• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

किसीकी मुस्कुराहटों पे हो निसार…

- दासू भगत (चंदेरी सोनेरी)

Nitin Phanse by Nitin Phanse
December 27, 2024
in मनोरंजन
0

धूसपूर गावचा शंकरदास ते चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा गीतकार शैलेंद्र हा प्रवास अवघा ४३ वर्षांचा. त्यांच्या अंत्ययात्रेला चित्रपटसृष्टीतीलच नाही तर अख्खा जनसमुदाय लोटला होता. त्यांच्या मृत्यूनंतर शैलेंद्र खरोखरच किती मोठे होते याचा प्रत्यय येणे सुरू झाले आणि आजही दर दिवसागणिक शैलेंद्र मोठे होत आहेत…
– – –

आता मुंबईचे समुद्रकिनारे घाणीने गिळंकृत केले आहेत. किनार्‍याकडे फेसाळत येणार्‍या लाटांमध्ये मानवी प्रगतीचा अहंकार व दर्प ये-जा करतो. समुद्राची गाज तर कोलाहलात कधीच विरून जाते. मात्र ५०च्या दशकात हा समुद्र असा नव्हताच मुळी. जुहूच्या समुद्र किनार्‍याची ओढ असलेला एक तरुण सकाळीच घराबाहेर पडायचा. तेव्हा गल्ली सुनसान व रस्ते निर्मनुष्य असत आणि हे रस्ते त्याला प्रचंड उर्जा देत. त्याने लिहिलेली बहुतेक गीतं या सुनसान रस्त्यावरून समुद्राकडे जाताना त्याला सुचली. रस्ते हे मार्गक्रमणासाठी तर समुद्र जीवनाचे सार सामावून घेणारा… म्हणून तो नेहमी म्हणायचा, ‘जर मुंबईची ही सकाळ नसती जर हे सुनसान रस्तेही नसते आणि जर हे रस्ते नसते तर तर मी माझ्या एकटेपणात कधी बुडालोच नसतो… मग माझी ही गाणी मला कधी स्फुरलीच नसती.’
केसरीलालराव बिहारच्या आरा जिल्ह्यातील धुसपूर गावचा भूमिहीन मजूर. जन्माने धुसिया चर्मकार. त्यामुळे जातवास्तवाचा बळी. जमीनदारांच्या शेतात मजुरी करणे हाच जगण्याचा आधार. पण कामाच्या शोधात त्यांनी गाव सोडले. तो अगोदर रावळपिंडीला (जे आताच्या पाकिस्तानात आहे) आला. येथील ब्रिटिश हॉस्पिटलमध्ये ठेके घेत पत्नी, चार मुलं आणि एक मुलगी यांचा संसार चालवू लागला. शंकरदास हा सर्वात मोठा मुलगा. सुरुवातीस बरे चालले, पण नंतर आर्थिक तंगीने बेजार झाला. शेवटी कुटुंबकबिला घेऊन मथुरेत आला. इथे केसरीलालचा मोठा बंधू रेल्वेत कामाला होता त्यामुळे आसरा मिळाला. मथुरेची रेल्वे कर्मचार्‍यांची कॉलनी ‘ध्यौली प्याऊ’ या नावाने ओळखली जाते. शंकरदास शाळेत जाऊ लागला. घरात दारिद्र्य इतके की भूक मरावी म्हणून वडील सर्व मुलांना बिडी प्यायला लावत. अशा परिस्थितीतही शाळा ते इंटरपर्यंतचे शिक्षण शंकरदासने पूर्ण केले.
शंकरदास लहानपणापासून महादेवाचा निस्सीम भक्त. जगण्याच्या वाटेवर काटेच काटे पसरलेले. पाय रक्तबंबाळ होईतो पायपीट होई सर्व कुटुंबांची. त्यात त्याची एकुलती एक लहान बहीण आजारी पडली. तिला वाचविण्याचा आटापिटा केला, पण दारिद्र्याने आर्थिक नाड्या अशा आवळल्या की पैशाअभावी तिच्यावर उपचार होऊ शकला नाही आणि ती मृत्यू पावली. शंकरदास प्रचंड उद्विग्न झाला. त्याचा दगडाच्या देवावरील विश्वास कायमचा लोपला… या काळात त्याने शाळकरी मित्र इंद्र बहादूर खरे याच्यासोबत कविता करायचा छंद जोपासला. रेल्वेलाईनजवळ एक छोटे तळे होते. तळ्याशेजारच्या एका मोठ्या दगडावर बसून हे दोघे मित्र कविता करत असत… पुढच्या संबंध आयुष्यात याच कवितेने शंकरदासला मानमरातब, पैसा, प्रसिद्धी मिळवून दिली आणि चित्रपटसृष्टीला महान गीतकार ‘शैलेंद्र’ मिळवून दिला.
कवी काव्यप्रतिभेने कितीही मोठा असला तरी पोट नावाचा अवयव आणि कुटुंब नावाची व्यवस्था प्रतिभेवर बहुतेक वेळा मात करते. शैलेंद्र स्वातंत्र्याच्या भावनेने पेटलेला कवी होता. त्याला मुंबईला रेल्वेतली नोकरी मिळाली आणि माटुंग्याला घर मिळाले तेव्हा त्यांच्या हृदयातही कवितेने घर केलेले होतेच. अशावेळी वरिष्ठाची मर्जी नोकरदार एकवेळ सांभाळू शकतो, पण कवीला ते जमत नाही. शेवटी स्वातंत्र्याचा जागर आणि कवीच्या निष्ठेने मात केली आणि शैलेंद्रने नोकरी सोडली. त्याने स्वातंत्र्यसंग्रामात लेखणीला धार लावून उडी घेतली. हे दिवस ‘चले जाव’चे होते. स्वातंत्र्याच्या उर्मीने थेट तुरुंगातही जावे लागले. त्यांची ‘जलता है पंजाब’ ही कविता.
