• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं…

- रवींद्र पोखरकर (राज्यकारण)

Nitin Phanse by Nitin Phanse
December 8, 2022
in कारण राजकारण
0

‘आज की शाम एक ऐसी शाम है, जहां चिड़ियां को उसका घोंसला नजर नहीं आ रहा है, क्योंकि उसका घोंसला कोई और ले गया है. मगर उसके सामने थक जाने तक एक खुला आसमान जरूर नजर आ रहा है,’ एनडीटीव्हीचा राजीनामा देऊन बाहेर पडल्यावर आपल्या युट्यूब चॅनलवरून बोलताना दाटून येणार्‍या कंठाला आवर घालण्याचा प्रयत्न करीत रवीश कुमारच्या मुखातून हे शब्द बाहेर पडले आणि ऐकणारे लक्षावधी लोक भावुक झाले. एनडीटीव्ही, प्राईम टाईम आणि रवीश कुमार हे असंख्य सुजाण लोकांच्या आयुष्यातील मागील अनेक वर्षांचं सोमवार ते शुक्रवार रात्रीचं ठरलेलं समीकरण होतं.त्यात आता खंड पडणार हे समजल्यावर सारेच हळहळले.
हे आज ना उद्या घडणार, गोदी मीडियात समाविष्ट होण्यास नकार देणारं हे एकमेव चॅनल मोदी-शहा आपल्या ‘खास’ मित्रांच्या माध्यमातून ताब्यात घेणार, याची जाणीव एनडीटीव्हीच्या बहुसंख्य प्रेक्षकांना आधीपासूनच होती; परंतु तरीही ते प्रत्यक्षात घडल्यावर आणि रवीश त्यातून बाहेर पडल्यावर लोकांना धक्का बसायचा तो बसलाच. देशभरातील लोकहिताच्या बातम्यांना प्राधान्य देणारं, त्यांचा पाठपुरावा करणारं, पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांबाबत चर्चा घडवणारं हे एकमेव चॅनल शिल्लक राहिलं होतं. अखेर त्यावरही त्यांचा कब्जा झालाच. आपल्या विरोधात आवाज उठवू पाहणारा एकही राजकीय पक्ष, एकही प्रसारमाध्यम या देशात शिल्लक राहता कामा नये, अशीच मोदींची अघोरी इच्छा आहे. हेच हिटलरने त्याच्या काळात जर्मनीत केलं होतं. हिटलरची प्रोपगंडा किंवा गोबेल्स नीती आणि मोदीशहांची मागील काही वर्षातील नीती पाहिली तर त्यात इतकं प्रचंड साम्य दिसून येतं की आपण अक्षरशः अवाक होऊन जातो. हिटलरच्या काळात टीव्हीमाध्यम रूळायचं बाकी होतं. वर्तमानपत्र अर्थात प्रिंट मीडिया हेच प्रमुख प्रसारमाध्यम होतं. ते आपल्या ताब्यात आणण्यासाठी हिटलरने अतिशय नियोजनबद्ध रीतीने जे काही केलं, तेच सगळं मोदींनी आजच्या भारतात केलंय. आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतं की जर्मनीतील त्या काळातील जनता जशी हिटलरच्या बहकाव्यात आली तेच आजच्या आधुनिक म्हटल्या जाणार्‍या काळात भारतात घडलं!
रवीशच्या राजीनाम्यानंतर ‘प्रोपगंडा’ या पुस्तकाचे लेखक, पत्रकार रवी आमले यांनी एक ट्विट करून हिटलरने जर्मनीतील तत्कालीन माध्यमे कशी ताब्यात घेतली त्याविषयीचा त्यांच्या पुस्तकातील काही मजकूर ट्विट केलाय. तो असा- कोण आणि कसे असतात वृत्तपत्रांचे वाचक? हिटलरने त्याचाही नीट अभ्यास केलेला दिसतो. ‘माइन काम्फ’मध्ये त्याने वाचकांची तीन प्रकारांत विभागणी केलेली आहे. पहिला प्रकार वाचतील त्यावर विश्वास ठेवणार्‍यांचा. दुसरा कशावरही विश्वास न ठेवणार्‍यांचा