‘थँक्स डिअर’ हे आयुष्यातील स्पर्धेच्या चढाओढीवर विनोदी अंगाने भाष्य करणारं नाटक घेऊन लेखक-दिग्दर्शक निखिल रत्नपारखी आणि तुषार गवारे ही जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करायला आली आहे. प्रमुख भूमिकेत निखिल रत्नपारखी आणि हेमांगी कवी आहेत.
या नाटकाविषयी बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री हेमांगी कवी म्हणाल्या, या आधी माझं ‘ओवी’ हे नाटक आलं होतं. त्यांनतर कोविडमुळे दोन वर्षं सगळं थांबलं होतं. मधल्या काळात माझ्याकडे अनेक नाटकांच्या नवीन संहिता वाचनासाठी आल्या होत्या, पण मला त्या फारशा आवडल्या नव्हत्या. रंगभूमीवर माझी इमेज ‘इंटेन्स भूमिका करणारी अभिनेत्री’ अशी झाली होती. ती ब्रेक करायला मी एक हलकी फुलकी भूमिका असलेलं नाटकं शोधत होते. ती भूमिका या नाटकात मिळाली. निखिल रत्नपारखी हे स्वतः एक अभिनेते असल्यामुळे त्यांचं दिग्दर्शन तालीम मास्तर पद्धतीचं नसून ते कलाकाराला भूमिकेचा ठहराव शोधायला पुरेसा अवधी देतात. काय आहे हे नाटक? जीवनाच्या स्पर्धेत प्रत्येकजण जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. सिने-नाटक क्षेत्रातील स्ट्रगलर्स, त्यांच्यातील स्पर्धा, यश अपयश या गोष्टींवर हे नाटक भाष्य करतं. मी या क्षेत्रात अनेक वर्ष काम करत असल्यामुळे आणि माझा स्ट्रगल अजूनही सुरू असल्याने मला ही भूमिका फार जवळची वाटते. या क्षेत्रात काम करणार्या आणि येऊ इच्छिणार्या व्यक्तींना या नाटकाच्या निमित्ताने एक रियालिटी चेक मिळेल.
निखिल रत्नपारखी म्हणाले, या नाटकाचा आराखडा डोक्यात होता, पण ते शब्दांत मांडणं काहीवेळा अवघड होतं. कोणत्याही नाटकाची लेखन प्रक्रिया काही अंशी पेनफुल असते, नाटक लिहित असताना अनेकदा यापुढे काय घडेल याबाबत दिवसभर काहीही सुचत नाही. मग रात्री तीन वाजता अचानक काही तरी सुचतं आणि गुंता सुटत जातो. लेखनाचा असा गमतीशीर प्रवास होत गेला. हे दोन कलाकारांचं नाटक आहे. त्यामुळे कुठेही संथ होणार नाही खूप काळजी घ्यावी लागली. मी आणि तुषार आम्ही दोघे या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन करताना आमचे विचार एकाच दिशेने वाटचाल करत होते. त्यामुळे बर्याचदा मी एखाद्या कल्पनेवर विचार करत असताना तो ते बोलून दाखवत असे. माझी या नाटकातील भूमिका एका दिग्दर्शकाची आहे.त्याच्याकडे एक अभिनेत्री प्रशिक्षण घ्यायला येते. हा दिग्दर्शक थोडासा तिरसट आहे. पुढे रंगमंचावरच पाहा. प्रेक्षकांना हे नाटक नक्की आवडेल अशी मला खात्री आहे.
लेखक, दिग्दर्शक तुषार गवारे म्हणाले, निखिल गेली अनेक वर्षे जाहिरात, चित्रपट आणि नाटक या क्षेत्रात काम करतोय. या क्षेत्राच्या ग्लॅमरला भुलून आलेले तरुण त्यांना येणार्या अडचणी, आपल्यापेक्षा कमी टॅलेंट असणारी माणसं क्लृप्त्या लढवून पुढे जातात तेव्हा त्यांची होणारी कुचंबणा, नैराश्य, त्या अनुभवातून शिकत त्यांनी मिळवलेले यश त्याने पाहिलं आहे. या निरीक्षणातूनच त्याला या नाटकाचा विषय सुचला. सोशल मीडियावरील बॉयकॉट ट्रेण्ड, ट्रोलिंग या विषयावर देखील हे नाटक भाष्य करतं. आम्ही दोघेही अभिनेते असल्यामुळे लेखन करताना हे नाटक कसं सादर होईल हे दिसायला लागलं. एक तत्वनिष्ठ माणूस आणि एक परिस्थितीनुसार स्वतःला बदलू शकणारी व्यक्ती अशा दोन भिन्न व्यक्तिमत्त्वांविषयी बोलणारं हे नाटक आहे. नाटकाच्या प्रत्येक प्रवेशाला पुढे काय घडेल असे आखाडे प्रेक्षक बांधत असतात त्या अंदाजांना धक्का देत हे नाटक पुढे जातं.
निर्माते राहुल भांडारे म्हणाले, मी नेहमीच रंगभूमीवर वेगवेगळे विषय आणण्याला प्राधान्य देतो. निखिल रत्नपारखी यांच्यासोबत मी ‘टॉम अँड जेरी’ हे नाटक केलं होतं. त्यांची लेखनशैली गंभीर विषयावर हसत खेळत व्यंगात्मक भाष्य करणारी आहे आणि दिग्दर्शक म्हणून ते इतरांपेक्षा वेगळी मांडणी करतात. हेमांगीसोबत मी ‘ठष्ट’ हे नाटक केले होते. त्यामुळे ती किती ताकदीची अभिनेत्री आहे याची मला जाणीव होती. तिच्या नेहमीच्या बाजापेक्षा वेगळी भूमिका या नाटकात आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये काहीही करुन प्रत्येकाला जिंकायचे आहे. कोणतेही तारतम्य न बाळगता आपण फक्त यशाच्या दिशेने धावत असतो. ते करत असताना कोणत्या पातळीवर जाऊन आपण तडजोडी करतोय याचा विचार करण्याची गरज आहे. यश मिळवताना काय करावं लागतं आणि अपयश आल्यावर काय करावं या दोन्ही गोष्टीवर हे नाटक भाष्य करतं.
‘अलबत्या गलबत्या’ या नाटकात राजकन्येची भूमिका करून अनेक लहान मुलांच्या भावविश्वात स्थान मिळवणार्या अभिनेत्री श्रद्धा हांडे प्रथमच निर्मिती क्षेत्रात उतरत आहेत. त्या म्हणाल्या, रंगमंचावर काम करताना नाटक चालवायला किती मोठा घाट घातला जातो हे कळत नाही. निर्माती म्हणून नाटक उभं करताना एका वेगळ्याच जबाबदारीची जाणीव होतेय. या नाटकाच्या निमित्ताने कलेची जाण असलेले निर्माते, उत्तम कलाकार, आशयघन नाटक आणि वेगळ्या धाटणीचे दिग्दर्शन यांची चांगली भट्टी जमली आहे. हे नाटक प्रेक्षकांचे मनोरंजन करेल अशी मला खात्री आहे.