किसने हमारे जलियाँवाले
बाग में आग लगाई
किसने हमारे देश में
फूट की ये ज्वाला धधकाई
किसने माता की अस्मत को
बुरी नजर से ताका
धर्म और मजहब से अपनी बदनियत को ढाँका
कौन सुखाने चला है पाँचो नदियों की धारा
जलता है जलता है, पंजाब हमारा प्यारा
जलता है जलता है, भगतसिंह की आंखो का तारा
त्या काळात ही कविता स्वातंत्र्यसंग्रामात उतरलेल्या अनेक युवकांना प्रेरणा देत असे. याच कवितेने त्यांचा चित्रपटसृष्टीकडे जाण्याचा दरवाजाही किलकिला केला…
मुंबईतल्या एका कविसंमेलनात पृथ्वीराज कपूरसोबत राज कपूरने पहिल्यांदा शैलेंद्रला ‘जलता है पंजाब’ ही कविता म्हणताना ऐकले. राज कपूर त्यावेळी ‘आग’ या चित्रपटाची निर्मिती करत होता. त्याने शैलेंद्रकडे ही कविता मागितली. मोबदला देण्यासही तयार झाला. पण शैलेंद्र पडला पक्का सिद्धांतवादी. काव्याची विक्री करणे त्याच्या सिद्धांतात बसणारे नव्हते. त्याने राज कपूरला चक्क नकार दिला. पण राज कपूरला शैलेंद्रमध्ये त्याचा गीतकार स्पष्ट दिसत होता. त्याने आपले व्हिजिटिंग कार्ड त्याच्या हाती दिले व म्हणाला, ‘आप कुछ भी कहें लेकिन, पता नहीं क्यों मुझे आपके अंदर सिनेमा का एक सितारा नजर आता है. जब जी चाहे इस पते पर चले आना.’
झाँसी स्टेशनवर शैलेंद्रजींचे एक दूरचे नातेवाईक स्टेशन मास्टर होते. एकदा शैलेंद्रजी त्यांना भेटायला गेले आणि त्यांची मुलगी शंकुतला हिच्या प्रेमात पडले. त्यावेळी शैलेंद्रकडे लग्नासाठी घ्यायचे नवीन कपडेही नव्हते. पण शकुंतलाच्या वडिलांनी परवानगी दिली व त्यांचे लग्न झाले. रेल्वेतील नोकरी फार मोठ्या पगाराची नव्हती. शकुंतला त्यांच्या जीवनात बहुदा आनंद घेऊन आली असावी. एकदा त्यांना पत्नीला झाँसीला पाठवायचे होते पण खिशात पैसे नव्हते. राज कपूरने दिलेले व्हिजिटिंग कार्ड त्यांना आठवले. ते चेंबूरला आर.के. स्टुडिओत पोहचले. राज कपूरकडून ५०० रुपये घेऊन त्यांनी पत्नीला दिले. मग एक दिवस ते पैसे परत करण्यासाठी ते राज कपूरकडे पोहचले. राज कपूरने त्यांचा हात त्यांच्याच खिशाकडे परत नेला आणि मंद स्मित करत म्हणाला, ‘मला पैसे परत नकोत. बस माझ्या चित्रपटासाठी दोन गाणी लिहून दे.’ तेव्हा राज कपूर ‘बरसात’च्या तयारीत मग्न होता. त्यावेळी योगायोगाने पाऊसही सुरू होता. शैलेंद्रने चित्रपटसृष्टीतले पहिले गीत लिहिले, ‘बरसात में हम से मिले तुम सजन तुमसे मिले हम…’ चित्रपट इतिहासातील पहिले टायटल साँग म्हणून या गीताकडे बघितले जाते. १९४९मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने शैलेंद्रसोबत संगीतकार शंकर जयकिशन, लताबाई आणि हसरत जयपुरी यांना घराघरात नेऊन बसविले. या चित्रपटात शैलेंद्र यांची फक्त दोन गाणी होती. त्यातले दुसरे, ‘पतली कमर है तिरछी नजर है…’
ज्या काळात शैलेंद्र गीत लिहीत होते त्या काळात उर्दू भाषेचे वर्चस्व असणार्‍या कवींचा वरचष्मा होता. म्हणूनच की काय शैलेंद्रची अत्यंत सोपी शब्दरचना असलेली पण तितकीच भावगर्भ असलेली गाणी उठून दिसत. असे म्हणतात की सोपे लिहणे हे अत्यंत अवघड काम असतं. शैलेंद्र यांची सर्वच गाणी सहज सोपी असल्यामुळे पाठ होत असत आणि मधुर चालीमुळे ओठांवरही सहज रेंगाळत असत. ज्या गीताने त्यांना जगात लौकिक मिळवून दिला ते गाणे होते, ‘आवारा हूँ, या गर्दिश में हूँ, आसमान का तारा हूँ’ एकदम साधे शब्द पण कमालीचे अर्थपूर्ण. ‘आवारा’चे हे गाणे त्या काळात रशियात अत्यंत लोकप्रिय होते. त्यावेळी चित्रपटसृष्टीतही साम्यवादी विचारामुळे भारावलेले अनेक साहित्यिक, कलावंत व संगीतकार होते. त्यात स्वत: राज कपूर, पटकथाकार के. ए. अब्बास, वसंत साठे, हसरत, शैलेंद्र यांचाही समावेश होता. एका विचारधारेचे लोक एकत्र आले की काम सोपे होऊन जात असे. राज कपूर आणि त्याची टीम अखेरपर्यंत एकत्र टिकू शकली ती यामुळेच.
