माननीय मुख्यमंत्री म्हणतात की हिंदी भाषेच्या सक्तीला नकार दिला, तर मराठी मुलं महान सांस्कृतिक ज्ञान परंपरेला मुकतील? असं काय महान ज्ञान दडलेलं आहे त्या भाषेत, तुम्हाला काही कल्पना?-वनिता कोळी, माहीम
जय श्रीराम…नाही नाही, असं बोलून उत्तर टाळत नाहीये…हिंदी पट्ट्यामध्ये आवाजाच्या ज्या पट्टीत जय श्रीराम बोलले जाते, त्या पट्टीत आपल्याकडे अजूनही बोलले जात नाही, असा माननीय मुख्यमंत्री यांचा अभ्यास असावा…तुम्हीही जरा अभ्यास करून बोला… आम्हालाही याचं उत्तर देण्यासाठी अभ्यास करावा लागेल… तो कधी पूर्ण होणार असे फालतू प्रश्न विचारू नका…
मणिपूर जळत होतं, तेव्हा झुरळं झोपली होती, शेतकरी आत्महत्या करत होते, तेव्हा झुरळं झोपली होती, देश रोज लुटला जातोय, व्यापार्यांच्या घशात घातला जातोय, झुरळांना त्याबाबत काही म्हणायचं नाही. त्यांना फक्त ‘नीट’ परीक्षा एवढाच विषय महत्त्वाचा वाटतोय… असं का? -शिवाजी सानप, आजरा
स्वतःच जळतं तेव्हाच नीट कळतं… असं तुम्हाला बोलायचं आहे का? हॅ हॅ हॅ हॅ.. कॉकरोचच्या विरुद्धही बोलायचं नाही आणि त्यांच्या बाजूनेही बोलायचं नाही… हा ट्रेंड आम्हाला पण जमला की नाही?
देशातल्या बहुजन युवकांना राष्ट्रकार्याला, धर्मकार्याला वाहून घ्यायचं आवाहन करणारे नेते, मंत्री, अभिनेते वगैरेंची मुलं मात्र राष्ट्रकार्यात नसतात, ती देशातच नसतात, ती परदेशांमध्ये शिकून तिकडेच गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्या मिळवून सेटल होतात, असं का?-सारिका शेंडे, धंतोली, नागपूर
आपल्याकडे गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्या नसतील, मग नेत्यांची, अभिनेत्यांची पोरं काय पकोडे तळतील? आणि ज्यांना पकोडेच तळायचेत, ते परदेशात जाऊन काय पकोडे तळणार? ते आपल्याच इथे राहून फावल्या वेळेत पकोडे तळून, फुल टाईम राष्ट्रकार्य करत असतील, तर तुमच्या का पोटात दुखतं? आणि राष्ट्रकार्य करायला एवढेजण (आम्ही बाबा याच अर्थाने बहुजन म्हणतो) असताना, गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्या करणारे कशाला त्यांच्यामध्ये पडतील? सगळी सिस्टीम सिस्टीमेटिकली चाललीय… उगाच तुम्ही मध्ये लुडबुड करू नका, सारिकाताई… राष्ट्रकार्य करणार्यांना, उगाच त्यांचे राष्ट्रकार्य बाजूला ठेवून, तुम्ही कशा राष्ट्रद्रोही आहात हे ठरवण्याचे कार्य सुरू करावं लागेल.
एकीकडे ट्रम्प मोदींना जिवलग मित्र म्हणतो आणि दुसरीकडे वाढीव टॅरिफ लावतो, एकीकडे भारताशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत असं सांगतो, दुसरीकडे भारताला नरक असं संबोधतो. याचं नेमकं काय करायचं तरी काय? -मायकेल डिकुन्हा, वसई
बोलावे त्याच्या विपरीत चालावे…
तो नाचवेल तसे नाचावे..
त्यालाच देशप्रेम म्हणावे
मनी असू द्यावी देश’भक्ती’
(हा श्लोक घोटवून घ्या… पुन्हा असे प्रश्न पडणार नाहीत.)
भारतीय पर्यटक परदेशांत गेल्यावर, तिकडच्या लोकांना भारतीयांची घृणा यावी इतके चेकाळल्यासारखे का वागायला लागले आहेत. आपण विश्वगुरू बनलो आहोत, ही थाप त्यांना खरी वाटते की काय? -उषा कुलकर्णी, नारायण पेठ, पुणे
आपण विश्वगुरू झालो की नाही याच्यावर शंका घेताय? तुम्ही नक्की कुलकर्णी आहात की भागवत आहात? आधी हे क्लिअर करा… म्हणजे उत्तर काय द्यायचं हे आम्हाला क्लियर होईल.
ज्या देवाला मनोमन कुठेही केलेला नमस्कार आपोआप पोहोचतो, त्याला नमस्कार करण्यासाठी विशिष्ट देवळातच जायचं असं भाविक लोक का मानतात? -दिगंबर पाटणकर, सांगली
कुठल्या युगात वावरताय दिगंबरराव? ‘देवाला नमस्कार करण्यापेक्षा, विशिष्ट नेत्यांना नमस्कार करा, जे हवं ते प्राप्त होईल,’ असं खुलेआम सांगितलं जाणार्या युगात आहात आपण. असं देवळातल्या देवाबद्दल शंका घेण्यापेक्षा, देवाच्या पार्टीत जा..तुम्हाला प्रश्न पडणार नाहीत. आणि पडले तरी तुम्ही प्रश्न विचारूचं शकणार नाही याची गॅरंटी.
मुंबईच्या मराठी माणसांनी रिक्षावाल्यांशी, दुकानदारांशी, एकमेकांशी मराठीत बोलावं, यासाठी त्यांच्याकरता ‘लाडका मराठी भाऊ’ योजना सुरू करून काही अनुदान दिलं तर उपयोग होईल का? -सुधाकर शर्मा, चिंचपोकळी
समजा तुम्ही बोलताय असं झालंच… तर असंच करून राजकारण करणार्यांनी राजकारण कशावरून करायचं? मग अशांसाठी लाडका नेता योजना खुलेआम सुरू करावी लागेल… (जी गुपचूप चालू आहे. असं ‘आम्हाला निधी नीट मिळत नाही’ असं बोलणारे, सत्ताधार्यांचे लाडके नसणारे नेते बोलतात… तेच ऐकून आम्ही बोललो.
विचारून टाका प्रश्न
तुम्हालाही अभिनेते संतोष पवार यांना प्रश्न विचारायचाय…? मग वाट कसली बघताय…? उचला पेन आणि टाका विचारून प्रश्न… हा प्रश्न थेट ‘मार्मिक’च्या[email protected] या ईमेल आयडीवर पाठवून द्या… किंवा आमच्या पत्त्यावर पाठवा. मार्मिक प्रश्नाला संतोष पवार उत्तर देतील...

