इ.स. २००० – २००१चा काळ! गोरेगावच्या फिल्मसिटीमध्ये संजय लीला भन्साळींच्या ‘देवदास’चं चित्रिकरण जोमात सुरू होतं. भारतीय चित्रसृष्टीच्या तोपर्यंतच्या इतिहासातील सर्वात महागडा अन् भव्य चित्रपट एकेका दृश्याने हळूहळू आकार घेत चाललेला होता. चित्रपटासाठीचे काही सेट्स, ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंच्या मार्गदर्शनाखालील टीमसोबत, माझ्या धाकट्या भावाने, धीरजने, त्यांचा मुख्य सहाय्यक म्हणून, आरेखलेले आणि बांधलेले होते. त्याच्या हाताखाली त्यावेळी सुमारे बाराशे लोकांचं मनुष्यबळ दोन वर्षं दिवसरात्र राबत होतं.
चंद्रमुखीचा (माधुरी दीक्षित) कोठा/ हवेली बांधून झालेली होती. सेटवरचे लाईट्स सुरू झाले की अक्षरशः डोळे दिपून जात होते. फक्त स्वर्गीयच म्हणावं असं झगमगतं नेत्रदीपक काम समोर उभं राहात होतं. आज ‘काहे छेड मोहे..’चं सराव चित्रिकरण सुरू होतं. संध्याकाळची वेळ होती. अबू जानी, संदीप खोसला, नीता लुल्ला आणि रेझा शरीफींच्या संकल्पनेतून उतरलेला, कितीतरी आरसे आणि घुंगरू लावून सजवलेला अवजड पेहराव परिधान करून माधुरी दीक्षित नृत्याच्या कठीण स्टेप्स, थोड्याफार सरावानंतर, लिलया करून दाखवित होती. ते तिला जमत होतं कारण तिची उजळणी करून घेत होते, लखनऊ घराण्याचे विख्यात कथ्थक सम्राट, पद्मविभूषण, संगीत नाटक अकादमी, कालिदास सन्मान विभूषित पं. ब्रिजमोहन मिश्रा अर्थात् बिरजू महाराज!
मुंबईच्या सिनेसृष्टीतल्या माधुरी दीक्षित या बिरजूजींच्या पट्टशिष्या! ‘देवदास’मध्ये केवळ माधुरी आहे म्हणून बिरजूजी आयुष्यात पहिल्यांदा संजयजींसाठी नृत्य दिग्दर्शन करीत होते. नृत्यासाठी, ते शिकण्यासाठी, कितीही श्रम करायची तयारी असलेली ही मराठी मुलगी बिरजूजींची फार लाडकी! ते मंतरलेले पवित्र दहा दिवस फक्त बिरजूजींचेच होते. या महत्त्वाच्या गाण्यासाठी पंडितजी स्वतः जातीने सेटवर हजर असायचे. त्यांच्या कितीतरी शिष्या त्यासाठी खास दिल्लीहून आलेल्या होत्या. या गाण्यात माधुरीच्या मागे नाचताना दिसणार्या मुली कुणी एक्स्ट्रॉ आर्टिस्ट नसून बिरजूजींच्या शिष्या आहेत.
– – –
आदल्याच रात्री पंडितजी आणि त्यांच्या शिष्या, शाश्वती सेन, सेट पाहायला आलेले होते. सेटच्या फ्लोअरनुसार त्यांना त्यांचे आडाखे बांधायचे होते. फिल्मसिटीमधली सायंकाळ फार सुंदर असते. आम्ही आमचं सेटवरचं काम उरकत आणलेलं होतं. नीरव शांततेसोबत आज आम्हाला तिथे पंडितजींचा सहवास मिळत होता. बिरजूजी सूर, ताल, लय आणि नृत्य यांचे अतूट संबंध विशद करून सांगत होते. जीवन कसं संगीतमय असतं, आपण उचलतो ते प्रत्येक पाऊल कसं नृत्य असतं, आयुष्यातला प्रत्येक घटक कसा या रेशमी धाग्यांनी आपल्याशी जोडला गेलेला असतो असं बरंच काही ते सांगत होते. साधी चिवचिवणारी चिमणीसुद्धा कशी आणि कुठल्या रागात गाते, हे बिरजूजींनी त्यांच्या आवाजात गाऊन समजावून दिलं. त्यावर आधारित ताल त्यांनी धरला आणि दोन सेकंदात शाश्वतीजींनी त्यावर नृत्यही करून दाखवलं. अत्यंत मृदू आवाजात हे अभिजात बंध उलगडून सांगणार्या त्यांच्या तेजस्वी मुखकमलावरून आमची नजर हटत नव्हती. संगीत न समजणारा माणूसही ते बोल ऐकताना गुंगून जात होता.
– – –
‘काहे छेड मोहे’च्या शूटमधल्या ब्रेकच्या वेळी बोलता बोलता माधुरीने शंका काढली…
‘अमुक ओळीतल्या या शब्दावर माझा ताल चुकतोय, नृत्याची स्टेप जमतेय पण नाचताना लय हरवतेय’.