राज कपूर अनेकदा मुंबईच्या गर्दी गोंगाटापासून दूर लोणावळ्यास असलेल्या आपल्या फार्म हाऊसमध्ये निवांतपणे बैठकी घेत असे. एकदा त्याने संगीतकार जयकिशन, शैलेंद्र व ऱ्हिदम मास्टर दत्ताराम यांना घेऊन लोणावळा गाठला. एका झाडाखाली सतरंजीवर सगळे गप्पा मारत बसले. सोबत बाजा, ढोलक, तबला, हार्मोनियम होतेच. राज कपूर शंकर-जयकिशनला म्हणाला, ‘मला एका नृत्यगीतासाठी चाल हवी आहे. तुमच्याकडे एखादी ट्यून आहे का?’ यावर जयकिशन म्हणाला, ‘सध्या माझ्याकडे नाही, नंतर सांगतो’. शंकर म्हणाला, ‘माझ्याकडे आहे’. मग राज कपूरने दत्तारामना दादरा ठेका वाजवायला सांगितलं. मास्टर दत्ताराम ठेका वाजवू लागले. शंकरने त्याच्याकडील चालीला डमी शब्द लावले, ‘रमैया वस्तावया…रमैया वस्तावया…’ बराच वेळ ते चाल वाजवत राहिले. शेवटी राज म्हणाला, ‘अरे, याच्या पुढे काय? तेवढ्यात बाजूला बसलेले शैलेंद्र म्हणाले, ‘मैंने दिल तुझको दिया…’ आणि बघता बघता एक अजरामर गाणे तयार झाले. शंकरजी मूळचे हैद्राबादचे असल्यामुळे अनेकदा ते तेलुगू शब्दांचा वापर चाल देताना करीत असत. रमैया म्हणजे ‘राम’ आणि वस्तावैया म्हणजे ‘परत कधी येणार’. ‘श्री ४२०’मधील नायक राजूदेखील मूळ मित्रांमध्ये परत येतो तेव्हा सर्वजण हे गाणे म्हणत असतात. शैलेंद्रने या गाण्याला साध्या शब्दांच्या कोदंणाने इतक्या उंचीवर नेऊन ठेवलेय की आज ६२ वर्षानंतरही गाण्याच्या भेंड्या खेळताना ‘र’ हे अक्षर आले की पहिले गाणे आठवते ते ‘रमैया वस्तावैया…’
मथुरेहून मुंबईला येण्यापूर्वी शाळा कॉलेजात असताना शैलेंद्रना हॉकीचे खूप वेड होते. या खेळापासून त्यांना खूप उर्जा मिळत असे. मात्र जातवास्तवाचा चटका त्यांना एकदा हॉकी खेळतानाच बसला. ते खेळत असताना कुणीतरी म्हणाले, ‘घरात खायला नाही तरी हे लोक हॉकी खेळणार?’ मनातील अत्यंत चीड आणि मानभंगामुळे त्यांनी हॉकी स्टिक लगेच मोडून टाकली आणि मुंबईत जायचे मनात पक्के केले. मला वाटतं त्यांच्या मनातील हीच चीड, संताप, वेदना, स्वाभिमान शब्द बनून त्यांच्या लेखणीतून झरत असावेत. ते मेकॅनिकल इंजिनीअर होते. रेल्वेतले काम संपले की समोर कागद घेऊन तास न् तास ते कविता लिहीत बसत. नाहीतर चर्नी रोडजवळच्या ऑपेरा हाऊससमोरच्या ‘प्रगतीशील लेखक संघा’च्या कार्यालयात जाऊन बसत. इथे त्यावेळी अनेक कवी साहित्यिकांचा जमावडा असे. राज कपूरने त्यांनी पहिल्यांदा इथेच बघितले होते.
अत्यंत समर्पक शब्द आणि त्यातून व्यक्त होणारी संवेदना ते सहज लिहित ती अशी,
कल तेरे सपने पराये भी होंगे,
लेकिन झलक मेरी आँखों में होगी
फूलों की डोली में होगी तू रुखसत,
लेकिन महक मेरी साँसों में होगी…’
(शम्मी कपूरचा ‘ब्रह्मचारी’ १९६८).
प्रेमात असो की विवेक डळमळताना असो आपलं पाऊल घसरू शकते. यावर ते म्हणतात, ‘सहज है सीधी राह पे चलना, देखके उलझन, बचके निकलना… कोई ये चाहे माने न माने, बहुत है मुश्किल गिर के संभलना…’ (राज कपूरचा ‘जिस देश गंगा बहती है’ १९६०).
चित्रपटात येण्यापूर्वी ते देशभक्तीपूर्ण गीत लिहित असत. हा प्रभाव नंतर अनेकदा दिसून आला. भलेही आमची वेषभूषा कुठलीही असो, हृदय मात्र हिंदुस्तानीच असेल. ‘मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिश्तानी, सर पे लाल टोपी रुसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी…’ ‘संगम’ चित्रपटातील, ‘तन सौंप दिया, मन सौंप दिया, कुछ और तो मेरे पास नहीं… जो तुम से है मेरे हमदम, भगवान से भी वो आस नहीं…’ आपल्या संशयी पतीला समजावताना एक सरळ गृहिणी किती साध्या शब्दात कौटुंबिक जीवनातील स्त्रीचं स्थान समजावून सांगत आहे. ‘गाईड’ चित्रपटातील, ‘आज फिर जीने की तमन्ना है… आज फिर मरने का इरादा है…’ कुचंबणा सहन करणार्‍या विवाहित स्त्रीला जेव्हा मुक्त आभाळाचा तुकडा दिसू लागतो तेव्हा ती आणखी वेगळं काय म्हणेल?
शैलेंद्र यांनी जी प्रेमगीतं लिहिली त्यात ते वास्तवापासून कधीच लांब गेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या गीतात प्रेम जितक्या सहजेते येतं तितक्याच सहजतेने वास्तवाचं दर्शनदेखील, ‘प्यार हुवा इकरार हुवा है, प्यार से फिर क्यूँ डरता है दिल…’ किंवा ‘हर दिल जो प्यार करेगा वो गाना गाएगा, दिवाना सैकडों में पहचाना जाएगा…’ किंवा ‘दिल अपना और प्रीत परायी’मधील, ‘अजीब दास्ताँ है ये… कहाँ शुरू कहाँ खतम…’ ‘अनाडी’ चित्रपटातील त्यांची सर्वच गाणी म्हणजे तत्वज्ञानच आहे, मग ते प्रेमाचं असो की व्यवहारातलं… ‘दिल की नजर से, नजरों के दिल से, ये बात क्या है, ये राज क्या है, कोई हमें बता दे’, किंवा ‘किसी की मुस्कुराहटों पे हो निसार…’ हे गीत म्हणजे जागतिक स्तरावर माणसाला एका सूत्रात बांधण्याचा मंत्रच आहे.
