अजय कायमच उनाड म्हणून प्रसिद्ध होता. उनाडक्या करणे म्हणजे काय हे अजयकडे पाहून कोणालाही सहज समजेल असा त्याचा शैक्षणिक प्रवास होता. प्राथमिक शाळेत असताना वर्गात दंगा करणारा, शांत न बसणारा मुलगा ही त्याची ओळख हायस्कूलमध्ये गेल्यावर मात्र वर्गातील सर्वात त्रासदायक मुलगा यात रूपांतरित झाली होती. एखाद्या शिक्षिकेची मुलांकडे पाठ वळली किंवा तिने फळ्यावर काही लिहायला सुरुवात केली की सार्या वर्गाला खदाखदा हसवण्याची संधी अजय कधी सोडत नसे. शिक्षिका मुख्याध्यापकांकडे घेऊन गेल्या तरी पण त्याच्यावर परिणाम शून्य. अजयच्या पालकांना शाळेत बोलावले तर त्यांचा तो मुलगा शोभू नये, इतके ते साधेभोळे, सरळ स्वभावाचे. वडील एका कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करत, तर आई घरातूनच शिवणकाम करून चार पैसे मिळवत असे. अजय एकटाच. भावंडे नाहीत.
शाळा सुटल्यावर थेट घरी येणे त्याला कधीच जमले नाही, आवडतही नव्हतेच. आईचा धाक फारसा राहिला नव्हता आणि वडील घरातच नसायचे. दुकानातून वडिलांची घरी येण्याची वेळ रात्री दहाची. तोवर जेवण करून अजय झोपलेला. शाळेच्या तक्रारी, अजयचे वागणे, त्याची अभ्यासातील अधोगती पाहून वडिलांची चिंता कायम वाढत होती. एखाद्या दुकानात सेल्समन म्हणून त्याला कामाला लावणेही शाळा संपल्यावर शक्य होणार नाही, असे वडिलांना जाणवू लागले होते.
त्यातच इयत्ता सातवीत अजय चार विषयांत नापास झाला. केवळ परीक्षा घ्यायची नाही असा नियम असल्यामुळे अजयला वरच्या वर्गात ढकलले गेले. नापास झाल्यामुळे शेजार्यांच्या बोलण्यातून, शिक्षकांच्या चिडवण्यातून, मित्रांच्या टाळणार्या नजरेतून थोडीशी अजयचे मनात बोच निर्माण झाली. मार्क चांगले पडतील किंवा नाही, हे सोडा; पण आता नापास व्हायचे नाही, याची अजयने मनाशी खूणगाठ बांधली. वर्गात खोड्या काढणे कमी न होताही प्रत्येक विषयात चाळिशीतला आकडा जेमतेम गाठत अजय आठवी पास झाला. नववी चालू असताना गॅदरिंगमध्ये शाळेच्या एका माजी विद्यार्थ्यांचा सत्कार ठरला होता. सत्काराचे कारण सुद्धा तसेच होते. शालेय जीवनात फारसा कोणालाही माहीत नसलेला, आठवत नसलेला श्यामसुंदर सोनावणे याने बँकॉक येथे स्वतःचे हॉटेल सुरू केले होते. भारतातून बँकॉकला जाणार्या महाराष्ट्रीयन लोकांना त्या हॉटेलात खास आदरातिथ्य कसे मिळते याचे वर्णन एका मोठ्या वृत्तपत्रात छापून आले होते. त्या बातमीत श्यामसुंदरने त्याच्या शाळेचाही उल्लेख केलेला त्या वृत्तपत्राने छापला होता. ‘माझ्या शाळेने केलेल्या संस्कारांमुळेच मी मोठा झालो’ अशा त्या उल्लेखामुळे शाळेचे संचालक, मुख्याध्यापक व शिक्षक सारे चकित झाले होते. श्यामसुंदर सोनावणे कोणाला आठवतही नव्हता. पण मग शाळेच्या दप्तरातून त्याचा सारा आगापिछा शोधला गेला. घराचा पत्ताही सापडला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शामसुंदरने गॅदरिंगला येण्याचे कबूल पण केले.
