या संपूर्ण प्रक्रियेत अशोकला श्याम बेनेगल, बासू भट्टाचार्य, गोविंद निहलानी यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांचा सहवास लाभला, त्यांच्याबरोबर सिनेमाच्या चर्चा करून एक वेगळा दृष्टिकोन विकसित करून घेता आला. बासू भट्टाचार्यजींबरोबर तर अशोकची खासच गट्टी जमली होती. एक ‘सिनेमा करणारा’ कुशल आणि बुद्धिमान दिग्दर्शक आणि दुसरा ‘सिनेमा पाहणारा प्रेक्षक’ यांची एकमेकांना पूरक अशी जोडीच जमली. त्यांच्या या दोस्तीचा परावर्तित प्रकाश आमच्यासारख्या अशोकच्या मित्रांवरही सातत्याने पडत गेला आणि व्यावसायिक नाटक सिनेमा करताना माझ्यासारख्या निर्माता दिग्दर्शकाला, पुढे ‘भस्म’सारखा चित्रपट करण्याचा योग आला, तेव्हा आपोआपच काही वेगळ्या प्रेरणा मिळत गेल्या. इथपर्यंतच्या प्रवासापर्यंत अशोक राणे हा मुंबईतल्या मराठी चित्रपटसृष्टीतल्या नवोदितच नव्हे, तर अगदी तरबेज दिग्दर्शकांचाही ‘फेस्टिव्हल’ आधारस्तंभ झाला.
—-
नाट्य-चित्रपटसृष्टीत समीक्षक किंवा पत्रकार यांच्याशी काही दिग्दर्शकांची खास मैत्री होते. मात्र मैत्री आणि ओळख यात फरक आहे. ओळख वर्षानुवर्षे कायम राहते. तिच्यात चढउतार विस्मृतीचेच असतात. खूप वर्षांनी भेट झाल्यास ओळख पुन्हा ताजी होते, तर मैत्रीमध्ये घडणारे बदल विस्मयकारक असतात. ते स्थिर नसतात. ती टिकाऊ असतेच असे नाही, तर कधी कधी कामचलाऊही असते. टिकाऊ मैत्रीत स्वार्थ कमी असतो, ओलावा आणि हक्क जास्त असतो. कामचलाऊ मैत्री ही कामापुरती असली तरी त्यात स्वार्थ ठासून भरलेला असतो. हे सर्व सांगायचं कारण म्हणजे ज्येष्ठ पत्रकार, समीक्षक, आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे आस्वादक, अभ्यासक आणि आता पटकथाकार व दिग्दर्शक आणि दुसरी ओळख म्हणजे ‘सिनेमा पाहणारा माणूस’… अशोक राणे.
अशोकशी कोणाचीही दोस्ती होऊ शकते. मात्र त्याला सिनेमा बघण्याची आवड असणे गरजेचे आहे. मग तो दिग्गजच असला पाहिजे अशी काही अट नाही… एकपासून हजारपर्यंत कोणत्याही संख्येत सिनेमा पहिला असेल तर अशोकशी ओळख होताच त्याला सिनेमाचा ‘नाद’ हा लागणारच. त्याच्या सिनेमा बघण्याच्या संख्येत वाढ होईल किंवा संख्या आधीपासूनच जास्त असेल तर निदान ‘रुची’मध्ये फरक पडेल. जगातल्या कोणत्याही देशातला सिनेमा असो, अशोकने तो पाहिलेला तरी असतो किंवा तो पाहणार तरी असतो. त्या चित्रपटाबद्दल माहिती नसणं ही तर अशक्य कोटीतील गोष्ट आहे.
एके काळी सिनेमाचा नाद असलेला मुलगा हा ‘फुकट गेला’ असं समजायची पद्धत मध्यमवर्गीय किंवा निम्नमध्यमवर्गीयांत होती. अशोक तर गिरणी कामगाराचा मुलगा. चोरून सिनेमा बघण्याशिवाय गत्यंतर नसलेल्या घरात जन्माला आला. अशा मुलाने जागतिक स्तरावर ‘सिनेमा बघणारा माणूस’ बनणं ही साधी गोष्ट नाही. पण तो झाला. तो तसा कसा झाला याच्या अनेक रोमांचक कथा आहेत. त्या सगळ्या त्याच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘सिनेमा पाहणारा माणूस’ या पुस्तकात अतिशय प्रभावी आणि रंजक पद्धतीने कथन केल्यात. त्या केवळ सिनेमाच्या बाबतीतच असल्यामुळे अशोकला जवळून ओळखणार्या आमच्यासारख्या मित्रांना तो त्याहीपेक्षा जास्त माहिती असतो.
