‘बँडिट क्वीन’ स्टार्ट टू एंड फक्त आणि फक्त भयानक, विदारक वास्तव आहे. ‘मासूम’ आणि ‘मिस्टर इंडिया’ देणार्या माणसाकडून हे कसं घडलं? याचं उत्तर खुद्द शेखर कपूरकडेही नाही. तो म्हणतो, ‘मला जसं जाणवलं तसं मी अंत:प्रेरणेने शूट करत गेलो. इतका राग, इतका द्वेष, इतकी हिंसा माझ्यात असू शकते हे कळून मी थक्क झालो.’
—-
सिनेमा ही एक जादू आहे. ती आपल्याला हसवते, रडवते, खूष करते. पण हे सगळं वर वर असतं. फार कमी सिनेमे आपल्या मनावर दीर्घ काळ परिणाम करतात. डोक्यात घुसून बसतात. आणि काही सिनेमे हे फक्त गोष्ट सांगून थांबत नाहीत, तर त्या गोष्टीमध्ये आपण असतो तर काय झालं असतं, या विचाराने थरकाप उडवायला लावतात.
शेखर कपूरचा ‘बँडिट क्वीन’ नेमकं हेच करतो आपल्याबरोबर.
शेखर कपूर मूळचा चार्टर्ड अकाऊंटंट. इंग्लंडमध्ये काही वर्ष काम केलेला. वडील इथले यशस्वी डॉक्टर. तिन्ही मामा भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज. चेतन, देव आणि गोल्डी. आनंद ही आनंद. मात्र शेखरच्या वडिलांना- डॉक्टर कुलभूषण यांना शेखरने फिल्म इंडस्ट्रीपासून दूर राहावं असं वाटायचं. शेखरने तसा प्रयत्न केलाही पण… आधी अभिनेता बनून, आणि मग दिग्दर्शक बनून तो हिंदी चित्रपटात आलाच.
‘बँडिट क्वीन’ हा दिग्दर्शक शेखर कपूरचा प्रदर्शित झालेला तिसरा सिनेमा. प्रदर्शित झालेला असं म्हणायचं कारण म्हणजे शेखर चित्रपट अर्धवट सोडून देण्याबद्दल कुप्रसिद्ध होता आणि आहे. पदार्पणातच ‘मासूम’सारखा हृदयस्पर्शी चित्रपट देऊन चित्ररसिक आणि समीक्षकांची वाहवा मिळवणार्या शेखरचा दुसरा सिनेमा होता ‘मिस्टर इंडिया’. तो तर दणदणीत ब्लॉकबस्टर यश संपादन करता झाला. त्यानंतर तो अनिल कपूर, सनी देओल यांच्याबरोबर ‘जोशिले’ करत होता. पण काहीतरी बिनसलं आणि शेखर त्या प्रोजेक्टमधून बाहेर पडला. ज्यांनी ‘जोशिले’ पाहिला असेल त्यांना खलनायक जोगी ठाकूर आणि लेह लडाखच्या परिसरात रेखाटलेला त्याचा ग्राफ लक्षात आला, तर ‘बँडिट क्वीन’चा पुसटसा आगाज़ त्यात दिसून येईल. अर्थात हे ठरवून केलेलं नसावं नक्की. कारण तेव्हा ‘बँडिट क्वीन’चा विषयही शेखरच्या डोक्यात नव्हता.
‘मिस्टर इंडिया’च्या यशानंतर त्याच्याकडे बॉलिवुड मोठ्या आशेने बघत होतं. मात्र स्टार सिस्टीमवर वैतागलेला शेखर हळूहळू चित्रपट दिग्दर्शन सोडून गप्पांचे शो, डबिंग असं काय काय करत होता. लंडनमध्ये झालेल्या इंग्रजी भाषेतील गप्पांच्या कार्यक्रमाचे निर्माते होते चॅनल फोर. त्यांनी शेखरला माला सेन यांनी लिहिलेल्या ‘बँडिट क्वीन’ या पुस्तकावर डॉक्युमेंट्री बनवायला सांगितली. शेखरने त्याच बजेटमध्ये सिनेमा बनवायला घेतला…
…‘बँडिट क्वीन’.
‘हे लोक तिला बँडिट क्वीन का म्हणतात कळत नाही? लहानपण ओरबाडून घेतलं गेलेली एक छोटी मुलगी आहे ती,’ शूट चालू झाल्यावर शेखरचं हे मत होतं. हा चित्रपट करत असताना तो फुलनदेवीला नीट जाणून घेऊ लागला होता.
