२०१९ मध्ये मी कोचीमध्ये गेले होते. शाहरुख आणि सलमान यांच्याबद्दल सर्वात जास्त वेळा गुगल सर्च करणारं कोची हे शहर आहे. तिथे पहिल्याच दिवशी एका छोट्या कॉफी हाऊसच्या बाहेर काही तरुण मुली भेटल्या. ‘त्यांचा आवडता अभिनेता कोण’ असं विचारल्यावर त्यांनी एकमतानं उत्तर दिलं, ‘शाहरुख खान’. ‘तो चांगला माणूस आहे’. असं एकजण म्हणाली. शाहरुख त्यांच्यासाठी आदर्श प्रेमी, रोजच्या कटकटीच्या आयुष्यातला दिलासा, मध्यमवर्गातून येऊन नेत्रदीपक यश मिळवणारा आदर्श असं खूप काही आहे.
– – –
एकटं बाहेर पडणं, स्वत:चं स्वत: चित्रपटाचं तिकीट काढून शाहरुखचा चित्रपट थिएटरमध्ये पहाणं ही एका मुलीची स्वातंत्र्याची कल्पना होती. भारतातल्या एका खेड्यात दर महिन्याला पैसे बाजूला टाकून सगळ्या मैत्रिणींना शाहरूखच्या चित्रपटाची सीडी भाड्यानं आणायची असते. आपल्या आयुष्यातल्या स्त्रियांचा तो किती आदर करतो, त्यांच्याकडे कसं पाहतो, त्यांचं कशा पद्धतीने ऐकतो, त्यांच्यावर कसं प्रेम करतो यावर त्याच्या फॅन्सचं प्रचंड प्रेम आहे. त्यांना आपल्या कहाण्या त्याच्या चित्रपटांमधून पडद्यावर जिवंत झाल्यासारख्या वाटतात.
– – –
यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर एक जण मित्राला फोन करुन म्हणाला ‘अब मैं शाहरूख बन गया!’ महत्वाकांक्षा आणि चांगलं आयुष्य याच्याशी शाहरूख हे नाव इतकं जोडलं गेलं आहे.
– – –
‘मला सर्वात जास्त मत्सर कधी वाटला?’ तर आर्थिक धोरणं या विषयावर काम करणार्या माझ्या एका मैत्रिणीला हीथ्रो विमानतळावर शाहरुख भेटला. फास्ट ट्रॅक इमिग्रेशनच्या रांगेत असताना ‘एका मोठ्या बँकेतली अर्थसल्लागार’ या आपल्या कामाबद्दल तिनं त्याला सांगितलं. त्यानं तिला ‘इमिग्रेशन प्रक्रिया संपल्यावर एक सेल्फी काढू’ असं प्रॉमिस केलं. इमिग्रेशन संपल्यानंतर शाहरूख थांबला. त्यानं तिच्याबरोबर सेल्फी काढली. तिनं अर्थातच त्वरेनं ती सेल्फी नवरा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअर केली. ‘या माणसानं १९८०नंतर जन्माला आलेल्या भारतीय लोकांसाठी रोमान्सची कल्पना तयार केली. आपण त्याच्याबद्दल किती विचार करतो ते आपल्या लक्षातही येत नाही’ भारतातल्या सर्वात मोठ्या ऑनलाइन मॅट्रिमोनियल साईटचा चाळिशीतला मार्केटिंग हेड मला हे सांगत होता.
– – –
भारतातल्या विविध भागातल्या बायकांच्या रोजगारी, वेतन, राहणीमान याबद्दल सर्वेक्षण करताना बोलायची सुरुवात कुठून करायची असा प्रश्न श्रायना भट्टाचार्य हिला पडायचा. श्रायना मग पहिला प्रश्न विचारायची. ‘तुमचा आवडता अभिनेता कोण?’ यावर असंख्य वेळा एकच उत्तर होतं, ‘शाहरुख खान’.
हार्वर्डमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेली श्रायना भट्टाचार्य वर्ल्ड बँकेत काम करते. आपल्या सर्वेक्षणाच्या दरम्यान भारतातल्या बायकांना शाहरुख इतका का आवडतो, हा प्रश्न तिला पडला. भारतातल्या ६६ टक्के बायकांच्या कामाला वेतन मिळत नाही. दहापैकी सहा बायकांचं आयुष्य बिनावेतन घरकाम करण्यात खर्ची पडतं. या प्रश्नांची उत्तरं शोधताना शाहरुख बायकांना इतका आवडतो, हे तिच्या लक्षात आलं. ‘दिलवाले दुल्हनिया’मध्ये काजोलवर प्रेम करणार्या शाहरुखइतकाच स्वयंपाकघरात गाजरं सोलणारा, एकीला साडी निवडायला मदत करणारा शाहरुख त्यांना जवळचा वाटत होता, अशी असंख्य उत्तरं श्रायनाच्या लक्षात आली.
