भिती नव्हती अशातलो भाग नाय. भिती होतीच. पण पहिली लाट इली आणि केळुरीक न शिवताच गेली आनी तेका लागून आमच्या केळुरीतल्या लोकांचो आत्मविश्वास म्हणजे अगदी सातवे आसमानपे वैगेरे म्हणतात तसो पोहोचलेलो होतो.
—-
देशावर, खरा म्हणजे अख्ख्या जगावर कोरोनाचा संकट येऊन वर्ष होऊक इला होता. डॉक्टर्स तसेच डब्लू.एच.ओ. सारख्यो जगाच्या ख्यातीवरच्यो संस्थो सरकाराक तसाच सामान्य जनतेक वेळोवेळी कोरोनाचो प्रादुर्भाव टाळण्यासठी सल्लेवजा सूचना देत होत्यो. आता सरकारकडून तेचा कितपत पालन होत होता त्याबाबतीत काही मी बोलू शकणा नाय, ता तेंचा तेच जाणोत बापडे. पण आमच्या केळुरीत मात्र सगळा कसा निवांत होता. जगात पहिली लाट येऊन दुसरी लाट आली होती. पण कोणाकच कोरोनाच्या बाबतीत काही सिरीयसनेस वैगेरे आलेलो नव्हतो. अख्ख्या जगात तसाच देशात लॉकडाऊन झालेलो होतो, पण आमच्या केळुरीत मात्र सगळे लोक गावभर यथेच्छपणे हयसून थयसर हिंडत होते. बरेचजण मास्क न घालताच गावभर हिंडत होते. कारण आजूनपर्यंत केळुरीत कोरोनाने प्रवेश केलो नव्हतो.
पण हेचो अर्थ केळुरीतले लोक कोरोनाक घबरल्यानीच नाय किंवा अजिबातंच तेका दादच दिली नाय असासुद्धा काही नव्हता. खरा म्हणजे पहिल्या लाटेच्या अगदी सुरुवातीच्या काळातसुद्धा निवडणुकीच्या वेळेक नको ती आश्वासना जनतेक देत लोकांची मता मागित हिंडणारे भावी आमदार किंवा मंत्री निवडणुको झाल्यावर थयसून नायसे होतंत आनी थयसर आपला तोंडसुध्दा परत कधी दाखवत नाय. तसाच आमच्या केळुरीतले ग्रामस्थ मुंबई-पुण्याचो पावणो बघितलो रे बघितलो का थयसून लगेच नायसे होई होते. म्हणजे पयल्या लाटेच्या वेळेक जरी केळुरीत कोरोना नासलो तरी मुंबई पुण्याच्या पावण्यांपासून आमच्या केळुरीतले लोक चार हात लांबच रवत होते. मुंबई-पुण्याचो पाहुणो येताना कोरोना घेऊनंच येतोलो, असोच तेंचा समज होतो.
एकदा पहिली लाट इल्यानंतर काय दिवसांनी पुण्यातून कामतांचो रोहन इ-पास काढून केळुरीत आपल्या काकाक म्हणजेच पंढरी कामताक भेटूक इलो होतो. तो जेव्हा केळुरीत इलो तेव्हा तेका बघितल्यानंतर सगळे केळुरीतले ग्रामस्थ म्हणजे तोंडावरती हात ठेवून सैरावैरा धावलेले होते. जनू नाडकर्ण्याक हात तोंडावर घेवूचा लक्षात न इल्यामुळे तेना म्हणजे गडबडीत अंगावर असलेला बनयन अजून वर नाकापर्यंत ओढून, धोतरात झुरळ गेल्यासारखो थयसून पळत सुटलो. म्हणजे भिती नव्हती अशातलो भाग नाय. भिती होतीच. पण पहिली लाट इली आणि केळुरीक न शिवताच गेली आनी तेका लागून आमच्या केळुरीतल्या लोकांचो आत्मविश्वास म्हणजे अगदी सातवे आसमानपे वैगेरे म्हणतात तसो पोहोचलेलो होतो.
