‘अमित शाह यांनी संसदेत जे सांगितले आहे ते साफ खोटे आहे…’
‘माझे आयुष्य सार्या देशाला लाभू देत…’
‘आज सरकारने जे फौजदारी कायदे केले ते फक्त नावे बदलणे आहे, त्यामुळेच नुसते नावे बदलणारे नव्हे, तर काम करणारे सरकार हवे असेल तर शिकलेल्या उमेदवाराला मतदान करा…’
आज देशात या तीन वाक्यांची चर्चा आहे. ही तिन्ही वाक्ये कोणत्याही आत्मप्रौढीने आणि फेकाफेकीने भरलेली नाहीत, विखाराने भरलेली नाहीत, त्यामुळे ती सत्तेतल्या किंवा सत्तेबाहेरच्या कोणाही राजकीय नेत्याने उच्चारलेली नाहीत, हे स्पष्टच आहे. त्यांनी उच्चारली असती तर फारशी कोणी गांभीर्याने घेतलंही नसतं.
कॅमेर्यासमोर सतत काहीतरी बोलून स्पेस व्यापून ठेवायची, हा त्यांचा फंडा आता सामान्य लोकांच्याही लक्षात आलेलाच आहे. पण, ही वाक्ये आहेत सामान्य माणसांची आणि ती आज चर्चेत आहेत, हे अनेकार्थांनी महत्त्वाचे आहे. यातले पहिले वाक्य आहे यवतमाळच्या सर्वसामान्य, गरीब घरातल्या, आत्महत्या केलेल्या कर्जबाजारी शेतमजुराची विधवा असलेल्या कलावती बांदूरकर यांचे. दुसरे वाक्य दिल्लीत हातगाडीवरून भाजी विकणारे, हातावर पोट असणारे फिरते विक्रेते रामेश्वर यांचे आहे आणि तिसरे वाक्य एका खासगी शिकवणीची नोकरी करणारे मध्यमवर्गीय शिक्षक करण सांगवान यांचे आहे. एकशे चाळीस कोटी लोकसंख्येतील ही तीन सामान्य माणसे. एरवी सामान्य असणारे हे तिघे काही बाबतीत मात्र असामान्य आहेत, नव्हे गर्भश्रीमंत देखील आहेत. आजच्या खोकेकाळात असामान्य ठरणारी त्यांची ही श्रीमंती आहे सचोटीची, निर्भयतेची आणि देशप्रेमाची. तीन सामान्य भारतीयांची ही वाक्ये आजच्या केंद्र सरकारवर वार करणारे जणू एक त्रिशूळ आहे. या सरकारविषयी सामान्यजनांच्या मनात साचलेल्या जनक्षोभाला वाट करून देणारी ही वाक्ये आहेत.
आपण ज्यांना सामान्य माणूस म्हणतो, त्यांना हे विशेषण त्यांची आर्थिक परिस्थिती, शिक्षण आणि सामाजिक स्तर खालचा असल्याने दिले जाते. तसेच त्यांच्याकडे इतरांपेक्षा वेगळे विशेष असे काही पैसेकमाऊ किंवा लौकिककमाऊ प्राविण्य अथवा कौशल्य नसल्याने देखील त्यांना सामान्य ठरवले जाते. आजची देशातील राजकीय परिस्थिती पाहता या तथाकथित असामान्य म्हणजे प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी ज्या तीव्रतेने व्यक्त व्हायला हवे, ते होताना दिसत नाही, पण लौकिकार्थाने ज्यांना सामान्य समजले जाते, त्या व्यक्ती असामान्य धैर्य दाखवून सरकारला थेट जाब विचारत आहेत. ज्यांनी जाब विचारला तर प्रभाव पडतो, ते गर्भश्रीमंत उद्योगपती, मोठमोठे कलाकार, पत्रकार व साहित्यकार, पैशाने व प्रसिद्धीने गब्बर झालेले क्रिकेटपटू, नवश्रीमंत उच्चमध्यमवर्ग