२० नोव्हेंबर या प्रबोधनकार ठाकरेंच्या स्मृतिदिनी त्यांच्यावरच्या वेबसाईटचं रिलॉन्चिंग उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते शिवाजी मंदिर, दादर इथे होतंय. त्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यातल्या ऋणानुबंधाला उजाळा मिळालाय.
– – –
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचं साहित्य ही पेटती मशाल आहे. तिच्या प्रकाशात समोरची वाट उजळून निघते. त्यांनी केलेल्या इतिहासाच्या विश्लेषणात वर्तमानातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात. पण डोक्यात असंख्य प्रश्नांचं मोहोळ उभं करणारा विद्रोह, ही प्रबोधनकारांच्या साहित्याची सगळ्यात मोठी ताकद आहे. प्रश्नांतून उत्तराकडे होणार्या प्रवासातच विचारांची वाटचाल विधायक दिशेने होते.
असं प्रबोधनकारांचं साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं म्हणून ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या वेबसाईटचा घाट घातला. १७ सप्टेंबर २०१०ला प्रबोधनकारांच्या १२५व्या जन्मदिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या हस्ते तिचं लोकार्पण झालं. या वेबसाईटमधे प्रबोधनकारांची पुस्तकं वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत. त्यातून गेल्या बारा वर्षात लाखो जणांपर्यंत प्रबोधनकार पोचले आहेत. विसाव्या शतकातल्या महाराष्ट्राचा अभ्यास करणार्या जगभरातल्या अभ्यासकांनी त्याचं कौतुक केलंय. दुर्मिळ असणारी पुस्तकं एका क्लिकवर उपलब्ध झाल्यामुळे लेख किंवा पुस्तकं लिहिणार्या, पीएचडी करणार्यांना त्याचा फायदा झालाय. विशेषतः तरुणांमधे प्रबोधनकारांविषयी विविध कारणांनी निर्माण झालेलं कुतूहल शमवण्यात ही साईट बर्याच अंशी यशस्वी झालीय.
पण या बारा वर्षांत टेक्नॉलॉजीही आमूलाग्र बदललीय. सोशल मीडियाचा पसारा अवाढव्य झालाय. माहितीचं जाळं पीसीवरून स्मार्टफोनवर आलंय. त्यामुळे सध्या साइटवर अनेक एरर आहेत. अनेक ठिकाणी शब्द आणि पॅरेग्राफ चिकटले आहेत. प्रबोधनकारांच्या भाषणांचे ऑडियो ऐकू येत नाहीत. त्याला साईट नव्याने सुरू करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे नव्या स्वरूपातील सोशल मीडिया आणि मोबाईल फ्रेंडली वेबसाईटचं रिलॉन्चिंग प्रबोधनकारांच्या स्मृतिदिनी रविवार, २० नोव्हेंबर २०२२ला मुंबईतील शिवाजी मंदिर येथील कार्यक्रमात होतंय.
या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते हे लोकार्पण होतंय. एकविसाव्या शतकातल्या महाराष्ट्राच्या राजकारणातले हे दोन नेते बहुदा पहिल्यांदाच या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका मंचावर येत आहेत. त्या निमित्ताने एक महत्त्वाच्या ऋणानुबंधाला उजाळा मिळतोय. हे समतेच्या लढाईतल्या दोन दिग्गजांमधलं स्नेहाचं नातं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि केशव सीताराम ठाकरे. घटनाकार आणि प्रबोधनकार. दोघेही समकालीन. दोघेही दादरकर. एकमेकांशी ते किमान चाळीसेक वर्षं तरी एकमेकांच्या संपर्कात असावेत. दोघांचाही वैचारिक पाया सारखाच होता. महात्मा जोतिबा फुलेंना दोघांनीही आपलं गुरू मानलं होतं. भगवान बुद्ध हे दोघांचीही प्रेरणा होते. राजर्षी शाहू महाराज हे दोघांच्याही पाठिशी आदरपूर्वक उभे होते. बाबासाहेबाना अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले होते. प्रबोधनकार हे पांढरपेशा सीकेपी जातीत जन्मलेले असूनही त्यांना ब्राम्हणेतर म्हणून जातिभेदाचे फटके बसले होते. तरीही दोघे जातिव्यवस्थेविरुद्ध अत्यंत धडाडीने लढले.
