• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

…आणि शिवसेनेची स्थापना झाली!

- योगेंद्र ठाकूर (गाथा शिवसेनेची)

Nitin Phanse by Nitin Phanse
November 17, 2022
in भाष्य
0

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्राचे वर्णन आचार्य अत्रे यांनी `नवयुग’च्या मे १९६०च्या अंकात `भारताचे चौदावे रत्न’ म्हणून अग्रलेखात उल्लेख केला. तर १३ ऑगस्ट १९६० रोजी बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे यांनी `मार्मिक’ हे मराठीतले पहिले व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले.
मराठी माणसाला मुंबईसह महाराष्ट्र मिळाला याचा आनंद मराठी माणसाला होताच. परंतु मराठी माणसाच्या प्रगतीत खोडा घालण्याचे काम विरोधक करीत होते. अमराठी लोकांचा वरचष्मा त्यांच्या प्रगतीच्या आड येत होता. महाराष्ट्रात मुंबई होती, पण मुंबईत महाराष्ट्र दिसत नव्हता. ‘मुंबई तुमची, भांडी घासा आमची’ असे मराठी माणसास हिणवले जात होते. मुंबईतील केंद्र आणि राज्य शासनाच्या आस्थापनांत दक्षिणात्य लोकांचे वर्चस्व होते, तर छोटे दुकानदार, फुटपाथवरील विक्रेते हे उत्तर भारतीय आणि गुजराती-मारवाडी आणि काही केरळी होते. या सर्व ठिकाणी मराठी माणसाची गळचेपी होत होती, कोंडमारा होत होता आणि ससेहोलपटही होत होती. असूनि खास मालक घरचा, फिरतो दारोदारी, बनूनि भिकारी, अशी अवस्था होती. या दबलेल्या मराठी माणसाला ताठ उभे राहण्याची ताकद `मार्मिक’ साप्ताहिकाने दिली. मराठी माणसाच्या व्यथा व कथा त्यात मांडल्या जाऊ लागल्या. अन्यायाचे पाढे वाचले जाऊ लागले. त्यावेळी `मार्मिक’मधून मुंबईतील आस्थापनांतील नोकरवर्गाच्या याद्या छापून येत होत्या. त्यात परप्रांतीयांचा भरणा होता. मराठी माणसास स्थान नव्हते. लायकी असून त्यांना नोकर्‍या मिळत नव्हत्या. मुंबईतील सरकारी-निमसरकारी व प्रायव्हेट कंपन्यांमध्ये दक्षिणात्यांचा भरणा जास्त होता. मराठी माणूस शोधून सापडत नव्हता. बाळासाहेबांनी आपल्या लिखाणाने मराठी माणसाचे स्फुल्लिंग चेतवले. अनेक मराठी माणसे `मार्मिक’च्या कार्यालयात येऊन व्यथा आणि वेदना मांडायचे. ही मराठी माणसांची गर्दी पाहून दादा म्हणजे प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेबांना म्हणाले, हे एवढे लोक येतात, याला काही ऑर्गनाईज्ड स्वरूप द्यायचं की नाही? या सगळ्या गोष्टीला, चळवळीला संघटनेचा आकार द्या. तरच त्यातून काहीतरी ठोस घडेल. नाहीतर ही जागृती फुकट जाईल. मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी प्राणपणाने झुंजणारी संघटना काढणं हा एकच मार्ग त्यावर आहे. संघटना काढायची! दादा म्हणाले कधी?
बाळासाहेब म्हणाले, `आत्ता’.
नारळ आणून छत्रपतींच्या पुतळ्यासमोर सहदेव नाईकने तो फोडला. बाळासाहेब म्हणाले, नाव काय ठेवायचे?
दादा म्हणाले, त्यात विचार कसला करता? शिवसेना! तो दिवस होता १९ जून १९६६!! मराठी माणसांच्या वेदनेतून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना स्थापन झाली. १९ जून १९६६ रोजी सकाळी ९.१५ वाजता `शिवछत्रपतींच्या जयजयकारात शिवसेनेची नोंदणी सुरू झाली. सहदेव नाईक यांनी नारळ फोडला. नारळातले पाणी शेजारी उपस्थित असलेल्या सहा वर्षाच्या उद्धववर पडले, हा शुभसंकेत ठरला. शिवसेनेचे स्थापनेचे तेही साक्षीदार होते. तेव्हापासून उद्धवजींच्या नसानसांत आणि रक्तात शिवसेना भिनली आहे. प्रबोधनाकारांच्या हस्ते शिवसेनेचे तक्ते देण्यास सुरुवात झाली. एका तासात दोन हजार तक्ते संपले. दोन दिवसात दहा हजारांच्यावर नोंदणी झाली. २६ जूनच्या `मार्मिक’मध्ये शिवसेनेचे बोधचिन्ह म्हणून डरकाळ्या फोडणारा `वाघ’ छापण्यात आला. सोबत शिवराय होतेच. मागच्या बाजूला महाराष्ट्राचे चित्र आणि `मराठा तितुुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हे वचन लिहिलेले होते आणि मोठ्या अक्षरात मराठी माणसांच्या या संघटनेचे नाव छापलेले होते- शिवसेना!