असा सर्व सुखवस्तू समाज वेगवेगळ्या कारणांनी मूग गिळून गप्प बसला आहे. त्यातलं प्रमुख कारण आहे सुडाच्या एकतर्फी कारवाईची भीती. सरकार चुकीचे वागते आहे, ईडीचा व इतर तपासयंत्रणांचा एकांगी गैवापर करते आहे, संसदेत धडधडीत खोटे बोलले जाते आहे, दरोडेखोरांनी घरे, दुकाने फोडावीत तसे दिवसा ढवळ्या पक्ष फोडले जात आहेत, गुजरातसारख्या राज्यात तर पोलिसी राज आहे, त्या राज्यातील न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे, कॅगने भ्रष्टाचाराचे ढळढळीत पुरावे दिले आहेत, मजूर व शेतकरी नव्हे तर लहान उद्योगपती व व्यापारी देखील नागवले जात आहेत; पण तरी या बाबतीत जाहीरपणे कोणी बोलत नाहीतच, खासगी गप्पांमधून देखील ही ‘आहे रे’ जमात त्याबद्दल अवाक्षर देखील काढत नाही. आपण बरे, आपले उत्पन्न बरे, आपली साठवलेली संपत्ती बरी असा विचार करून हा सुखवस्तू समाज सत्तेच्या गैरवापराकडे, सरकारच्या अकार्यक्षमतेकडे, भ्रष्टतेकडे, समाजात द्वेष पसरवण्याकडे सोयीस्कर डोळेझाक करतो आहे आणि त्यांच्या हितांचे (म्हणजे काय हे त्यांनाही कळले असते तर बरे झाले असते) रक्षण करणारे हे सरकार सत्तेत अनादि अनंत काळ राहणार आहे, या भ्रमात आहेत. एरवी देशप्रेमाच्या गप्पा करायच्या पण फायदा दिसला की लाच दे, ब्लॅकमनी घे, उत्पन्न कमी दाखव, जीएसटी चुकव, असे उद्योग गुपचूप करणारा हा बेगडी उच्चभ्रू वर्ग सत्तेला आव्हान कसे देणार? तो वर्ग मिंधाच झाला आहे की काय, असा प्रश्न पडतो. ज्यांच्या आवाजाला थोडेफार वजन आहे, ते बोलले तर सरकारला त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही त्यांनीच नांगी टाकल्यावर देशात यापुढे सरकारविरोधात निर्भयपणे खरे बोलणारे, सच्चेपणाने देशावर प्रेम करणारे कोणी उरले नाहीत असे वाटत असताना अचानक वीज चमकावी, अशी ही उपरोल्लेखित तीन वाक्ये गेल्या आठवड्यात कानावर पडली आणि मेरा देश बदल रहा है, याची खात्री पटू लागली.
खोटे रेटून बोलायचे व ते असे काहीतरी बेधडक आवेशात बोलायचे की समोरच्या विरोधकाला सत्य माहिती असून देखील स्वतःवर शंका यावी हे राजकारणातील प्रभावी कुटील, कारस्थानी हत्यार सरकार पक्ष बिनदिक्कत वापरतो. त्या खोट्यातूनच अफवा पसरतात, कुजबूज सुरू होते आणि जनतेला धडधडीत खोटे देखील कालांतराने खरे वाटू लागते. पण लोकशाहीत काही विशेष पदावरील व्यक्तींनी संसदेच्या पवित्र सभागृहात तरी अपवित्र असे असत्य भाष्य करू नये इतकी संसदीय मर्यादा पाळायला हवी. संसदेत बेदरव्ाâारपणे खोटे बोलायचे आणि ते उघडे पडल्यावर माफी देखील मागायची नाही अशाने संसदेची गरिमा टिकेल का? मर्यादापुरूषोत्तम श्रीरामाचे नाव घेत सर्व प्रकारची अमर्यादा