
अर्ध्या सुट्टी असल्यानं चालत चालत गांधी चौकातल्या पेपरच्या स्टॉलवर आला. तसा त्याचा मूडच एकांत हवा म्हणतोय, म्हटल्यावर
स्टॉलपेक्षा चांगलं ठिकाण दुसरं कोणतं मिळणार? त्यानं पेपरवाल्या काकाच्या हातात चिल्लर ठेवली अन् नेहमीचा पेपर अलगद घेतला. हे पेपरवाले काका त्याच्या लहानपणापासून तो बघतोय, इथंच स्टॉल लावत आहेत. अर्ध्याचा आजा म्हणायचा, पूर्वी पेपरची लाईन असलेले पंचक्रोशीत हे एकमेव! सकाळी सायकलला पॅडल मारलं की जवळपासची खेडी पहाटे फिरून पेपर पोहोचवून गावात येणार. आणि इथे
स्टॉल लावून बसणार. इंग्रजी, हिंदी नि मराठी अशी सारी वर्तमानपत्र, साप्ताहिकं, मासिकं त्यांच्याकडे हमखास मिळणार. पूर्वी टीव्ही यायच्या आधी सकाळी सकाळी त्यांच्या स्टॉलवर फार गर्दी असायची म्हणे!
आज काय विशेष, म्हणून अर्ध्या पेपर चाळू लागला तर गुरू ते जगतगुरुपर्यंतच्या भूलथापा त्यात पहिल्या पानापासून सुरू झालेल्या दिसल्या. त्या भूलथापा मारून शोषण केलं म्हणून गुरू भोंदू म्हणवले गेले वा छापले गेले, अटकेत गेले. तर दुसर्यानं भूलथापा मारून शासन केलं आणि ते करत असता पब्लिकचं शोषण झालं तरी ते जगतगुरु कायम राहिले, हे बघून अर्ध्याचे डोळे विस्फारले गेले.
दुसर्या पानावर भली मोठी जाहिरात. अर्थात सरकारची! हे केलं, ते करू, आणि तमुक प्रस्तावित आहे. हे दरवेळचं चावून चोथा झालेलं वाक्य टाकून जाहिरात छापलेली. जाहिरातीत कामाच्या जंत्रीपेक्षा बिनकामाची तोंडं जास्त छापून दिलेली. मिसरूड न फुटलेल्यापासून ते जख्खड म्हातार्यांपर्यंत सारीच तोंडं त्यात छापलेली. तिसर्या पानावर आणखी काही बातम्या संक्षिप्तपणे छापलेल्या. त्याच पानांवर खाली कोपर्यात यथातथा व्यंगचित्र नि त्याजवळ टुकार चुकार चारेक ओळी छापलेल्या.
चौथ्या पानावर संपादकीय भंडारा मुक्तहस्ते उधळलेला. त्याजवळ काही पाहुण्यांचे मिळमिळीत मजकूर छापून दिलेले. पुढील काही पानांवर तसलंच काही छापलेलं. त्यात सातव्या की आठव्या पानावर तीन पेराची गावची रेशनच्या तांदळाच्या काळ्या बाजाराची मोघम बातमी छापलेली. बिननावाची नि बिनबुडाची. ‘बघा आपल्या गावची बातमी आलीय!’ अर्ध्या किंचाळला.
‘ते होय? कावळ्याला टीचरं दिसली म्हणजे तो काय मलमं खलून थोडीच लावायचा आहे? त्याला काय चोच मारायला वल्लं कातडं भेटलं
म्हणजे झालं,’ पेपरवाल्या काकांनी टोमणा मारला.
‘म्हणजे ओ काका?’ अर्ध्या न कळून विचारू लागला.
‘त्याला त्याचा शेर मिळाला नसंल. म्हणून भुई धोपटीत असंल,’ काका परखड बोलला.
‘कोणी दिली पण ही बातमी?’ अर्ध्याला प्रश्नं पडला.
‘कुपाळदेनं!’ पेपरवाल्या काकांनं सहज उत्तर दिलं.
‘ते फार मोठ्या पेप्रात पत्रकार म्हणून आहेत ना?’ अर्ध्यानं बाळबोध प्रश्न विचारला.
