कोरोना संकटामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आले असून अर्थसंकल्पीय अधिवेशन वेळेपूर्वी म्हणजे जानेपारीपासूनच सुरू करण्याचा विचार असल्याचे संकेत मिळत आहेत. कोरोना संकट आणि दिल्ली सीमेजवळ सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशन जानेवरीतच सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती मिळाली आहे. केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना पाठवलेल्या एका पत्रातून याबाबतचे संकेत मिळत आहेत.
कोरोना संकटामुळे आतापर्यंत संसदेचे हिवाळी अधिवेशन झालेले नाही. एखाद्या संकटामुळे संसदेचे अधिवेशन रद्द करण्याची घटना बऱ्याच वर्षांनी घडली आहे. त्यामुळे आता हिवाळी अधिवेशन रद्द करून जानेवारीतच अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात करण्याचा विचार सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाबाबत अधीर रंजन चौधरी यांनी संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र पाठवले होते.
त्यावर प्रल्हाद जोशी यांनी चौधरी यांना उत्तर पाठवले. यंदा कोरोना संकटामुळे संसदेचे पावसाळी अधिवेशनही सप्टेंबरमध्ये घेण्यात आले होते. कोरोनाबाबतचे निर्देश पाळत काळजीपूर्वक हे अधिवेशन घेण्यात आले होते. त्यात 27 विधेयके मंजूर करण्यात आली होती. हिवाळ्यात कोरोना संकट वाढण्याची शक्यता आहे. तसेच दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अधिवेशनाबाबत आपण नेत्यांशी चर्चा करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आता अर्धा डिसेंबर महिना उलटून गेला आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आल्याची चर्चा असून जानेवारीपासूनच अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांनी अधिवेशन लोकशाहीसाठी आवश्यक असून अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. कोरोना संकट, शेतकरी आंदोलन, कृषी कायदे, इंधनाचे वाढते दर या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक असून अधिवेशन झाल्यास ते सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन रद्द करून जानेवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्याबाबत विचार सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
सौजन्य- सामना