
मुंबई आणि ठाणे ही शहरे केवळ महाराष्ट्राची आर्थिक आणि औद्योगिक केंद्रे नाहीत, तर ती निसर्गाच्या कुशीत वसलेली शहरे आहेत. एका बाजूला अथांग अरबी समुद्र आणि दुसर्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विशाल हरित पट्टा लाभलेली ही शहरे भौगोलिकदृष्ट्या अत्यंत संपन्न आहेत. मात्र, मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच जेव्हा मुंबई-ठाण्यातील तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस ओलांडतो, तेव्हा ती केवळ एक हवामानाची बातमी उरत नाही; ती निसर्गाने दिलेली एक गंभीर ‘धोक्याची घंटा’ ठरते.
निसर्गाचा समतोल ज्या वेगाने बिघडत आहे, त्याचेच हे ज्वलंत उदाहरण आहे. मुंबई आणि ठाणे ही किनारी शहरे असल्यामुळे तेथील तापमान सहसा मर्यादित राहणे अपेक्षित असते. समुद्रावरून येणारे वारे जमिनीवरील उष्णता कमी करतात, तर जमिनीवरून समुद्राकडे जाणारे वारे रात्रीच्या वेळी शहराला थंडावा देतात. शिवाय, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे कॉलनीसारखे भाग शहराचे ‘फुफ्फुस’ म्हणून काम करतात. ठाणे शहर तर तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. या सर्व नैसर्गिक घटकांमुळे येथील हवामान मानवी जीवनासाठी सुसह्य होते. परंतु, गेल्या दोन-तीन दशकांत या भौगोलिक रचनेत मानवी हस्तक्षेपामुळे आमूलाग्र बदल झाले आहेत. मार्च महिन्यात जिथे तापमान साधारणपणे ३३ ते ३४ अंशांच्या आसपास असायला हवे, तिथे ते ४० अंशांवर पोहोचणे हे सूचित करते की, आपल्या शहरांची नैसर्गिक ‘कूलिंग सिस्टम’ आता पूर्णपणे कोलमडली आहे.
पर्यावरणशास्त्रात सध्या ‘अर्बन हीट आयलंड’ या संकल्पनेची मोठी चर्चा आहे आणि मुंबई-ठाणे ही शहरे त्याचे उत्तम उदाहरण बनली आहेत. शहरात ज्या वेगाने सिमेंट-काँक्रीटचे जाळे पसरले आहे, त्या तुलनेत मोकळ्या जागा आणि झाडे कमालीची कमी झाली आहेत. काँक्रीट, डांबर आणि इमारतींच्या काचा दिवसभर सूर्याची प्रखर उष्णता शोषून घेतात. नैसर्गिक जमीन किंवा झाडे ही उष्णता परावर्तित करतात, मात्र काँक्रीट ती साठवून ठेवते. रात्रीच्या वेळी वातावरण थंड होणे अपेक्षित असते, तेव्हा हे काँक्रीट साठवलेली उष्णता हळूहळू बाहेर सोडायला लागते. यामुळे शहराच्या रात्रीही तापलेल्या राहतात. आसपासच्या ग्रामीण किंवा हरित भागाच्या तुलनेत शहराचे तापमान ३ ते ५ अंशांनी अधिक भरते, यालाच ‘अर्बन हीट आयलंड इफेक्ट’ म्हणतात.

