‘मॅडम, रिक्षा कुठून घेऊ ते आधीच सांगा. नंतर काहीही ऐकून घेणार नाही, सांगून ठेवतोय. काल एका गिर्हाईकाला असंच विचारलं, तर म्हणाला तुम्हाला हवी तिकडून घ्या. मग मैदानाच्या बाजूने घेतली रिक्षा. तर नेमका इकडे तो राजकीय नेत्याचा कार्यक्रम. जाम गर्दी झालेली रस्त्यात. अशी किरकिर केली त्या प्यासेंजरने. आता मला काय स्वप्न पडलं की काय, इकडे कार्यक्रम आहे. तरी प्यासेंजरला आधी विचारलं होतं ना.’
मला बोलायचा क्षणाचाही अवधी न देता रिक्षावाल्याची पूर्णवेळ टकळी चाललेली होती. बरं एवढं विचारून कुठल्या रस्त्याने न्यायचे हे सांगायची संधी त्याने मला दिलेलीच नव्हती.
कुठल्याही गाडीचा ड्रायव्हर ही माझ्या मते एक वेगळी श्रेणी आहे. देवाने खूप म्हणजे खूप तावून सुलाखून ड्रायव्हर जन्माला घातलेले असतात. माझ्या मते त्यांच्याइतकं ज्ञानी आणि बहुश्रुत कुणीही नसावं. कुठल्याही गावातील भूगोल, इतिहास आणि वर्तमान समजावून घ्यायचा असेल तर तिथे रिक्षाने नाहीतर टॅक्सीने प्रवास करावा. काही वेळातच त्या गाडीवानाने आपल्याला त्रिकालज्ञानी केलं नाही तर मग सांगा. राजकारणावरती बोलणे हा तर ड्रायव्हर लोकांचा आवडीचा आणि अभ्यासाचा विषय. गल्लीतील नगरसेवकापासून ते त्याच नगरसेवकाच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत सगळ्या बाबतीत यांचा दांडगा अभ्यास असतो. ऋषी सुनक इंग्लडचे पंतप्रधान होण्याच्या काही महिने अगोदरच एका टॅक्सी ड्रायव्हरने ते निवडून येणार असल्याचं मला खात्रीपूर्वक सांगितलं होतं.
‘तू हे इतक्या खात्रीलायकरित्या कसे काय सांगतोस,’ असे मी विचारल्यावर त्याने माझ्याकडे एक अत्यंत दयनीय कटाक्ष टाकला, ‘मॅडम, २२ वर्ष झाली, एयरपोर्टवर टॅक्सी घेऊन येतो मी, उगीच नाही गाडीची चाकं घासली.’
उगीच नाही काळ्याचे पांढरे झाले, असे पूर्वज म्हणायचे त्याच धरतीवर त्याने हे वाक्य फेकलेलं होतं. पुढे काही विचारण्याचा मला धीरच झाला नाही.
काही विशिष्ट पात्रता असल्याशिवाय माणसाला ड्रायव्हर बनताच येत नाही असे माझे ठाम मत आहे. गाडी चालवता येणे ही फारच प्राथमिक अट झाली. पण तुम्हाला जर दुसर्याच्या गाडीवर वाहनचालक म्हणून नियुक्ती हवी असेल तर वेळोवेळी आपले मत प्रदर्शित करणे, मुळात प्रत्येक गोष्टीवर आपले ठाम मत असणे, दुसरा कोणी फोनवर बोलत असल्यास कानाडोळा केल्यासारखे दाखवून तो संवाद ऐकणे, स्वतः सोडून जगातील बाकीच्या कुठल्याही ड्रायव्हरला उत्तम गाडी चालवता येत नाही या गोष्टीवर प्रगाढ विश्वास असणे, तोंडात मावा ठेवून बोलता येणे आणि डुप्लिकेट धडाम धडाम गाणी शोधून ती लावता येणे, अशा काही महान गोष्टींमध्ये प्राविण्य सिद्ध केल्याशिवाय व्यावसायिक गाडीचालन करता येतच नसावे.