मग तिच्या मनात एका पुस्तकानं आकार घेतला. ‘शाहरूख त्यांना इतका का आवडतो’ या प्रश्नाच्याच उत्तरातून त्या बायकांचं मनोगत आणि मानसिकता श्रायना उलगडत गेली. २००६पासून २०२१पर्यंत तिनं या प्रश्नांचा घेतलेला धांडोळा तिनं ‘Desperately Seeking Shah Rukh’ या पुस्तकात मांडला आहे. हार्पर कॉलिन्सचं हे २०२१च्या नोव्हेंबरमध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक. या पुस्तकाचं उपशीर्षक ‘India’s lonely young women and the search for intimacy and independence’ असं आहे. निरनिराळ्या आर्थिक स्तरातल्या स्त्रिया इंटिमसी आणि स्वातंत्र्य याला किती पारख्या आहेत हे या पुस्तकात जागोजागी दिसतं.
‘ब्रेकअप झालेल्या एका मुलीला शाहरूख आपल्या मित्र, आदर्श, विश्वासानं संवाद साधता येईल असा माणूस का वाटतो,’ या कथेनं या पुस्तकाची सुरुवात होते. या पुस्तकाचे चार भाग आहेत. पहिल्या तीन भागांत श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब वर्गातल्या बायका आपल्या शाहरुखप्रेमाबद्दल सांगतात. शेवटच्या भागात मन्नत या शाहरुखच्या बंगल्याबाहेरच्या फॅन्सबरोबर श्रायनाचा झालेला संवाद आहे.
कुटुंबांमध्ये, कामाच्या ठिकाणी आणि रोमँटिक नात्यांमध्ये असलेल्या असमानतेबद्दल त्याचे चित्रपट, गाणी, मुलाखती पाहून बायकांची मतं कशी तयार होतात आणि त्या कशा व्यक्त होतात हे या पुस्तकात आलं आहे. लग्न, एकटं राहणं आणि डेटिंग, मजूर आणि कामगार स्त्रिया, शाळेतल्या मुली अशा अनेक गोष्टींबद्दल या पुस्तकात स्टॅटिस्टिकल डेटासकट माहिती आहे. मात्र त्यानं पुस्तक वाचण्यातला रस कमी होत नाही. पुस्तकात जागोजागी हृदयद्रावक किंवा दिलखेचक कथा-कहाण्या आहेत.. आणि अर्थातच सतत शाहरुख आहे.‘हे पुस्तक शाहरुख खानबद्दल नाही. स्वत:बद्दल बोलण्यासाठी शाहरूखच्या चाहत्या असलेल्या करोडो स्त्रिया शाहरुख या आयकॉनचा कसा आधार घेतात ते या पुस्तकात मी सांगायचा प्रयत्न केला आहे’ असं पुस्तकाच्या सुरुवातीलाच श्रायना सांगते. तसंच भारतातल्या सगळ्याच बायकांच्या भावनांचं प्रतिनिधित्व हे पुस्तक करतं असा लेखिकेचा दावा नाही. पण बायकांचा एकाकीपणा आणि स्वातंत्र्य याबद्दलचे प्रश्न हे पुस्तक उभं करतं.
– – –
या पुस्तकात एक गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे, शाहरुख खान अभिनेता म्हणून आवडतो, याचबरोबर त्याच्या मुलाखतींमध्ये त्याचं बोलणं छाप पाडून जातं. त्या मुलाखतींमधूनही एक बुद्धिमान, हजरजबाबी अभिनेता अशी त्याची प्रतिमा तयार झाली आहे. त्याचा २०१७मधला टेड टॉकही चिक्कार गाजला. या टॉकमध्ये तो म्हणतो, ‘या टॉकच्या आधी मी माझा चेहरा आरशात पाहिला. मी मादाम तुसाँच्या माझ्या पुतळ्यासारखा दिसतो आहे अशी मला खात्री पटायला लागली. त्या साक्षात्कारी क्षणानंतर मी स्वत:ला विचारलं, मी माझा चेहरा जरा ठीकठाक करायला हवा का?’ चिरतरुण प्रेमिक अशी प्रतिमा असलेल्या या अभिनेत्यानं आपल्या चेहर्यावर दिसणारं आपलं वय मान्य करणं याला असामान्य धैर्य लागतं. शाहरुखचे विरोधक हाच मुद्दा घेऊन त्याच्यावर टीका करायला लागतात. तो एक कार्टून कसा दिसतो, तो किती वयस्कर झाला तरी प्रियकराची भूमिका का करतो, हे प्रश्न सातत्यानं विचारले जातात.
