
यावर्षी वातावरणातील उष्णतेने सर्वच प्रकारचे रेकॉर्डस् मोडीत काढत उष्णतेचा नवा उच्चांक गाठला… भारतात तर संपूर्ण जगातील सर्वात जास्त उष्ण म्हणून ४७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदवून, अनेक शहरांची नोंद झाली.
पृथ्वीवरील वातावरण, हवामानातील बदल, कमी आणि जास्त दाबाचे पट्टे, इ. सर्व पृथ्वीच्या परिवलन आणि परिभ्रमण या कृतीमुळे होत असतात. पृथ्वीच्या याच परिवलनामुळे, विषुववृत्ताजवळ ३० अंश उत्तर आणि दक्षिण गोलार्धात ज्या प्रकारचे ग्रहीय वारे वाहतात, त्यांना ‘व्यापारी वारे’ असं म्हणतात. पूर्वी व्यापारासाठी समुद्रात फिरणार्या शिडाच्या जहाजांना या वार्यामुळे दिशा आणि गती मिळत असे, म्हणून त्यांचे असे नाव पडले. या वार्यामुळे विषुववृत्ताजवळ हवामानातील बदल, चक्रीवादळांची दिशा, महासागरातील प्रवाह इत्यादींवर परिणाम होत असतो. आणि जागतिक हवामान बदलांमुळे या सर्वांवर परिणाम होतो. जागतिक तापमानवाढीमुळे म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगच्या कारणाने पृथ्वीच्या तापमानात वाढ होऊन हवामानात बदल घडून येतात. यामध्ये, ‘अल निनो’ या विध्वंसक कार्यकर्त्याचे नाव यावर्षी सगळीकडे जास्तच गाजले आहे!
कोण आहे हा ‘अल निनो’?
तर अल निनो हा एक स्पॅनिश शब्द आहे. त्याचा अर्थ आहे ‘छोटा मुलगा’ किंवा ‘बाळ येशू’. अमेरिकेच्या पेरू, इक्वेडोर देशाजवळील किनार्यावर समुद्राचे पाणी गरम होण्याची जी घटना घडते, ती ख्रिसमसच्या सुमारास सुरुवात होत असल्यामुळे, तिथल्या मच्छीमारांनी या घटनेला हे नाव दिले. हा हवामानातील एक प्रकारचा बदल आहे, जो जवळपास दर दोन ते सात वर्षांनी रिपीट होतो. तसंच ‘ला नीना’ (स्पॅनिश अर्थ- छोटी मुलगी) हा हवामान बदलाचा प्रकार अल निनोच्या अगदी उलट असतो, ज्यात प्रशांत महासागरातील तापमान कमी होते.
‘अल निनो’ या हवामान बदलामध्ये, नेमकं विषुववृत्ताजवळ मध्य व पूर्व पॅसिफिक म्हणजेच प्रशांत महासागरातील पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान सामान्यापेक्षा जास्त वाढल्याने संपूर्ण पृथ्वीवर हवेच्या दाबामध्ये मोठे बदल घडून येतात. ज्या वर्षी प्रशांत महासागरातील तापमान दोन अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढते, तेव्हा त्यावेळी त्याला ‘सुपर अल निनो’ असं म्हणलं जातं! यावर्षी या अल निनोचा प्रभाव अत्यंत प्रभावी किंवा फार जास्त आहे. सुपर अल निनोहून अधिक म्हणावं, इतकं. यामुळे यावर्षी याला एका जपानी राक्षसाचे नाव दिले गेले असून त्याला ‘गॉडझिला अल निनो’ असं म्हणलं जात आहे. या जास्त प्रभावी अल निनो मुळे, सर्वच जगात कुठे प्रचंड उष्णता तर कुठे प्रचंड पाऊस अशी परिस्थिती असणार आहे. याचा आग्नेय आशियाई देश आणि भारतावर देखील मोठा परिणाम होत असतो.
तसा भारतातील पाऊस हिंदी महासागरातील डायपोलवर देखील बराच अवलंबून असतो. या डायपोलची स्थिती सकारात्मक असल्यास, अल निनोचा मान्सूनवर प्रभाव काही प्रमाणात कमी होऊन पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता कमी होते. परंतु, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजांनुसार, हिंद महासागरातील डायपोल परिस्थिती सध्या तरी तटस्थ आहे. आणि ती पुढे तटस्थ राहण्याचीच सर्वाधिक शक्यता आहे, ज्यामुळे अल निनोच्या परिणामांनुसार बदल घडण्याची शक्यता कमी असू शकते. परंतु, या डायपोलवर पुढच्या काही दिवसांत परिस्थिती सकारात्मक बदलल्यास, अल निनोचा प्रभाव कमी होऊ शकतो. आपण किमान आशा ठेवू की ही परिस्थिती सकारात्मक होत बदलावी.
मान्सूनच्या वार्यांना हा अल निनोचा प्रभाव बहुतांशी वेळा कमकुवत करतो. त्यामुळे जेव्हा जेंव्हा अल निनोचा प्रभाव असतो, तेव्हा तेव्हा मान्सूनचा पाऊस सामान्यापेक्षा कमी प्रमाणात पडतो. मागच्या १५० वर्षांतील अभ्यासात जवळपास बहुतांश वेळा अल निनोमुळे मान्सून कमकुवत होऊन पाऊस कमी झाल्याची नोंद असल्याचं दिसून येतं. भारतीय हवामान खात्याने यावर्षी यामुळे पावसाचे प्रमाण ९०टक्केपर्यंत असेल असं सांगितलं आहे. एक दोन टक्क्याने देखील पाऊस कमी-अधिक झाला, तरीही मोठ्या प्रमाणावर पावसाच्या पाण्याची पातळी बदलते, यावर्षी तर ती ९० टक्के किंवा त्याहूनही कमी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजे एकीकडे पावसाचे प्रमाण बरेच कमी असेल, तर दुसरीकडे अमेरिकेसारख्या देशात अत्यंत जास्त पाऊस, पूरस्थिती असेल, अशी शक्यता आहे. भारतात देखील उत्तर भारतीय हिमालयीन प्रदेशात गंभीर पूरपरिस्थिती आणि मध्य व दक्षिण भारतात कोरडा दुष्काळ असंही होऊ शकते. म्हणजेच भारतातील बहुतांशी भागात यावर्षी दुष्काळी परिस्थिती असण्याची जास्त शक्यता आहे.
