मार्मिक सुरू झाल्यानंतरच्या पुढच्याच वर्षीच्या, १९६१च्या गणेशोत्सवात बाळासाहेबांनी रेखाटलेली ही रविवारची जत्रा. गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांनी सुरू केला तो एक सामाजिक उत्सव म्हणून. त्यात मेळे व्हायचे, त्यात गाणी, नाटुकली यांच्यातून वेगवेगळे सामाजिक संदेश दिले जायचे. बहुतेक ठिकाणी गणेशोत्सवाचा मंडप एखाद्या तात्कालिक विषयावरच्या देखाव्याने नटलेला असायचा. त्यातूनही प्रबोधन केले जायचे. हलते देखावे, त्यांच्यामागे नाट्यमय निवेदन, एखादा गणपती तर वैज्ञानिक संशोधनाची रंजक मांडणी करणाऱ्या कल्पनेसाठी ओळखला जायचा. गणपती हा प्रेमाचा, जिव्हाळ्याचा गणराया. त्यामुळे त्याच्या आकारात कधी आवडते नेते बसायचे, कधी तो जवान बनायचा, कधी पोलीस! क्रिकेटमध्ये पराक्रम गाजवल्यावर क्रिकेटपटूच्या वेषातलीही गणेशमूर्ती षटकार लगावताना दिसायची. त्या वातावरणात बाळासाहेबांनी वेगवेगळ्या पक्षांच्या गणपतींना त्या त्या पक्षाच्या नेत्यांची रूपं दिलेली आहेत आणि प्रत्येक गणपतीचं वैशिष्ट्य काय आहे, ते खाली लिहिलं आहे आरतीच्या, गीताच्या किंवा कॅप्शनच्या रूपात. त्या काळात भावना दुखावण्याचा रोग बळावलेला नव्हता म्हणूनच बाळासाहेबही ही करामत करू शकत होते. सर्वात लक्षणीय आहे तो चित्रमालेचा शेवट. सर्वसामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करणारा काकाजी एक मोदक घेऊन बसला आहे, तो भव्य आकाराचा मोदक पोकळ आहे. या पक्षांकडून आणि त्यांच्या दैवतांकडून सर्वसामान्य माणसाला काय मिळतंय, हे त्यांनी किती मार्मिकपणे सांगितलेलं आहे!