फुलन. हीच ती दुर्दैवी बाई, जिला जग बँडिट क्वीन म्हणून ओळखत होतं. माला सेन यांनी लिहिलेल्या फुलनच्या आत्मचरित्रपर पुस्तकावर शेखर कपूर हा चित्रपट बनवत होता. त्याला ही कल्पना नव्हती की पडद्यावर काहीतरी अद्भुत घडणार होतं.
सिनेमाची कथा सुरू होते उत्तर प्रदेशातल्या एका छोट्याश्या खेड्यात. दहा वर्षाच्या अल्लड फुलनला एक सायकल आणि एका गाईच्या बदल्यात तिच्यापेक्षा वीसेक वर्षांनी मोठ्या असलेल्या पुत्तीलाल मल्लाहबरोबर लग्न करून पाठवलं जातं.. फुलनसुद्धा मल्लाह समाजातली. मल्लाह हे जातीच्या उतरंडीमध्ये खालच्या पायरीवर असणारे. लहानगी फुलन सासरी गेल्यावर विहिरीवर पाणी भरायला जाते, तेव्हा ठाकूर समाजाच्या बायका, तिला तिची जागा दाखवतात. मल्लाह आणि इतर खालच्या जातीच्या लोकांनी मातीचे घडे वापरावेत असा अलिखित नियम. फुलनचा मातीचा घडा फोडणार्या पोरांना फुलन अर्वाच्य भाषेत शिव्या देते. पण याची शिक्षा तिला रात्री तिचा पती घरी आल्यानंतर मारून आणि मग शारीरिक अत्याचार करून देतो. फुलन तिथून पळून परत आपल्या गावी येते. तिने घरादाराच्या नावावर बट्टा लावलाय असं सगळे म्हणतात. फुलनचं कोवळ वय संपून ती तारुण्यात पदार्पण करतेय. गावातल्या ठाकूर पोरांचं लक्ष तिच्यावर आहे. अशात एका जबरदस्तीच्या प्रसंगातून फुलन प्रतिकार करून पळते, पण गावची पंचायत ठाकुरांची. फुलनचा वाईट शब्दात अपमान करून, तिला गावातून हाकललं जातं. दरबदर भटकत, कधी आपल्या दूरच्या भावाकडे रहात फुलन आपल्या घरी जाते. तिला पोलीस ठाण्यात डांबलं जातं. तिथून सोडल्यानंतर त्याच रात्री तिला बाबू गुज्जरची टोळी उचलून नेते. आणि बाबू गुज्जरकडूनही तिच्यावर अनन्वित अत्याचार होतात. त्याच्या टोळीतला विक्रम मल्लाह हे सहन न होऊन गुज्जरला ठार मारतो आणि टोळीचा मुखिया बनतो. फुलन आणि विक्रम एकत्र राहू लागतात. टोळीचे तुरुंगात असलेले वरच्या जातीतले मालक ठाकूर श्रीराम आणि लाला बाहेर येतात. बाबू गुज्जरला मारलेलं त्यांना आवडलेलं नाहीये. विक्रम मल्लाहचा काटा काढला जातो. फुलनला परत उचलून नेलं जातं, दुर्दैवाचे दशावतार भोगायला. बेहमई गावात तिच्यावर अनेक ठाकूर समाजाच्या पुरुषांकडून बलात्कार होतो. तिची नग्न धिंड काढली जाते. तिथून कशीबशी वाचलेली फुलन मानसिंग नावाच्या विक्रम मल्लाहच्या जुन्या साथीदाराला भेटते आणि आपली टोळी स्थापन करते. आता ती फुलनदेवी म्हणून प्रसिद्ध झाली आहे. तिला गोरगरिबांचा पाठिंबा आहे. अशात बेहमई गावात ठाकूर श्रीराम येणार असल्याची तिला खबर मिळते, आणि फुलन साथीदारांसह बेहमईवर हल्ला चढवते. सुडाने पेटलेल्या फुलनला श्रीराम मिळत नाही पण तिथल्या बावीस ठाकुरांची ती ओळीत उभं करून हत्या करते. हे प्रकरण खूप गाजतं आणि पोलीस तिच्या मागावर निघतात. फुलन पोलिसांच्या हाती लागत नाही परंतु ती थकलेली आहे, जखमी आहे. तिचे बरेच साथी मारले गेले आहेत. अशात भारत सरकारच्या डाकूंना एक संधी देण्याच्या भावनेतून जाहीर केलेल्या योजनेत फुलन शस्त्र खाली ठेवते.
