केसरी ट्रस्टींच्या कोर्टबाजीला कंटाळून श्रीधरपंत टिळकांनी वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. प्रबोधनकार पुण्यात असताना श्रीधरपंत त्यांच्याकडे मनातलं सगळं सांगून टाकायचे. त्यामुळे आपण पुण्यातच राहिलो असतो, तर आत्महत्येची वेळ आली नसती, अशी हळहळ प्रबोधनकारांना वाटत राहिली.
– – –
केसरीच्या ट्रस्टींच्या विरोधाला न जुमानता श्रीधरपंतांनी गायकवाड वाड्यातल्या सार्वजनिक गणपतीसमोर अस्पृश्यांच्या मेळ्याचं आयोजन केलं. ते कमी होतं म्हणून गायकवाड वाड्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता समाज संघाची स्थापना केली. त्यानंतर दोनच दिवसांनी गायकवाड वाड्यातच आंतरजातीय सहभोजनाचं आयोजन केलं. अशा प्रकारे एकीकडे सामाजिक सुधारणांच्या विश्वात दमदार पावलं टाकत असताना ते आतून मात्र फार अस्वस्थ होते. कारण केसरीच्या ट्रस्टींनी त्यांना जगणं हराम केलं होतं.
लोकमान्य टिळकांनी मृत्यूपत्रात लिहिलं होतं की मुलं लायक असतील तर त्यांना केसरी ट्रस्टवर स्थान मिळावं. श्रीधरपंतांनी लिखाणातून योग्यता सिद्ध केली होती. पण केसरीचे ट्रस्टी टिळकांची दोन्ही मुलं नालायक आणि बेजबाबदार असल्याचं सगळ्यांना सांगत होते. अशा वेळेत आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी श्रीधरपंतांचा आटापिटा सुरू होती. त्यांनी त्यांच्या पूर्वप्रसिद्ध लिखाणाचा संग्रह माझा व्यासंग या नावाने अत्यंत आग्रहाने प्रसिद्ध केला. आत्महत्येआधीची ती निरवानिरव होती, असं वाटण्याइतकं स्पष्ट मनोगत त्यांनी पुस्तकात व्यक्त केलं आहे, कोर्टाच्या भावनाशून्य वातावरणास नाइलाजास्तव गुरफटले गेल्यामुळे यापुढे माझ्या हातून काही विशेष वाङ्मयसेवा होईल अशी अपेक्षा करण्यात आता फारसे हशील नाही. किंबहुना कज्जेदलालीतच उरलेल्या आयुष्याचे मातेरे व्हावयाचे. इतःपर माझे आयुष्य कोर्टाचे उंबरठे झिजवण्यात खर्ची पडणार.
श्रीधरपंतांच्या लिखाणात ही निराशा स्पष्टपणे दिसून येते. रामभाऊंनाही हे नैराश्य माहीत होतं, अलीकडे एक दोन आठवडे श्रीधरपंत बरेच चिंताक्रांत दिसत असत. दिवाणी दाव्यात अपयश येईलसे त्यांना वाटत होते अशातला भाग नाही. परंतु वडिलांचे ध्येय डोळ्यांपुढे असताना सुद्धा विशिष्ट परिस्थितीमुळे त्यांच्या मार्गात अडचणी उत्पन्न झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर निराशेचा पगडा होता. अलीकडे मजकडे ते मी आत्महत्या करणार असेही ते म्हणत.
काकासाहेब गाडगीळ हे प्रबोधनकारांचे मित्र. याच काळात त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशपातळीवर वाढत होता. अरुणा आसफअलींच्या मुंबई युवक संघात ते सक्रिय होते. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना पुण्यात वसंत व्याख्यानमालेत व्याख्यानासाठी बोलावलं होतं. ते पुण्यात काकासाहेबांच्याच घरी राहिले होते. पुण्यातून निघताना ते काकांसोबत श्रीधरपंतांकडे जेवायला गेले. जेवणानंतर काकासाहेब आणि श्रीधरपंत नेहरूंना सोडायला रेल्वे स्टेशनवर गेले. नेहरूंना बंगळुरूच्या गाडीत बसवलं. स्टेशनवरून घरी परतताना काकांनी श्रीधरपंतांना शनिवारवाड्याजवळ सोडलं. ही घटना २४ मेची होती. उद्या काही विपरीत घडेल असं काकासाहेबांच्या मनातही आलं नाही.