गॅदरिंगसाठी बोलावलेला प्रमुख पाहुणा म्हणून श्यामसुंदरचे एक छोटेसे भाषण झाले. नंतर त्याचा सत्कार झाला. आपल्या शाळेचा एक विद्यार्थी परदेशात जाऊन छानसा व्यवसाय सुरू करतो हे मुलांनाही जरा वेगळे होते. पण बहुतेक मुलांना तो हॉटेलचा व्यवसाय करतो हे फारसे भावले किंवा आवडले नव्हते. त्यातच हे बँकॉक शहर येते कुठे, कोणत्या देशात? याचाही मुलांना फारसा संदर्भ लागला नव्हता. अजयने मात्र एक वेगळीच गोष्ट केली. तसा धीटपणा त्याच्या अंगात बाणलेला होता. श्यामसुंदर स्टेजवरून खाली उतरताना पटकन पळत जाऊन त्याच्या समोर हातातली वही व पेन दिले. ‘सर, स्वाक्षरी करता का?’ म्हणून विनंती केली. कोणी आपली स्वाक्षरी मागतोय, हा शामसुंदरला पहिलाच अनुभव होता. त्याने कौतुकाने अजयची पाठ थोपटली व विचारले, तुला कोण व्हावेसे वाटते? अजयने सगळ्यांना ऐकू जाईल, असे मोठ्याने छान उत्तर देऊन टाकले. परदेशात जाऊन मला सुद्धा तुमच्यासारखा एखादा व्यवसाय करायला आवडेल. तुम्ही त्यासाठी मला मार्गदर्शन कराल का? अर्थातच श्यामसुंदरने दुसर्या दिवशी त्याला घरी बोलावले.
स्वप्नाला दिशा देणारी भेट
अजयच्या मनात पुढे काय करायचे याबद्दल कसलीही स्पष्टता नव्हती. मात्र परदेशात जायचे व काहीतरी करायचे हे बीज मात्र त्या भेटीत पक्के रुजले. आपल्या मार्कांचा, आपल्या शिकण्याचा आणि आई-वडिलांच्या पार्श्वभूमीचा इथे काहीही फायदा नाही. परदेशात काहीतरी करून जाऊ एवढे त्याच्या मनाने घेतले होते. त्यासाठी पैसे किती लागतात, किती शिकावे लागते, कधी जाता येते, असले कोणतेही प्रश्न अजयला पडणे त्या वयात शक्यही नव्हते. मात्र शामसुंदरच्या दुसर्या दिवशी झालेल्या भेटीनंतर अजयमध्ये पूर्णतः बदल घडला हे मात्र खरे. मुख्य बदल झाला होता, तो म्हणजे इतरांच्या रिकामटेकड्या खोड्या काढणे बंद झाले. अजय शांत झालेला पाहून शिक्षक त्याच्याकडे सहानुभूतीने पाहू लागले. त्याच्या अभ्यासाकडे थोडे त्यांनीही लक्ष देणे सुरू केले. अजयने मनाशी एक गोष्ट ठरवली होती, काठावर पास न होता किमान ५० टक्क्याचा आकडा आपण ओलांडायचा. नववीमध्ये ते त्याला जमले. आणि कधी नव्हे ते चक्क ६१ टक्के मार्क मिळवून अजय दहावी पास झाला. अजयच्या आई-वडिलांना खूपच आनंद झाला होता. मुलगा आता पदवीधर होणार, चांगल्या नोकरीला लागणार अशा त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. अजयच्या डोक्यामधले परदेशाचे वेड तात्कालिक होते व आता तो नीट शिकणार अशी त्यांची कल्पना मात्र अजयने सपशेल चुकीची ठरवली.
