एक गजराज शहरातील रस्त्यावरून जात असताना काही भटकी कुत्री त्याच्या मागे लागून जोरजोरात भुंकू लागली. बराच वेळ गजराज त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत चालत राहिला. पण कुत्री काही भुंकायचे थांबेनात, हे पाहून अखेर तो चिडून मागे वळला आणि आपली सोंड वर करून त्या कुत्र्यांकडे पाहून त्याने जोरात चीत्कार केला. गजराजाचा तो आक्रमक आवेश पाहून आणि त्याचा गगनभेदी चित्कार ऐकून ती कुत्री प्रचंड घाबरली आणि मागे वळून त्यांनी धूम ठोकली. गजराज पुन्हा आपल्या मार्गाने ऐटीत चालत निघाला.
पंचतंत्रात ही कथा आहे. तिथे गोष्टींच्या खाली एका वाक्यात तात्पर्य दिलेलं असतं. इथे ते लिहिण्याची गरज नाही. आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आता खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईच्या प्रसंगी जी आक्रमक भूमिका घेतली आणि त्यानंतर न्यायालय आणि जनतेत ईडीची जी नालस्ती झाली त्यावरून वरील कथा आठवली. २०१९ साली तेव्हा येऊ घातलेल्या निवडणुकांच्या दरम्यान शरद पवार आपल्या वाटेतला मोठा अडसर ठरू शकतात, हे लक्षात घेऊन काही दबावतंत्राचा वापर करून पवारांना शांत ठेवता येईल का, याची चाचपणी करण्याचा निर्णय राज्य आणि केंद्रातील भाजपच्या काही प्रमुख नेत्यांनी घेतला.त्यानुसार केंद्रीय सत्तेचा गैरवापर करीत काही प्रकरणांच्या चौकशीचा हवाला देत ईडीच्या वतीने पवार यांना नोटीस धाडण्यात आली. पन्नास वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेल्या पवारांना भाजपचा कावा ओळखायला अजिबातच उशीर लागला नाही. त्यांनी धूर्तपणे भाजपचा डाव त्यांच्यावरच उलटवण्याची रणनीती आखली. ईडीने त्यांना कार्यालयात तातडीने बोलावले नसतानाही त्यांनी स्वतःहून ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचं घोषित केलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आधीच नोटीसवरून असंतोष होता. पवारसाहेब ईडीच्या कार्यालयात जाणार हे कळल्यावर अस्वस्थ आणि संतप्त नेते, कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात गोळा होऊ लागले. राज्यभरात ईडीच्या विरोधात घोषणाबाजी आणि काही ठिकाणी रास्ता रोको वगैरे प्रकारांच्या माध्यमातून उद्रेक सुरु झाला. पवार खरंच ईडीच्या कार्यालयात जाण्यास निघाले, तर मुंबईसह महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडण्याची चिन्हे दिसायला लागली. आपला डाव आपल्याच अंगाशी आला हे तोवर भाजप नेत्यांच्या पूर्ण लक्षात आलं होतं. ईडी अधिकार्यांचीही चांगलीच तंतरली होती. अखेर मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पवारांच्या निवासस्थानी पाठवून त्यांनी ईडी कार्यालयात येऊ नये अशी विनंती करण्यात आली. ईडीनेही सपशेल माघार घेतली आणि त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.
खासदार आणि दै. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत ही शिवसेनेची मुलुखमैदान तोफ. महाराष्ट्रात असंवैधानिक मार्गाने सत्तापालट घडवताना सगळ्यात जास्त त्रास त्यांचाच होणार हे भाजप आणि त्यांच्या नादाला लागलेले गद्दार जाणून होते. त्यामुळेच त्यांना ठरवून टार्गेट करण्यात येत होतं. ईडीचा वापर राऊतांना नमवण्यासाठीच करण्याचा निर्णय झाला होता. पण भाजपचा आणि गद्दार सेनेचा अंदाज चुकला. राऊतांना ओळखण्यात ते कमी पडले. बाळासाहेब ठाकरे यांच्या सान्निध्यात राहिलेले, त्यांचे धगधगते विचार अंगी भिनलेले राऊत अखेरपर्यंत नमले नाहीत. भाजपला, गद्दार सेनेला ते शिंगावर घेतच राहिले. अखेर ईडीची कोठडी स्वीकारून जेलमध्ये जाणं त्यांनी स्वीकारलं, पण त्यातून खरा निष्ठावंत कसा असतो ते जगाला दाखवून दिलं. आपण निरपराध असून न्यायालयीन लढाई आपणच जिंकू हे राऊत सतत सांगत होते. अखेर तेच खरं ठरलं. परंतु ते होत असताना मा.न्यायालयाने जे कठोर आणि परखड ताशेरे ईडीच्या कार्यप्रणालीवर ओढले त्याने ईडीचे पूर्ण वस्त्रहरण झालं. संजय राऊत यांना अटक करण्यासाठी ईडीकडे कोणताही सबळ पुरावा नव्हता, तरीही पूर्णपणे बेकायदा पद्धतीने ईडीने अटकेची कारवाई केली, हे जामीन मंजूर करताना न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नमूद केलंय. याशिवायही ईडीच्या कारवाईवर भाष्य करताना न्यायालयाने जे काही अन्य मुद्दे निकालपत्रात नमूद केलेत त्याने ईडीची पूर्ण नालस्ती झालीय.