विजय आनंद यांचा ‘गाईड’ हा चित्रपटसृष्टीतला माईलस्टोन. खरे तर चित्रपटात विवाहित नायिका न स्वीकारण्याचा तो काळ. शिवाय चित्रपटाच्या शेवटी आध्यात्माचीही किनार… यातील सर्वच गाणी शैलेंद्रने अत्यंत काळजीपूर्वक लिहिली आहेत. ‘गाता रहे मेरा दिल’, ‘पिया तोसे नैना लागे रे’, ‘क्या से क्या हो गया’, ‘दिन ढल जाए’, ‘तेरे मेरे सपने अब एक रंग है’… प्रत्येक गाण्यात स्वत: शैलेंद्र संवेदनेसह विरघळत असत. साहिर, शकील, मजरूह, शैलेंद्र हे मुळात अगोदर कवी. चित्रपटगीते या सर्वांनी नंतर लिहिली. ती लिहिताना अनेक मर्यादा येतात आणि तडजोडी कराव्याच लागत. त्या शैलेंद्र यांनी केल्या, पण स्वत:चा वेगळा विशिष्ट बाज ठेवूनच. पटकथेत शैलेंद्र यांची गाणी मिसळून जात. ती ठिगळं वाटत नसत.
शैलेंद्र उत्तम डफ वाजवत असत, कारण ते स्वातंत्र्य संग्रामातील शाहीरही होते. राज कपूर शैलेंद्रकडून डफ वाजविणे शिकला. त्याच्या चित्रपटात या डफाचा वापर खूप सुंदर असायचा. ‘मेरा नाम राजू घराना अनाम…’, ‘होठों पे सच्चाई होती है…’, ‘दिल का हाल सुने दिलवाला…’, ‘रमैया वस्तावैया…’ या गाण्यांतला डफ… स्वातंत्र्याचा हुंकार म्हणजे डफ… हे वाद्य ते फक्त ताल धरण्याचेच काम करत नाही तर त्यावर तडतडणारी बोटे दमनाचा निषेधही करतात. शैलेंद्रची गाणी म्हणजे जोडाक्षरविरहित कवितांचा भाता… यातला प्रत्येक शब्दबाण रसिकांच्या हृदयावर अचूक लागेल अशी व्यवस्था असलेला…
संगीतकार आणि गीतकार यांच्या जोड्या हमखास ठरलेल्या असत. शंकर जयकिशनसाठी शैलेंद्र यांनी सर्वाधिक गीते लिहिली. शंकर जयकिशन अनेक निर्मात्याकडे शैलेंद्रसाठी शब्द टाकत असत. पण एकदा त्यांनी दक्षिणेतील चित्रपट करताना शैलेंद्रऐवजी दुसर्‍या गीतकाराकडून गाणी लिहून घेतली. शैलेंद्रना ही गोष्ट बोचली. बातचीत बंद झाली. शैलेंद्र अत्यंत भावनिक होते. त्यांनी शंकर जयकिशनना आपल्या भावना कळवल्या त्या अशा, ‘छोटीसी ये दुनिया पहचाने रास्ते है, कहीं तो मिलोगे, कभी तो मिलोगे, तो पूछेंगे हाल…’ शंकर जयकिशन या चार ओळींनी हेलावले. त्यांनी अबोला सोडला. नंतर या चार ओळीचे पूर्ण गाणे १९६२मधील ‘रंगोली’ चित्रपटासाठी शैलेंद्र यांनी लिहिले. या चित्रपटाचे निर्माते राजेंद्रसिंग बेदी यांना खरे तर मजरूह सुलतानपुरी यांना साईन करायचे होते, पण शंकर जयकिशन यांनी शैलेंद्रसाठी आग्रह केला आणि त्यांनी तो मान्यही केला.
शैलेंद्र यांचे मोठे पुत्र, जे आता हयात नाहीत, त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा… शैलेंद्रच्या पत्नी सतत चुलीसमोर असत तेव्हा हा मुलगा बाबा घरी आला की त्यांना म्हणायचा, ‘बाबा, जर आपण भाकरीचे झाड लावले तर किती छान होईल.. एक रोटी तोडायची अन् आंब्याबरोबर खायची…’ अजाणत्या वयातील मुलाचे हे बोल पुढे त्यांच्या गीतात प्रकटले. १९५७ मधील हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘मुसाफिर’ या चित्रपटात किशोरदाचे एक गाणे आहे, नायकही तेच आहेत.
‘मुन्ना बडा प्यारा, अम्मी का दुलारा…’
यात पुढील ओळी आहेत,
‘एक दिन वो माँ से बोला,
क्यूँ फूंकती है चूल्हा
क्यूँ ना रोटियों का पेड हम लगा लें
आम तोडे, रोटी तोडे, रोटी-आम खा लें
काहे करे रोज रोज तू ये झमेला
अम्मी को आई हँसी, हँसके वो कहने लगी
लाल, मेहनत के बिना रोटी किस घर में पकी
जियो मेरे लाल, जियो मेरे लाल…’
या गाण्यातल्या ‘मेहनत के बीना रोटी किस घर मे पकी…’ या एका ओळीत त्यांनी जगण्याचे सार सांगितले आहे.