कौशल्य विकास कोर्स
मोठाल्या हॉटेलांमध्ये लागणारा हाउसकीपिंगचा सहा महिन्यांचा कोर्स एका संस्थेत सुरू झाला होता. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेखाली भारतातील दोनशे शहरांत अशा स्वरूपाचे अनेक अभ्यासक्रम सुरू झाले होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या अभ्यासक्रमाला फी नव्हती. उलट अभ्यासवृत्ती म्हणून महिना पाचशे रुपये मिळणार होते. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर शहरातीलच एका थ्री स्टार हॉटेलमध्ये उमेदवारीची निश्चिती होती. अजयच्या आई-वडिलांना हे सारे मान्य नसले तरी कॉलेजची फी भरायची नाही व अजयला स्वतःला पाचशे रुपये महिना मिळणार आहेत, याचाच एक प्रकारे आनंद झाला होता.
अभ्यासाचे पुस्तक म्हटल्यावर जांभई देणारा अजय प्रत्यक्ष काम शिकण्याच्या हाउसकीपिंगच्या अभ्यासक्रमात मनापासून रमला. अंगातील रग कामात जिरू लागली. प्रशिक्षणातील शिस्त तशी कडकच होती. दोन्हीचा मेळ होऊन अजय चक्क त्याच्या बॅचमध्ये पहिला आला. दहावीच्या मार्कांपेक्षा हे यश त्याला जास्त सुखावून गेले. जेमतेम सात दिवसांच्या सुट्टीनंतर एका थ्री स्टार हॉटेलमध्ये अजयची उमेदवारी सुरू झाली. एकवेळचे जेवण आणि ड्युटीवर असतानाचा चहा, नाश्ता तोही पोटभर व हवा तसा, हा एक वेगळाच अनुभव अजयला येत होता. सामान्य मराठी घरातील भाजी, पोळी, आमटी, भात या सार्वकालिक जेवणाऐवजी एक वेगळाच आनंद अजय अनुभवत होता.
अजय काम करत असलेल्या हॉटेलमध्ये अधूनमधून परदेशी पाहुणे पण उतरत. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर कंपनीच्या कामाकरता येणारे लोक फाईव्ह स्टारमध्ये उतरतात, कारण कंपनी त्यांचे पैसे भरत असते. तेच लोक स्वतः ट्रिपसाठी त्याच शहरात येतात तेव्हा ते थ्री स्टारमध्ये उतरतात. जेमतेम पस्तीशीचा एक कॅनेडियन नागरिक त्या हॉटेलमध्ये चार दिवस सलग मुक्कामाला होता. विल्सन ऊर्फ विली हे त्याचे नाव. रोज सकाळ संध्याकाळ अजयची व त्याची गाठ पडत होती. अजयची आदर्श आणि आदबशीर वागणूक त्याच्या नजरेत भरली होती.
कॅनडातील एका छोट्याशा शांत गावी त्याचं एक रिसॉर्ट होते. कमीतकमी मनुष्यबळ असलेला कॅनडा हा एक देश.
आपल्या रिसॉर्टमध्ये हा विविध कामासाठी खूप उपयोगी पडेल, विविध कामे शिकण्याची त्याची तयारी असेल हे त्याच्या नजरेने हेरले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅनेडियन माणसाला द्याव्या लागणार्या पगाराच्या जेमतेम साठ टक्के पगारात अजयला तो नोकरीला ठेवू शकत होता. विलीची गरज आणि अजयची इच्छा यांची छान सांगड घातली गेली. कॅनडात येण्यासाठी काय काय करायला लागेल, कोणती कागदपत्रे लागतील या सगळ्याची साग्रसंगीत माहिती अजयला देऊन विली कॅनडाला परत गेला. मात्र त्यापूर्वी त्याने अजयची सर्व माहिती कॅनेडियन एम्बसीला दिली. हा माणूस मला नोकरीला गरजेचा आहे असे पत्रही दिले.