प्रत्येक गावच्या वाहनचालकांची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात. जसे की तुम्ही कितीही स्त्री असा, पण दिल्लीचा वाहनचालक तुम्हाला ‘सरजी’च म्हणणार. पुणे स्टेशनच्या बाहेर येऊन डेक्कनला किंवा शिवाजी नगरला जायला रिक्षा मिळवून दाखवावी. पुण्याच्या संस्कृतीचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे याची तिथल्या रिक्षाचालकांना जाणीव आहे. त्यामुळे बाहेरगावहून आलेला एखादा माणूस कायमचा पुणेकर होऊ नये म्हणून ते रिक्षाभाडं घ्यायचंच नाकारतात आणि खुशाल कोंडाळं करून बाहेरच्या लोकांनी पुणं कसं बिघडवलं यावर गप्पा करीत बसतात.
दक्षिण भारतात तर तर्हाच निराळी. आम्ही मध्यंतरी एका लग्नासाठी चेन्नईला गेलो होतो. बराच वेळ प्रयत्न करूनही ओला/उबेर मिळत नव्हती. कशीबशी ती मिळाली तर भाषेच्या अनंत अडचणी. खरं तर बुकिंगच्या वेळी पत्ता टाकूनही वाहनचालक गोंधळला होता. त्याच्या मते चेन्नईमध्ये असे कुठले ठिकाणच नव्हते. आजूबाजूच्या लोकांना मध्यस्थी घेऊन शेवटी त्याला ते ठिकाण समजावून सांगितले. गाडीत बसलो तर हा भलताच गप्पिष्ट निघाला. तामिळ भाषेत चिकार गप्पा मारू लागला, आम्हाला कळत नाही, हे बघून मधेच ‘इंग्लिश इंग्लिश’ असे म्हणून संपूर्ण तामिळ वाक्यात एक इंग्रजी शब्द घालू लागला. त्याने बहुधा खूप विनोद सांगितले असावेत, कारण मधेमधे तोच जोरजोरात हसत होता. हल्ली विनोदी लिखाण मागे पडले आहे असे म्हणणार्यांना त्याचे विनोद ऐकवायला हवेत.
आमच्या चेहर्याकडे बघून त्याने मधेच विचारले, ‘यू फ्रॉम मुंबई?’
आम्ही – येस
तो – फ्रॉम धारावी?
आम्ही – नो नो
तो – देन सायन कोळीवाडा?
आम्ही – नो
त्याच्या दोन्हीही प्रश्नांना मिळालेल्या नो उत्तराने तो खूपच नाराज झालेला होता. त्याच्या मते आम्ही जर धारावी किंवा सायन कोळीवाडामधून आलेले नसू, तर आम्हाला मुंबईचे म्हणवण्याचा काहीच अधिकार नव्हता.
या वाहनचालक चमूमध्ये सुद्धा स्वतःचे काही अहंकार जपलेले असतात. मी ऑफिसला फारशी चारचाकी नेत नाही. पार्किंगची अडचण होते. पण त्या दिवशी अगदीच नाईलाज म्हणून गाडी नेली.
ऑफिसला पोचले तर पार्किंग बर्यापैकी भरलेले होते. एका कोपर्यात जागा रिकामी दिसली म्हणून तिथे गाडी लावली आणि निघणार तितक्यात शेजारी पांढर्या कपड्यात बसलेल्या एका वाहनचालकाने अत्यंत तुच्छ कटाक्ष टाकत सांगितले, ‘मॅडम, गाडी हलवावी लागेल.’
मी – का?
वाहनचालक – शेजारी व्यवस्थापकीय संचालकांचे पार्किंग आहे.
मी – मग?
वाहनचालक – अहो, त्याशेजारी दुसर्या कोणाची गाडी पार्क करू शकत नाही.
हा नियम मला माहितीच नव्हता. मग ऑफिसमध्ये चौकशी केल्यावर समजले की असा काही नियम नाही पण अलिखित स्वरूपात तो पाळला जातो. एवढेच नव्हे, तर प्रत्येक श्रेणीच्या व्यवस्थापकांच्या वाहनचालकांचा वेगळा गट आहे. ते सगळे एकमेकांबरोबर बोलत नाहीत. वरिष्ठ व्यवस्थापनातील लोकांचे ड्रायव्हर वेगळे बसलेले असतात. चुकून नवीन वाहनचालक त्यांच्यात गेला, तर त्याला तशी जाणीव करून दिली जाते.
बघा म्हणजे ‘कोहम्’ वगैरे प्रश्न आपल्याला उगीचच पडलेले असतात. या गाडीवान लोकांना त्याचे उत्तर किती लवकर मिळालेले असते.