‘अरे पत्रकार वेगळे रे! ही गावात धमक्या देऊन खंडण्या गोळा करणारी मंडळी म्हणजे बातमीदार! पण कातडं बातमीदाराचं पांघरणार अन् आव पत्रकाराचा आणणार,’ पेपरवाल्या काकानं उत्तर दिलं.
‘पण काका दोन्हीत काय फरक राहतो?’ अर्ध्याचे प्रश्न संपत नाही.
‘पोरा, तुला वाचता येतं ना? मग वाचत जा रे! भेद कळेल.’ पेपरवाल्या काकानं आवरतं घेतलं.
अर्ध्या कुपाळदेचा चेहरा आठवतो, धिप्पाड बांध्याचा काळा-सावळ्या रंगाचा नि जत्रेतला कचकड्याचा रंगीत गॉगल डोळ्यावर लावणारा नि उठता बसता गावातल्या पोरा-टोरांना देखील बातमी देऊ का, म्हणून धमक्या देणारा कुपाळदे आठवतो. त्याचा मुख्य धंदा काय? याचा थांगपत्ताच लागत नाही. कधी तो नाक्यावर चहा उकळताना दिसतो. कधी कुठल्या बँकेच्या पावत्या फाडत शंभर-दोनशे रुपडे गोळा करताना दिसतो. कधी विमा उतरवतो. कधी काय तर कधी काय!!
‘काका ह्या कुपाळदेचा धंदा नेमका काय आहे हो?’ अर्ध्या आता खोलात शिरू लागला. शेवट माहिती पाहिजे ना?
‘अश्यांचे धंदे एकच! लेखण्या बटीक बनवण्याचे. मलिदा भेटला की गुळणा धरून ही बेनी तोंडाला बूच लावून पडणार! यांना गावात मोकळे फिरणारे सांड दिसत नसतील? त्यांनी अडवलेला रस्ता वा धडका देऊन पाडलेले माणसं दिसत नसतील? स्मार्ट गावाची बोंब मारणार्या पुढार्यांभोवती पिंगा घालताना रस्त्यात टमरेल घेऊन बसलेलं नागडं पोरं दिसत नसेल? उखडलेले रस्ते, गल्लीबोळात पडलेला कचर्याचा ढीग दिसत नसेल? कदाचित दिसला असता, पण कचकड्याच्या रंगीत गॉगलमधून यांना लोकांच्या अडचणींची, त्रासांची फक्त किंमतच दिसते. म्हणून सरपंचाच्या घरात पाणी येण्याआधी यांच्या घरात पाणी येतं?’ काका भीड ठेवतच नाहीत.
‘म्हणजे?’ अर्ध्याला आणखी माहिती पाहिजे.
‘तो मागं नवीन सरपंच झाला ना? ही दोनचार बेणी त्याच्याकडे गेली. बिचार्याला काय धमक्या दिल्या कुणास ठाऊक? पण गावात पाणी सोडताना आधी यांच्या नळाला पाणी सोडलं जातं. मग गावाला. तसंही येतं आठ दिवसांत एकदा. पण यांना मिळालं नाही तर हे बातमी टाकणार. लोकांशी घेणं काय? परवा यानं पेट्रोल पंपवाल्याला दम दिला. रांग असली तरी पहिला नंबर लावत जा, नाहीतर काटा मारतो म्हणून बातमी टाकेन. लोकं म्हणतात, जाऊदेत. भर मेल्या. मागे ही रस्त्याची अख्खी झाडं तोडली. याचा जीव गुंतला ओंडक्यात. बायकोला भाजी कापायला ठोकळा हवा होता म्हणे. हा गेला झाडं तोडण्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडे. एक ठोकळा दे म्हणून अडून बसला. तो नाही म्हंटला. तर दुसर्या दिवशी अमुक इतकी झाडं विना परवाना तोडली म्हणून बातमी टाकली,’ पेपरवाल्या काकानं कुपाळदेची कुंडली काढली.
‘बापरे! इतका मतलबी माणूस आहे हा?’ अर्ध्यानं आश्चर्याने विचारलं.