शंकर जयकिशन यांच्या व्यतिरिक्त शैलेंद्र यांनी संगीतकार सल्ाील चौधरी (मधुमती), एस. डी. बर्मन (गाईड, बंदिनी, काला बाजार), रविशंकर (अनुराधा) यांच्यासाठीही अप्रतिम गाणी लिहिली. ‘मधुमती’ चित्रपटातील ‘सुहाना सफर और ये मौसम हँसी…’ या गाण्यासाठी दिग्दर्शक बिमल रॉय शैलेंद्रजींची वाट बघत होते. मुदत संपूनही गाणे आले नाही म्हणून त्यांनी शैलेंद्रना बोलावून घेतले. शैलेंद्र म्हणाले, गाणे सर्व तयार झालेय पण मला एक ओळ अचूक सुचत नाहीए, मला आणखी एक दिवस वेळ द्या. या गाण्याची एक ओळ होती, ‘ये गोरी नदियों का चलना उछलके…’ याच्या पुढची ओळ शैलेंद्रच्या मनासारखी उतरत नव्हती.. पण दुसर्‍या दिवशी सकाळीच बिमलदांना त्यांनी फोन केला व ओळ सुचली असे सांगितले. पुढची ओळ होती, ‘के जैसे अल्हड चले पी से मिलकर…’ बिमलदा म्हणाले, ‘अरे व्वा! सुंदरच. कशी सुचली?’ शैलेंद्र म्हणाले, ‘मी जेव्हा घराच्या खिडकीत बसून खाली गल्लीतल्या रस्त्यावर बघत होतो, तेव्हा एक तरुणी अत्यंत घाईने, पण प्रसन्नपणे जाताना दिसली आणि ही ओळ सुचली.’
शैलेंद्रांना सकाळी लवकर उठून समुद्रावर जायला आवडत असे. घर ते समुद्र आणि समुद्र ते घर या दरम्यान ते अगदी एकांतात असत. स्वत:च्या मनाच्या डोहात शिरायला असे एकांत किमान कवीला तरी हवे असतात. त्यांच्या अनेक गीतांनी याच रस्त्यावर जन्म घेतला. ‘ये मेरा दिवानापन है’ (१९५८- यहुदी), ‘सब कुछ सिखा हमने’ (१९५९- अनाडी), ‘मै गाँऊ तुम सो जाओ’ (१९६८- ब्रह्मचारी) या तीन गीतांना फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. त्यांची कन्या अमला मुजुमदार कन्या आठवण सांगतात, ‘बाबा एका गीतात ‘सबकुछ सिखा हमने, ना सिखी होशियारी’ असे म्हणतात, वास्तविक जीवनातही ते तसेच होते. अनेकदा सेटवरील कामगार तंत्रज्ञ अडचणीत त्यांच्याकडे मदतीसाठी येत. मग नुकत्याच मिळालेल्या मानधनातून त्यांना पैसे देत. घरी आल्यावर पाकिट कपाटात ठेवत. मग आई त्यातून पैसे काढून घेई. बाबा पाकिट हलके झालेले बघून आईला विचारत तर आई म्हणे, ‘तुम्ही अनेकांना पैसे वाटता मग शिल्लक कसे राहतील?’ बाबा मग फक्त छानपैकी हसत. कारण त्याना माहित असायचे की आईने पैसे काढून घेतले आहेत.’
‘बरसात’ या पहिल्याच चित्रपटाने त्यांच्यावर लक्ष्मीची पण बरसात केली. बर्‍यापैकी कमाई होऊ लागली. मग त्यांनी एक नवीन घर खरेदी केले व घराचे नाव ठेवले ‘रिमझिम’. राज कपूरचा ‘बरसात’नंतरचा दुसरा चित्रपट होता ‘आवारा’. आवाराची कथा ऐकण्यासाठी तो शैलेंद्रला बळजबरीने सोबत घेऊन गेला. ख्वाजा अहमद अब्बास यांनी कथा तयार केली होती. शैलेंद्र अगदी साध्या कपड्यात गेले होते. अब्बास साहेबांनी त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. सर्व कथा ऐकून झाल्यावर राज शैलेंद्रकडे बघत म्हणाला, ‘क्यों कविराज कुछ समझ मे आया.’ यावर शैलेंद्र म्हणाले, ‘हाँ, समझ में तो आया, काफी अच्छी कहानी है’. यावर राज म्हणाला- ‘और क्या समझ मे आया?’ यावर शैलेंद्र म्हणाले, ‘बिचारा गर्दिश में था पर आसमान का तारा था.’ या उत्तरावर अब्बास साहेबांनी चमकून त्यांच्याकडे बघितले व ते राजला म्हणाले, ‘मला यांची परत एकदा ओळख करून दे. मी दोन अडीच तास जी कथा ऐकवत होतो त्याचे सार या कवीराजने फक्त एका ओळीत सांगितले…’
शैलेंद्रजींची हीच तर खासियत होती. खूप मोठी गोष्ट खूप सोपी करून सांगायची. ‘आवारा’चे हे टायटल गीत प्रचंड लोकप्रिय झाले. सर्वसामान्य पण गुणी माणसाचं सहजसोप्पं तत्वज्ञान,
घरबार नही संसार नहीं
मुझसे किसीको प्यार नहीं
उस पार किसीसे मिलने का इकरार नहीं
सुनसान नगर, अंजान डगर का प्यारा हूँ…
खरे तर आज इतक्या वर्षानंतरही असे लाखो आवारा डोळ्यात असंख्य स्वप्ने घेऊन आमच्या आजूबाजूला धडपडताना दिसतात.
शैलेंद्र यांनी जितकी टायटल साँग्स चित्रपटासाठी लिहिली आहेत, तितकी कदाचितच इतर कुणी लिहिली असतील. चाहे कोई मुझे ‘जंगली’ कहे, मेरे मन की गंगा… बोल राधा बोल ‘संगम’ होगा के नहीं, भैया मेरे ‘छोटी बहन’ को ना भुलाना, आ हा ‘आयी मिलनी बेला’ देखो आयी, जीवन के दो पहलू है ये ‘हरियाली और रास्ता’, सच है दुनियावालो की हम है ‘अनाडी’, जिस देश में गंगा बहती है, ‘दिल अपना और प्रीत परायी’ किसने है ये रीत बनायी, जानेवाले जरा होशियार यहाँ के हम है ‘राजकुमार’ वगैरे वगैरे. विशेष म्हणजे गाण्यातील टायटल हे अजिबात ओढून ताणून आणले आहे, असे वाटतच नाही, इतके ते गीतात एकजीव झालेले आहे. ‘आवारा’ चित्रपटातील त्यांचे ‘घर आया मेरा परदेसी’, ‘आवारा’मधील ‘आवारा हूँ’, ‘बरसात में हमसे मिले तुम’ ही गाणी तर हिंदी चित्रपट संगीतातील लँडमार्क आहेत. एका गीतात शैलेंद्र म्हणतात, ‘होंगे राजे राजकुंवर, हम बिगडे दिल शहजादे… हम सिंघासन पर जा बैठे, जब जब करे इरादे…’. लोकशाहीचे मूल्य काय असते हे त्यांनी इतक्या अचूक शब्दात मांडले आहे की महान कवी गुलजार यांनाही या गीताची भुरळ पडते.
