
बा रा ज्योतिर्लिंगांतील सर्वात पहिल्या आणि परकी आणि यवनांच्या आक्रमणाने कैक वेळा धराशायी झालेल्या सोमनाथ मंदिराच्या सरदार वल्लभभाई पटेलांच्या शुभहस्ते झालेल्या पुनर्निर्माणाला नुकतीच ७५ वर्षे पूर्ण झाली. ‘इव्हेंटपुरुष’ प्रधान सेवक नरेंद्र मोदी यांनी त्याचाही ‘इव्हेंट’ केला आणि महामहीम राज्यपालांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रत्येकाने ‘एकाला लागली चट…’ या न्यायाने या इव्हेंटमध्ये झोकून दिले. पानपानभर जाहिराती देणे हा तर यांच्या डाव्या हातचा मळ. या सोहळ्यानिमित्त भारतीय जनता पक्षाने सरकारच्या खर्चाने देशभरात एक उत्सव केला. देश चालवण्याची जबाबदारी असलेल्या पंतप्रधानांनी संपूर्ण दिनचर्या जर मंदिर चालवण्यात आणि पूजाअर्चा यातच घालवली आणि त्याला राज्यपाल आणि मुख्यमंत्री, मंत्री यांनी साथ दिली तर मग हिंदुस्थानच्या १४० कोटी नागरिकांनी करायचे काय? हा मूलभूत सवाल आहे.
अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी मंदिराचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होता तेंव्हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुस्पष्टपणे सल्ला दिला होता की संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजूर करून घेत हा प्रश्न मार्गी लावावा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही हीच भूमिका मांडताना ‘मंदिर वहीं बनाएंगे मगर तारीख नहीं बताएंगे’, अशा शब्दांत खिल्ली उडविली होती. परंतु ते ऐकण्यात आले नाही. आणि सर्वोच्च न्यायालयाने हा प्रश्न मार्गी लावला. मात्र जणू हा निर्णय आपणच घेतला असल्याचे भासवून स्वतःच्या टिर्या बडवून आधी भूमिपूजन आणि नंतर लोकार्पण करण्यात आले. याचाही निवडणुकीच्या प्रचारात पुरेपूर वापर करून, ‘जो राम को लाये हैं, हम उनको लायेंगे’, अशा घोषणांनी माहौल बनविण्यात आला. तरीसुद्धा काळारामाच्या नाशिकमध्ये शिवसेनेचे रामभाऊ वाजे हे खासदार म्हणून दणदणीत मतांनी निवडून आले, तर अयोध्येत समाजवादी पक्षाचे उमेदवार संसद भवनात पोहोचले. काशी विश्वनाथ मंदिर असलेल्या पावन भूमीत मोदी स्वतः तीन फेर्या मागे होते. प्रभू श्रीरामचंद्रांनी पाठ फिरवली परंतु भगवान शंकरांने नाक कापण्यापासून वाचविले (असावे).

मुळात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी अयोध्येत प्रभू रामलल्लाचे दर्शन खुले केले. तसेच तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांनी ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद उद्ध्वस्त होण्याचा मार्ग प्रशस्त केला. ज्या क्षणी बाबरी पतनास प्रारंभ होत असल्याचे नरसिंह राव यांना समजले, त्याक्षणी हा प्रकांड पंडित, उच्चविद्याविभूषित नेता आपल्या निवासस्थानी दार बंद करून महापूजेला बसला आणि बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्याचे समजताच त्यांनी महापूजा थांबविली. या मान्यवरांनी याचा कधी ‘इव्हेंट’ केला नाही की त्याचे ‘फोटोसेशन’ करीत स्वतःच्या टिर्या बडवून घेतल्या नाहीत.
सोमनाथ मंदिर पुनर्निर्माण अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सौराष्ट्राच्या सोमनाथ मंदिराच्या गर्भगृहात स्वतः मोदी भस्म लावून महापूजेला बसले आणि त्याचवेळी आमचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महालक्ष्मी मंदिर येथील धाकलेश्वर महादेव मंदिरात महापूजा बांधली. पान पानभर जाहिरातीत मुख्यमंत्री भगवी टोपी परिधान करून दिसताहेत. परंतु दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हातात राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्र असलेल्या लोकराज्य. ज्याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. हां एक म्हणता येईल की बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना तयार केली, त्या राज्यघटनेच्या आम्ही कशा चिरफळ्या उडविल्या त्याची जनतेला निश्चितच आठवण करून देणारे हे छायाचित्र आहे.
सर्वत्र अमृतमहोत्सवी सोहोळ्याचा ‘अमृतकाल’ असा उदोउदो चाललाय, परंतु गेल्या ७५ वर्षांत अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा पूर्ण करू शकलो आहोत का? ते करण्यासाठी ज्यांना निवडून दिले आहे, ते देश चालविण्याऐवजी देवळेच चालवत असतील तर त्यांना काय म्हणणार? हिंदुस्थानात आठ पीठांचे आठ शंकराचार्य आहेत त्यांना ही कामे सोपविणे केव्हाही चांगले, अशी सर्वसामान्य माणसांची भावना आहे. अरे, हे देश चालवताहेत की देवळं? असा साधा प्रश्न जर सर्वसामान्य माणूस उपस्थित करता झाला तर तो दोष कुणाचा? आमचे एक सन्मित्र प्रकाश सावंत यांनी त्यांच्या कोकणातील चिपळूण तालुक्यातील निर्व्हाळ या गावी मंदिर उभारणीस विरोध केला आणि देशाला मंदिरांची नाही, तर विद्यामंदिरांची गरज आहे, असे निक्षून सांगितले. पण लक्षात कोण घेतो? तूर्तास इतकेच!
(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.)