हिमाचलला गेलो होतो, तेव्हा तिथे आमच्याकडची रोकड संपली. वाहनचालकाला एटीएमपाशी गाडी घेऊन चल म्हटलं, तर म्हणाला, तुम्हाला रोकड हवी असल्यास मी देऊ शकतो. आम्ही म्हटलं, अरे बरीच हवी आहे. तर त्याचे उत्तर होते, लगेच हवी असल्यास ६०,०००पर्यंत देऊ शकतो, १५ मिनिटात लाखभर मिळू शकतात. फावल्या वेळचा छंद म्हणून शेतीव्यतिरिक्त तिथले लोक वाहनचालक म्हणून काम करतात. त्याची रोकड देण्याची क्षमता बघून मला कफल्लक झाल्यासारखं वाटू लागलं.
गाडी सजवणारी वाहनचालकांची एक अजब श्रेणी आहे. थ्रीडी लायटिंग, दोन बाजूला पंखे, डॉल्बी सिस्टीम वाटावी अशी म्युझिक सिस्टीम, भपकेबाज एयर प्रâेशनर्स अशी आपापल्या वकुबाप्रमाणे गाडीची केलेली सजावट बघून मला भरून येते.
काही वाहनचालकांना नुसता आरामात बसलेला प्यासेंजर बघवतच नाही. एकदा तर एका रिक्षाचालकाने मला बजावलेच होते, ‘ताई, मागच्या शीटवर नुसत्या बसूनच हायेत ना तुम्ही, तर एक काम करता का, मागे फिशपॉन्ड ठेवलाय छोटा, तो पकडून बसता का? लई हलायलाय कवाचा, फुटाय बिटायचा.’
फिशपॉन्ड पकडण्यापासून ते पावसाळ्यात रिक्षाचे पडदे पकडून बसण्यापर्यंत सगळी कामे मी केलेली आहेत. हल्ली नवीन निघालेल्या महिला चालक चलित रिक्षाच्या चालिकेने तर एकदा मला रिक्षात तसंच बसवून बाजारात जाऊन मटार, मेथी, शेपू अशी काय काय भाजी आणली आणि मला म्हणाली, ‘ताई निवडता का जरा. तुमाला सोडलं की लगेच घरी जाऊन भाजी करायची आहे मला. तेवढीच जरा मदत. लागल्यास पाच रुपये कमी द्या भाड्याचे.’
वाहनचालक या विषयावर माझा आता एवढा अभ्यास झालेला आहे की १०० लोकांमध्ये एखादा वाहनचालक असेल तर तो मी अचूक ओळखू शकते. शहरात काय चालले आहे याची तर इतकी पक्की खबर दुसरे कोणी ठेवूच शकत नाही. मध्ये एका साहित्य संमेलनाला गेले होते, तेव्हा तिथल्या रिक्षावाल्याला विचारलं की काय रे कसा आहे संमेलनाला प्रतिसाद? तर म्हणाला, ‘एवढं काही नाही हो ताई. यापेक्षा जास्त गर्दी जळगावकरणीच्या तमाशाला असती.’
एक मोठा नेता गेल्यावर एका रिक्षावाल्याला विचारले होते, ‘काय रे बरीच दिसते गर्दी.’ तर तो म्हणाला, ‘म्याडम, ही तर काहीच गर्दी नाही, आमचे अमुकतमुक मंत्रीसाहेब गेल्यावर बघा गर्दी कसली असती ते.’
अध्यात्म म्हणू नका, राजकारण म्हणू नका- भ्रष्टाचार, महागाई, आजूबाजूला घडणार्या घटना याचे वाहनचालकांइतके आकलन मला दुसर्या कुठल्याही व्यवसाय करणार्या लोकांमध्ये दिसले नाही. देशाचा विकास नक्की कशातून घडू शकेल हे त्यांना माहिती असते. देश कशामुळे अधोगतीला चालला आहे हेही त्यांना ठाऊक असते. शिवाय वाहनचालक प्रत्येक गावागावात, शहरात असतात. त्यामुळे देश कुठल्या दिशेने निघाला आहे आणि त्याची दशा काय आहे हे जाणून घ्यायचे असेल तर टॅक्सीने अथवा रिक्षाने प्रवास करावा.