सिनेमा संपतो तेव्हा आपणही फुलनसारखे थकून विझून गेलो असतो कारण शेखर कपूरचा बँडिट क्वीन आपल्याला कुठेही क्षणभर रिलीफ नावाची गोष्ट देत नाही. या चित्रपटाचं वैशिष्ट्य असं आहे की तो एक चित्तरकथा म्हणून कधीही प्रेक्षकांना लुभावत नाही. तो बघणार्यांना हादरवून टाकतो. ओरबाडतो. बोचकारतो. पोटात ढवळून आणतो. किळस आणतो. विषण्ण करतो.
प्रतीकात्मकता, सौंदर्यदृष्टी, हळुवार हाताळणी या सगळ्या गोष्टींना जणू भिंतीला पाठ टेकवून उभे करून दिग्दर्शक शेखर कपूरने इथे त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. ‘बँडिट क्वीन’ स्टार्ट टू एंड फक्त आणि फक्त भयानक, विदारक वास्तव आहे. ‘मासूम’ आणि ‘मिस्टर इंडिया’ देणार्या माणसाकडून हे कसं घडलं? याचं उत्तर खुद्द शेखर कपूरकडेही नाही. तो म्हणतो, ‘मला जसं जाणवलं तसं मी अंत:प्रेरणेने शूट करत गेलो. इतका राग, इतका द्वेष, इतकी हिंसा माझ्यात असू शकते हे कळून मी थक्क झालो.’
‘बँडिट क्वीन’मध्ये हा जाळ जागोजागी आहे. फुलनचं स्त्री असणं आणि त्यातही मल्लाह जातीतलं असणं, हे वारंवार अपमानकारक शब्दांत थुंकलं गेलंय. शिव्या, अपशब्दांनी भरलेला आहे हा चित्रपट; पण कुठेही त्यात कृत्रिमपणा नाही. जी जी पात्रं ती भाषा बोलतायत ती ओघवती, नैसर्गिक आहे. कुठेही आक्रस्ताळेपणा नाही. आणि म्हणूनच बँडिट क्वीन इतका भेदक आहे.
चित्रपटात पावलोपावली होणार्या हिंसेमुळे सर्वात जास्त अस्वस्थ भारतीय सेन्सॉर बोर्ड झालं असावं. चित्रपट कानला दाखवला गेला. तिकडे चर्चा झाली. मात्र भारतात वर्षभराने प्रदर्शित होताना सेन्सॉरशिपचा फटका ‘बँडिट क्वीन’ला बसला. निर्मात्यांनी फिल्म ट्रिब्यूनलकडे धाव घेतली. न्या. लेंटिन आणि तीन महिला सदस्य असलेल्या या समितीकडून सेन्सॉरचे बरेचसे कट रद्द केले गेले आणि सिनेमा प्रदर्शित झाला. ‘बँडिट क्वीन’ या सर्व गोष्टींनी चर्चेत होताच, पण सगळ्यात जास्त चर्चा होती ती फुलनच्या नग्न परेडच्या प्रसंगाची..
सिनेमात हा प्रसंग येतो त्या वेळी खरं तर फुलनवर एकामागून एक होणारे शारीरिक अत्याचार बघून मेंदू बधीर झालेला असतो. त्यात ठाकूर श्रीराम फुलनचे कपडे फर्रकन फाडतो आणि क्षणात ती विवस्त्र होते तेव्हा कपडे असूनही आपण नागवे झाल्याची जाणीव होते. समोर आहे तो फुलनचा, एका स्त्रीचा नग्न देह आहे या भावनेने उद्दिपित होण्याऐवजी तो एका माणसाचा देह आहे, अनन्वित हाल सोसलेला, शरीरावर आणि मनावर बलात्कार झालेला, या सत्यतेने गुदमरून जायला होतं. अपमान हा खूप क्षुल्लक शब्द आहे. खालच्या जातीतल्या स्त्रीने भोगवस्तू म्हणूनच राहायला हवं ही त्या ठाकुरांची, कदाचित आम लोकांची, ज्यात स्त्री पुरुष दोन्हीही येतात त्यांची अपेक्षा. फुलनच्या नावापुढे विक्रम मल्लाहने देवी लावलेलं आहे. ते त्या लोकांना डाचतं आहे. ठाकूर श्रीराम विवस्त्र फुलनचे केस ओढत अख्ख्या बेहमईसमोर तिला फिरवत म्हणतो, ‘ही बघा तुमची देवी.’