शिवसेनेच्या सभासद नोंदणीची माहिती, नवे शाखाप्रमुख आणि त्यांची माहिती, नोंदणी किती झाली या सर्व गोष्टी `मार्मिक’मध्ये छापून येत होत्या. आता `मार्मिक’ हे फक्त व्यंगचित्र साप्ताहिक न राहता शिवसेनेचे मुखपत्र बनले होते. १९५५ ते १९६०पर्यंतचा कालखंड हा संयुक्त महाराष्ट्र समितीच्या लढ्याचा कालखंड होता. १९६० ते १९६६चा कालखंड हा `मार्मिक’चा कालखंड होता. या कालखंडात बाळासाहेबांनी त्यांच्या अग्रलेखाद्वारे, माहितीद्वारे झोपी गेलेला मराठी माणसाला जागे केले. त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी `मार्मिक’ने बजावली.
१९६६ साली दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. जानेवारी महिन्यात पंतप्रधान शास्त्रींचे ताश्कंदमध्ये आकस्मिक निधन झाले आणि काँग्रेस अध्यक्ष कामराज नाडर यांच्या पाठिंब्याने इंदिरा गांधी पंतप्रधानपदावर आरुढ झाल्या. राष्ट्रीय पातळीवरील ही घटना इतकी महत्त्वाची होती की तिचे पडसाद पुढच्या कित्येक वर्षे देशांमध्ये उमटत राहिले. महाराष्ट्रात १९ जूनला शिवसेनेची स्थापना झाली, ज्यामुळे राजकीय समीकरणे बदलली. `मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी संघटना’ असे बिरुद लावून `मार्मिक’कार ठाकरे यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. तोपर्यंत `मराठी लोकांचा तारणहार’ म्हणून `मराठा’कार आचार्य अत्रे यांच्याकडे पाहिले जायचे. सातार्‍यास एस.टी. स्थानकाजवळ `रजताद्रि’ नावाचे हॉटेल आहे. तेथे आचार्य अत्रे गेले असताना एकाही वेटरला मराठी येत नसल्याचे पाहून त्यांचे पित्त खवळले आणि जेथे छत्रपतींची गादी आहे, त्या शहरात मराठी राजभाषा असूनही तिची कशी हेळसांड होत आहे, यावर त्यांनी परखड भाष्य केले. भाषा टिकवण्यासाठी तरुणांनी संघटित व्हायला हवे आणि अशी ही शिवसेनाच मराठीचा प्रभाव टिकवू शकेल, असे अत्र्यांनी अग्रलेखात लिहिले.
शिवसेना स्थापन झाली. शिवसेनेचे ध्येय धोरण व उद्दिष्टे काय असावीत याची सांगोपांग चर्चा प्रबोधनकार, बाळासाहेब आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केली, मग निर्णय झाला. शिवसेनेचे उद्दिष्ट एकच! मराठी माणसांचा सर्वांगीण विकास!!
प्रत्येक मराठी माणसाला त्याचा हक्क मिळायलाच हवा, भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य मिळायलाच हवे. ही मागणी करत असताना मराठी माणसाला त्याच्या कर्तव्याची जाण असावी, याकडेही बाळासाहेबांचा कटाक्ष होता. त्यासाठी संघटनेने धोरण आखले ते असे…
– मराठी माणसाने मराठी माणसाला पाण्यात न पाहता मदत करावी व परस्पर उत्कर्ष साधावा.
– मराठी दुकानदार व उत्पादक यांच्याकडून माल खरेदी करावा. परस्परांनी मराठी माणसांबद्दल सहृदयतेचे धोरण ठेवावे.
– मराठी माणसांनी आपल्या जागा परप्रांतीयांना विकू नयेत. विकल्यास शिवसैनिकाने त्याचा नावपत्ता शिवसेना कचेरीला कळवावा.
– मराठी अधिकार्‍यांनी मराठी माणसाचीच नोकर्‍यांच्या जागी भरती करावी.
– मराठी तरुणांनी उत्तम इंग्रजी शिकून स्टेनो टायपिस्ट म्हणून पुढे यावे. तसेच आज नवनवीन तांत्रिक कोर्सेसकडे जाण्याची धमक ठेवावी.
– मराठी माणसांचे हित होईल याच दृष्टिकोनातून सर्व व्यवहार करावे.
– मराठी शाळा, संस्था, आश्रम व सांस्कृतिक कार्यक्रम यांनाच सक्रिय मदत करावी. स्वाभिमानी महाराष्ट्रीय मंडळींनी रस्त्यावर, फुटपाथवर विक्री करणार्‍या परप्रांतीय उपर्‍या फेरीवाल्यांचा कसलाही माल खरेदी करू नये.
– आपल्या माणसांना हॉटेल वगैरे धंद्यात पुढे आणण्यासाठी व हीन न लेखण्याची बुद्धी बनवावी.
– आपल्या माणसाशी उद्धट आणि उर्मटपणे वागू नये.
