बदलत्या काळानुसार देशातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासातही योग्य तो बदल केला पाहिजे, ही सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडली, तेव्हा ती एकमताने मंजूरही झाली. त्या त्या राज्यांनुसार हा आराखडा करावा ही उपसूचना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मांडली, तेव्हा तिलाही सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला. त्याचे पडसाद महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांच्यापर्यंत पोहोचले तेव्हा हा बदल नेमका कसा करावा या विचाराने त्यांची तारांबळ उडाल्याची खबर माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या याच्यापर्यंत पोहोचली. नव्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय घडामोडी यांचे पडसाद नव्या अभ्यासक्रमात उमटण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तसेच चंद्रशेखर ५२ कुळे यांच्यापासून तिरकिट थोमय्या यांच्यापर्यंत साडेपंधरा तज्ज्ञ नेत्यांची समिती नेमण्यात आली. समितीच्या बैठकीला पोक्या राजकीय निरीक्षक व पत्रकार या नात्याने उपस्थित होता. बैठकीत मंत्री आणि नेत्यांनी मांडलेल्या मौलिक सूचनांवर उहापोह करण्यात आला. अल्पोपहाराला कांदेपोहे, दुपारी स्वादिष्ट भोजन आणि रात्री साग्रसंगीत पेयपान व डिनर पार्टीनंतर बैठक संपली. या बैठकीचा पोक्याने लिहिलेला हा वृत्तांत-
फडणवीस : पंतप्रधान मोदीजी यांनी बदलत्या काळाला अनुसरुन हा चांगला निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वप्रथम मोदीजींच्या अभिनंदनाचा ठराव आपण संमत करुया. तसेच येत्या अभ्यासक्रमात देशात क्रांतिकारी बदल घडवून देशाला जागतिक पातळीवर अत्युच्च स्थानी नेणार्या पंतप्रधान मोदीजींचे रंगीत छायाचित्र सर्वच विषयांच्या पाठ्यपुस्तकांच्या आतील दर्शनी पानावर छापण्याची आपण सक्ती करुया. इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा वाटा नसून आपल्या लाडक्या मोदीजींचाच वाटा आहे. त्यामुळे जगात शांतता निर्माण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा गौरव म्हणून त्यांनाच शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात यावे अशा आशयाचा लेख मी चीनचे पंतप्रधान जिन पिंग यांच्याकडून लिहून घेतो. तो सर्व इयत्तांच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात येईल. वाढत्या महागाईला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच कसे जबाबदार आहेत यावरील चिकित्सक लेख रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन देतील. तोही पाठ्यपुस्तकात घ्यावा.
दादासाहेब भुसे : विद्यार्थी पहिलीचा असो की दहावीचा, त्या सर्वांना बुद्धीमत्ता समान पातळीवर आणण्याचे प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असणार आहे हे विरोधकांनी लक्षात ठेवावे. सगळ्या पुस्तकांत मोदीजींचीच गौरवगीते असतील. ही सूचना मी मांडावी, अशी विनंती मला माजी मुख्यमंत्री आणि आजी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी माझ्या कानात कुजबुजून केली होती. ती मान्य करावी ही विनंती.
फडणवीस : मान्य. आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल सारे काही बदलून टाकायचे आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली नवा भारत नवा महाराष्ट्र उभा करायचा आहे. त्याचा नवा इतिहास भूगोल रचायला सर्वांचाच हातभार लागावा.
संजय शिरसाट : इतिहास-भूगोल कसा बदलणार!
फडणवीस : सोपे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी यवनांचा नि:पात केला इथपासून सुरू करू. हिंदूंची एकजूट कायम राहावी, भारत हे हिंदू राष्ट्र व्हावे म्हणून माननीय मोदीजींनी कितीतरी विधायक काम केले याची यशोगाथा नव्या पिढीला कळायलाच हवी. त्याचे धडे सर्व शालेय पुस्तकांमध्ये असायलाच हवे. महाराष्ट्राचा भूगोल बदलण्यासाठी आधुनिक भूगर्भ शास्त्रज्ञांचे मत आपण घेऊ. त्यांना आपले किरकिट थोमय्या मार्गर्शन करतील. महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत जे भौगोलिक प्रदेश आहेत ते पूर्वीपासून बहुसंख्यांक हिंदूंचेच होते, त्यामुळे अल्पसंख्यांक या शब्दाला काडीचाही अर्थ नाही. भविष्यकाळात आपण सगळ्याच राज्यांची नावे बदलून त्यांना कमळ फुलांची नावे देऊ. भविष्यात महायुती वगैरे शब्द जाऊन काँग्रेस सोडून सगळे पक्ष भाजपातच विलीन होणार आहेत. त्याची सुरुवात आतापासूनच करू. काही कठोर निर्णय केंद्रीय प्रशासनाला देशातील शांततेसाठी घ्यावे लागले. याला हुकूमशाही म्हणत नाहीत. तर हीच खरी सुखशाही. `नीट’ ही परीक्षाच कायमची रद्द केली जाईल व आयएएस अधिकार्यांपासून डॉक्टरांची भरती केंदीय प्रशासनाच्या शिफारसींनुसार केली जाईल. पोलीस भरती आपले आमदार आणि शरीसौष्टवपटू संजय गायकडवाड यांच्याच मार्गदर्शनाखाली केली जाईल. पहिलीपासून दहावीपर्यंत एकाही विद्यार्थ्याला वार्षिक वा बोर्डाच्या परीक्षेला बसावे लागणार नाही. त्यामुळे विद्यार्थी टेन्शन फ्री होतील. ही ढकलगाडी दहावीपर्यंत सुरुच राहील. मुलांची गुणवत्ता दादासाहेब भुसे व महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर मुलांच्या मुलाखती घेऊन ठरवतील. राज्यातील अंधश्रद्धेचे व बुवाबाजीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हावार समित्या निर्माण करण्यात येतील. अंधश्रद्धेमुळे समाजाचे कसे नुकसान होते याचे धडे लिहिण्याची जबाबदारी सर्वस्वी नेते धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर सोपवण्यात येत आहे. माजी विधान परिषद अध्यक्ष आणि विद्यमान आमदार नीलम गोर्हे यांची `संस्कार कथा’ ही प्रदीर्घ लेखमालिका प्रत्येक इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात अनिवार्य असेल. त्यात त्यांचे व्यक्तिगत अनुभव असतील. विद्यार्थ्यांना शेअर बाजाराची गोडी लागावी यासाठी विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळणारे माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे अभ्यासपूर्ण सदर असेल. मिथेनॉलचे भाव का वाढतात-उतरतात या विषयावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रत्येक इयत्तेच्या पाठ्यपुस्तकातून योग्य मार्गदर्शन करतील.

