होमरूल लीग हे भारतीय स्वातंत्र्याचा उद्घोष करणारं महत्त्वाचं आंदोलन आणि प्रबोधनकारांचा शॉर्टहँडचा छंद या दोन गोष्टी एकत्र आल्याने त्यांना काही अविस्मरणीय क्षण अनुभवता आले.
– – –
राम एजन्सीमध्ये नोकरी करत असतानाच प्रबोधनकार स्लोन पद्धतीने शॉर्टहँड शिकले. त्याला ते ध्वनिलेखन म्हणत. या पद्धतीनुसार मोठमोठी व्याख्यानं शब्दशः उतरवण्याचं कौशल्य त्यांनी कमावलं होतं. या कौशल्याच्या आधारे प्रसिद्ध पत्रकार बनण्याचं त्यांचं स्वप्न होतं. पण घरच्या गरिबीमुळे सरकारी नोकरी करावी लागली होती. तरी ते पत्रकार बनण्याची हौस म्हणून मुंबईतल्या महत्त्वाच्या व्याख्यानांना हजर राहून त्याचं शब्दांकन करत.
गजाननराव वैद्य हे मूळ थिऑसॉफिकल सोसायटीचे एकनिष्ठ अनुयायी. त्यामुळे हिंदू मिशनरी सोसायटीच्या उपक्रमांत अनेक थिऑसॉफिस्ट त्यांचे सहकारी म्हणून आवर्जून जोडलेले होते. ते सगळे प्रबोधनकारांचेही मित्र झाले. त्यांच्यासोबत ते थिऑसॉफिकल सोसायटीच्या व्याख्यानांना जात असत. त्यात त्यांना पुढे जॉर्ज आरुंडेल, जे. जे. विमादलाल, बॅ. सी. जिनराजदास अशा वक्तृत्वासाठी जगभर गाजलेल्या विचारवंतांची भाषणं शब्दबद्ध करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांची ध्वनिलेखनाची कला अधिक विकसित झाली.
विशेषतः जिनराजदास यांच्या भाषणामुळे. जिनराजदास हे मूळ श्रीलंकेचे, तत्त्वज्ञानाचे जगप्रसिद्ध विद्वान, पुढे थिऑसॉफिकल सोसायटीचे अध्यक्ष बनलेले. मुंबईतल्या गावदेवीला सोसायटीचं संमेलन भरलं होतं. त्याचे अध्यक्ष असणार्या जिनराजदासांचं भाषण नोंदवायला प्रबोधनकारांनी सुरुवात केली. सुरवातीला मिनिटाला ३० ते ४० शब्द इतका वेग शेवटी मिनिटाला २०० ते २१० शब्दांपर्यंत पोचला. त्याबरोबरच ध्वनिलेखनाचा वेगही वाढत गेलेला प्रबोधनकारांना आढळला. ध्वनिलेखक वक्त्याशी समरस झाला असेल, तर तो कितीही वेगात केलेलं भाषण नोंदवू शकतो, असा निष्कर्ष त्यांनी काढला.
थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना अमेरिकेत १८७५ साली झाली होती. धर्म, संप्रदाय, वंश, वर्ण, जात, लिंग अशा कोणत्याही भेदभावांवर मात करत मानवतेच्या आधारावर विश्वबंधुत्व उभं करण्यासाठी ही सोसायटी काम करत होती. पण मानव आणि निसर्गातल्या अज्ञात शक्तींचा शोध घेण्यासाठी सोसायटी स्थापनेपासूनच भारताकडे आकर्षिली गेली होती. १९०८मध्ये अॅनी बेझंट या अध्यक्ष झाल्यावर थिऑसॉफीचा प्रभाव देशभर पसरू लागला. मुंबईही त्याला अपवाद नव्हतीच.