आणि तिसरा जे वाचतील त्याचा तर्कशुद्धपणे अभ्यास करून नंतर आपले मत बनविणार्‍यांचा. यातल्या दुसर्‍या दोन गटांची त्याला पर्वा नाही. कशावरही विश्वास न ठेवणारे सगळ्याच वृत्तपत्रांचा तिरस्कार करतात. त्यांना हाताळणे अवघड. कारण ते सगळ्याच गोष्टींकडे संशयाने पाहतात. त्यांना प्रोपगंडा भरवणे कठीणच. तिसर्‍या प्रकारचे वाचक हे बुद्धिवादी असतात. ‘प्रत्येक पत्रकार बदमाश असतो आणि कधी कधी तो खरेही बोलतो,’ अशी त्यांची धारणा असते. शिवाय संख्येने ते कमीच असतात. तेव्हा ते काही उपयोगाचे नाहीत. राहता राहिले पहिल्या प्रकारचे वाचक. हिटलरच्या मते ती म्हणजे साध्या आणि हलक्या कानाच्या लोकांची गर्दी, पण ते संख्येने बहुसंख्याक. त्यांची मतपेढी मोठी. हिटलरचे लक्ष्य होती ती ही गर्दी. त्याला त्यांना आपल्या कब्जात घ्यायचे होते. त्यांना आपली विचारधारा शिकवायची होती; पण त्याच्यापुढे एक अडचण होती. हे लोक आधीपासून वेगळी वृत्तपत्रे वाचत होते. त्यांपासून त्यांना परावृत्त कसे करायचे? काम अवघड होते. तेव्हा हिटलरने पहिल्यांदा प्रस्थापित माध्यमांविरोधात प्रचार आघाडी उघडली. आपल्या विरोधकांचे राक्षसीकरण करण्याचा प्रभावी प्रोपगंडा तंत्राचा पद्धतशीर वापर त्याने वृत्तपत्रांविरोधात सुरू केला. पण हे करताना त्याला त्या माध्यमाचे महत्त्व कमी करायचे नव्हते. ते साधन बदनाम करून कसे चालेल? तेच तर तोही वापरत होता. तेव्हा त्याने प्रोपगंडाचा रोख वळविला तो वृत्तपत्रांचे प्रकाशक आणि पत्रकार यांच्याकडे. सामान्य वाचकांच्या हाती मतपत्रिका असते. ते सत्तेवर कोणाला आणायचे हे ठरवीत असतात. वृत्तपत्रे त्यांना शिकवत असतात. परंतु हे ‘शिक्षक’ काही चांगले नाहीत. ते ‘खोटे, अडाणी आणि सैतानी मनोवृत्तीचे’ आहेत. त्यांनीच तर जर्मनीची वाट लावली नाही काय? याच जर्मन वृत्तपत्रांनी ‘आपल्या लोकांच्या’ गळी ‘पाश्चिमात्य लोकशाही’ची बकवास उतरवली नाही काय? हीच दैनिके समाजाच्या नैतिक अध:पतनास कारणीभूत ठरली नाहीत काय? आपले लोकही अखेर आधुनिक बनेपर्यंत याच दैनिकांनी नीतिमूल्ये, सार्वजनिक सभ्यता यांची टिंगल केली नाही काय? त्यांना कालबाह्य आणि खालच्या दर्जाचे ठरविले नाही काय? राज्याच्या बळाला याच दैनिकांनी विरोध केला नाही काय? हे हिटलरचे प्रश्न होते. यातून तो एकच बाब लोकांच्या मनावर बिंबवू पाहत होता, की ही सगळी प्रस्थापित माध्यमे देशविरोधी आहेत. देशाच्या संस्कृती आणि सभ्यतेच्या विरोधी आहेत. ‘जर्मन राईश आणि जनता यांची कबर खोदण्याचेच काम या तथाकथित उदारमतवादी माध्यमांनी केले,’ असे तो सांगत होता. लोकांचा त्यावर विश्वास बसत गेला आणि मग ही माध्यमं आपल्या हितचिंतकांकरवी ताब्यात घेण्याचा हिटलरचा मार्ग अगदीच सुकर झाला.