राज कपूर यांचा अत्यंत महत्वाकांक्षी चित्रपट म्हणजे ‘संगम’. नर्गिसने आरके वँâप सोडल्यानंतर त्यांच्या चित्रपटाची मुख्य नायिका कोण होणार, याचे सर्वांना कुतूहल होतेच. त्यांनी वैजयंती माला यांच्याकडे प्रस्ताव दिला. पण त्यांचा काही लवकर होकार येईना… मग राज कपूर यांनी एक दोन ओळीचे पत्र लिहिले. त्या ओळी होत्या… ‘मेरे मन की गंगा और तेरे मन की जमुन्ाा का, बोल राधा बोल संगम होगा की नहीं?’ यावर उत्तर आले, होगा… होगा… होगा… मग पुढे राज कपूरने हाच मुखडा धरून पुढचे गाणे लिहिण्याची जबाबदारी शैलेंद्रवर सोपविली… ती त्यांनी इतकी सुंदर पार पाडली की आज ५४ वर्षानंतरही हे गाणे तितकेच लोकप्रिय आहे. या गाण्यात वैजयंती मालानेही सहभाग घेतला. होगा… होगा… होगा… म्हणायला.
सामाजिक शोषण, गरीबी, सत्तेचा माज यावर अत्यंत परखडपणे पण तिक्याच सोप्या शब्दात त्यांची लेखणी प्रहार करीत असे. जे जे त्यांनी वास्तवात भोगलं तेही त्यांनी त्यांच्या गीतातून प्रकट केलं.
छोटे से घर में गरीब का बेटा,
मैं भी हूँ माँ के नसीब का बेटा
रंज-ओ-गम बचपन के साथी
आंधियों मे जली जीवन बाती
भूख ने है बडे प्यार से पाला
दिल का हाल सुने दिलवाला
शैलेंद्र यांनी पैसा, प्रसिद्धी, मानसन्मान भरपूर मिळवलं, पण बालपण मात्र कधीच हरवू दिलं नाही. भलेही ते अत्यंत कष्टप्रद होतं, त्यात अनेक अडीअडचणी, वेदना होत्या, तरीही ते प्रियच वाटत असे त्यांना. त्यांनाच काय आम्हालाही तर तसेच वाटते. आमच्या सर्वांची ही ठसठस आणि हूरहूर त्यांनी किती सुंदर शब्दात व्यक्त केली आहे,
मेरे ख्वाबों के नगर,
मेरे सपनों के शहर
पी लिया जिनके लिए,
मैंने जीवन का जहर
ऐसे भी दिन थे कभी,
मेरी दुनिया थी मेरी
बीते हुए दिन वो हाय,
प्यारे पल-छिन
कोई लौटा दे मुझे बीते हुए दिन…
शैलेंद्रजी आपल्या लेखणीचा वापर एखाद्या एक्स-रे मशीनसारखा करत असत. चेहर्‍यावर मुखवटे लावून जगणार्‍या लोकांचा आतला खरा चेहरा ते सहजपणे लोकांसमोर उघडा पाडत. लेखनाची एकदा ऊर्मी आली की ते अस्वस्थ होत. एकदा ते मास्टर दत्ताराम यांच्यासोबत बसले असताना लिखाण सुरू होते. कागदावर लिहायचे, नाही आवडले की फाडून त्याचा बोळा करायचे. शेवटी पेनातली शाई संपली. अन अचानक त्यांना सुंदर ओळी सुचल्या. पण पेनाततली शाई संपलेली. त्यांनी आजूबाजूला बघितले. सिगारेट पेटवतानांच्या काडीपेटीच्या अनेक काड्या समोर दिसल्या. मग त्यांनी त्या काड्याच्या कार्बनने ओळी लिहिल्या, ‘ऐ मेरे दिल कहीं और चल…’ एका नितांतसुंदर जिवंत गाण्याचा जन्म विझलेल्या काड्यांच्या सहाय्याने झाला.
क्रांतीची गाणी गाणार्‍या शैलेंद्रच्या आत देखील अनेक शैलेंद्र होते. जीवनातील सर्वच भावनांचा उत्कट आविष्कार म्हणूनच त्यांना सहज करता आला असावा. अन्यथा ‘रंज-ओ-गम बचपन के साथी, आंधियों में जली जीवन बाती’ लिहिणारी त्यांची लेखणी, ‘ये मेरा दिवानापन है, या मोहब्बत का सुरूर, तू न पहचाने तो है ये तेरी नजरों का कसूर…’ ही प्रेमाची तरलता तितक्याच उत्कटतेने लिहते. आध्यात्माचा स्पर्श असलेली… ‘ओ जानेवाले हो सके तो लौट के आना’, ‘वहाँ कौन है तेरा, मुसाफिर जाएगा कहाँ’, ‘मेरे साजन है उस पार, मैं इस पार, ओ रे माझी ले चल पार’, ‘दुनिया बनानेवाले क्या तेरे मन में समाई’, ‘तू प्यार का सागर है’, ‘जीना यहाँ मरना यहाँ’, ‘झूमती चली हवा…’ त्यांनी लिहिलेली ‘दिल तेरा दिवाना है सनम’सारखी प्रेमगीते, ‘याद न जाए…’सारखी विरहगीते, ‘तू प्यार का सागर है’सारखी भक्तीरसपूर्ण गीते, ‘नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठी में क्या है’ किंवा ‘जुही की कली मेरी लाडली…’सारखी बालगीते, ‘जाओ रे जोगी तुम जाओ रे’सारखी शास्त्रीय संगीतावर आधारित गीते, ‘अब की बरस भैया को’सारखी कौटुंबिक गाणी… अशी लांबलचक यादी शैलेंद्र यांच्या खात्यात जमा आहे. इतकेच नाही तर त्यांनी एक असा वेगळा प्रयोग आपल्या गीतात केला, जो आजपर्यंत कुणीच करू शकला नाही. राजेंद्र कुमारच्या ‘ससुराल’ चित्रपटात एक गाणे आहे, एक सवाल मैं करू एक सवाल तुम करो…’ हे एक सवाल जबाब पद्धतीचे गाणे आहे. मात्र यात एक वैशिष्ट्य असे की जे उत्तर आहे, तोच पुन्हा एक प्रश्न आहे. खूप सुंदर असे हे सवाल जवाब आहेत.