अॅनी बेझंट या लंडनला जन्मलेल्या, पण तनमनाने भारतीय झाल्या होत्या. पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचं वसाहतीअंतर्गत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी होमरूल चळवळ सुरू केली. लोकमान्य टिळक त्यात त्यांचे सहकारी होते. होमरूलची मागणी करणारं निवेदन घेऊन त्या शिष्टमंडळासह १९१६ला लंडनला गेल्या होत्या. त्या मुंबईला परतल्यावर त्यांचा सत्कार आणि जाहीर भाषणाचं आयोजन थिऑसॉफिस्टांनी ठरवलं. सरकारची बाजू घेणारी वृत्तपत्रं गैरसमज निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक चुकीचं रिपोर्टिंग करत. त्यांना शह देण्यासाठी बेझंटबाईंचं व्याख्यान शब्दशः उतरवून त्याचा प्रसार करण्याचं आयोजकांनी ठरवलं. गजाननरावांमुळे ते काम प्रबोधनकारांकडे आलं.
तेव्हाच्या एम्प्रेस म्हणजेच आताच्या मिनर्व्हा थिएटरमध्ये बेझंटबाईंना ऐकण्यासाठी तुडुंब गर्दी झाली होती. प्रबोधनकारही त्यासाठी सज्ज होते. पण तेव्हाच त्यांचा जीव की प्राण असणारी त्यांची आजी बय खूप मरणासन्न अवस्थेत होती. इथे बेझंटबाईंचं भाषण सुरू झालं. त्या तासभर बोलल्या. प्रबोधनकारांनी भाषणाचं रिपोर्टिंग सुरू केलं खरं, पण मन घराकडेच ओढलं जात होतं. शॉर्टहँडसाठी वापरण्यात येणार्या शंभर पानाच्या दीड चोपड्या भरल्या. लक्ष नसताना त्यात काय नोंदलं गेलंय, हे त्यांना माहीत नव्हतं. पण परतीच्या लोकल प्रवासात त्यांनी तपासलं तर सगळं भाषण नीट उतरलं होतं. घरी गेल्यावर त्यांनी सगळं भाषण फुलस्केप आकाराच्या सहा पानांत टाइप केलं. नंतर बेझंटबाईंनी तपासलं तेव्हा फक्त पाच चुका निघाल्या.
लक्ष दुसरीकडेच असताना इतकं अचूक शॉर्टहँड कसं झालं, हे कोडं सोडवण्यासाठी प्रबोधनकार सर दिनशा एडलजी वाच्छांकडे गेले. ते फक्त काँग्रेसचे पुढारी नव्हते, तर शॉर्टहँडसह अनेक विषयांचे तज्ज्ञ होते. त्यावर त्यांनी पुस्तकही लिहिलं होतं. शॉर्टहँड हे इंटलेक्च्युअल की मेकॅनिकल? बौद्धिक की यांत्रिक? या विषयावर ते व्याख्यानंही देत. प्रबोधनकारांनी आपला अनुभव सांगितल्यावर ते म्हणाले, या कलेला आता मेकॅनो–इंटलेक्च्युअल म्हणायला हवं.
होमरूल आंदोलनाने प्रबोधनकारांना प्रभावित केलं होतं. त्यांनी स्वदेशी चळवळीप्रमाणेच या आंदोलनाच्याही गमतीजमती सांगितल्या आहेत. बेझंटबाई, जॉर्ज आरुंडेल आणि बी. पी. वाडिया या थिऑसॉफिस्ट चळवळीच्या नेत्यांना इंग्रज सरकारने उटीला गुलिस्तान नावाच्या बंगल्यात नजरकैदेत ठेवलं होतं. त्यामुळे देशभर सरकारच्या विरोधात नाराजी उसळली. नजरकैदेतच बेझंटबाईंनी गुलिस्तान बंगल्यावर लाल आणि हिरव्या रंगाचा झेंडा होमरूल लीग चळवळीचा राष्ट्रीय ध्वज म्हणून फडकावला. तोवर हिंदुस्थानचे असे स्वतंत्र निशाण जन्माला आलेलेच नव्हते, असं प्रबोधनकार नोंदवतात.