कोणत्याही दबावापुढे न झुकता निधड्या छातीने ईडीच्या कोठडीत गेलेल्या राऊत यांच्याविषयी निष्ठावंत शिवसैनिक आणि सर्वसामान्य जनतेमध्ये किती प्रचंड कौतुक, स्नेह आणि आदर निर्माण झालाय, त्याची प्रचिती त्यांच्या सुटकेनंतर सगळ्यांनाच आली. आपण काय करायला गेलो आणि हे काय होऊन बसलं, असं भाजप आणि गद्दार सेनेला आता वाटत असेल. शरद पवार यांच्या ईडी प्रकरणानंतर पुन्हा एकदा भाजपच्या तंगड्या त्यांच्याच गळ्यात येऊन पडल्यात. सत्तेपुढे लाचार होऊन चुकीच्या कारवाया करणार्या ईडीच्या अधिकार्यांना खरं तर तोंड दाखवायला आता कुठे जागा राहिलेली नाही. एखाद्या व्यक्तीवर न्यायालयाने इतके कठोर ताशेरे ओढले असते तर आता कोणत्या तोंडाने समाजापुढे जायचं या लाजेकाजेतून त्या व्यक्तीने आत्महत्या केली असती. पण लाचार ईडीच्या कार्यप्रणालीत काही फरक पडेल का, याबाबत शंकाच आहे.
राजकारणात धूर्तपणा, कावेबाजपणा, संधिसाधूपणा वगैरेपर्यंत ठीक होतं. पण राजकीय विरोधकांना केवळ राजकारणातूनच नव्हे तर जीवनातूनच उठवण्याचा, त्यांचे कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा हा जो घाणेरडा प्रकार भाजपने सत्तेचा गैरवापर करीत सुरु केलाय तो संतापजनक आणि निषेधार्ह आहे. राऊत यांच्या संदर्भातील मुंबईतील न्यायालयाच्या निकालानंतर दुसर्याच दिवशी दिल्ली न्यायालयानेही एका प्रकरणावरून ईडीची खरडपट्टी काढली. सत्तेचा इतका गैरवापर आजवर या देशात कधीही झाला नव्हता. न्यायपालिकेत अजूनही अनेक न्यायाधीश नि:स्पृहपणे आपलं कर्तव्य बजावत आहेत म्हणून लोकशाही कशीबशी जिवंत आहे, अन्यथा कठीण झालं असतं.
कोठडी, कारागृह म्हणजे काय असतं आणि कोणत्याही निरपराध माणसाच्या वाट्याला अकारण तिथले भोग वाट्याला येतात तेव्हा त्याची तिथे काय मानसिक अवस्था होते ते परवा ‘माझा कट्ट्या’वर संजय राऊत जेव्हा सांगत होते, तेव्हा ते ऐकताना कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला गहिवरून आलं असेल. हे सगळे गद्दार पुढील काळात जनतेच्या रोषात खाक होतील, त्यांचं कुठे अस्तित्वही राहणार नाही, हे त्यांचे उद्गार त्यांच्या मनातील पुढचा निर्धार काय आहे त्याची दिशा दाखविणे होते. असो. या सगळ्यातून राऊतांच्या आजवरच्या कारकीर्दीला अधिक झळाळी तर प्राप्त झालीच पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मूळ आणि खर्या शिवसेनेतही मोठंच चैतन्य निर्माण झालंय. येत्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने हे चैतन्य महत्वाचं ठरेल.
मातोश्रीवर संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांचा हात उंचावून या हातांमधील शिवसेनेची धगधगती मशाल विरोधकांची राख करेल हे दर्शवलं. राऊत यांनी दिलेला लढा आणि पुढचा व्यक्त केलेला निर्धार पाहून ‘अमर उजाला’मध्ये मागे प्रकाशित झालेली ही कविता आठवली..
मुझे मिटाने का हौसला हो तो आज़मा के देखना
कागज पे बनी तस्वीर नहीं खून का गहरा रंग ‘लाल’ हूँ मैं
न सिसकती दबी चीख न सबर-ए-इम्तेहान हूँ मैं
रगों में दौडते लहू का खौलता उबाल हूँ मैं!!
कोई हकरायदाहि से महरूम कठपुतली नहीं
मैं शोर हूँ, कोहराम हूँ, दहाड़ हूँ मैं !!
वो मजलूम नहीं जिसको घेरे हों सियासी फंदे
तख्त पलट के रख दूं एक ही बाजी में
शतरंज की ऐसी गहरी चाल हूँ मैं!
मैं किसी हार में लगा नाज़ुक सा फूल नहीं
कलेजा चीरती तलवार की तेज धार हूँ मैं!!
नहीं हूँ मधुर रागिनी, साज या तराना कोई
मैं हूँ तांडव शिव का, तबाही का ऐलान हूँ मैं!!
बुझता दिया नहीं मशाल हूँ मैं…