राजकारणातला ‘कलगीतुरा’ आपल्याकडे नित्याचाच झालाय. त्यातले वादविवाद हे सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा यासाठी काहीदा जीवघेणेही असतात. दुसरीकडे लोककलेतील हा प्रकार म्हणजे आध्यात्मिक विचारधन आहे. त्याला माणुसकीचा स्पर्श आहे. हरवलेल्या मूल्यांचा आणि परंपरेचा शोध-ध्यास त्यामागे आहे. या ‘कलगीतुर्या’तून एक स्वच्छ, पारदर्शक विचार नव्या पिढीपुढे ठामपणे मांडला जातोय, यातच सारं काही आलंय.
– – –
पहाटे रामप्रहरी घरोघरी येणारा वासुदेव; गुबू गुबू आवाज करीत नंदीसोबतचा नंदीवाला, हाती आसूड घेऊन फिरविणारा मळवटधारी पोतराज, कवड्यांची माळा, मखमली अंगरखा यासह लोकधर्माचा पुजारी-गोंधळी, घंटा वाजवित, भंडारा उधळीत नाचणारे वाघ्यामुरळी, ‘जय जय राम कृष्ण हरी’ करणारा कीर्तनकार; आणि अख्खी रात्र जागवून आध्यात्मिक झगडा करणारे कलगी-तुरेवाले! अशा अनेक व्यक्तिरेखा म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण लोकसंस्कृतीचे उपासकच!
पारंपरिक कलेतून एकेकाळी समाजप्रबोधन आणि समाजसेवा होत होती. माणसांपासून, संपर्कापासून, सुखसोयींपासून शेकडो मैल दूर गावात कुणाचं निधन झालं तर मृतदेहासमोर रात्रभर सोबत करण्यासाठी ‘कलगीतुरेवाले’ तयार असायचे. आजच्यासारखी रुग्णालये, रुग्णवाहिका, कोल्ड स्टोरेज, मोबाईल नसल्याने रात्रभर मृतदेह कुटुंबियांसह एकाकी, उघडा पडायचा. अशा वेळी पहाटे त्यावर अंत्यसंस्कार होईपर्यंत या मंडळींची कामगिरी असायची. जागरण करून दु:खाची राखण करण्याची गावकर्यांची ही अनोखी, जगावेगळी सेवाच जणू. त्यावेळी दोन गट हे कवन, लावण्या, गाणी यातून सवाल-जबाब, वादावादी करायचे. या सादरीकरणामुळे कुटुंबियांचे दु:ख जरा हलके व्हायचे. अशा या विरंगुळा, करमणूक अधिक सांत्वन यातून ही कलगीतुर्या्ची लोककला विकसित झाली. त्याला एखाद्याचे मरण हे साक्षीदार ठरले. जीवनमरणाचे संदर्भ आणि मानसशास्त्र व धर्म-चालीरीतीच्या दृष्टीनेही हा कलाप्रकार लाख मोलाचा सिद्ध झाला, ज्याला सातशे वर्षाचा इतिहास आहे.
याच कलेचा शोध घेणारे ‘कलगीतुरा’ हे दोन अंकी प्रायोगिक नाटक व्यावसायिक रंगभूमीवर नुकतेच प्रगटले आहे. एका स्पर्धात्मक परीक्षेतून उत्तीर्ण झालेलं हे नाटक आहे. ‘परीक्षा’ तशी कठीण होती. ‘नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ या संस्थेने नाट्यलेखकांकडून संहिता मागितल्या होत्या. एकूण पन्नास संहिता तज्ज्ञ परीक्षकांपुढे पोहोचल्या. नवे विषय, नवे संदर्भ, नवी संकल्पना असणार्या या संहितांमधून अखेर नाशिकचे दत्ता पाटील यांची संहिता सर्वोत्कृष्ट ठरली. महाराष्ट्राची लोकपरंपरा जपणारी संहिता म्हणून त्यावर वर्षभर विचारमंथन झाले. प्रत्यक्षात १९९०नंतर ‘कलगीतुरा’ हा कलाप्रकार जवळजवळ संपल्यागतच होता, पण नाशिककर अभ्यासकांनी थेट गावोगावी भटकंती करून तो पुन्हा शोधला आणि नाटकातूनही जिवंत केला. दुसरीकडे मुंबईत प्रदीर्घ कालावधीनंतर एनसीपीएने प्रथमच या मराठमोळ्या नाटकाच्या निर्मितीचा निर्णयही घेतला, हे एक वैशिष्ट्य नोंद घेण्याजोगं आहे.