लाल रंग हिंदूंचा आणि हिरवा मुस्लिमांचा, असा एकतेचा संदेश देणार्या झेंड्याचा प्रसार पूर्ण देशभर होऊ लागला. साड्या, ब्लाऊज, कोटाची बटनं, टोप्या, हातरुमाल, डायर्यांची कव्हर, अशा गोष्टी लालहिरव्या रंगात न्हाऊन निघाल्या. कुंकवाच्या टिळाही अर्धा लाल आणि अर्धा हिरवा लावण्याची फॅशन आली. त्यात बेझंटबाई संपादक असणार्या `न्यू इंडिया` या दैनिकाने असंतोषात भर टाकली.
प्रबोधकारांनी या दैनिकाविषयी सांगितलेली गोष्ट खरंच नवलाची आहे. मद्रासमध्ये छापण्यात येणार्या या दैनिकाच्या हजारो प्रती रोज संध्याकाळी मुंबईत पोचायच्या. फोर्टमधल्या एका स्टेशनरीच्या दुकानात फक्त न्यू इंडिया हेच वर्तमानपत्र विकलं जायचं. तिथे दैनिकाच्या माणसाच्या उंचीच्या दोन थप्प्या उभ्या केलेल्या असत. फोर्टातल्या ऑफिसांमधून सुटलेले लोक एक प्रत उचलायचे आणि जवळ ठेवलेल्या एका पेटीत एक आणा टाकायचे. गरज असल्यास पैसे सुटे करूनही घ्यायचे. न राहवून प्रबोधनकारांनी एकदा दुकानदाराला विचारलंही. त्यावर तो म्हणाला, `जितक्या प्रती, तितके आणे बिनचूक पेटीत असतात. आपले लोक चांगला प्रामाणिकपणा दाखवू लागले आहेत.`
बेझंट आणि त्यांच्या सहकार्यांना गुरुवारी नजरकैदेत ठेवलं म्हणून दर गुरुवारी संध्याकाळी गिरगावातल्या सिक्कानगरच्या पटांगणात जाहीर सभा व्हायची. मुंबईत होमरूलमधल्या टिळक पक्षाच्या वत्तäयांपेक्षा बेझंट शाखेचे वक्तेच प्रभावी होते. या सभांना हजर राहण्यासाठी नोकरदार काहीतरी कारण सांगून ऑफिसातून लवकर पळायचे. त्यात शॉर्टहँडने भाषणं नोंदवण्यासाठी आलेले प्रबोधनकारही होते. दर गुरुवारी डोकं दुखतंय हे कारण पचलं नाही. त्यांचा साहेब विल्यम मेंटिथने जाब विचारला. त्यावर प्रबोधनकारांनी खरं काय ते सांगून टाकलं. कारण प्रबोधनकारांच्या शब्दात सांगायचं तर मेंटिथ हा मोठ्ठा खवड्या असामी होता, पण खरं बोललं तर सुतासारखा सरळ असे. साहेबानेही मोकळेपणाने परवानगी दिली, `तू फक्त रिपोर्टिंगच्या प्रॅक्टिससाठीच जातोच ना? का होमरूलर म्हणून? तसे नसेल तर अगत्य जात जा. दर गुरूवारी मला अर्ज करायचंही कारण नाही.`
शॉर्टहँडच्या या छंदामुळे प्रबोधनकारांची दैनिकांच्या बातमीदारांशी मैत्री झाली. त्यांनी प्रबोधनकारांकडून या भाषणांच्या टाइप केलेल्या प्रती विकत घ्यायला सुरुवात केली. एक प्रत दीड रूपया या दराने दर गुरूवारी सहा रुपये उत्पन्नही मिळू लागलं. त्यासाठी प्रबोधनकारांना भाषण झाल्या झाल्या प्रार्थना समाजाच्या हॉलमध्ये टायपिंग करत बसावं लागे. त्यावर प्रबोधनकार लिहितात, `होमरूल लीग आंदोलनाचा माझ्या संसाराच्या स्वराज्याला हा काय थोडा फायदा म्हणायचा?`