काश्मीरमध्ये कलम ३७०, तिथल्या जनतेला, विधिमंडळाला विश्वासात न घेता, काढून टाकल्यानंतर तिथे सगळं काही आबादीआबाद झालं आहे, सगळं काही शांत, सुरक्षित आहे, हा भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने फुगवलेला भ्रमाचा भोपळा, पहलगाममध्ये झालेल्या नृशंस दहशतवादी हल्ल्याने फोडून टाकला. हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत होता, त्यामुळे दहशतवाद्यांचं नंदनवन बनलेल्या त्या देशाला अद्दल घडेल असा धडा शिकवलाच पाहिजे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून, त्याची खातरजमा करून हिंदूंना वेचून गोळ्या घातल्या, शिवाय, मोदींना आमचा निरोप द्या, असे फुत्कार टाकले, अशा बातम्या वाचल्यानंतर देशातलं जनमन उसळलं आणि पाकिस्तानला एकदाच काय तो धडा शिकवून टाका, अशी प्रखर भावना निर्माण झाली.
अशी भावना निर्माण होण्याची ही पहिली वेळ नव्हे. पाकिस्तान या देशाने जन्मापासून भारताच्या कुरापती काढण्याचं धोरण ठेवलेलं आहे आणि युद्धज्वर अनावर झाल्यावर भारताकडून सणसणीत मारही खाल्लेला आहे. पाकिस्तानच्या खुमखुमीला दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्या देशाचे दोन तुकडे करून दीर्घकाळ लक्षात राहील, असा धडाही शिकवला आहे. तरीही पाकिस्तानी राज्यकर्ते आणि लष्करी अधिकारी यांच्यातला भारतद्वेष अधून मधून जागा होतो आणि असे भ्याड हल्ले केले जातात.
या नतद्रष्ट शेजार्याला, म्हणजे तिथल्या भारतद्वेष्ट्यांना भारताने धडा शिकवलाच पाहिजे. ती सगळ्या देशाची एकमुखी मागणी असलीच पाहिजे. पण तो शिकवायचा कसा? त्या देशावर फारसा काही परिणाम न करणारा सर्जिकल स्ट्राइक करून? त्या देशाबरोबरचा व्यापार बंद करून? भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी करून? सिंधू पाणीवाटप करार रद्द करून? यातले काही उपाय, उदा. सर्जिकल स्ट्राइक हे निव्वळ चित्तचक्षुचमत्कारिक असे काहीतरी करून दाखवले आणि ढोल वाजवले, या प्रकारचे उपाय आहेत. पाणीवाटपाचा करार संपूर्णपणे रद्द करणे जागतिक बँकेच्या सहभागामुळे अवघड आहे आणि अगदी तसेही करून दाखवायला गेले तर सिंधूचे पाणी अडवणे हे काही वर्षे चालणारे काम आहे. आज हल्ला झाला आणि धडा काही वर्षांनी शिकवला, असे करता येणार नाही. समस्त भारतीयांच्या अंतरात पेटलेली सुडाची आग इतक्या दीर्घकालीन उपायांनी शांत होणार नाही.
शिवाय, पाकिस्तान हा अमेरिकेच्या आणि इतर शक्तींच्या पाठबळावर उभा असलेला एक विसविशीत, विस्कळीत, चिरफाळलेला देश आहे. तिथे सरकार आणि लष्कर यांचा एकमेकांमध्ये समन्वय नाही, अनेक फुटीर गट आहेत. अनेक धर्मांध अतिरेकी संघटना आहेत. त्यामुळे आपण धडा शिकवल्यानंतरही मरायला मारायला उद्युक्त झालेले त्यांच्यातील कोणीही पुन्हा अशा प्रकारचा हल्ला करू धजणार नाहीत, अशी छातीठोक ग्वाही कोणीच देऊ शकत नाही.
अशावेळी पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या बरोबरीने या देशाच्या राज्यकर्त्यांनी काही धडे शिकायला हवेत आणि इथल्या त्यांच्या आंधळ्या अनुयायांनाही शिकवायला हवेत. प्रतिबंध अनेकदा उपायांपेक्षा जास्त परिणामकारक ठरतो.
