मार्मिकच्या ३ मे १९७० या तारखेच्या अंकाचे हे मुखपृष्ठ एका अर्थाने विलक्षण आहे, मुखपृष्ठावरील व्यंगचित्र म्हणून त्याची रचना आजही अनेकांना चकवून जाईल. प्रयोगशील व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी मास्टहेड म्हणजे अंकाचे नाव, त्यासमोरची मोकळी जागा, खालच्या चौकटीत चित्र ही नेहमीची रचना बाजूला ठेवून मार्मिक हे शीर्षक उभे केले आहे आणि बाकीची सगळी जागा चित्राने भरली आहे. हा कागदांचा ढिगारा आहेत, त्यात महाराष्ट्राचे नेते यशवंतराव चव्हाण आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईक हरवले आहेत, वर पंतप्रधान इंदिरा गांधी याही चिंताग्रस्त आहेत, त्या तोडगा सापडतो आहे का, ते पाहतायत. शिवसेनेमुळे बिदर, भालकी, बेळगाव, विजापूरसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी घोषणा दुमदुमत होती. तोडगेच तोडगे सुचवले गेले, पण त्यांच्यातून कालापव्ययापलीकडे काहीही साधणं शक्य नव्हतं. या तोडग्यांच्या ढिगार्यात हा प्रश्नच हरवून जाईल, ही शिवसेनाप्रमुखांची अटकळ किती खरी होती, ते आपण आजही पाहतो आहोत. आजही हा प्रश्न सुटलेला नाही आणि काळाच्या ओघात त्याची धारही बोथट होऊन बसली आहे. कर्नाटकाने मराठी प्रांत गिळून टाकल्यात जमा आहे… एक मात्र बरं आहे या चित्रात, की महाराष्ट्राच्या एका प्रश्नाच्या बाबतीत पंतप्रधान किमान काही विचार करताना दिसत आहेत… महाराष्ट्रातले उद्योग पळवायचे, मुंबई महाराष्ट्रातच ठेवून महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी भाषेचा, मराठी माणसाचा उपमर्द करायचा आणि निवडणुका आल्यावरच टोपी, पगडी वगैरे घालून महाराष्ट्राशी जुनं नातं असल्याच्या थापा मारायच्या, यातलं काही त्या करताना दिसत नाहीत.