दोघेही ज्ञानयोगी. वाचनाचा दोघांनाही प्रचंड नाद. इतिहास, तत्त्वज्ञानासह अनेक विषयांचा दोघांचाही व्यासंग मोठा. दोघांनीही या व्यासंगाच्या आधारे ब्राह्मणी वर्चस्वाला हादरे दिले आणि बहुजनांची न्यूनगंडातून सुटका करण्याचं महत्त्वाचं काम केलं. फक्त समाजसुधारक म्हणूनच नाही तर पत्रकार, लेखक आणि वक्ते म्हणून दोघांचाही महाराष्ट्रभर दरारा होता. दोघांचीही लेखणी तिखट होती. बाबासाहेबांनी काही देवतांवर केलेली टीका काही वर्षांपूर्वी वादाचा विषय बनली होती. पण प्रबोधनकारांनी देव आणि देवळांवर केलेले प्रहार त्याच्याही पुढे आहेत. प्रबोधनकारांनी आपल्या लिखाणात बाबासाहेबांविषयी अनेकदा अत्यंत आदरपूर्वक लिहिलं आहेच. बाबासाहेबांनाही एक इतिहास संशोधक म्हणून प्रबोधनकारांच्या लेखनाचे उतारे आपल्या साहित्यात संदर्भ म्हणून दिलेले आहेत. गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील, रावबहाद्दूर सी. के. बोले, श्रीधरपंत टिळक, दिनकरराव जवळकर, ज्ञानदेव घोलप अशी दोघांच्या कॉमन मित्रांची यादी खूप मोठी आहे.
दोघांच्या संदर्भातला एक महत्त्वाचा संदर्भ १९२३ सालातल्या निवडणुकांचा आहे. तेव्हा प्रबोधनकार सातार्यात होते. निवडणुकांमधे ब्राह्मणेतर आणि बहुजन समाजाच्या नावाने अस्पृश्यांना गृहित धरण्याला त्यांनी विरोध केला. त्यांनी `प्रबोधन`मधे त्यावर लेखही लिहिला, `अस्पृश्यांनो स्पृश्यांपासून सावध राहा!` याचा परिणाम म्हणून प्रबोधनकारांनी सातार्यात बसवलेलं `प्रबोधन`चं बस्तान उद्ध्वस्त झालं. स्पष्ट सांगायचं तर त्यानंतर प्रबोधन आणि प्रबोधनकारही देशोधडीला लागले. पण माणगाव परिषदेत छत्रपती शाहूंनी मांडलेल्या भूमिकेचा वारसा सांगत त्यांनी ते हसत हसत स्वीकारलं.
प्रबोधनकारांच्या या भूमिकेतून त्यांचा बाबासाहेबांविषयीचा विश्वास लख्ख दिसतो. ती भूमिका अशी हाेती, ‘तुमच्या भाग्याने तुम्हाला डॉ. आंबेडकरांसारखा तरणाजवान तुमच्या हाडारक्तांमासाचा पुढारी लाभला असताना, तु्म्ही आमच्यासारख्यांच्या मागे का लागावे? अहो, मेंढ्यांचा पुढारी दाढीवाला बोकड असावा. लांडगा चालेल का? आंबेडकरच तुमचं कल्याण करणार. बाकीचे आम्ही सारे बाजूचे पोहणारे.’ आजही बेरजेच्या राजकारणाच्या नावाने दलित मतांना आणि नेत्यांना वापरण्यात येतंय. त्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचं आहे.