२५ मे १९२८. श्रीधरपंत रोजच संध्याकाळी फर्ग्युसन कॉलेज किंवा भांबुर्ड्याच्या दिशेने फिरायला जात. भांबुर्डा म्हणजे आताचं शिवाजीनगर. त्या दिवशी त्यांनी पुण्याच्या कलेक्टरला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आणि विविधवृत्तच्या संपादकांना पत्रं पाठवली. त्या दिवशी त्यांनी पैशाचं पाकीट किंवा कोणतही गोष्ट सोबत घेतली नाही. प्रत्यक्ष घराबाहेर पडण्यापूर्वी त्यांनी एकदा पत्नी शांताबाईंना डोळे भरून पाहिलं आणि बाहेर निघाले. त्यांनी निग्रहपूर्वक चालत भांबुर्डा गाठलं. स्टेशनजवळ रेल्वे रुळावर गेले. नेहमीप्रमाणे मुंबई पुणे एक्सप्रेस येत होती. त्याखाली त्यांनी स्वतःला झोकून दिलं. श्रीधरपंतांचे मित्र नानासाहेब चापेकर यांनी त्यांच्या आत्महत्येची जागा नोंदवून ठेवली आहे, पुण्याच्या मुळामुठेच्या संगमावरल्या, पूर्वी सेशन्स कोर्ट असलेल्या बेट या नावाने ओळखल्या जाणार्या इमारतीच्या मागच्या बाजूच्या रेल्वे लाईनवर.
टिळकांच्या मुलाने आत्महत्या केली, ही मोठी बातमी होती. सगळ्या मराठी इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये ती छापून आली. त्यावर मोठी चर्चा झाली. त्यामुळे पुण्यातल्या ब्राह्मणी कंपूने अनेक अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला. पण श्रीधरपंतांनी पुण्याच्या कलेक्टरला पाठवलेल्या पत्रात कारण स्पष्टच सांगितलं होतं, आयुष्याबद्दल निराश होऊन व आयुष्याला कंटाळून मी आज आत्महत्या करीत आहे. मला असे नेहमी वाटे की माझा जन्म, माझ्या देशाची, माझ्या समाजाची व माझ्या भाषेची सेवा करण्याकरिता आहे. माझ्या माता पितरांचीही याहून भिन्न कल्पना नव्हती. माझा जन्म वकील व कायद्यांची कोर्टे यांचे असहाय खेळणे बनण्याकरिता नव्हता. परंतु दुर्दैवाने माझे वडील कै. लो. बा. गं. टिळक यांचे पश्चात एका डांबीस टोळीने (a gang of rascals) आमचे जगाचे मार्गासंबंधी अज्ञान व अनुभवाचा फायदा उठवून आम्हांस फसविले व आमचे कौटुंबिक संपत्तीचा बहुतेक भाग (म्हणजे छापखाना, वर्तमानपत्रे, सरकारी कर्जरोखे, बँकेतील शिल्लक इ.) आमचे हातावेगळा केला… एखाद्या गरीब अपरिचित शेतकर्याचे झोपडीत माझे जीवितकार्य पुरे करण्याकरिता माझा पुनर्जन्म होवो अशी मी आशा बाळगतो.
रँग्लर परांजपेंनी श्रीधरपंतांना श्रद्धांजली वाहताना लिहिलं, श्रीधरपंतांच्या मृत्यूने आपल्या महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. कारण त्यांचे अल्प आयुष्यातही आमच्यामधील पुष्कळ लोकांस ते आपल्या प्रसिद्ध वडिलांच्या मोठेपणाची बरोबरी काही निराळ्या प्रश्नांच्या लढायांचे बाबतीत करतील अशी आशा वाटत होती. एका जाणकार विद्वानाने व्यक्त केलेल्या मतात कोणतीही अतिशयोक्ती नव्हती. श्रीधरपंतांचं जाण्याने ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरांमधली तेढ संपवून सगळ्या महाराष्ट्राला एकत्र जोडू शकणारा पूल संपला होता. त्या दृष्टीने श्रीधरपंतांनी आत्महत्येच्या आधी बाबासाहेब आंबेडकरांना पाठवलेलं पत्र महत्त्वाचं आहे.
