
डॉ. आनंद नाडकर्णी. एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व. त्याच्या संपर्कात आलेल्या किंवा न आलेल्या अनेकांना त्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्रेरणा दिली. माध्यमात काम करत असताना २००२ मध्ये ’वेध व्यवसाय परिषदे’च्या निमित्ताने त्यांच्याशी संपर्क झाला. त्यानंतर दरवर्षी या उपक्रमाद्वारे त्याची भेट होत गेली. बातमीपेक्षा खूप काही वेगळे विषय, विचार ऐकायला मिळाले. कालांतराने म्हणजे २०१४ मध्ये पाथेय शैक्षणिक सामाजिक संस्था आणि आयपीएच यांच्या संयुक्त विद्यमाने ’वेध’च्या कल्याणच्या आवर्तनाची सुरुवात झाली आणि डॉक्टरांची अनेक रूपे पहायला आणि अनुभवायला मिळाली. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन कसे असावे हे त्यांच्याकडून प्रत्यक्ष शिकायला मिळाले. केंद्रप्रमुख म्हणून देवेंद्र ताम्हणे आणि समाजभान जपणार्या शहरातील सृजनांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू झाला. अपेक्षेप्रमाणेच येथेही त्याला उदंड असा प्रतिसाद मिळाला.
सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणे तेही एक कार्यकर्ता म्हणून असा अनुभव नव्हता. पण वेधच्या आयोजनात डॉक्टरांकडून खूप शिकायला मिळाले. पहिली एक-दोन वर्षे या सर्व प्रक्रिया शिकण्यात गेली. त्यानंतर मात्र आमच्या कार्यकर्त्यांनी विषय निवडावा, त्यासाठी फॅकल्टी कोण असेल त्यांची नावे सुचवावीत असा प्रवास सुरू झाला. याच दरम्यान डॉक्टरांनी आपल्या काही जबाबदार्या केंद्रप्रमुखांकडे सोपवण्यास सुरुवात केली. अर्थात यासाठी त्यांनी त्याचे प्रशिक्षण देणेही सुरू केले होते. त्याचबरोबर प्रत्येक केंद्रावर त्यांच्याबरोबर मुलाखतीसाठी मदतनीस तयार केले. त्यासाठीही कार्यशाळा घेतल्या गेल्या. या कार्यशाळेत त्यांच्याकडून बरेच शिकायला मिळाले. ’वेध व्यवसाय परिषदे’चे कालांतराने ’जीवन की पाठशाला’ असे रूपांतर करण्यात आले; अर्थात मूळ गाभा कायम ठेवून. मात्र या उपक्रमात केवळ विद्यार्थी, शिक्षक नाही, तर पालकही जोडले जावेत हा त्यामागचा उद्देश होता. असा उपक्रम विविध शहरांत राबविला जात होता, मात्र त्यात एकसंधपणा असावा याचाही विचार डॉक्टरांनी केला. त्यासाठी सर्व केंद्रावरील सदस्यांच्या एकत्रित कार्यशाळा घेण्यात येऊ लागल्या. काळाची पावले ओळखत हा वारसा पुढे नेण्यासाठी सक्षम समूह तयार करण्याचा डॉक्टरांचा प्रयत्न होता.
अशा कार्यशाळेत आम्हाला डॉक्टर जास्त जवळून अनुभवता आले. पत्रकार म्हणून काम करत असल्याने मुलाखत घेणे हा माझ्या कामाचा भाग होता. परंतु ’वेध’च्या मुलाखती गप्पा असतात, त्यातून आपल्याला फॅकल्टीचा जीवनप्रवास उलगडत न्यायचा प्रयत्न कसा करायचा, हे त्यांनी आवर्जून समजावले. बातमीसाठी घेतली जाणारी मुलाखत ही माहितीची देवाणघेवाण असते. ’वेध’च्या माध्यमातून एका व्यक्तीचा प्रवास प्रेरणादायी ठरेल, अशा पद्धतीने गप्पा मारायच्या याची खूणगाठ त्यानंतर मी मनाशी बांधली.
प्रत्यक्ष परिषद सुरू होण्यापूर्वी त्याची तयारी कशी केली? विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांची उपस्थिती यावरही त्यांचे बारकाईने लक्ष असायचे. त्याची माहितीही वेळोवेळी ते घेत असत. त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे यासाठी ऑनलाईन मीटिंग्स हा उत्तम पर्याय होता. प्रत्येक फॅकल्टीबरोबर अशीच ऑनलाईन मीटिंग घेऊन त्यांच्या मुलाखतीची पूर्वतयारी करणे हाही एक अलिखित नियम होता. २०२४ मध्ये प्रत्यक्ष वेधने विराम घेतला. त्यानंतर त्यांनी आपले स्वतंत्र यू ट्युब चॅनेल सुरू करुन अनेकांना बोलते केले. तीस वर्षांहून अधिक काळ विविध शहरात हजारो फॅकल्टींना त्यांनी बोलते केले. आज डॉक्टर आपल्यात नाहीत, परंतु त्यांनी दिलेला वसा पुढे सुरू ठेवत त्यांना स्मृतीत ठेवणे आमच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी असेल.