धडा क्र. १ : भारतात धर्माच्या नावाने किंवा कोणत्याही कारणाने अस्वस्थता निर्माण व्हावी, रक्तपात व्हावा, गृहयुद्ध भडकावे, हे देशद्रोह्यांचे नापाक इरादे आहेत. त्यासाठीच धर्म विचारून जीव घेणे आणि मोदींना जाऊन सांगा, असे निरोप देणे, हे प्रकार घडलेले आहेत. आता आपण संतापाच्या भरात काश्मीरवरच बहिष्कार घालू, काश्मीरशी काहीही संबंध नसलेल्या स्थानिक मुस्लिमांची रसद तोडू, असल्या उपद्व्यापांतून देशभक्तीचं कार्य करत नसून त्या नापाक इराद्यांनाच बळ देतो आहोत, त्यांचे हेतूच सफल करत आहोत, हे अनुयायांना समजावून सांगायला हवं.
धडा क्र. २. : काश्मीरचा गुंतागुंतीचा प्रश्न, आधीच्या सरकारांनी मुळातच अतिशय दुबळ्या करून ठेवलेले कलम ३७० हटवल्यामुळे संपूर्ण सुटला, आता काश्मीर भारताच्या मुख्य प्रवाहात आले, वगैरे वल्ग्नना निरर्थक होत्या. नोटबंदीमुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले, हे कलम हटवल्यामुळे काश्मीर शांत झाला, अशी तात्कालिक आणि खोटेपणावर आधारलेली वातावरणनिर्मिती केल्यावर निवडणुकांमध्ये मतं मिळवण्याचे क्षुद्र हेतू सफल होतात; पण, त्यावर विसंबून काश्मीरमध्ये निर्धास्तपणे गेलेले याच देशाचे नागरिक हकनाक मरणही पावतात. तेव्हा ढोल कुठे आणि किती वाजवायचे, याचा फेरविचार करायला हरकत नाही.
धडा क्र. ३ : एवढ्या मोठ्या हल्ल्यानंतर सगळे विरोधी पक्ष सरकारला एकमुखी पाठिंबा देतात. पण देशाचे पंतप्रधान, विद्यमान सरकारचे प्रमुख विदेश दौर्यातून परत येऊन सर्वपक्षीय बैठकीला हजर राहात नाहीत. पहलगामलाही भेट देत नाहीत. ते बिहारमध्ये निवडणुकीच्या प्रचारसभेत जातात आणि तिथल्या बिहारी जनतेसमोर इंग्लिशमध्ये भाषण करून दहशतवाद्यांना इशारा देतात. इतका तिन्ही त्रिकाळ निवडणुकांचाच विचार करायचा असेल, तर स्वतंत्र पक्षांतर्गत प्रचारमंत्रीपद निर्माण करा आणि देशाच्या कारभारात सहभागी होतील, पुढाकार घेऊन नेतृत्त्व करतील, असे पंतप्रधान नेमा.
धडा क्र. ४ : जे झाले त्याची सरकार म्हणून जबाबदारी घ्या आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसारख्या महत्त्वाच्या पदावरच्या लोकांनाही उत्तरदायी करा. पहलगामला सुरक्षा का नव्हती, इथपासून सैन्यभरती का बंद आहे, इथपर्यंतच्या सगळ्या विषयांवर तुम्ही जनतेला उत्तरदायी आहात. नॉन बायॉलॉजिकल वगैरे स्तोम माजवणार्या संकल्पना भक्त मंडळींना पूजा अर्चा करण्यासाठी ठीक आहेत; सगळे कसे आणि किती जैविक आहे, ते चीनचा नुसता नामोल्लेख केला तरी दिसून येते आणि गलवानचा फियास्को त्याला साक्ष आहेच.
याचबरोबर मोदीजी खाकरले, आता काहीतरी मोठं होणार, डोवाल आता अॅक्शन मोडमध्ये (हे हल्ल्याच्या आधी काय करत होते) असल्या पाचकळ बातम्या देणार्या प्रसारमाध्यमांनी आणि भाजपच्या प्रचारयंत्रणांनी सेट करून दिलेल्या नॅरेटिव्हला बळी पडून वड्याचं तेल वांग्यावर काढायला निघालेल्या आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी शिकावे, असे बरेच धडे या हल्ल्याने शिकवले आहेत… ते आपण शिकूच याची काही शाश्वती मात्र दिसत नाही.