वाचताना वाटतंय ना हेच सगळं गेल्या आठनऊ वर्षात आपण आपल्या देशात अनुभवल्यासारखं? ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनीही रवीशच्या राजीनाम्यानंतर आपला अक्षर दिवाळी अंकातील एक जुना लेख फेसबुकवर शेअर केलाय. कोणत्या परिस्थितीत आपल्याला आयबीएन-लोकमतचा राजीनामा द्यावा लागला ते त्यांनी त्यात सविस्तर लिहिलंय. त्यात शेवटी त्यांनी म्हटलंय, ‘२६ मे २०१४ ला मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. एक जून २०१४ला म्हणजे बरोबर पाच दिवसांनी मुकेश अंबानींनी राघव बहलशी केलेल्या कराराची अंमलबजावणी केली आणि आमचं नेटवर्क ताब्यात घेतलं. एखाद्याला हा योगायोग वाटू शकतो, पण ज्यांना राजकारण आणि अर्थकारणाची गुंतागुंत समजते त्यांना याचा नेमका अर्थ समजू शकतो. साधारण मे महिन्यात आम्हाला भविष्याची पूर्ण कल्पना आली होती. आता आमचं राज्य येणार, तुमच्या संपादकांना गाशा गुंडाळायला सांगा, असा निरोप एका वरिष्ठ भाजप नेत्याने मला पाठवला. आयबीएन लोकमतमध्ये आपल्या मर्जीतला संपादक यावा म्हणून काही भाजप नेते प्रयत्न करू लागले होते. अनपेक्षित काहीच नव्हतं. सत्तेचं सर्वोच्च केंद्र बदललं की खाली पडझड ही होणारच. पण सचोटीने पत्रकारिता करूनही आपल्याला हा फटका बसतोय याचं वाईट वाटत होतं. काँग्रेस किंवा वाजपेयी सरकारच्या काळात असा काहीच अनुभव आला नव्हता. एक मित्र म्हणाला, ’अरे, त्यावेळी तू महानगरमध्ये होतास, खर्‍या अर्थाने स्वतंत्र होतास. बडी माध्यमे नेहमीच सत्तेची गुलाम असतात.’ एका परीने त्याचं म्हणणं बरोबर होतं. त्यातल्या त्यात अशा उन्मत्त सत्तेपुढे आपण कधी झुकलो नाही यातच समाधान होतं. राजीनामा देताना म्हणूनच कदाचित माझी मान ताठ होती आणि अंबानीच्या नोकरांच्या नजरा झुकलेल्या होत्या.’
गोदी मिडियात सहभागी न झालेले आणि आपल्या विचारांशी, पत्रकारितेच्या मूल्यांशी ठाम असणारे पत्रकार संख्येने कमी असले तरी ते आहेत हेच आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि मोदींनी प्रचंड दबाव आणूनही ते झुकले नाहीत हे आपल्यासारख्या लाखो सर्वसामान्य देशवासियांना धाडस आणि प्रेरणा देणारं आहे. यातील बहुतांश पत्रकार आता युट्यूबवर आलेले आहेत. त्यांचे चॅनल सबस्क्राईब करून आणि ते पाहून आपण त्यांना समर्थन देत रहायला हवं. त्यांच्या लढण्याच्या जिद्दीच्या पाठी आपलं बळ उभं करायला हवं. ‘सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं..’ हे लक्षात ठेवायला हवं. अमिताभ बच्चन आणि शबाना आझमी अभिनित ‘मै आझाद हूँ’ या सुंदर चित्रपटात कैफी आझमी यांनी लिहिलेलं एक जबरदस्त प्रेरणादायी गीत आहे. त्यातील प्रमुख दोन ओळी अशा आहेत…

इतने बाजू इतने सर,
गिन ले दुश्मन ध्यान से
हारेगा वो हर बाजी,
जब खेले हम जी जान से

Previous Post

तुमचे शिव्यांनी पोट भरते, जनतेने काय करावे?

Next Post

वेळ चुकली, समन्वय चुकला! संघांना फटका बसला!

Next Post
वेळ चुकली, समन्वय चुकला! संघांना फटका बसला!

वेळ चुकली, समन्वय चुकला! संघांना फटका बसला!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.