‘कलगीतुरेवाले’ म्हणजे कोण? मराठी शाहिरी ही तशी आध्यात्मिक गूढतेने भारावलेली आहे. केवळ शृंगार, चावटपणा त्यात नाही. यात दोन पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकायचे. दोन गट. दोन समूह. त्यांच्याकडे कवनांचा भलामोठा स्टॉक असायचा. सोबत डफ, तुणतुणे, दिमडी, मंजिरी ही वाद्येही. कलगीवाली मंडळी ही शक्ती पक्षातील आणि तुरेवाले हे शिव पक्षातले. शिव आणि शक्तीचा हा सामना समजला जायचा. कलगीवाले तुळशीच्या मंजिरीसारखे आणि मोराच्या तुर्यासारखे ताठ मानेने उभे राहाणारे, तर तुरेवाले मक्याच्या कणसातल्या केसांसारखे किंवा पगडीच्या झिरमिळ्यासारखे! ही या दोन्ही पक्षांची वैशिष्ट्ये मानली जातात. एक प्रश्न विचारतो, दुसरा त्याला सडेतोड जबाब देतो आणि हा खेळ रंगतो. यात रामायणापासून महाभारतापर्यंत, पुराणकथांपासून ते धर्मशास्त्रापर्यंतचे अनेक विषय कवने, काव्यातून साकार व्हायचे. अगदी पेशवाईतही याचे जाहीर सामने झाल्याची उदाहरणे आहेत. एकाची चढावाची लावणी तर दुसर्याची उत्तराची लावणी, अशा स्पर्धा तेव्हा रात्रंदिवस, दिवसेंदिवस चालायच्या. जो पक्ष निरुत्तर होईल तो पराभूत म्हणून जाहीर व्हायचा आणि मग हा खेळ संपायचा. त्यात शाहीर राम जोशी हे तुरेवाले आणि शाहीर प्रभाकर हे कलगीवाले विशेष गाजले. असे चुरशीचे आखाडे महाराष्ट्रात भरले आहेत. त्यांना लोकाश्रय आणि राजाश्रयही मिळाला आहे. हा या कलेचा प्रवास. आता ही कला तशी प्रदर्शनापुरती शिल्लक उरलीय. नेमक्या याच विषयावर यातलं नाट्य गुंफलं आहे.
पडदा उघडतो आणि गणराय पूजन होते. गावकरी उत्साहाने गण सादर करतात. तुरेवाले आणि कलगीवाले एकमेकांना आपल्या ताकदीचे महत्त्व सांगतात. त्यातून या लोककलेची प्राथमिक माहिती मिळते. शहरातून या गावात एक संशोधक तरुणी राधा इथे गावात येते. तिला या कलेची सविस्तर माहिती हवी आहे. सर्जेराव हा कांद्याचे व्यापारी या कलेत सक्रीय बनलेला. तो राधाला या कलेबद्दल जी माहिती देतो, ती म्हणजेच हे नाटक. दोन अंकातल्या एकेका प्रसंगातून भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळही नजरेपुढून सरकतो. संशोधक राधा अगदी मरणदारीही पोहोचते, एका विलक्षण अनुभवाची प्रचिती घेते. दोन गटांत कितीही टोकाचे वादविवाद झाले, तरी तुर्याची शान कलगीविना अधुरी आहे, हेच यातून प्रकाशात येते.
ज्या दिवशी गावात ‘लॉज’, ‘हॉटेल’ येईल त्या दिवशी गाववाल्यांची ‘लाज’ वेशीला टांगेल. गावातला पाहुणचार संपेल, असा विचार असल्याने या गावातील माणुसकी जपण्यासाठी ‘लॉज’ आलेला नाही, तसेच देखण्या संगमरवरी मूर्ती, चकाचक मंदिरे गावकर्यांना मनाला पटत नाहीत. संगमरवरी देवात त्यांना देव दिसत नाही. दगडाचे देवच खरेखुरे वाटतात. उन्हातान्हात पावसा-वादळात ते आनंदात राहतात. त्यांची कुठलीही तक्रार नसते, हे लॉजिकही कथेच्या ओघात मोठा आध्यात्मिक अन् जीवनशैलीचा अर्थ सहजतेनं सांगून जातात. या कलगीतुर्याचा शेवट शिवाच्या भगव्या सकारात्मक विचारांनी केलाय, जो हृदय हेलावून सोडतो.
शिवाचा तो भगवा बाणा,
आम्ही करितो भाषण
शक्तीची ती निशाणी लावली
कलगी गाते दिमाखानं!
