आपण आयुष्यात कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात गेलो नाही, एकवेळ मी राजकारण सोडेन, परंतु भारतीय जनता पक्षात जाणार नाही, असे काँग्रेसचे पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विकास ठाकरे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. साप्ताहिक ‘मार्मिक’च्या दि. ६ जूनच्या अंकात ‘अधोरेखित’ या सदरात ‘राहुल जनतेसोबत, नेते रेशीमबागेत’ या शीर्षकाखाली प्रकाशित झालेल्या लेखातील, आपण रेशीमबाग या संघाच्या मुख्यालयात गेल्याचा दावा चुकीचा, अवमानकारक आणि विपर्यस्त आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण जनतेच्या समस्यांच्या संदर्भात भेटलो, पण ते संघाच्या मुख्यालयात किंवा हेडगेवार स्मृतिमंदिरात नव्हे, तर बाहेरच्या रस्त्यावर भेटलो, असे त्यांनी सांगितले.
विकास ठाकरे म्हणाले की ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नागपूरची डोबीनगर मुस्लिमबहुल झोपडपट्टी उठवण्यासाठी रेल्वेने हालचाली सुरू केल्या होत्या. ४०-५० वर्षांपासून हे लोक इथे निवासी आहेत. तीन जून रोजी त्यांच्या घरावरून बुलडोझर चालला असता. सातशेपेक्षा अधिक गरिबांची घरे वाचावीत आणि त्यांना अन्यत्र घरे मिळावी यासाठी मी ३० मे रोजी मुख्यमंत्र्यांना फोन केला. ते रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती मंदिरात असल्याने या परिसराच्या बाहेर नगरसेवक आणि समस्याग्रस्त काही लोकांसोबत थांबलो. मुख्यमंत्री आमच्याकडे आले. त्यांना विषयाचे गांभीर्य समजावून सांगितले. त्यांनी तातडीने सूचना देत गरीबांवर येणारे संकट थोपवले. मी हेडगेवार स्मृती मंदिरात गेल्याचे चुकीचे वृत्तांकन लोकसत्ता या वर्तमानपत्राने केले. जो फोटो त्यांनी वापरला तो स्मृतिमंदिराच्या बाहेरचा आहे.
याच बातमीचा आधार घेत ‘मार्मिक’चे स्तंभलेखक विकास झाडे यांनी ‘राहुल जनतेसोबत, नेते रेशीमबागेत!’ या लेखात मी रेशीमबागेत गेल्याचा उल्लेख केला आहे. माझ्या रक्तातच काँग्रेस आहे. मी आयुष्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात गेलो नाही. मी एकदाचे राजकारण सोडेन परंतु भाजपमध्ये कदापिही जाणार नाही असे विकास ठाकरे यांनी निक्षून सांगितले.
‘मार्मिक’शी बोलताना आ. ठाकरे म्हणाले, मी १३ वर्ष नागपूर शहर काँग्रेसचा अध्यक्ष होतो. या काळात मी काँग्रेस मजबूत केली आहे. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेससाठी प्रतिकूल आहे. २०१९पर्यंत इथे भाजपचा आमदार होता. भाजपचा झंझावात असतानाही २०१९ आणि २०२४मध्ये मी इथून सलग दोनवेळा निवडून आलो आहे. हे माझ्या कामाच्या बळावर शक्य झाले. जनतेचे काम करणारा लोकप्रतिनिधी म्हणून मतदार पक्ष न पाहता मला मतदान करतात. गेली तेरा वर्ष मी नागपुरात काँग्रेससाठी अथक परिश्रम घेतले. अन्यथा इथली काँग्रेस भाजपने केव्हाच गिळंकृत केली असती. मी नागपूरमध्ये या काळात भाजपच्या विरोधात दीडशे आंदोलने केलीत. मतदारांच्या हक्कासाठी लढत गेलो. त्यामुळेच पक्ष श्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास दर्शवत निवडणुकामंध्ये माझ्यावर अन्य राज्यातील महत्वाची जबाबदारी सोपवली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे बालमित्र आहेत. परंतु विधानसभेत त्यांच्यावर विविध विषयांवर सर्वाधिक हल्लाबोल करणारा, भाषणे करणारा मी एकमेव आमदार आहे. नुकत्याच झालेल्या नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत मी १२ नवीन नगरसेवक निवडून आणले. पक्षासाठी काम करणारे हे कार्यकर्ते होते. डोबीनगरचे बहुसंख्य मतदार हे मुस्लिम, दलित आणि ओबीसी आहेत. त्यांच्या हक्कासाठी लढलो. त्याचा फायदा हा भाजपला नाहीतर काँग्रेसला होणार आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