यामुळे, यावर्षीच्या खरीप पिकांवर फार मोठा परिणाम होऊ शकतो. दुबार पेरणीचे संकट, पाण्याअभावी पिके करपून जाण्याची शक्यता, तसेच उत्पन्नात घट आणि बाजारातील किमती यात तफावत होऊ शकते. सध्या जगातील युद्ध परिस्थितीमुळे आणि बर्याच अंशी नियोजनाच्या अभावामुळे आधीच देशाची अर्थव्यवस्था हेलकावे खात असताना या कमी प्रमाणात पडू शकणार्या पावसामुळे आणखीनच अर्थव्यवस्थेत मोठे उतार पाहावयास मिळू शकतील.

या सगळ्या परिस्थितीमुळे, केवळ आर्थिक बाबतीतच बदल घडतील, असं नाही, तर, शेतकरी, कामगार, नोकरदार ते लघु व मोठे व्यावसायिक, उद्योजक या प्रत्येकावर नैराश्याचं एवढे सावट पुन्हा घोंगावू शकतं. व्यक्तिगत मानसिक, शारीरिक स्वास्थ्यावर देखील दूरगामी परिणाम करणारे हे घटक ठरू शकतील.
काय करता येईल?
या सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन पुढची पावलं टाकणं गरजेचं असेल.
भारताच्या एकूण जीडीपीमध्ये १५ टक्के वाटा शेतीचा असतो आणि ४५ टक्क्यांच्या जवळ देशातील रोजगार कृषीवर आधारित आहे. त्यामुळे नियोजनाचा मोठा भार या क्षेत्राला उचलावा लागणार आहे.
शेतकर्यांनी, पेरणीची इत्यादीं ची घाई न करता, हवामान विभागाकडून देण्यात येत असलेल्या पावसाच्या अंदाजाचा सतत आढावा घेत रहावा. जेणेकरून शेतीतील उत्पन्नात नुकसान होणार नाही किंवा ते कमी होईल.
जी पिकं कमी पाण्यात, उष्णतेत तग धरू शकतील, अशा पिकांची निवड करावी.
पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं महत्त्व समजून घेत पाणीबचत करणे अनिवार्य करून घ्या, ज्यात ठिबक सिंचन योजनेच्या वापरावर भर द्यावा.
त्याचप्रमाणे शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा शक्य होईल तितका वापर करून, पारंपरिक पद्धतीने केवळ पावसावरचे अवलंबित्व कमी कसे करता येईल, यावर भर द्या. त्यासाठी कृषी विभागाच्या मदतीने वेळोवेळी स्वतः मार्गदर्शन घेत रहा.
गाव, शहरं सगळीकडे पाण्याचा प्रत्येकाने, सांडपाणी, इतर कामासाठी प्रत्येक बाबतीत अत्यंत काळजीपूर्वक आणि काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे.
ठिबक सिंचन वापरणे.
जितका पडेल, त्या पडलेल्या पावसाचा साठा करणे.
जलसंवर्धन करणे. तसेच, सरकारकडून कर्जमाफी, ठिबक सिंचन योजनेत अनुदान, मोफत बियाणे आदी शेतकरी हिताचे निर्णय तातडीने अंमलबजावणीसहित घेतले जावेत, जेणेकरून शेतकर्यांना दुष्काळी परिस्थितीत तग धरून ठेवणे शक्य होईल.
सरकारकडून पाण्याचे मोठ्या प्रमाणात रिसायकल केले जावे, ज्यातून पाणी वाया न जाता, ते पुनर्वापर होऊ शकेल.
अनावश्यक खर्च टाळावेत.
अगदी पाण्याच्याच बाबतीत नाही, तर अन्नधान्य फार जपून आणि त्यावर प्रक्रिया करून व त्याचा साठा करून वापरण्याची गरज पडू शकते.
वीज टंचाई, महागाई सर्व बाबतीत संकटे घोंगावू शकतात. याआधी कित्येक दुष्काळ या देशाने आणि इतर जगाने पाहिलेले आहेत.
हा गॉडझिला अल निनो, केवळ याच वर्षी नाही, तर पुढची दोन वर्षे प्रचंड उलथापालथ करणार आहे, ही गंभीर बाब लक्षात घेऊन वेळेतच सरकार आणि जनतेने नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.
सर्वात महत्त्वाचे, आपल्या स्वतःचे आणि कुटुंबाचे आरोग्य सांभाळावे.
प्रत्येक कठीण परिस्थिती नेहमीसाठीच तशीच राहत नसते, ती काही काळाने बदलणारच असते. परंतु फक्त आव्हानात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी वेळेतच काही परखड नियोजन करणे आणि मानसिक स्थैर्य राखणे अत्यंत गरजेचे असते.
(लेखिका वैद्यकीय व्यावसायिक आणि पर्यावरण अभ्यासक आहेत.)