आज मुंबई-ठाणे हे एक विशाल उष्णतेचे बेट बनले असून, तेथील रहिवाशांना घराबाहेर आणि घरातही प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. विकासाच्या नावाखाली आपण हजारो झाडांची कत्तल केली आहे. रस्ते रुंदीकरण, उड्डाणपूल, मेट्रो प्रकल्प आणि टोलेजंग गृहप्रकल्प यांसाठी निसर्गाचा बळी दिला गेला. एक मोठे वृक्ष जेवढा थंडावा देतो, तेवढा थंडावा निर्माण करण्यासाठी १० वातानुकूलन यंत्रे लागतात. झाडे तोडल्यामुळे जमिनीची उष्णता शोषून घेण्याची क्षमता संपली आहे. या वाढत्या तापमानाला केवळ झाडांची कमतरता कारणीभूत नाही, तर वाढते वायू प्रदूषणही तितकेच जबाबदार आहे. वाहनांची वाढती संख्या, कोळशावर आधारित उद्योग आणि बांधकामातून उडणारी धूळ यामुळे वातावरणात प्रदूषित कणांचे प्रमाण वाढले आहे. हे कण वातावरणात एका आवरणासारखे काम करतात आणि जमिनीवरून बाहेर पडणारी उष्णता अंतराळात जाण्यापासून रोखतात, ज्याला स्थानिक पातळीवर ‘ग्रीनहाऊस इफेक्ट’ म्हटले जाते.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई आणि ठाण्याच्या सीमांना जोडणारे जगातील अशा प्रकारचे एकमेव जंगल आहे जे महानगराच्या मध्यभागात आहे. मात्र, या जंगलावरही आज विकासाचा आणि अतिक्रमणाचा मोठा दबाव आहे. जंगलाच्या सीमा दिवसेंदिवस धूसर होत चालल्या आहेत. बांधकामांचा धूर, धूळ आणि मानवी गोंगाट थेट जंगलाच्या गाभ्यापर्यंत पोहोचत आहे. जर हे जंगल सुरक्षित राहिले नाही, तर मुंबई-ठाण्याचे तापमान भविष्यात ४५ अंशांपर्यंत जाण्यास वेळ लागणार नाही. ठाणे ‘तलावांचे शहर’ आहे, तसेच मुंबईतही एकेकाळी अनेक तलाव होती आणि मिठीसारख्या नद्या वाहत्या होत्या. निसर्गात पाण्याचे साठे तापमान नियंत्रणाचे सर्वात मोठे साधन असतात. बाष्पीभवनाच्या प्रक्रियेमुळे आसपासचा परिसर थंड राहतो. दुर्दैवाने, अनेक तलाव आज अतिक्रमणामुळे आकुंचन पावले आहेत. ज्यांना शहराचे ‘स्पंज’ म्हटले जाते, त्या पाणथळ जागा बुजवून तिथे सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. पावसाचे पाणी जमिनीवर जिरण्याऐवजी ते थेट वाहून जाते आणि जमिनीतील ओलावा संपल्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता अधिक प्रकर्षाने जाणवते.
आपण समुद्राच्या वाढत्या पातळीचा आणि किनारपट्टीच्या तापमानाचा विचार करतो तेव्हा या समस्येचे गांभीर्य आणखी वाढते. अरबी समुद्राचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढल्याने समुद्रावरून येणार्या वार्यांमधील आर्द्रता वाढली आहे. यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा ‘फील लाइक’ तापमान, म्हणजे जाणवणारी उष्णता कितीतरी जास्त असते. घामाचे बाष्पीभवन न झाल्याने शरीराला होणारा त्रास अधिक तीव्र होतो. हे बदल केवळ नैसर्गिक चक्राचा भाग नसून ते मानवी चुकांचे परिणाम आहेत.
वाढत्या उष्णतेचा परिणाम केवळ पर्यावरणावर होत नाही, तर तो थेट मानवी आरोग्यावर आणि सामाजिक जीवनावर होत आहे. उष्माघात, निर्जलीकरण आणि हृदयविकाराचे धोके वाढले आहेत. विशेषत: उन्हात काम करणारे मजूर, रिक्षाचालक, ट्रॅफिक पोलीस आणि रस्त्यावरील विक्रेते यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाढत्या उष्णतेमुळे घराघरात वातानुकूलन यंत्रांचा वापर वाढतो, ज्यामुळे पुन्हा कार्बन उत्सर्जन वाढते. या दुष्टचक्रातून बाहेर पडणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. गरीब वस्त्यांमध्ये जिथे झाडांची सावली नाही आणि घरांची छते पत्र्याची आहेत, तिथे उष्णतेचा हा दाह जीवघेणा ठरतो. या उष्णतेमुळे केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो; चिडचिडेपणा वाढणे, कामातील उत्पादकता घटणे आणि झोपेचे विकार या समस्या आता सामान्य झाल्या आहेत.