हे जरासं अपेक्षित होतंच. कित्येक किलो वजन असलेला पोशाख सांभाळून साधं उभं राहणं हेसुद्धा महाबिकट काम आणि त्यात तो परिधान करून कितीही नृत्य सराव केला तरी आयत्या वेळी कुठेतरी कमी पडणं स्वाभाविक होतंच. माधुरी फार परफेक्ट काम करण्यासाठी प्रसिद्ध आणि म्हणूनच तिची स्वतःची त्यामागची मेहनत केवळ अफाट असते. प्रत्येक छोट्या गोष्टीवर तिचं बिनचूक लक्ष असतं. ती बाब जाणून घेण्याची तिची लालसा कधीही न संपणारी असते. नंतर अर्थातच तो अवजड पोशाख बदलला गेला हा भाग वेगळा.
पंडितजींनी स्मितहास्य केलं. त्यांनी उजव्या पायावर घुंगरांच्या पट्ट्या चढवल्या, अगदी वर, गुडघ्यांपर्यंत! माधुरीला म्हणाले…
‘उपर से तिसरे लाईन में बायें सें पांचवा बजाके दिखाओ..’
माधुरीने हसून असमर्थता दर्शवली…
‘जी, ये मैं कैसे कर सकती हूं..?’
साठ-बासष्ठ वर्षांच्या पंडितजींनी बसल्या जागी ते करून दाखवलं. त्यांनी त्यांच्या पायाच्या नसा अशा काही खेचल्या की नेमकं ते वरून तिसर्या ओळीतलं पाचवं घुंगरू क्षणभर थिरकून शांत झालं. त्यानंतर त्यांनी फक्त पाय आणि पायाची बोटं हलवून घुंगरांमधून सप्तसूर – ‘सा रे ग म प ध नि सा’ काढून दाखवले. सेटवरचा प्रत्येक माणूस थक्क होऊन जागच्या जागी थिजलेला होता. धन्य ते गुरूजी आणि त्यांची ती शिष्या..!!
‘देवदास’च्या भव्य राजेशाही सेट्सवर संजयजी दिग्दर्शकाच्या खुर्चीत असायचे, एका जागेवरून सगळा कारभार सांभाळायचे. सिनेमॅटोग्राफर बिनोद प्रधानजी कॅमेर्यामागे असायचे आणि माझा भाऊ, पळापळ संपली की येऊन जमिनीवर बिरजूजींच्या पायाशी बसलेला असायचा. सेटवर येणारे सर्व कलाकार, अगदी शाहरूख, जॅकी, मिलिंद गुणाजी, सगळेच जण, सर्वप्रथम बिरजूजींचा चरणस्पर्श करून आशीर्वाद घेत असत. ती व्यक्तीच तशी आदरणीय आणि व्यक्तिमत्त्व तर अगदी मुलायम, हव्या हव्याशा वाटणार्या आजोबांसारखं, अतीव प्रेमळ..!
‘मालती गुंधाय, केश प्यारे घुन्गवारे’ या ओळींचं शूट सुरू होतं आणि कित्येक टेक्स झाले तरी चुन्नीलालला (जॅकी श्रॉफ) त्या ओळी काही केल्या सादर करता येत नव्हत्या. बरं, आज तो पहिल्यांदाच देवदास मुखर्जीला (शाहरूख खान) कोठ्यावर घेऊन आलाय. आपल्याला सुद्धा गाणं येतं, चंद्रमुखीशी आपली खास ओळख आहे, हे त्याला देवदासला जाणवून द्यायचंय पण हाय…
पं. बिरजू महाराजांनी गायलेल्या त्या ओळी दिग्दर्शकाला हव्या तशा साकारल्याच जात नव्हत्या. शेवटी जॅकीचा पेशन्स संपला. प्रत्येक ‘कट’वर अस्सल बम्बैय्या शिव्यांचा भडिमार सुरू झाला…
‘च्या–ला ये मालतीच्या..’,
‘इसके बाल की तो –’,
‘क्या गुंधारैली — –’!!
इकडे संजयजी अस्वस्थ, बिनोददा कसनुसे, धीरजसारख्या बाकीच्या बर्याच सहाय्यकांना तर काय करायचं तेही सुचेना. कुणाच्याच अंगी बिरजूजींकडे साधं बघायचंही धारिष्ट्य नव्हतं. शेवटी शाहरूख शांतपणे जागेवरून उठला, जॅकीकडे जाऊन म्हणाला, ‘सामने पंडितजी बैठे है भिडू, कुछ तो जरा..’ जॅकीने तिथूनच हात जोडून मोठ्याने पंडितजींची माफी मागितली. सगळा सेट जसाच्या तसा स्तब्ध उभा होता.
बिरजूजींनी जॅकीला जवळ बोलावलं, पाठीवर थोपटलं आणि हात त्याच्या पाठीवर तसाच ठेवून त्या ओळी साध्याच म्हणून दाखवल्या. नंतर त्या सुरात गाऊन दाखवल्या आणि शेवटी तळहातांवर ताल धरून गुणगुणूनही दाखवल्या. जॅकी श्रॉफने पुढच्या ‘टेक’ला शॉट ओके दिला. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
‘देवदास’शी जोडल्या गेलेल्या असंख्य आठवणी आहेत आमच्या! पंडित बिरजू महाराजांच्या पावन स्मृतींना नम्र अभिवादन!