आपल्याकडे लोक कसे पाहतात हे शाहरुखला ठाऊक असावं का, याचं उत्तर नक्कीच हो असं आहे. त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल नवीन काही लिहिणं अशक्य आहे, कारण तो सतत स्वत:चा अभ्यास आणि विश्लेषण करत असणार. आपण त्यावर भाष्य करावं याची गरजच उरत नाही.
– – –
१९९०पासून भारतातल्या धनवान आणि मध्यमवर्गीय लोकांचा सचिन तेंडुलकर आणि शाहरुख खान यांच्यावरचा एकत्रितपणे क्रश विकसित झाला. १९९१च्या जागतिकीकरणानं, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राच्या वाढीमुळे आणि आयटी बूममुळे भारताची अर्थव्यवस्था बदलली. त्यानं कौटुंबिक नातेसंबंधही बदलले. मात्र पुरुषांची मानसिकता किती बदलली? सुशिक्षित, पगारदार असून स्त्रियांना किती तडजोडी कराव्या लागतात, लढावं लागतं त्याचे दाखले अनेकदा समाजात दिसतात. अनेक यशस्वी स्त्रियांना खाजगी आयुष्यात किती असमानतेला तोंड द्यावं लागतं. उच्च मध्यमवर्गापुरतं पाहिलं तर पुरुषांमध्ये नको इतका आत्मविश्वास आणि बायकांमध्ये स्वत:च्या क्षमतांबद्दलचा नको इतका संशय (सेल्फ डाऊट) दिसतो.
‘आपल्याला हवं तसं वागण्यासाठी सतत कुणाची तरी परवानगी मागणं म्हणजे काय हे कळल्याशिवाय भारतातली कोणतीच स्त्री जगू शकत नाही. आपल्याला हवा तो जोडीदार आणि नात्यातलं समाधान लाभणार्या फार थोड्या स्त्रिया असतात. नात्यांमध्ये असणार्या एकाकीपणाबद्दल आणि दु:खाबद्दल आपले अनुभव सातत्यानं मांडणार्या स्त्रिया हेच एक मुळातलं अपयश आहे.’ स्त्रियांच्या शरीरांवर आणि मानसिकतेवर सतत नजर ठेवली जाते. १९८७मध्ये अमर्त्य सेन यांनी एका लेखात बायका आता ‘असमानतेला सरावल्या आहेत,’ असे उद्गार काढले होते. खाजगी आणि सार्वजनिक ठिकाणी दुय्यम स्थान असणं हे बायका आता निमूट मान्य करतात.
अशी अनेक निरीक्षणं लेखिकेनं नोंदवली आहेत. पण त्यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे, सुशिक्षित बायकांना समान संधी आणि चांगली वागणूक मिळावी यासाठी त्या आसुसलेल्या आहेत. भारतात असलेलं पुरुषांचं दैवतीकरण आणि सुपरस्टारडम याचा त्यांना वैताग आला आहे. खाजगी आयुष्यात आणि कामाच्या ठिकाणी त्यांना आदर आणि सन्मान हवा आहे. त्यांचं रक्षण करतो असा भाव नको आहे. त्यांना शाहरूख खानबरोबर लग्न करायचं नाही. त्यांना शाहरुख खान व्हायचं आहे. त्याच्यावर लोकांचं जसं प्रेम आहे तसं प्रेम, आदर त्यांना हवा आहे. त्यांना चांगला पोशाख घालायचा आहे, चांगलं दिसायचं आहे आणि चांगले पैसे कमवायचे आहेत. ‘आपलं रक्षण करणारा आणि आपलं समाजातलं स्थान ठरवणारा एक पुरुष हवा’ ही गरज मागे पडते आहे. आता त्यांना पुरुषांसारखं स्वातंत्र्य आणि स्वावलंबन हवं आहे. काही मुलींची तरी त्यासाठी एकटं राहायची आणि लढायची तयारी आहे. चांगलं आयुष्य याची त्यांची कल्पना लग्न आणि भरपूर पैसे कमावणारा नवरा याच्याशी निगडित नाही. त्यांचे मित्र आणि प्रियकर राजकारणी आणि क्रिकेटर्सना आदर्श मानतात. या मुलींना मात्र आपलं स्वातंत्र्य हाच आदर्श वाटतो.
‘बायकांनी पुरुषांसारखं स्वतंत्र असणं हे मला चुकीचं वाटतं. त्यांनी ‘पुरुषांसारखं काहीही’ असा आदर्श ठेवण्यापलीकडे त्यांच्यात खूप क्षमता आहेत’ असं शाहरुखच म्हणतो!