अंगीकारणारे भाजपेयी नेते हे हिंदुत्वाच्या आड लपलेले संधिसाधू भोंदू आहेत. कलावती यांना नरेंद्र मोदींनी मदत केली असे गृहमंत्र्यांनी संसदेत रेकॉर्डवर सांगितले, ज्यावर सत्ताधारी पक्षाने बाके देखील वाजवली, जे देशाने संसद टीव्हीच्या माध्यमातून पाहिले व ऐकले, तेच खोटे निघावे. कलावती यांनी ‘गृहमंत्री अमित शहा संसदेत खोटे बोलत आहेत,’ असे सांगितले; इतकेच नव्हे तर मला नरेंद्र मोदींनी काडीची देखील मदत केली नसून फक्त राहुल गांधी यांनीच आजवर सर्व मदत केली, असे त्यांनी लेखी दिले आहे. केंद्र सरकारची लंगोट देखील यातून वेशीवर टांगली गेली आहे. पण, खोटे बोलण्याचा व ते पसरवण्याचा वेग इतका प्रचंड आहे की गेली दहा वर्षे केलेली फेकूगिरी कशी धादांत खोटीच होती, हे सिद्ध करायला पुढची शंभर वर्षं अपुरी पडतील. दुधाने तोंड पोळलेली जनता आता सरकारने काहीही सांगितले की फॅक्ट चेक करून घ्यायला लागली आहे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आकडा जनता तपासून घेते आहे.
कलावती बांदूरकर यांचे पती परशुराम हे विदर्भातील शेतकरी. त्यांनी आत्महत्या केली आणि विधवा कलावती उद्ध्वस्त झाली. २००८ साली राहुल गांधी तिला भेटायला गेले, तिच्या घरी ते जेवले आणि त्यानंतर तिला त्यांच्या पुढाकाराने तिला सर्वोपरी मदत दिली गेली. आज देखील दरमहा पंचवीस हजार रुपये व्याज त्यांना एका मुदत ठेवीतून मिळते आहे. २००८ची ही घटना खोटी आहे अशी ओरड भारतीय जनता पक्ष तेव्हा करत होता, पण, मीडियाने ती खरी असल्याचे पुरावे दिले. त्यानंतर जनताही कलावतीला विसरली होती, राहुलही पुढे निघाले होते. पण कलावतीने भारत जोडो यात्रेत सहभागी होत राहुल यांचे उपकार लक्षात ठेवले. आपले सरकार काय कार्यक्षम आहे याचा ढोल बडवताना अमित शहा बिनदिक्कतपणे कलावतीबाबत संसदेत बोलून गेले आणि तोंडघशी पडले. कलावती ही गरीब बाई. सरकार सांगतेच आहे तर आपण मोदींनी मदत केली असं म्हणू, राहुलने मदत केलीच नाही, असं सांगू, असा विचार तिने केला असता तर तिच्याही वाट्याला दोनपाच खोके आले असते, तिच्या आयुष्याचे कल्याण झाले असते. पण ती प्रामाणिक राहिली आणि केंद्रीय गृहमंत्री खोटे बोलत आहेत, असं बेडरपणे सांगू शकली. हीच असते स्वच्छ असण्याची सामान्याची असामान्य ताकद .
रामेश्वरची चित्तरकथा
मेरी उमर सारे देश को लगे… हे वाक्य कोणा राजकीय नेत्याचे नाही, उद्योगपतीचे नाही, कोणा उच्चशिक्षिताचे नाही तर हे वाक्य आहे हातगाडीवर टोमॅटो विकणार्या दिल्लीतील भाजीविक्रेत्याचे. भानू प्रताप झा या टीव्ही पत्रकाराने टॉमेटोच्या राक्षसी किंमतीवर एक न्यूज रिपोर्ट करताना या रामेश्वरची मुलाखत २७ जुलै रोजी घेतली होती.