राज कपूरच्या ‘श्री ४२०’ आणि ‘बूट पॉलिश’मध्ये शैलेंद्र पडद्यावर पण दिसले. पैकी ‘बूट पॉलिश’ चित्रपटातील एक गाणे ‘चली कौन से देस गुजरिया…’ हे गाणे त्यांच्यावरच चित्रित करण्यात आले आहे. सुरुवातीला शैलेंद्र स्वत:वर हे गाणे चित्रित करावयास नकार देत होते. पण राज कपूरने ‘या गाण्यात तू नसशील तर हे गाणे मी चित्रपटातच घेणार नाही,’ असा पवित्रा घेतला आणि शैलेंद्र तयार झाले… मैत्रीचा हा एक अनोखा गोफ होता. दिलीप कुमारच्या ‘मुसाफिर’ या चित्रपटात देखील शैलेंद्रची छोटीसी भूमिका आहे. रस्त्यावर गाणी म्हणून पोट भरणार्‍या माणसाची एक छोटीशी भूमिका त्यांनी केली असून एक गाणेही त्यांच्यावर चित्रित केले आहे.
एक काळ असा आला की चित्रपटात शैलेंद्रचे एक जरी गीत असले तरी तो चित्रपट हिट होई. त्यांची अनेक गाणी लोकसंगीत आणि ग्रामीण संस्कृतीच्या बोलीभाषेचे प्रतीक असत. शहरातील शिक्षित ते खेड्यातला अडाणी अशा प्रत्येकाच्या ओठावर ही गाणी असत. ‘मधुमती’मधील ‘दैया रे दैया रे चढ गयो पापी बिछुवा’, ‘राजकुमार’मधील ‘इस रंग बदलती दुनिया में’, ‘मेरा नाम जोकर’मधील ‘मेरे अंग लग जा बालमा’, ‘काँच की चुडिया’सारखी त्यांची काही गाणी मदहोश करणारी आहेत. त्यात प्रणयाची धुंदीही आहे, पण त्यांनी कधीही अश्लीलतेचा शिक्का आपल्या गाण्यावर उमटू दिला नाही. ‘मेरा नाम जोकर’ हा राज कपूरचा अत्यंत महत्वाकांक्षी चित्रपट. चित्रपटाची दीर्घ लांबी घातक ठरली आणि इतका सुंदर चित्रपट म्हणावा तसा चालला नाही. या चित्रपटातील एक अत्यंत सुंदर गाणे म्हणजे ‘जीना यहाँ मरना यहाँ…’ पण शैलेंद्र या गाण्याचा मुखडाच लिहू शकले. त्यांच्या मृत्यूनंतर हे गाणे त्यांचे पुत्र शैली शैलेंद्र यांनी पूर्ण केले.
१४ जानेवारी १९६१मध्ये शैलेंद्र यांनी एका चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात केली. फणीश्वर नाथ रेणू या प्रसिद्ध लेखकाच्या ‘मारे गए गुलफाम’ या कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता. खरे तर हा चित्रपट एक कविताच होता. १९६६मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे नाव ‘तीसरी कसम’. चित्रपट पूर्ण होण्यास पाच वर्षे लागली. रेणू आणि शैलेंद्र यांनी दिवसरात्र एक करून प्रचंड मेहनत घेतली. ३ ते ४ लाखाचे बजेट २०-२५ लाखावर गेले. चित्रपटनिर्मितीच्या शेवटच्या दोन वर्षात रेणूजी पण त्यांच्या गावी निघून गेले आणि शैलेंद्र पूर्णपणे एकटे पडले. रेणू यांच्याशिवाय अंतिम संकलन पूर्ण करण्याची शैलेंद्र यांची इच्छा नव्हती. पण रेणूजींना येथे आणून ठेवायचे कुठे? हॉटेलचा खर्च ते करू शकत नव्हते. स्वत: रेणूजीवरही ५०० रुपयाचे कर्ज होते. तेही मुंबईला येऊ शकत नव्हते. राज कपूर, वहिदा रेहमान हे मुख्य कलावंत. बासू भट्टाचार्य हे दिग्दर्शक होते. राज कपूरने फक्त एक रुपया मानधन घेऊन या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार व राष्ट्रपतीचे सुवर्ण कमळ मिळाले, पण चित्रपट चालला नाही. भारतीय लोकसंस्कृतीचा हा उत्कट आविष्कार होता. रेणूजींनी यात संवाद लिहिले होते. त्यात शैलेंद्र यांनी लिहिलेली सर्वच गाणी या कथानकात इतकी मिसळून गेली की रेणू कोणते आणि शैलेंद्र कोणते हे ओळखता येऊ नये. यातला राज कपूर हा त्याच्याच इतर चित्रपटांत दिसणार्‍या राज कपूरसारखा मुळीच नाही. भोळा भाबडा हिरामण गाडीवान आणि नाचणारी वहिदा रहमान खरोखरच लाजबाब आहेत.