सध्याची अजयची उमेदवारी संपल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे आणि पासपोर्ट काढून अजयने फक्त एम्बसीत जाऊन भेटायचे होते. यथावकाश अजय कॅनडात पोचला. रिसॉर्टमध्ये कामाला लागला. राहणे, जेवणे मोफत असल्यामुळे हातातील पगार डॉलर जमवण्यापुरता बाजूलाही पडत होता. पाहता पाहता कामाची तीन वर्षे गेली. अजयला एकविसावे वर्ष लागले होते.
कॅनडा या देशाची परमनंट रेसिडेन्सी (पीआर) मिळाली होती. छोटे जेमतेम दीड दोन हजार वस्तीचे गाव, तिथले रिसॉर्ट आणि तेच तेच काम याचा त्याला कंटाळा ही आला होता. पण काय करायचे ते पण सुचत नव्हते. काही वेळा दैवच संधी समोर आणून टाकते. तसाच प्रकार अजयच्या बाबतीत दुसर्यांदा घडणार होता. भारतातली विलीची भेट हा पहिला. तर विलीचा स्वतःच्या रिसॉर्टमध्ये झालेला अपघाती मृत्यू हा दुसरा. दुसर्या मजल्यावर चढून रिसॉर्टच्या छपराची दुरुस्ती करत असताना विली खाली पडला व जागीच मरण पावला. या सगळ्याची चौकशी करण्याकरता नजिकचे शहराचा शेरीफ त्याच्या मदतनीसाला घेऊन आला होता. विलीच्या मागे रिसॉर्ट बंद होणार हे जवळपास नक्की होते. त्या छोट्याशा गावात अजयला दुसरे कोणतेच काम मिळणार नव्हते. शेरीफला चौकशीमध्ये अजयने सगळी मदत तर केलीच, पण त्याच्या जोडीला शेरीफचे काम व मदतनीसाची नोकरी या सगळ्याची चौकसपणे माहिती घेतली. ती ऐकून अजयला आश्चर्याचा एक धक्काच बसला. तिथे सर्व छोट्या शहरांमध्ये स्वतःची अशी शेरीफच्या हाताखाली चालणारी यंत्रणा असते. पगार घसघशीत असतात. गुन्हेगारी मोजकी असल्याने कामही फार नसते. सचोटीने काम करणे ही सगळ्यात मोठी अट. हे सारे कळल्यानंतर मदतनीसामार्फत शेरीफकडे त्याने मला काम मिळेल काय अशी विनंती केली.
शेरीफच्या खास पोलिसी नजरेने दोन-तीन दिवसात अजयला जोखून झालेले होतेच. अर्थातच होकार मिळाला. प्रश्न एकच होता शहरात राहण्याची व जेवणाची व्यवस्था अजयला स्वतःला करायची होती. पण त्याची आता फारशी काळजी राहिलेली नव्हती. कारण रीतसर मोठा पगार सुरू होणार होता. थेट सरकारी नोकरी नसली तरी मान तोच होता.
सगळ्यांना त्रास देणारा, शिक्षकांना छळणारा, आई-वडिलांचे न ऐकणारा, उनाड अजय आता परदेशात इतर नागरिकांना शिस्त लावणारा वचक दाखवणारा जबाबदार पोलीस बनला होता. लंडनच्या बॉबीचे कौतुक आपण सारेच ऐकतो, ते वाचत मोठे झालो आहोत. त्या अर्थाने आता अजय कॅनेडियन बॉबी बनला होता.
तात्पर्य : कष्टाची तयारी, पडेल ते काम शिकण्याची तयारी, नवीन कौशल्ये शिकायची इच्छा असेल तर जगाच्या पाठीवर अजयसारखी अक्षरशः लाखो भारतीय माणसे शंभरपेक्षा जास्त देशांत काम करत आहेत. संपूर्ण आफ्रिकेतील चाळीस देश, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, सिंगापूर, बँकॉक, मॉरिशस, मध्य-पूर्वेतील अनेक देश तुमच्या श्रमाचे, कौशल्याचे दाम देण्यास तयार आहेत.