ठराविक दिवसांत काही चर्चा अपरिहार्य असतात म्हटले तरी वावगे ठरायला नको, जसे गणपतीच्या दिवसांत मोदक उकडीचा की तळणीचा, होळीला पुरणपोळी साखरेची का गुळाची, दिवाळीत अनारश्यांचेही तसेच! अर्थात ही चर्चा त्या पदार्थाच्या रूपाने एकाप्रकारे विभिन्न संस्कृतींमधला फरक अधोरेखित करत असते. कालच एके ठिकाणी वाचल्याप्रमाणे, चूक-बरोबर किंवा श्रेष्ठ-कनिष्ठ असे काहीच नसते, तर सामुग्रीच्या उपलब्धतेनुसार व सांप्रत हवामानाला मानवतील असे बदल त्या त्या पाककृतीमध्ये होतात व रुजतात. ‘नैवेद्यम समर्पयामी’ असे म्हणून हात जोडले की साधा खडीसाखरेचा खडादेखील जास्त गोड बनतो, तिथे या नानाविध संकीर्ण पदार्थांची काय कथा? बनविणार्याचा भक्तिभाव हाच खरं तर कोणत्याही प्रकारच्या मोदकाला जास्त चवदार बनविणारा मुख्य घटक! बाप्पाबरोबरच बनविणार्या व खाणार्यालाही तृप्त करणारा!
आमच्याकडे कायमच भाद्रपदात चतुर्थीला तळणीचे तर पंचमीला उकडीचे मोदक बनवले जातात. आता जरी वर्षानुवर्षाच्या सवयीने उकडीचे मोदकही छान जमत असले तरी बाप्पा विराजमान होणार त्या दिवशी मूळचे हातखंडा असलेले तळणीचे मोदकच केलेले चांगले हा त्यामागचा आईचा सुज्ञ विचार. या तळणीच्या मोदकांमध्येही अनेक शाखा उपशाखा आढळतात नाही का? अगदी पारीमध्ये व सारणामध्येपण! पारीचं म्हणाल तर नुसत्या कणकेत कडकडीत तुपाचं मोहन व थोडा रवा घाला किंवा निम्मा निम्मा बारीक रवा व मैदा मिसळून त्यात तुपाचे मोहन व निरसे दूध घालून भिजवा. नुसत्या रव्याचे किंवा मैद्याचे पण होतातच की हे मोदक वेळप्रसंगी. सारणाच्या प्रकारांना तर गणतीच नाही, करू तितके प्रकार कमी. सुकं खोबरं, खसखस, थोडी कणिक असं सगळं भाजून त्यात पिठीसाखर व सुकामेवा मिसळला की एक प्रकार बनतो. खवा भाजून त्यात गार झाल्यावर ओल्या नारळाचा चव व पिठीसाखर घातले की सारणाचे दुसरे रूप बनते. उकडीच्या मोदकाप्रमाणेच ओला नारळ व गुळाचे सारण भरलेला तळणीचा मोदकही अव्वल लागतो बरं! पुरणाचा मोदकही चविष्ट बनतोच की. सुकामेवा व वेलदोड्याची पूड हे सगळीकडे सामायिक पण ऐच्छिक घटक. एकदा का आपापल्या आवडीचा भिजवलेला पारीचा गोळा थोडा मुरला व सारण गार झाले की मोदक बनवायला सुरुवात करता येते. नेहमीच्या पुरीपेक्षा जरा मोठी पुरी लाटायची, तळहातावर ती पारी उचलून त्याला बारीक कळ्या काढायच्या व तयार वाटीच्या आकारात सारण भरून त्या सगळ्या कळ्या हलक्या हाताने पण घट्ट चिकटतील, अशा एकत्र आणायच्या, वर जास्त पारीचा भाग शिल्लक राहात असेल तर शेंडी उडवून मोदकाला छान आकार द्यायचा. मध्यम ते मंद आचेवर मोदक तळायचे. खमंग चवीचे व खुसखुशीत ते खुटखुटीत पारीचे टिकावू मोदक तयार!
या मोदकांना आकार देण मला तरी तुलनेत कठीण वाटतं. पारी तशी नाजुक असते हाताळायला व उकडीला जसा घट्टपणामुळे दिलेला आकार कायम राहतो, तसे इथे नाही! मात्र सर्वसाधारण पुरीचेच पोटात गोडवा भरलेले व सगळी टोकं एकत्र होऊन बनलेले हे रूप बाप्पाचे आवडते पक्वान्न बनते! एकदा ठरविले तर अतिशय सहज अगदी रोजच्या पोळ्यांच्या कणकेनेही उपलब्ध गोडवा सामावत सगळ्या कडा जुळवून घेतल्या तर मोदक बनू शकतो, नाही का?
आयुष्याचे ध्येय गाठायलाही केवळ तसे स्वप्न बघून होत नाही, तर भावभावनांच्या जोडीला, विचार व कृती ह्या सगळ्यांची सांगड घातली तरच आपण तो ध्येयस्वप्नपूर्तीचा आनंद अनुभवू शकतो! एका व्यक्तीपुरते मर्यादित असेल तर स्वत:चे नानाविध भाव, राग लोभ जसे आतल्या आत जुळवून घ्यावे लागतात तसेच कुटुंबाला, समाजाला एखादे ध्येय गाठायला एकमेकांच्या क्षमतांचा आदर राखत, गुणांची कदर करत पुढे जाताना आधी एकत्र यावे लागते. आपापसात भांडणारे कौरव पांडव देखील बाहेरच्या शत्रूसाठी ‘वयं पंचाधिकं शतम’ असे म्हणून कायम सर्वश्रेष्ठ ठरले तर आपण काय वेगळे?
एका मरणासन्न व्यक्तीला म्हणे त्याच्या पश्चात सर्व मुलांनी एकत्र राहावे ही इच्छा होती. मुलांमध्ये असलेल्या कुरबुरींची जाणीव असल्यांनी त्यानी केवळ शब्दाने नाही तर अनुभवांनी मुलांना सल्ला द्यायचे ठरविले. सर्वांना एकेक काठी देऊन ती मोडायला सांगितली, काठ्या मोडल्या. मात्र तशाच काठ्यांची मोळी बांधून ती मोडून बघायला सांगितली तर ती काही मोडली नाही. आपापसातले मतभेद, अहंकार वगैरे बाजूला सारून एकत्र येण्याची शिकवण पुढे त्यांना कायम जशी उपयोगी पडली तशीच तुम्हाआम्हालाही पडो हीच सदिच्छा!
वैयक्तिक पातळीवरही हुशारी का चिकाटी, मेहनत का चतुराई असे भेदभाव न करता मोदकाच्या सगळ्या कळ्यांप्रमाणे जर हे आपल्याच व्यक्तिमत्वाचे कंगोरे एक केले तर अगदी सामान्यांचीही असामान्य स्वप्न, ध्येय नक्कीच पूर्ण होतात हे निश्चित. सर्व बाजूने एकत्र येताना मनात मात्र सकारात्मकतेचा गोडवा साठवायला विसरायचं नाही बरं का!! एकदा का आयुष्य जगताना ही कृती जमली की जन्माचं सार्थक होणार हेच खरं, अगदी बाप्पाच्या शिदोरीत बांधल्या जाणार्या, तळणीच्या मोदकासारखच!!