यातील एकेक गाणे म्हणजे एकेक रत्नच. लोकसंगीताचा अप्रतिम दरवळ शैलेंद्रच्या सर्वच गाण्यात आहे. ‘पान खाये सैंया हमारो’, ‘सजनवा बैरी हो गए हमार’, ‘दुनिया बनानेवाले’, ‘सजन रे झूठ मत बोलो’, ‘चलत मुसाफिर मोह लिया रे…’ राज कपूरने चित्रपटाच्या शेवटात बदल करण्यास सांगितले होते. शेवट दु:खांत नको असे सुचविले होते, पण रेणू व शैलेंद्र यांनी नकार दिला. रेणूजी पाटण्याला निघून गेले. वितरक पण तयार होईनात. ट्रंकेतील चित्रपटाची रिळे बघून शैलेंद्र विषण्ण होऊ लागले. मनाने खूप खचले. रात्र रात्र जागरण होऊ लागले. परिणामी हा झुंजार कवी आजारी पडला. दिल्ली व उत्तर प्रदेशातील काही वितरकांनी ‘तीसरी कसम’ खरेदी केला खरा, पण त्याच्या प्रीमियरला ते जाऊ शकले नाही. एकटे पडलेले शैलेंद्र मग एकाकी झाले. त्यांनी आपल्या मित्राला, रेणूंना एक पत्र लिहिले, ‘मित्रा सर्व सोडून गेले… मी एकाकी झालोय. चित्रपट प्रदर्शित झालाय. आता हसू की रडू ते समजत नाही, पण या चित्रपटाचा मला अभिमान आहे.’
मग एक दिवस विखुरलेल्या शैलेंद्रने स्वत:ला सावरले. ३ डिसेंबर १९६६ला शैलेंद्र राज कपूरच्या घरी गेले. दोघेही मित्र एकमेकांशी काहीच बोलले नाही. मुक्यानेच दोघांनी संवाद साधला. जड मन आणि उदासीचे सावट घेऊनच शैलेंद्र घरी परतले. जणू काही या महान गीतकाराने सर्व जगाचे ओझे आपल्या खांद्यावर पेलले होते. त्यांची लेखणी एकदम नि:शब्द झाली. उसळून येणारे शब्दझरे अचानक आटले… खरं तर हा प्रतिभावान कवी पैशामुळे नाही तर जवळच्या अनेक नातेवाईक, मित्र, सहकारी यांच्या वागणुकीने व्यथित झाला होता. चित्रपट नगरी ही खरोखरच मायानगरी आहे. इथे मनाचे सौदे सहजपणे केले जातात. मानवी व्यवहाराच्या कठोर वास्तवाने शेवटपर्यंत या कवीचा पिच्छा केला.
१३ डिसेंबर १९६६चा दिवस. शैलेंद्र खूप बैचेन होते. पत्नीने त्यांची बैचेनी बघून राज कपूरला फोन केला. राजने त्यांना परिचयाच्या डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला. शैलेंद्र डॉक्टरकडे निघाले. मध्येच त्यांना राजला भेटायची इच्छा झाली व ते थेट राजच्या घरी पोहचले. गप्पा मारताना राजने विचारले, ‘जीना यहाँ मरना यहाँ’ कधी पूर्ण होणार? यावर मिस्कीलपणे शैलेंद्र म्हणाले, ‘उद्याचा तमाशा होऊन जाऊ दे एकदाचा…’
शैलेंद्र दवाखान्यात दाखल झाले. रात्र कशीबशी पार पडली. दुसरा दिवस १४ डिसेंबर राज कपूरचा वाढदिवस… शैलेंद्रना सारखे वाटत होते की राजचे अभिष्टचिंतन करण्यासाठी मला गेले पाहिजे. मात्र त्यांची नाजुक अवस्था लक्षात घेता डॉक्टर परवानगी देत नव्हते. राजची पत्नी कृष्णा व गायक मुकेश हॉस्पिटलमध्ये पोहचले. आर.के. स्टुडिओतील सर्व कर्मचारी शैलेंद्रसाठी प्रार्थना करत होते. अखेर दुपारी शैलेंद्रची ओजस्वी शब्दयात्रा कायमची थांबली. सर्वत्र ही बातमी वार्‍यासारखी पसरली.
राजच्या वाढदिवसाची तयारी पूर्ण झालेली. त्याचा तर विश्वासच बसेना… आपला मित्र शैलेंद्र मध्येच असा कसा सोडून जाऊ शकतो? तो थेट शैलेंद्र यांच्या घरी पोहोचला. शैलेंद्रजीच्या पार्थिवावर कोसळून धाय मोकलून रडला… त्यांच्या कल्पनेला शब्दरूप देणारा मित्र जो काल त्याच्याशी बोलला होता, तो आज अचानक सोडून गेला होता… राजच्या चित्रपट कारकीर्दीवरचा हा फार मोठा आघात होता. राज नंतरच्या प्रत्येक वाढदिवसाला शैलेंद्रच्या आठवणीने ढसाढसा रडायचा. नंतर त्याने ‘धर्मयुग’ या मासिकात शैलेंद्रवर लेखही लिहिला. त्यात त्याने लिहिले होते, ‘माझे शरीर स्टुडिओत असायचे, पण आत्म्ाा शैलेंद्रजवळ असायचा नेहमी.’
धूसपूर गावचा शंकरदास ते चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा गीतकार शैलेंद्र हा प्रवास अवघा ४३ वर्षांचा. त्यांच्या अंत्ययात्रेला चित्रपटसृष्टीतीलच नाही तर अख्खा जनसमुदाय लोटला होता. त्यांच्या मृत्यूनंतर शैलेंद्र खरोखरच किती मोठे होते याचा प्रत्यय येणे सुरू झाले आणि आजही दर दिवसागणिक शैलेंद्र मोठे होत आहेत.

Previous Post

मम्माज बॉय अश्विन!

Next Post

बाप आणि मुलाच्या नात्याची ‘डागडुजी’…

Next Post

बाप आणि मुलाच्या नात्याची ‘डागडुजी’...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.