१९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात पुकारलेल्या आणीबाणीचा विरोध करून जनता पक्षाने देशात रान पेटवले. जणू हा दुसरा स्वातंत्र्यलढाच आहे, असा त्यांचा आविर्भाव होता आणि त्याला जनतेचाही अभूतपूर्व पाठिंबा मिळाला. १९७७ साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली देशात पहिल्यांदाच काँग्रेसेतर सरकार सत्तेत आले, तेव्हा त्या सरकारकडून लोकांना फार मोठ्या अपेक्षा होत्या. इंदिरा गांधींच्या आणि काँग्रेसच्या ज्या चुका जनता पक्षाचे नेते उच्चरवाने सांगत होते, त्या त्यांचं सरकार करणार नाही, असं अपेक्षित होतं. काँग्रेसच्या सत्ताकाळात भ्रष्टाचार-अनाचार माजला आहे, आणीबाणीच्या आडून सत्तेचा गैरवापर चालला आहे, यावर जनता पक्षाच्या नेत्यांनी कडाडून टीका केली होती. मात्र, या पक्षाला सत्ता मिळाल्यावर तेच अनाचार पुन्हा सुरू झाले. त्याच चुका केल्या जाऊ लागल्या. सत्तेची ताकद चुकीच्या पद्धतीने वापरली जाऊ लागली… अर्थात हे सगळं करताना आणीबाणी जाहीर करण्याची चूक करायची नाही, एवढं एक पथ्य या पक्षाच्या धुरीणांनी बरोबर पाळलं… याचंच भेदक दर्शन बाळासाहेबांनी या १९७९ सालातल्या रविवारच्या जत्रेत घडवलं आहे. त्यानंतर हा पायंडाच पडला आहे… किती भयंकर होती आणीबाणी अशी रडारड गेल्या वर्षी आणीबाणीला ५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने धाय मोकलून करणारा भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार देशात बेलगाम हुकूमशाहीचा वरवंटाच चालवतो आहे. फक्त आणीबाणी लादली आहे, असं जाहीर केलं नाही, की आपण सोज्वळ, साजुक ठरतो असा त्यांचा भ्रम झालेला आहे… आता जेन झी आंदोलनाने तो दूर केला असेल, तर बरे.