दोघांनी मिळून दादरमधे एक खूप महत्त्वाची लढाई लढली होती, ती होती सार्वजनिक गणपती उत्सवाची. साल १९२६. टिळक ब्रिजच्या जवळ आणि दादर सार्वजनिक वाचनालयाच्या मागच्या बाजूला रिकाम्या मैदानात सार्वजनिक गणपतीचा मंडप होता. दलिताच्या हातून गणपतीची पूजा करायची असा निर्धार बाबासाहेबांच्या नेतृत्वात दादरच्या बहुजन तरुणांनी केला होता. त्यात प्रबोधनकारांचीही साथ होती. गणपतीच्या पहिल्याच दिवशी या कार्यकर्त्यांनी मंडपाला गराडा घातला. मंडळाचे उच्चजातीय पदाधिकारी टाळाटाळ करत होते. दुपारी बारा वाजता प्रबोधनकार गर्जले, तीन वाजेपर्यंत जर अस्पृश्याच्या हातून गणपतीची पूजा झाली नाही, तर गणपतीची मूर्ती फोडून टाकेन. त्यानंतर कुत्र्याचं शेपूट सरळ झालं. बाबासाहेबांचे एक कार्यकर्ते मडकेबुवा यांनी स्पर्श केलेलं गुलाबाचं फूल गणपतीवर वाहण्यात आलं. परळ चौकाला याच मडकेबुवांचं नाव देण्यात आलं आहे.
पण यानंतर तो गणेशोत्सव बंद पडला. त्याचा आळ प्रबोधनकारांवर आला. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक नवरात्रौत्सवाची सुरवात केली. जसे सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्यांनी केली तसंच मराठी पद्धतीच्या सार्वजनिक नवरात्रौत्सवाची स्थापना करण्याचं श्रेय प्रबोधनकारांकडे जातं. बाबासाहेब या बंडखोरीत सोबत होतेच. विशेष म्हणजे हा उत्सव सुरु करण्याची भूमिका मांडणारं एक आवाहन तेव्हा `प्रबोधन`मधे नाही, तर बाबासाहेबांच्या बहिष्कृत भारतमधे छापून आलं होतं. त्यावर प्रबोधनकारांची सही होती.
खांडके बिल्डिंगमधेच प्रबोधनकारांनी स्वाध्यायाश्रमाची स्थापना केली. या संस्थेच्या तरुणांनी अनेक भाषणांचं आयोजन केलं, पुस्तकं छापली, शिवाय हुंड्याच्या विरोधात रान उठवलं. पुढे प्रबोधनकार प्रबोधनच्या वाढीसाठी सातारा आणि पुण्याला गेले. तेव्हा बहुजनवादाचे संस्कार झालेले कार्यकर्ते बाबासाहेबांबरोबर गेले. बाबासाहेबांच्या चरित्रात टिपणीस, चित्रे, चिटणीस अशी कायस्थांची आडनावं अनेकांना बुचकळ्यात पाडतात. त्यामागे प्रबोधनकारांनी केलेली मशागत आहे. जुन्या जमान्यातील पत्रकार श्री. शं. नवरे यांनी १६ जानेवारी १९६५च्या महाराष्ट्र टाइम्समधे लिहिलंय, `आपल्या समाज सुधारणेच्या प्रचारासाठी कार्यकर्ते तयार करण्याचे उद्देशाने श्री. ठाकरे यांनी दादर येथे स्वाध्यायाश्रम नावाची संस्था बरीच वर्षे चालवली. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेल्या समाज समता संघाला निष्ठावंत कार्यकर्ते पुरविण्याचे काम मुख्यतः याच संस्थेने केले.` महाडच्या सत्याग्रहाला पाठिंबा देणारा अस्पृश्यांचा मेळावा परळच्या दामोदर हॉलमधे भरला होता. त्यात प्रबोधनकारांनी अस्पृश्यांच्या हातचं पाणी पिऊन आपण कर्ते सुधारक असल्याचं सिद्ध केलं होतं, असा एक संदर्भही बाबासाहेबांच्या चरित्रात सापडतो.