तरूण रंगकर्मींची तयारीची नाशिककर टीम ही या नाटकाची जमेची बाजू आहे. सार्यांना ताला-सुराचे आणि आवाजाचे चांगले भान आहे. त्यामुळे सादरीकरणात अस्सलता आलीय. हे कृत्रिम आणि नाटकापुरते नाटक वाटत नाही. राधा या संशोधक शहरी तरुणीच्या भूमिकेत श्रुती कापसे हिने ‘अभ्यासू’ म्हणून चांगली भूमिका केलीय. तिची देहबोली शोभून दिसते. हेमंत महाजन (सखाराम), किरण राव (रमाबाई), निलेश सूर्यवंशी (सर्जेराव) आणि डझनभर रंगकर्मी यांनी हा ‘सामना’ रंगतदार केलाय.
मोजके आणि प्रतीकात्मक नेपथ्य चेतन बर्वे यांनी चांगले उभे केलेय. अनेक प्रसंगातला खांबाचा वापर हा सुरेखच. त्यामुळे वातावरणनिर्मिती होते. प्रणय सपकाळे याची प्रकाशयोजना, कविता देसाई हिची वेशभूषा, ललित कुलकर्णी हिची रंगभूषा समर्पक आहे. ऋषिकेश शेलार यांचे संगीत कलगीतुर्यात घेऊन जाते. तांत्रिक बाजू उत्तमच.
नाटककार आणि दिग्दर्शक या दोघांनी यापूर्वी राज्यभरातील अनेक एकांकिका स्पर्धा गाजवल्या आहेत. इथेही दोघांचं ट्यूनिंग मस्त जुळलं आहे. काही प्रसंगांची मांडणी प्रकाशयोजना आणि नेपथ्यातून ज्या प्रकारे केलीय ती लाजवाबच! एखादं सुरेख चित्र रेखाटावं एवढी कलात्मकता त्यात दिसते. एकाच लेव्हलवर नदीचा किनारा, घरातलं अंगण, प्रेताभोवतीचे दृश्य, मंदिराचा पार, शेकोटी, मळ्यातलं घर, हे सारे प्रसंग थेट गावात घेऊन जातात. दिग्दर्शक सचिन शिंदे यांचे त्यामागले परिश्रम आणि कल्पकता नजरेत भरते. समूहाची सुरेख दृश्यात्मकता भन्नाटच. कथानकापेक्षा त्याचा आविष्कार वेगळ्या दुनियेत घेऊन जातो.
काही नाटकांचे फॉर्म त्या नाटकाला किंवा त्यातील विषयाला शंभर टक्के न्याय देणारे असतात. विजय तेंडुलकर यांच्या ‘घाशीराम कोतवाल’ या एका वळणावरल्या नाटकात लावणी, भारुड, अभंग, दशावतार, कीर्तन अगदी भूपाळी, ठुमरीचाही वापर करण्यात आला होता. सादरीकरणही वैशिष्ट्यपूर्ण होते. आज देखील प्रा. वामन केंद्रे यांच्या ‘गजब अदा’ नाटकात लोककलेचा अर्थपूर्ण वापर करून एक कथा तालासुरात मांडली आहे. त्याच वाटेवरच्या या ‘कलगीतुरा’मध्ये या लोककलेवरचं संशोधन व अभ्यास प्रथमच एवढ्या तपशिलांसह नाटकात आलाय आणि तीच अपेक्षा या निर्मितीमागे आहे. या नाटकाचे प्रयोग व्यावसायिकावर अधिकाधिक व्हावेत.
राजकारणातला ‘कलगीतुरा’ आपल्याकडे नित्याचाच झालाय. त्यातले वादविवाद हे सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा यासाठी काहीदा जीवघेणेही असतात. दुसरीकडे लोककलेतील हा प्रकार म्हणजे आध्यात्मिक विचारधन आहे. त्याला माणुसकीचा स्पर्श आहे. हरवलेल्या मूल्यांचा आणि परंपरेचा शोध-ध्यास त्यामागे आहे. डफ आणि तुणतुण्याची तार… त्या जोडीने कसदार तत्त्वाची खणखणीत लकेर, जी परसूल उंबर्याच्या या गावात आहे. या ‘कलगीतुर्या’तून एक स्वच्छ, पारदर्शक विचार नव्या पिढीपुढे ठामपणे मांडला जातोय, यातच सारं काही आलंय.
कलगीतुरा
लेखक : दत्ता पाटील
दिग्दर्शक : सचिन शिंदे
नेपथ्य : चेतन बर्वे
संगीत : ऋषिकेश शेलार
प्रकाश : प्रणय सपकाळे
निर्माते : फुस ग्रथी/ राजेश्री शिंदे
निर्मिती : नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स