‘फार! अगदी एखाद्या लहान मुलाच्या हाती एखादी लॉलीपॉप दिसली आणि याच्या तोंडाला पाणी सुटलं तर हा ती मिळवून खाल्ल्याशिवाय पुढे जाणार नाही. अगदी त्या चिमुकल्या मुलालाही धमकी देऊ शकतो हा प्राणी! बातमी टाकण्याची! काय समजलात?’ पेपरवाल्या काकाचं उत्तर आलं.
‘काका पत्रकारितेचा दर्जा इतका का घसरला असेल हो?’ अर्ध्यानं चिंतेने विचारलं.
‘पोरा, बातमीदारांचा दर्जा असं विचारायचा आहे का?’ पेपरवाल्या काकानं दुरुस्ती सुचवली.
‘हो, तेच म्हणायचं होतं काका मला!’ अर्ध्यानं लागलीच सावरून घेतलं.
‘पत्रकारांचा दर्जा आधीच घसरला आहे, बातमीदारांचा म्हणशील तर खर्या बातम्या लावायला बरेच बातमीदार जिवाला भितात. मग त्यात काही अशी मतलबी संधीसाधू बनतात. ते व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवण्याऐवजी थेट भ्रष्ट व्यवस्थेशी सौदा, तडजोड करतात आणि पदर भरून घेतात. बदल्यात जीवही वाचतो. आणि गाठीला पैसाही मिळतो.’ पेपरवाला काका मात्र निर्भीड बोलला.
‘काका तुम्ही का नाही होत बातमीदार? तुम्ही तर कुणालाच भिला नसता?’ अर्ध्याला काकाकडूनच आशा वाटायला लागली.
‘मी? तीस पस्तीस वर्ष लोकांपर्यंत सत्य पोहोचवायची धडपड केलीच की मी? एकानं सत्य शोधायचं असतं, एकानं मांडायचं, एकानं छापायचं आणि माझ्यासारख्यानं ते गल्लीबोळात पोहोचवायचं असतं. मी माझं काम अजूनही इमानेइतबारे करतोय. पण इथं रेल्वेच्या इंजिनसह पुढले काही डबेच घसरलेत. तिथं माझ्यासारख्या मागच्या डब्यानं इंजिन होऊन प्रश्न सुटणारे?’ काकानं अर्ध्यालाच कोड्यात टाकलं.
‘अर्ध्या चाल!’ नम्यानं दुरूनच आवाज दिला. अर्ध्यानं पेपरची घडी घातली नि हातात घेऊन नम्याकडं गेला.
‘बोल!’ अर्ध्यानं जवळ जाऊन नम्याला आदेश दिला.
‘अरे ग्रामपंचायतचे गाळे होते बघ. मी मला एक भेटावा म्हणून अर्ज केलेला?’ अर्ध्याला नम्या सांगतोय की कोडं घालतोय ते कळेना!
‘त्याचं काय?’ न उमजून अर्ध्यानं विचारलं.
‘ते बहुतेक गाळे गावच्या पत्रकारांना दिलेत ग्रामपंचायतने!’ नम्यानं चटकन सांगितलं.
‘पत्रकार नाही. बातमीदार म्हण!’ अर्ध्या आताच मिळालेल्या शिकवणीनं प्रभावित होऊन बोलला.
‘दोन्हीत काय फरक राहतो?’ आता प्रश्न नम्याला पडला. पडायलाच पाहिजे ना? भेद कळलेच पाहिजे ना?
‘मला फरक माहीत नाही. साम्य माहीत आहे!’ अर्ध्या आत्मविश्वासानं बोलला.
‘काय?’ नम्या बुचकळ्यात पडला.
‘दोघंही लेखण्या विकतात, वा त्यांचे सौदे करतात! असलं काही…’ अर्ध्या आठवलं तेव्हढं चटकन सांगून टाकलं.
नम्यानं काहीच न कळून मोटारसायकलला किक मारली. अर्ध्या मागं बसला, गाडी धूर सोडत निघून गेली. काही न उमगलेले प्रश्न अर्ध्याच्या मानगुटीवर बसून गेले.

