कोरोनाच्या संदर्भात महाराष्ट्र सरकार गंभीर व खंबीर असले, तरी या कोरोना लाटांच्या चढउतारात जर वारंवार समाज घरात ‘लॉक’ केला गेला, तर परत परत घबराट, झुंबड, तडफड, बेरोजगारी, निराशा, आत्महत्या असे चित्र निर्माण होईल. (महाराष्ट्र सरकारच्या विरोधात विद्रोही वातावरण निर्माण करण्यासाठी त्याचा राजकीय फायदाही उठवला जाईल.)
जसा मास हिस्टेरियाचा उन्माद असतो, तसा हा मीडियानेही न्यूज हॉरर सतत ओतून वाढवलेला भयभीतीचा मास फोबिया, सामुदायिक भयाचार आहे! टाळेबंदीला पर्याय शोधले नाहीत, तर कोरोनासोबत, कोरोनासह जगण्याची सवय कधी व कशी होणार? तेव्हा लॉकडाऊनला पर्याय शोधले, तरच भीती कमी कमी होत जाईल! पोलिसांच्या मदतीला तरुणांची ‘स्कॉड्स’ दिली जावी!
ऑफलाइन उच्चशिक्षण शक्य आहे. त्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी व संघटना यांचे सहकार्य घेत कॉलेज प्रशासनाचे अधिकार (व पर्यायाने जबाबदारी) वाढवावी लागेल. ज्या विषयांना फार कमी विद्यार्थी आहेत. ते शिस्त व अंतर पाळत सहजपणे वर्गात येऊ शकतात.
सरसकट एकच नियम कोरोनायुद्धात चुकीचा ठरतोय. अठरा वर्षावरील विद्यार्थी काही दिवसभर घरात बसून राहात नाहीत. पार्टटाइम कामावरही जातात. वेल्डिंगसारखी कामे करणारे कॉलेज विद्यार्थी कोकणात आहेत. दुकानात काम करणारे आहेत. मग त्यांना कॅम्पसवर येणेच फक्त धोकादायक का ठरावे? त्यांचा ताप रोज मोजा. मास्क सक्तीचा करा. लसीकरण करा. शिक्षकांचीही दरवर्षी कोरोना टेस्ट घ्या. इव्हेंट, गॅदरिंग, ट्रिप टाळा, पण अभ्यास तर होऊ द्या!
मी ‘पार्ले कॉलेज’ला फार पूर्वी शिकलो. तेव्हा छोटे गट करून इंग्रजीसारखे विषय आम्हाला शिकवले जायचे. अशी एकेक बॅच वेगवेगळ्या दिवशी वर्गात येऊन शिकू शकते. फक्त योजकता व कल्पकता हवी आहे! सार्वजनिक ठिकाणी (मास्क खाली सरकवून) मोबाइलवर लोक बोलत राहतात. त्यामुळेही कोरोना वाढू शकतो. लग्नाचा समारंभ न करता, नोंदणी पद्धतीने(च) लग्न करावे लागेल असा फतवा का नाही? तेव्हा कोरोनाचे खरे प्रसारमार्ग बंद करावे. मार्केट सुरूच हवे! तुम्ही प्रबोधन कसे करता ते आम्ही बघतो असे गळचेपीचे वातावरण असेल. महाराष्ट्रातील विचारवंत जर दहशतीखाली राहिले किंवा त्यांना काही स्पेस नसेल, ओळखतही नसेल, तर काही साध्य होणार नाही! बघा बुवा!!
– माधव गवाणकर, दापोली (रत्नागिरी)
कोरोनाच्या प्रसाराला रोखण्यासाठीच्या साध्यासाध्या नियमांच्या पालनात आपण समाज म्हणून सपशेल अपयशी ठरलो आहोत, नागरिकशास्त्रात शून्य गुणांनी नापास झालो आहोत. त्याचबरोबर कोरोनावर एकमेव खात्रीशीर उपाय असलेल्या लसीकरणाचा केंद्र सरकारने उडवून दिलेला बोजवारा पाहता तिसरी लाट आली तर कोणतेही सरकार टाळेबंदीपेक्षा वेगळ्या मार्गाची जोखीम पत्करणार नाही. टीव्ही चॅनेलांवर टीआरपीसाठी सुरू असलेला भयभीतीचा मारा अतिरेकीच असला, तरी डेल्टा प्लसचा धोका, म्युकर मायकॉसिसचं भय या वातावरणात धाडसी मार्ग पत्करल्यास उत्तर प्रदेश, बिहारसारखी स्थिती ओढवू शकते. समाजावर प्रभाव असलेल्या विचारवंतांनी सरकारच्या प्रबोधनाबरोबरच अधूनमधून समाजाचेही प्रबोधन करायला हवे, समाजाला नियम पाळायला शिकवायला हवे.