नेते आपल्या मुलांना रणांगणावर का नाही पाठवत?- अशोक परब, ठाणे
मग राजकारणात काय तुमच्या आमच्या मुलांनी यायचं? उद्या विचाराल, नेत्यांची मुलं तलवारी, झेंडे, त्रिशूल घेऊन का फिरत नाहीत? नेत्यांची मुलं सतरंज्या का घालत नाहीत? अशोकराव, आपण फारच दिवास्वप्नं पाहता बाबा. समजून घ्या, ही सगळी कामं तुमच्या आमच्या मुलांनी करायची कामं आहेत. नेत्यांचं आणि त्यांच्या मुलांचं काम हे त्यांच्या मुलांच भलं करण्याचं आहे.
भोंदू बागेश्वर बुवाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत नीचपणाचं वक्तव्य केलं त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवरायांच्या इतिहासाला लोककथा ठरवून त्या लफंग्याला सावरून घेतायत. त्या लफंग्यापेक्षा अधिक बदनामी तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच करतायत. हे काय चाललं आहे?- स्वप्नील शेवडे, तुळजापूर
‘लोककथा’च म्हणाले, त्यांनी ‘दंतकथा’ नाही म्हटलं त्यात समाधान माना… औरंगजेब, अफजल, शाहिस्ता यांना क्लीन चिट नाही दिली, हे नशीब समजा. की त्याचीच वाट पाहताय तुम्ही? आणि आता ते तसं बोलले म्हणून तुम्ही असं बोलताय? पण त्यांच्या विरोधातील कोणी महाराजांबद्दल काही बोललं की लगेच त्याला काय काय बोलतात ते? ते बघा ना… समजा तुम्ही कोणाला काहीतरी बोलायला सांगितलंय आणि तसं तो बोलला तर तुम्ही त्याच्या विरोधात बोलाल का?.. अंडरस्टँडिंग तुमच्यात नसेल… त्यांच्यात असतंच…
नारी शक्ती वंदनेच्या नावाखाली मोर्चा काढला जातो. रस्ते अडवले जातात. आणि मग ज्या महिलेने याचा जाब विचारण्याचं धारिष्ट्य केलं, तिला थेट चारित्र्यहीन ठरवण्याचा नीचपणा मुख्यमंत्र्यांचा भाऊ म्हणवणारा इसम सोशल मीडियावर करतो. यांचे समर्थकही तेच करतात. ही यांची नारी शक्ती वंदना?- सुवर्णा पाठारे, पनवेल
आणि एवढं कळूनही, त्यानंतरही तुम्ही परत हा प्रश्न विचारताय? त्या बाईला तुम्ही वंदन करताय हे छान! पण त्याआधी तुम्हालाच वंदन केलं पाहिजे ताई.
अमेरिकेच्या माथेफिरू अध्यक्षाने भारताला चक्क नरक असं संबोधलं. त्याबद्दल चकार शब्द न उच्चारणार्या आपल्या पंतप्रधानांनी ट्रम्पवर हल्ल्याचा प्रयत्न केल्यानंतर मात्र लगेच काळजी व्यक्त केली… ही आपली ५६ इंची छाती? यांनी इतका कळवळा कधी देशातल्या जनतेबद्दल दाखवला असता तर?- महेंद्र जगताप, सातारा
तुम्ही बोलणारे असेच बोलणार… इराणच्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली नाही म्हणून बोलणार आणि ट्रम्पचा कळवळा आला म्हणूनही बोलणार! नशीब मणिपूरबद्दल का कळवळा आला नाही, असं बोलला नाहीत. ‘ते’ आपल्याला बोलण्यासाठी रोज एवढे विषय देत असतात, त्यावर बोला की…
माझी बायको माझा फोन कधीही घेते आणि तो उघडून रद्दीवाला, भंगारवाला, भाजीवाला, मच्छीवाला, अशा सगळ्या नंबरांवर फोन करून बघते… नेमका कसला संशय येत असेल तिला?- प्रवीण शिंदे, नागपूर
तुमची नक्की आवड काय आहे, याबद्दल संशय असेल बिचार्या वहिनींना…
राघव चढ्ढा काही दिवसांपूर्वी ज्याला गुंड मवाल्यांचा पक्ष म्हणत होते, त्याच पक्षात त्यांनी प्रवेश घेतला. हे मतपरिवर्तन कशामुळे झालं असेल?- विजय नाडकर्णी, चेंबूर
मतपरिवर्तनच झालं असेल कशावरून? त्यांच्यातच परिवर्तन झाल असेल. ते गुंड मवाली झाले असतील… नाण्याला दोन बाजू असतात. आपण दुसरी बाजू सुद्धा बघावी. माणूस आहे… मोह, माया, लोभ, भीती… यापासून माणूस किती काळ लांब राहणार?
लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याकडे ना शाळा आहेत, ना रस्ते आहेत, ना आरोग्याच्या सुविधा आहेत, ना पोलिस आहेत- मग हे सगळं देण्याच्या आधी लोकसंख्येच्या प्रमाणात लोकप्रतिनिधी कशाला पाहिजेत?- शशांक पेठे, उमरगा
शाळा, रस्ते, आरोग्याच्या सुविधा हे असं काही देणं शक्य आहे का? त्या देण्याचा प्रयत्न करावा तर कोणी तरी उठणार आणि चार चार मुलं जन्माला घाला म्हणणार, आपणही भक्ती भावाने चार चार मुलं जन्माला घालणार. मग विचार करा, लोकसंख्या किती वाढणार? पण तुम्ही तुमचा स्वत:चा विचार करणार नाही हे त्यांना माहित आहे. मग ते त्यांचा स्वत:चा विचार करणारच ना.
विचारून टाका प्रश्न
तुम्हालाही अभिनेते संतोष पवार यांना प्रश्न विचारायचाय…? मग वाट कसली बघताय…? उचला पेन आणि टाका विचारून प्रश्न… हा प्रश्न थेट ‘मार्मिक’च्या [email protected] या ईमेल आयडीवर पाठवून द्या… किंवा आमच्या पत्त्यावर पाठवा. मार्मिक प्रश्नाला संतोष पवार उत्तर देतील…