या पत्रात ते लिहितात, आपल्या समता समाज संघाचे अंगीकृत कार्य नेटाने पुढे चालू ठेवण्यासाठी सुशिक्षित व समाज सुधारणावादी तरुणांचे लक्ष या चळवळीकडे अधिकाधिक वेधून घेणे आवश्यक आहे. आपण या कामी अहर्निश झटता याबद्दल मला फार संतोष वाटतो व आपले प्रयत्नांस परमेश्वर यश देईल अशी खात्री वाटते. महाराष्ट्रीय तरुणांनी मनावर घेतल्यास अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न अवघ्या पाच वर्षांत सुटेल. माझ्या बहिष्कृत बांधवांची गार्हाणी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे चरणारविंदी सादर करण्यासाठी मी पुढे जात आहे. तरी मित्रमंडळीस माझा सप्रेम नमस्कार सांगावा. कळावे, लोभ असावा, ही विनंती.
मृत्यूला सामोरं जाताना कुणीही खोट्या उमाळ्याने लिहू शकत नाही. श्रीधरपंतांचा हा कळवळा सच्चा होता. म्हणूनच त्यांच्या मृत्यूनंतर दोनच दिवसांनी समाज समता संघातर्फे परळच्या दामोदर हॉलमध्ये दुखवट्याची सभा बाबासाहेबांच्या अध्यक्षतेत झाली. त्याला प्रबोधनकार उपस्थित होते. त्यांनी भाषणही केलं. बाबासाहेबांनी समता समाज संघाचं मुखपत्र म्हणून समता हे पाक्षिक २६ जून १९२८ला सुरू केलं. विशेष म्हणजे श्रीधरपंतांची आठवण कायम राहावी म्हणून याच्या प्रसिद्धीचा दिवस शुक्रवार ठेवण्यात आला, कारण श्रीधरपंतांनी जग सोडलं, तो दिवस शुक्रवारच होता.
मामा वरेरकरांनी दुनिया या नियतकालिकाचा खास टिळक अंक दोन जूनला प्रकाशित केला होता. त्यात श्रीधरपंतांविषयी अनेक मान्यवरांचे लेख होते. त्यात प्रबोधनकारांचाही श्रीधर टिळकांची आत्महत्या की कज्जेदलालांनी पाडलेला खून? अशा मथळ्याचा लेख होता. या लेखात प्रबोधनकार लिहितात, मी पुण्यात असताना त्यांचा माझा अलीकडे सतत एक वर्ष निकट परिचय होता. खासगी व्यावहारिक आणि सार्वजनिक शेकडो बाबतीत आम्ही खुल्या दिलाने विचारविनिमय अनेक वेळा केलेले आहेत. आमच्या कित्येक बैठका सहा सहा तासही चालत असत. चित्पावनद्वेष्टा ठाकरे आणि चित्पावन टिळक श्रीधरपंत ही जोडी एकत्र फिरावयाला निघाली असता कित्येक पुणेरी गोडबोल्यांची तोंडे कडूजहर झालेली पाहून आम्ही दोघेही पोट धरधरून हसलो आहोत.
श्रीधरपंतांच्या आत्महत्येच्या कारणांची चर्चा करताना प्रबोधनकार लिहितात, कै. टिळकांसारख्या मानधन प्रभूच्या उदरी जन्म घेऊन, या सिंहाच्या छाव्याला, बापाच्या मूर्खपणामुळे आजूबाजूच्या कोल्ह्याकुत्र्यांकडून जो निष्कारण सासुरवास व उपहास नित्य भोगावा लागत असे, त्यामुळे आम्हा टिळकबंधूंची स्थिती हॅम्लेटप्रमाणे करण्याचा हितशत्रूंनी विडा उचलला आहे, अशा अर्थाचे उद्गार श्रीधरपंत अलीकडे केवळ बोलतच असे नव्हे, तर तसे त्यांनी आपल्या एका लेखात स्पष्ट लिहिल्याचे मी वाचलेले आहे. अखेर श्रीधरपंतांच्याच भाकिताप्रमाणे त्यांना हॅम्लेटची दुर्दैवी भूमिका यथातथ्य वठविण्याचाच प्रसंग आला. श्रीमंत सकलगुणालंकृत राजमान्य राजेश्री नेत्यांच्या विरुद्ध टिळकबंधूंनी दाखल केलेल्या दाव्याबद्दल मी सहज पृच्छा केली असता श्रीधरपंत स्पष्ट म्हणाले, या एकाच दाव्याचे काय घेऊन बसलात? कितीक तरी आणखी भानगडी अजून चव्हाट्यावर यावयाच्या आहेत. त्या एकदोन वर्षांत फडशा पडण्याजोग्या नाहीत. टिळकबंधूंचे प्रकरण म्हणजे दुसरे ताईमहाराज प्रकरण आहे. माझ्या आयुष्याची २५ वर्षे या प्रकारासाठी मी खास रिझर्व्ह करून ठेविली आहेत… टिळकबंधूंविरुद्ध खुद्द गायकवाड वाड्यात जो ज्वालामुखी धुमसू लागला, त्याचे कारण टिळकबंधूंचा सुधारकपणा नसून त्यांनी केसरी कंपूच्या कारस्थानावर सरकार दरबारी मारलेली बोंब, हेच होय आणि श्रीधरपंतांच्या आत्महत्येचे मूळ शोधीत गेला तर ते अखेर गायकवाड वाड्यात कज्जेदलालांनी भडकविलेल्या कायदेबाजीच्या यज्ञकुंडाच्या आसपासच कोठेतरी सापडले पाहिजे.