कोरोनाच्या प्रत्येक टप्प्यावर आमच्या केळुरीतल्या ग्रामस्थांनी आपली मता मांडलेली होती. ‘कोण कोरोना? हयसर नाय तो. तो त्या बाजूक.’ ह्या तेंचा म्हणणा जेव्हा कोरोना देशाबाहेर होतो तेव्हाचा. पण जेव्हा कोरोना देशात इलो तेव्हा हेच लोक, ‘देशात इलो? पण आमच्या राज्यात नाय आं येवूचो तो!’ आणि जेव्हा कोरोना राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शेजारच्या गावापर्यंत इलो तेव्हा हेच लोक, ‘ता कायोव असूदे आं पण आमच्या केळुरीत नाय आं येवूचो तो! आमच्या केळुरीतल्या लोकांचा आरोग्य म्हणजे काय समजला तो कारूना काय कोण तो? काय हो सरपंच बरोबर बोलतंय ना मी?’ ह्या सगळा ऐकल्यानंतर आमच्या केळुरीतले सरपंच अधिक डॉक्टर प्र.दी.प. म्हणजेच प्रदीप दीनकर पडते हेना लगेच प्रतिक्रीया दिली, ‘बरोबर हां, एकदम बरोबर हा तुमचां. आमच्या केळु्रीत करोना कधीच येऊ शकणा नाय. कारण प्रत्येक निवडणुकीत केळुरीतलो सरपंच म्हणून मीच निवडून येतलंय ह्या जसा काळ्या दगडावरचा पांढरा सत्य आसा, तसाच आमच्या केळुरीतल्या सगळ्या ग्रामस्थांकडे प्रत्येक रोगाक मात दिऊची शक्ती अगदी कुटून-कुटून भरली हा आणि श्री केळुरेश्वराचो वरदहस्त आमच्या केळुरीतल्या प्रत्येक माणसावर आसा आणि तो कोणाकंच काय्यक जावूक दिवचो नाय.’ शेवटच्या वाक्याक सरपंचाक म्हणजे अगदी गहिरून वैगेरे आल्यानी आनी थयसर उपस्थित असलेल्या चार पाच टाळक्यांनी तेच्या त्या भाषणावर टाळयो वैगेरे वाजवल्यान.
पण जेव्हा कोरोनाची दुसरी लाट इली तेव्हा त्या लाटेचा देशात असलेला भयाण रूप बघून आमच्या केळुरीतले स्वत:क सुशिक्षित म्हणवणारे काही जागृक तरूण ग्रामस्थ अजूनंच जागृक झाले आनी आता सगळ्या ग्रमस्थांका सुध्दा जागृक करून कोरोनाचा गांभीर्य तेंका पटवून देण्याची शपथ तेना घेतली. ‘आता आमका कोरोनाच्या विरोधात घराकडे बसूनंच लढो दिवक व्हयो’ ‘होय बरोबर तेका लागून उद्यापासून कोणीही गावात जमाव करता कामा नये’ असा अगदी तावातावाने बोलूक लागले. नाना देसायांचो मधू हो त्या तरूणांचो म्होरक्या. तेना तेचा ह्या म्हणणा धर्मा धाकणकर, पंढरी कामत, जनू नाडकर्णी, बाबुराव गोखले इत्यादी केळुरीतल्या साठ वर्षांवरच्या लोकांनी मिळून तयार केलेल्या ‘द सेजीस ऑफ ऑल अेजीस’ या तेंच्या यंग ओल्ड ग्रुपासमोर मांडल्यानीत. ह्या ऐकल्यावर धर्मा धाकणकर म्हणजे ‘काय तरी काय बोलतंस रे? आ? घराच्या बाहेरंच जर पडूचा नाय तर मग जेवल्यानंतर शतपावली रे खयसर करूची? आं? ता काय माज्याच्यानं जमणा नाय आं?’ ह्या धर्माचा मत. ‘बरोबर! जेवल्यानंतर हो जर घरा रवलो तर खुल्या हवेवर येऊन हेका सर्वार्थान् आपली आतली अडकलेली हावा मोकळी करूंक मिळणा नाय!’ जनू नाडकर्ण्याशिवाय ह्या असा आगाऊ कोणीच बोलू शकत नव्हतो. ‘हे गप रव रे जन्या. भारी रे मेल्या बोलतंस तू. आपला सांग मरे! आजपर्यंत बायकोच्यो साड्यो इस्त्री करीतंच होतो, आणि आता घरा रवूचा पडला तर बायकोच्यो साड्यो पण धुवीत हो!’ धर्मा धाकणकरान लगेच आपली प्रतिक्रिया दिली. ‘ए गप रवा रे.’ पंढरी कामतानं त्या दोघांका गप केल्यान आनी तो केळुरीतल्या तरूण मंडळींजवळ बोलूक लागलो, ‘राव रे मधू, पण म्हाका एक सांग आमीच कशाक म्हणून घरा रऊचा? त्यापेक्षा तुमीच नोकरी-धंद्याक जातंत ते कित्याक बंद होत नाय?’ ह्या ऐकल्याबरोबर मधू म्हणजे अगदी काकळुतीक येऊन बोलूकलागलो, ‘नायनाय काका, गैरसमज करून घेऊ नको. आमचा कसा हा, आमची गोष्ट जरा वेगळी हा. कारण काय हा आम्ही तरूण आसंत ना! आमका काय्यक होऊचा नाय.’ हो मधू म्हणजे साधा रोजचा बोलणासुद्धा संगीत नाटकातला भाषण बोलल्यासारखो बोलता. तेचो डोळो आमच्या केळुरीतले अग्रगण्य नाट्यकर्मी हरिभाऊ सहस्रबुध्देंच्या सुलुवर असल्याकारणान आपण असा बोलल्यानंतर कदाचित हरिभाऊ सुलूचो हात आपल्या हातात देतील अशी आपली तेची भाबडी आशा आसूक होइ. असो, तर मधू पुढे बोलूक लागलो. ‘काय हा काका केळुरीक आजून तुमची गरज हा. आमका काळजी हा ती तुमची, तुम्हा सगळ्यांची. आता बाबुराव काकांचाच उदाहरण घ्या, तेका हाय डायबिटीज् आसा, जर तेका काय झाला तर, ते गेले तर केळुरीतली संगीत रंगभूमी पोरकी होतंली.’ शेवटच्या वाक्यावर मधून हुंदको वैगेरे घेतलो. पण ह्या वाक्य त्या मधून म्हटल्यान मात्र गौरवर्णी बाबुराव गोखले म्हणजे लालेलाल होऊन तेच्या अंगावरंच धावले, ‘मेल्या माझ्या मरणावर उठतंस? आं? ये हयसर दाखवता तुका कोणाक काय होतंला तां फोफलीच्या?’ बाबुरावांचा ता रूप बघितल्यानंतर मधू म्हणजे जो पळत सुटलो तो एकदम आपल्या घराकडे जाऊन थांबलो.
गावच्या तरूण मंडळींनी बर्याचदा सांगून, आपला म्हणणा पटवून देऊनसुद्धा केळुरीतले मोठे लोक ऐकत नाय, ते आजूनपण भायर जमतंत, सोशल डिस्टंसींग पाळत नाय, पण ह्या सगळा बंद होऊक व्हया आणि केळुरीतल्या वयस्क लोकांका सोशियल डिस्टंसींगाचा महत्व पटवून देऊक व्हया ह्या उद्देश डोळ्यापुढे ठेवून केळुरीतले जवळ-जवळ वीस ते पंचवीस तरूण मधूच्या नेतृत्वाखाली एकत्र इले आनी पहाटे-पहाटे मूक प्रभातफेर्यो काढत सोशल डिंस्टंसिंगचा महत्व केळुरीतल्या ग्रामस्थांका पटवून देऊक लागले. तेंच्यामधे काय जणांच्या हातात ‘केळुरीत सोशल डिस्टंसींग होऊकंच व्हया’ किंवा ‘सर्वांनी मास्क लावूकच व्हया’ किंवा ‘सोशल डिस्टंसींग ह्याच आमचा मागणा, केळुश्वरा आमच्यावर धरू नको रागणा’ अशा प्रकारच्यो घोषणा लिहिलेल्यो होत्यो. सरपंचांनी हो मूक प्रचार कित्या, असा त्या तरूणांका विचारल्याबरोबर जनू नाडकर्णी कय्यक कारण नसताना मधेच, ‘बरोबर आसा. काय हा, तां तोंड जर उघडल्यान आणि चुकून जर तोंडात करोना आसलो तर तो बाहेर पडून दुसर्याक बाधा होऊक नको! म्हणून तोंड बंद. काय रे मधू बरोबर ना?’
ह्यो सगळ्यो गजाली सात-आठ दिवस चालल्यो असतील. पण अचानक एका दिसा केळुरीतल्या वयस्क लोकांका कोरोना होऊ नये म्हणून वीस-पंचवीस तरूण एकत्र घेवन सोशल डिस्टंसिंगचा महत्व सांगणारो मधू कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा समजला आनी त्या दिवसापासून पहिल्यांदाच केळुरीत कडक लॉकडाऊन सुरू झालो.
– शिवप्रणव आळवणी
(लेखक प्रशिक्षित अभिनेते आहेत)