प्रबोधनकार पुण्यात असतानाही त्यांनी ब्राम्हणेतर आंदोलनाला उभारी आणण्यात हातभार लावला होता. तेव्हा श्रीधरपंत आणि रामभाऊ या लोकमान्य टिळकांच्या मुलांनी केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर यांच्या सहकार्याने गायकवाड वाड्यातल्या गणपतीसमोर अस्पृश्यांच्या मेळ्याचा कार्यक्रम ठेवला. गायकवाड वाड्यातच समता सैनिक संघाची स्थापना करून बाबासाहेब आणि अन्य दलित नेत्यांबरोबर सहभोजन घडवलं होतं. या सगळ्या योजना रचल्या गेल्या त्या प्रबोधनच्या कचेरीत.
बाबासाहेबांनी बुद्ध धर्मात केलेल्या सामूहिक धर्मांतराविषयी आजही बोलके हिंदुत्ववादी त्यांना दोषी मानतात. मी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही, असं त्यांनी पहिल्यांदा मांडलं तेव्हा प्रबोधनकारांनी साप्ताहिक संदेशमधे लेख लिहून हिंदुत्ववाद्यांच्या या टीकेचा समाचार घेतला आहे. ते लिहितात, `हिंदू संघटना व्हावी, अशी माझी कितीही प्रामाणिक विवंचना असली तरी चालू हिंदू संघटनेच्या आणि हिंदू महासभेच्या धांगडधिंग्यावर माझा मुळीच विश्वास नाही. कारण तेथील कार्यकर्त्यांच्या हेतू नि तळमळीबद्दलच मी साशंक होण्याइतकी कारणे मजजवळ आहेत… डॉ. आंबेडकरांपुढे नाकदुर्या काढण्यासाठी डॉ. कूर्तकोटी शंकराचार्यापासून तो थेट बॅ. सावरकरांपर्यंत कोणी कितीही खर्याखोट्या तळमळीची शिकस्त केली, तरी त्यांच्या प्रयत्नांना भिक्षुकी जीर्णमताच्या पाषाण तटबंदीपुढे हारच खावी लागेल. सारा हिंदुसमाज ब्राम्हण नी ब्राम्हणेतर, भिक्षुकशाहीच्या करंट्या धर्मकल्पनेचा गुलाम बनलेला. मूठभर शहरी सुधारक म्हणजे हिंदूसमाज नव्हे आणि त्यांची बहुजनसमाजाला दाद किंवा पर्वा मुळीच नसते.`
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्रबोधनकार शेलारमामाच्या आवेशात आघाडीवर होते. त्यादरम्यान चर्चगेटजवळच्या लव्ह कोर्ट बंगल्यात त्यांची बाबासाहेबांशी शेवटची भेट झाली. तेव्हा बाबासाहेबांनी प्रबोधनकारांना सांगितले की जोवर सगळे विरोधी पक्ष एकत्र येत नाहीत, तोवर काँग्रेस संयुक्त महाराष्ट्र देणार नाही. शिवाय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन जिब्राल्टरसारखा तुमच्यासोबत उभा राहील, असं आश्वासनही दिलं. प्रबोधनकारांनी आंबेडकरांसोबत झालेली ही मुलाखत `नवाकाळ`मधे छापून आणली. त्यानंतर जादूची कांडी फिरली. सगळे मतभेद बाजूला सारून विरोधी पक्ष एकत्र झाले. संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली. या लढ्यातून महाराष्ट्राची निर्मिती झाली.
आज प्रबोधनकार डॉट कॉमच्या रिलॉन्चिंगच्या निमित्ताने हा ऋणानुबंध नव्याने झळाळून निघतो आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचं हे निमंत्रण आहे.