प्रबोधनकारांनी त्यांचं आत्मचरित्र ‘माझी जीवनगाथा’मध्येही ही चर्चा केली आहे. श्रीधरपंतांच्या मृत्यूनंतर ४०-४५ वर्षांनी प्रबोधनकारांनी बापूने आत्महत्या का केली? या नावाने एक परिच्छेद लिहिला आहे. त्यातून या दोन मित्रांचा एकमेकांविषयी असणारा जिव्हाळा लक्षात येतो. प्रबोधनकार लिहितात, मनातली खळबळ, संताप आणि चीड सगळे गाठोडे विश्वासाने आणि मनमोकळेपणाने आणून ओतण्याचे, बापू टिळकाला अवघ्या पुण्यात मी आणि माझे बिर्हाड हे एकच ठिकाण होते. वाड्यात ट्रस्टी लोकांशी काही गरमागरम बोलाचाली, तंटाभांडण किंवा रामभाऊंबरोबर हातघाईचे प्रकरण झाले का बापू तडाड उठून माझ्याकडे यायचा. मध्यरात्रीसुद्धा. पुणेरी राजकारणाच्या कंकासाला कंटाळून पुण्याला रामराम ठोकून मी दादरला आलो नसतो, तर माझी खात्री आहे, बापूने आत्महत्या केलीच नस्ाती. असत्य, अन्याय, अप्रामाणिकपणा त्याला बिलकूल सहन होत नसे. तो एकदम उखडायचा. त्याच्या कित्येक तक्रारी गंभीर असल्या, तरी पुष्कळशा अगदी क्षुल्लक असत. त्यांचा पाढा तावातावाने त्याने माझ्यापुढे ओकला का धीराच्या नि विवेकाच्या चार उपदेशाच्या गोष्टींची मात्रा चाटवून मी त्याला शांत करीत असे. हरएक बर्यावाईट घटनेचे चक्र त्याच्या डोक्यात सारखे गरगरत असायचे. मनस्वी विचार करणार्या मंडळीना मनातले विचार आणि भावना मोकळ्या करण्यासाठी एखादा स्नेहीसोबती आप्त जवळपास नसला, म्हणजे ते लोक मनांतल्या मनांत कूढू लागतात. असल्या कुढण्याच्या अतिरेकानेच बापू टिळकाची आत्महत्या ही दुर्दैवी घटना घडली.
श्रीधरपंतांवरच्या मृत्यूलेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी श्रीधरपंतांची थोरवी नोंदवून ठेवली आहे, कोणी काहीही म्हणो, श्रीधरपंतांच्या वडिलांना लोकमान्य ही पदवी अयथार्थ होती. तेली, तांबोळी म्हणून बहुजन समाजाचा उपहास करणार्या व्यक्तीला लोकमान्य म्हणणे म्हणजे लोकमान्य या शब्दाचा विपर्यास करणे, असे आमचे मत आहे. लोकमान्य ही पदवी जर टिळक घराण्यापैकी कोणा एकास साजली असती तर ती श्रीधरपंतासच होय. टिळकांच्या हातून लोकसंग्रह झाला नाही. खरा लोकसंग्रह श्रीधरपंतच करू शकले असते. तो करण्यास ते उरले नाहीत, ही महाराष्ट्रावरील नव्हे, हिंदुस्थानावरील मोठीच आपत्ती आहे.