हा जातीभेदाचा शाप मल्लाह किंवा खालच्या जातीतल्या लोकांनीसुद्धा प्राक्तन किंवा समाजव्यवस्था म्हणून गपगुमान स्वीकारला आहे. पंचायतीमध्ये, पोलीस चौकीमध्ये पोटच्या पोरीच्या अब्रूचे धिंडवडे उडताना, निमूट पाहणारा फुलनचा बाप दीनदयाल, विक्रम मल्लाहशी बोलताना मात्र हातचं न राखता, न भिता बोलतो कारण तो दीनदयालसारखाच खालच्या जातीतला आहे. फुलनने इतकं सगळं होऊनही परत नवर्याकडे जायला हवं असं तो बेदिक्कत सांगतो. बापाने आपल्याला कधीतरी समजून घ्यावं ही फुलनची अपेक्षा फोलच ठरते.
पण शेखर कपूरला एक माणूस म्हणून फुलनची वेदना किती कळलीय हे सांगायला एक प्रसंग बस आहे. तो म्हणजे विक्रम मल्लाह आणि फुलनचा पहिला प्रणयप्रसंग. प्रणय म्हणणं उगीचच मुलामा दिल्यासारखं होईल. कारण विक्रम आवडत असूनही फुलनला त्याच्याशी एकरूप होणं सोपं नाही. ज्या मुलीने वयाच्या दहाव्या वर्षी पुरुषाचं घृणास्पद रूप बघितलं आहे, छळ झेलला आहे, ते तिला विसरण कसं जमेल. फुलन विक्रमला थपडा मारते, नखांनी बोचकारते. कुठेतरी तिला नॉर्मल व्हायला हे गरजेचं आहे.
आणि नवरा पुत्तीलाल याला बेदम मारणंही तिला तेवढंच गरजेचं वाटतं. त्याला खांबाला बांधून ती अक्षरश: तुटून पडते. बंदुकीच्या दस्त्याने त्याला मारत रहाते. कारण फुलन त्या हिरावून घेतल्या गेलेल्या बालपणापासून वाढलीच नाहीये. नदीच्या पात्रात इतर मुलामुलींसोबत डुबक्या मारणार्या फुलनला पुत्तीलाल बरोबर घेऊन गेला होता. शेखरला ही जखम बरोबर सापडली आहे. नव्हे ती जखम त्याने आपली समजूनच स्वीकारली आहे आणि म्हणूनच तो म्हणतो फुलनच्या प्रत्येक कृतीत निरागसपणा आहे… हिंसेतही. आतापर्यंत भारतीय वृत्तमाध्यमांनी फुलनला एक आयटेम म्हणून, एक सनसनाटी बातमी म्हणूनच बघितलं होतं.
मीडिया, फिल्म्स आणि जाहिरात क्षेत्र एकमेकांच्या बहिणी असल्यागत वावरत असतात. भारतात वर्षानुवर्ष असलेल्या दारिद्र्य, जात पात, पुरुषसत्ताक समाजव्यवस्था याविरुद्ध बंड पुकारून कायद्याच्या विरुद्ध बाजूला उभ्या राहिलेल्या एका अभागी बाईची कहाणी बँडिट ‘क्वीन’ या नावाने ओळखली जावी यापेक्षा भयानक विनोद काय असू शकतो? भारतीय माध्यमांनी तर अजूनच वाईट नाव दिलं होतं या बाईला. काय? तर.. दस्यु सुंदरी. एखाद्या जीवघेण्या अनुभवातून झगडत जिवंत राहिलेल्या जिवाला चकचकीत वेष्टनात बांधून पेश करण्याचा क्रूर प्रकार आहे हा.
शेखरचा ‘बँडिट क्वीन’ही कदाचित या आरोपाचा धनी झाला असता; पण दूर कुठेतरी उत्तर भारतात गरिबीत वाढलेल्या, जातीच्या दुष्टचक्रातून, स्त्रीत्वाचा जणू शाप झालेल्या शरीराचे घाव सावरत, लढायला उभ्या राहणार्या फुलनचा दर्द सुस्थितीत वाढलेल्या, लंडनमध्ये सीए असलेल्या शेखरच्या जिव्हारी भिनला आणि बँडिट व क्वीन या दोन्ही शब्दांच्या धज्जियाँ उडवणारा एक बंडखोर सिनेमा तयार झाला. शेखर कपूरचा डीएसपी.
टिप : ‘बँडिट क्वीन’च्या अभिनय, संगीत, चित्रण या बाबींबद्दल लिहिणं म्हणजे या अस्सल अनुभूतीचा प्रभाव कमी करण्यासारखं होईल कदाचित. कारण ‘बँडिट क्वीन’ हा निव्वळ सिनेमा उरत नाही. फुलनच्या जागी आपण नाही या भावनेने टाकलेला सुटकेचा निःश्वास आहे तो.
कट इट!
– गुरुदत्त सोनसुरकर
(लेखक चित्रपट रसिक, लघुपट दिग्दर्शक आणि जाहिरात व्यावसायिक आहेत)