या परिस्थितीत केवळ चिंता व्यक्त करून चालणार नाही, तर आपल्याला युद्धपातळीवर धोरणात्मक बदल करावे लागतील. शहरात जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे ‘मियावाकी’सारखी घनदाट छोटी जंगले उभी करावी लागतील. केवळ शोभेची परदेशी झाडे न लावता वड, पिंपळ, कडुनिंब, उंबर यांसारखे देशी आणि डेरेदार वृक्ष लावले पाहिजेत, जे अधिक प्राणवायू देतात आणि पक्ष्यांनाही आश्रय देतात. शहरी नियोजनाचा विचार करताना नवीन इमारतींच्या रचनेत गच्चीवर बागा अनिवार्य केल्या पाहिजेत आणि भिंतींना अशा प्रकारचे रंग लावले पाहिजेत जे उष्णता परावर्तित करतील. सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देऊन वैयक्तिक वाहनांची संख्या मर्यादित केल्यास रस्त्यावरील डांबराचे तापमान आणि हवेतील प्रदूषण दोन्ही कमी होईल. प्रत्येक गृहनिर्माण संस्थेने ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’सोबतच आवारात किमान दहा मोठी झाडे लावण्याचा संकल्प सोडला पाहिजे.
प्रशासन त्यांचे काम करेलच, पण नागरिक म्हणून आपणही जबाबदारी ओळखली पाहिजे. शहर हे केवळ प्रशासनाचे नसून ते तिथल्या नागरिकांचेही असते. त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन जीवनात ऊर्जेची बचत करणे, सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणारे प्लास्टिक टाळणे, ही आता केवळ औपचारिकता राहिलेली नाही, तर ते आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे.
आज मुंबई-ठाण्यात मार्चमध्येच ४० अंश तापमानाची नोंद होणे हा निसर्गाचा आपल्याला दिलेला शेवटचा इशारा असू शकतो. शहरे ही केवळ काँक्रीटच्या चौकटी नसून ती श्वास घेणारी एक जिवंत व्यवस्था असावी लागते. आपण विकासाची व्याख्या बदलण्याची वेळ आता आली आहे. विकास म्हणजे केवळ उड्डाणपूल आणि मेट्रोचे जाळे नव्हे, तर ज्या शहरात माणूस मोकळा श्वास घेऊ शकेल आणि जिथे उन्हाळ्याच्या दुपारीही झाडाची सावली मिळेल, तो खरा विकास. जर आपण निसर्गाला प्रगतीत सन्मानाचे स्थान दिले नाही, तर निसर्ग आपल्याला त्याच्या अस्तित्वातून बेदखल करेल. आपण येणार्या पिढीला केवळ सिमेंटचे टॉवर्स आणि बँक बॅलन्स देऊन चालणार नाही, तर त्यांना श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा आणि राहण्यासाठी सुसह्य तापमान असलेले शहर देणे हीसुद्धा आपली नैतिक जबाबदारी आहे.
आपण विकासाच्या नावाखाली निसर्गाला किती किंमत मोजायला लावणार आहोत? निसर्गाचा समतोल राखणे ही आता केवळ चैन नसून ती जगण्यासाठीची अपरिहार्यता बनली आहे. या प्रश्नाचे उत्तर आपण आज शोधले नाही, तर उद्या निसर्ग स्वतः त्याचे उत्तर देईल आणि ते मानवासाठी अत्यंत कठोर असू शकते. येणारा काळ आपल्या सर्वांसाठी अग्निपरीक्षेचा असेल.