टॉमेटो दसपट महाग झाल्याने विक्री तर मंदावली आणि दसपट भांडवल हाताशी नसल्याने घाऊक बाजारातून माल न घेताच रिकाम्या हातगाडीने परत जाणारा रामेश्वर आणि भानूप्रताप झा यांची गाठ दिल्लीच्या आझाद मंडीसमोर पडली. रामेश्वर पाणावलेल्या डोळ्याने आपली हृदयद्रावक कहाणी सांगत असल्याचा तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. बहुतेकांनी तो बघितला असेलच. तो सोशल मीडियावर चांगलाच गाजला आणि रातोरात रामेश्वरची कहाणी देशभरात पोहोचली. त्यानंतर भानू प्रताप झा यांना रामेश्वरबद्दल सगळ्यांकडून विचारणा होऊ लागली, पण त्याचा पत्ता माहीत नसल्याने अडचण झाली. पाच दिवसानी त्यांना तो रामेश्वर सापडला आणि त्यांनी पुन्हा एकदा रामेश्वरची मुलाखत घेतली. त्याचे नाव देशभर पोहोचले हे ऐकून भारावून गेलेला रामेश्वर म्हणाला, ‘मेरी उम्र सारे देश को लगे…’ देशभक्ती म्हणजे बेंबीच्या देठापासून ओरडून केलेले लाल किल्ल्यावरील आक्रस्ताळे राजकीय भाषण नसते तर देशभक्ती असते रामेश्वरसारख्या दारिद्र्य पाचवीला पुजलेल्या देशवासीयाच्या तोंडून आलेले ‘मेरी उम्र देश को लगे’ हे वाक्य. आपण महागाईवर बोललो त्यामुळेच पोलीस पकडून नेतील अशी भीती वाटू लागल्याचे रामेश्वर म्हणाला. त्याच्यासारख्या दरिद्रीनारायणाला देखील सरकारची, पोलिसांची भीती वाटू लागली तर देशातील लोकशाही शेवटचे आचके देत आहे, असेच म्हणावे लागेल. रामेश्वरने सहजपणे मोदींना नव्हे तर राहुल गांधीना भेटायची इच्छा व्यक्त केली आणि हे कळताच राहुल यांनी त्याला सहकुटुंब जेवायला बोलावलं. सत्ताधारी एनडीएकडून (आधी भाजपाची एकमेवाद्वितीय असल्याची चमकोगिरी चालली होती, आता पायाखालची वाळू सरकत असताना एनडीए आठवली, हा एक विनोद) लोकांना फारशा अपेक्षा उरलेल्या नाहीत, त्या आता इंडिया आघाडीकडूनच आहेत, तीच वंचित व पिचलेल्या लोकांचे आशास्थान आहे, हे यातून ठामपणे अधोरेखित झाले आहे. रामेश्वर सच्चा देशप्रेमी आहे कारण तो हरप्रकारची कष्टाची कामं केलेला प्रामाणिक भाजीवाला आहे, आयत्या स्वातंत्र्यावर सत्तेच्या रेघोट्या काढणारा भाजपवाला नाही.