– मराठी माणसावर कोठेही अन्याय झाल्यास संघटित आवाज उठवून त्याचा प्रतिकार करावा.
– तत्कालीन महाराष्ट्र सरकारने मराठी माणसांच्या उत्कर्षासाठी काय करावे. महाराष्ट्र सरकारकडून काय अपेक्षा आहे याची माहिती – बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. महाराष्ट्र शासनाने हे केलेच पाहिजे. हे त्यांनी ठासून सांगितले.
– इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही ८० टक्के नोकर्‍या मराठी माणसालाच मिळाव्यात. यासाठी शासनाने खंबीर धोरण स्वीकारलेच पाहिजे.
– कोणत्याही जमिनीच्या लिलावांत प्रथम अग्रहक्क मराठी माणसालाच मिळावा. जमीनमालकी मराठी माणसाचीच राहिली पाहिजे. हाऊसिंग बोर्डाच्या गाळ्यात ८० टक्के जागा मराठी माणसांसाठी राखून ठेवाव्यात. बोर्डावर नेहमी मराठी माणसेच अधिकारावर राहावीत याची शासनाने काळजी घ्यावी. येथे उपरे येता कामा नयेत.
– एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची पुनर्घटना झालीच पाहिजे. येथेही मराठी माणसेच असावीत व प्रथम मराठी माणसांच्या अर्जांना प्राधान्य द्यावे.
– इतर धंद्यातही जास्तीत जास्त मराठी माणसे कशी बसतील याकडे जातीने लक्ष पुरवावे. याकरता बंगालचे दिवंगत मुख्यमंत्री सिद्धार्थ रे यांचा आदर्श शासनाने गिरवावा.
– खुद्द महाराष्ट्र शासनात अधिकाराच्या जागांवर मराठी माणसेच नेमावीत, नव्हे तशी दक्षता घ्यावी. झोपडपट्ट्यांतील उपर्‍यांना दुसर्‍या जागा मिळवून देण्याची जबाबदारी शासनाने व महापालिकेने मुळीच घेऊ नये.
– इतकेच नव्हे तर परप्रांतीय, भिकारी, हद्दपार केलेले गुंड, बेकार यांना तात्काळ महाराष्ट्राबाहेर घालवून देण्याची व्यवस्था करावी.
– उपर्‍यांच्या नव्या झोपड्या बांधल्या जाऊ नयेत, म्हणून तिथल्या स्थानिक पोलीस चौकीला जबाबदार धरावे, तशा त्या बांधल्या गेल्यास पोलिसांनी लाच घेतली असे समजले जाईल.
– मराठी माणसाच्या सहकारी हाऊसिंग सोसायट्यांनाच यापुढे कर्ज द्यावीत. जागा द्याव्यात. परप्रांतीयांशी गडगंज पैसा असल्याकारणाने ते सरकारी, म्युनिसिपल अधिकारी `विकत’ घेऊ शकतात, हे शासनाने लक्षात ठेवावे.
– महाराष्ट्रेतरांना नोकर्‍या व जागा देताना त्यांच्यावर किमान २० वर्षाच्या वास्तव्याची अट कटाक्षाने लादावी. कोणत्याही शिफारशी, वशिलांच्या चिठ्ठ्यांचा शासनाने विचार करू नये. त्याला केराची टोपली दाखवावी.
– नोकरीत मराठी माणसांवर कुठे अन्याय झाल्यास शासनाने संबंधित मालकाला, अधिकार्‍याला जाब विचारावा.
– यापुढे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही खाजगी, सरकारी, निमसरकारी नोकरीत नवीन भरणा करताना ८० टक्के मराठी माणसांना प्राधान्य मिळालेच पाहिजे असा कटाक्ष शासनाने पाळावा.
– मद्रास, बंगाल या इतर प्रांताप्रमाणेच महाराष्ट्र राज्यातील स्टेशनवरील पाट्या मराठी भाषेतून असल्या पाहिजेत असा नियम करावा व त्याची कडक अंमलबजावणी व्हावी.
– फुटपाथवर परप्रांतीयांना विक्रीसाठी महापालिकेने परवाने देऊ नये.
– मद्रास राज्यप्रमाणे ज्याला या राज्यात मराठी भाषा बोलता येते त्यालाच नोकर्‍या मिळतील हा नियम शासनाने करावा.

`मार्मिक’मधील बाळासाहेबांचे अग्रलेख वाचल्यानंतर मराठी माणसाचे मन चाळवले गेले. नंतर ते चवताळले आणि मराठी माणूस आपल्या न्याय हक्कासाठी शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकवटत गेला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आखलेल्या या धोरणानुसार शिवसेनेने पुढील वाटचाल सुरू केली. बाळासाहेबांच्या आदेशानुसार मोर्चे, आंदोलने, लढा आणि संघर्ष सुरूच राहिला. कारण संघर्ष हा शिवसेनेचा स्थायीभाव आहे.

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

शोध दादरचा…

Next Post

शोध दादरचा...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.