सांगवान यांचा सांगावा
अनएकॅडमी ही ऑनलाइन शिकवणी क्लासेस चालवणारी कंपनी. करण सांगवान हे तिच्यातले एक शिक्षक. यांनी फौजदारी कायद्याची मास्टर्स पदवी नॅशनल्ा लॉ कॉलेज, सिमला या प्रतिष्ठित संस्थेतून घेतली आहे. त्या अधिकारामुळेच सांगवान यांनी शिकवण्याच्या सहज ओघात नुकत्याच जाहीर केलेल्या फौजदारी कायद्यातील सुधारणांबाबत मतप्रदर्शन केले. कायद्याचा द्विपदवीधर असलेल्या व्यक्तीने ते केलेले असल्याने नक्कीच बिनबुडाचे आणि उथळ नव्हते. फौजदारी कायद्यातील नव्या सुधारणा हा निव्वळ नावे बदलण्याचा प्रकार आहे, असे त्यांचे मतप्रदर्शन सरकार आणि त्यांच्या ट्रोल कंपनीची नाराजी ओढवून घ्यायला पुरेसे ठरले. सांगवान यांना नोकरी गमवावी लागली. सांगवान बोलले तसेच बर्याच कायदेतज्ज्ञांचेही मत आहे आणि कायदेतज्ज्ञ नसलेल्यालाही टिप्पणीचा अधिकार आहेच की. सांगवान यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना (हे असले घोळ टाळण्यासाठी की काय) शिकलेल्या लोकांनाच मतदान करा, असं आवाहन केलं आणि ते मोदींच्या पंख्यांना झोंबलं. गंमत म्हणजे, मोदींची एक डिग्री उपलब्ध आहे. ते आपण एमए इन एंटायर पोलिटिकल सायन्स केले आहे, असं सांगतात. आधीही त्यांनी आपण सातवी पास आहोत, असं सांगितलंय, नंतर बारावी पास आहोत, असं सांगितलंय; म्हणजे ते अशिक्षित नक्कीच नाहीत. मग ही टिप्पणी त्यांच्या चाहत्यांना झोंबायचं कारण काय? सांगवान आणि अनएकॅडमी यांचं प्रचंड ट्रोलिंग झालं, त्या कंपनीवर दबाव वाढला आणि त्यांना काढून टाकलं गेलं. शिक्षण देत असताना सरकारविरोधी भाष्य अथवा राजकीय टिप्पणी करणे योग्य नाही ही टीका करणारे शाळेशाळेत सनातनी हिंदुत्वाच्या सापळ्यात अडकलेले शिक्षक मुलांवर काय ‘संस्कार’ करत आहेत, ते दिसत नसावं आणि शाळांमध्येच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा भरवल्या जाऊ लागल्या आहेत, तेही दिसत नसावं. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सरकार विरोधात थेट भूमिका घेणारे हजारो शिक्षक होते. नोकरी गेली तरी मी माझ्या मतावर ठाम आहे म्हणत करण सांगवान या सामान्य शिक्षकाने आज असामान्य धैर्य दाखवून त्या थोर देशभक्त शिक्षकांचे आदर्श जिवंत आहेत हे दाखवून दिले. एरवी हे ट्रोलरूपी टोळ संस्थांवर बहिष्काराचं अस्त्र उगारतात. यावेळी मात्र सांगवान यांच्यावर कारवाई केल्याच्या निषेधार्थ अनेकांनी या संस्थेतून शिक्षण घेणं थांबवलं आहे, हेही विशेष.
शाहरूख खानच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या सिनेमात ‘डोन्ट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन’ असा एक संवाद होता. ही ताकद इतिहासातही वारंवार दिसली आहे. ब्रिटीश राजवटीविरूद्ध लाखो सामान्य लढत होते आणि त्यांचे योगदान मोठे होते. प्रीतीलता वड्डेदार, हेमू कलानी, दुर्गावती देवी, पिंगळी वेंकय्या, बाघा जतिंद्र, मातांगिनी हाजरा अशी एक ना हजार नावे आजदेखील बरेचजणांना माहिती नाहीत, पण ते ब्रिटिशांविरूद्ध प्राणपणाने लढले होते. आज कलावती, रामेश्वर, करण सांगवान हे तिघे सामान्य माणूस मानले जात असले तरी ते जुलमी केंद्र सरकारच्या विरोधातील लढ्याचे शिलेदार आहेत. इतिहास त्यांची आणि अशा असंख्य सामान्यांची हिरो म्हणूनच नोंद घेईल की नाही, माहिती नाही; पण, तात्कालिक फायद्यांसाठी आणि घाबरून जाऊन सरकारसमोर नांगी टाकणारे आजचे हिरो मात्र भावी इतिहासात झिरो ठरणार आहेत. २०२४ साली केंद्रातले सरकार बदलेल की नाही, हे काळ ठरवणार आहे. पण आजच्या सरकारला उरलेल्या काळात कार्यपद्धतीत बदल घडवायला लावण्याची, बॅकफुटवर पाठवण्याची असामान्य ताकद या तिघांनी दाखवली आहे, ते मोलाचे आहे.