१९८९च्या डिसेंबरमध्ये मी लिहिलेला, दिग्दर्शित आणि निर्माण केलेला माझा पहिला चित्रपट ‘हमाल! दे धमाल’ प्लाझामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रकाशित झाला आणि मी नाटकातून सिनेमात गेलो. त्यावेळी असलेले नाट्यसमीक्षक मित्र बदलून आता नवीन मित्र मिळाले होते, चित्रपट समीक्षक… त्यात सुधीर नांदगावकर, शरद गुर्जर, पद्माकर कुलकर्णी, कमलाकर नाडकर्णी, दिलीप ठाकूर, श्रीराम खाडिलकर असे नवे जुने मित्र भेटले… त्यात एक लक्षणीय मित्र भेटला… तो म्हणजे ‘अशोक राणे’… अशोक तेव्हा ‘मुंबई सकाळ’मध्ये चित्रपटांवर समीक्षा लिहायचा. सर्वच समीक्षकांनी तोंडभर कौतुक केले होते माझ्या सिनेमाचे, तसेच अशोकनेही केले. काही लोक प्रत्यक्ष भेटलेसुद्धा. समीक्षक तोंडभरून कौतुक करतात तेव्हा त्यांच्या एकूण चित्रपटविषयक ज्ञानाचे प्रचंड कौतुक वाटते. आपल्याला म्हणायचेय किंवा दाखवायचे आहे ते यांनी बरोब्बर ओळखले, असे वाटून त्यांच्या एकूण समीक्षेचे दाखले जाहिरातीत देऊन त्यांना त्याची ताबडतोब पावती देतो. पण त्याच समीक्षकांनी आपल्या पुढच्या कलाकृतीला झोडले की मग मात्र त्यांच्या त्याच ज्ञानाचे वाभाडे काढले जातात. हाच उंदरा-मांजराचा खेळ अव्याहत सुरू आहे.
त्यावेळी अशोक राणे खर्या अर्थाने चर्चेचा विषय झाला तो त्याने एका प्रथितयश दिग्दर्शकाच्या सिनेमावर लिहिलेल्या अतिशय मार्मिक अशा टिपणी करणार्या वाक्यामुळे. त्या दिग्दर्शकाने भर प्रेस कॉन्फरन्समध्ये अशोक राणेंना घातलेल्या शिव्यांमुळे ते प्रकरण वाढत गेले. ज्या वर्तमानपत्रात ही टीका आली होती, त्यांनी अशोकला हे प्रकरण वाढवू नये, थांबवावे असा प्रेमळ आदेश दिला आणि अशोकनेही तो पाळला, कारण त्याला अशा प्रकरणांमुळे प्रसिद्धी मिळवायची नव्हती. सिनेमाविषयक काही भरीव कामगिरी करायची मनीषा तो बाळगून होता. त्यामुळे त्याने पुढे जायचे थांबवले. कालांतराने त्या दिग्दर्शकानेही सर्व विसरायचं ठरवलं. कारण पुढच्याच सिनेमाला पुन्हा एकदा सर्व पत्रकारांनी कौतुकाने चांगलं लिहिलं. अगदी अशोक राणेंनीसुद्धा. दिग्दर्शकालाही आधीचे विसरून जाण्यासाठी एवढे पुरेसे होते.
पण या घटनेमुळे नको असतानासुद्धा अशोकला प्रसिद्धी मिळाली आणि त्यामुळे त्याची अनेकांशी दोस्ती झाली, त्यात मीही होतो. अर्थात ही दोस्ती त्या प्रकरणाबद्दल पावती नव्हती, तर त्यावेळी यानिमित्ताने त्याच्याशी बोलल्यानंतर कळले की, त्याला एकूण सिनेमा या माध्यमाबद्दल किती ओढ आहे, किती आस्था आहे, तळमळ आहे. विशेष म्हणजे ही तळमळ आणि आस्था आजतागायत टिकून आहे.
पहिला ब्रेक
नुसतं समीक्षा लिहीत बसणं ही अशोकची महत्वाकांक्षा नव्हती. त्याला सिनेमा माध्यम हाताळायचं होतं. पण ही गोष्ट इतकी सहज शक्य नव्हती. एखाद्या पालकाला वाटलं की आपला मुलगा सचिन तेंडुलकर व्हावा, म्हणून तो मोठया हौशेने त्याला कुठच्यातरी नामवंत क्रिकेट अकादमीत टाकतो. गल्लीतल्या मैदानात वाट्टेल तशी आडवी तिडवी बॅट फिरवून सेंचुरी मारणारा त्याचा मुलगा, त्या अकादमीत हरवून जातो. कारण पुढे महिनाभर त्याच्या हातात बॅट न येता संपूर्ण मैदानभर इकडे तिकडे धाव, चेंडू पकडून आण… लांबूनच फेक… अशी दुय्यम कामे त्याचा ‘कोच’ त्याला करायला लावत असतो. खूप कष्ट आणि घाम गाळल्यानंतर एके दिवशी कोच हातात बॅट देतो, तशी अवस्था अशोकची एका संस्थेत झाली… ती संस्था होती, भारतीय चित्रपटसृष्टीत, विशेषत: मुंबईतल्या चित्रपट रसिकांना जागतिक सिनेमा दाखवणारी संस्था ‘प्रभात चित्र मंडळ’… या संस्थेत मोठ्या मिनतवारीने अशोक दाखल झाला तो चित्रपट पाहण्याच्या लोभानेच. दर आठवड्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवणार्या ज्या फिल्म सोसायट्या होत्या, त्यांची मातृसंस्था असल्यासारखीच होती ‘प्रभात चित्र मंडळ’. अशोकचा एकूण चित्रपट पाहण्याचा उत्साह आणि शौक त्यावेळच्या आयोजकांच्या, म्हणजे दिनकर गांगल आणि सुधीर नांदगावकर यांच्या नजरेतून सुटणे शक्य नव्हते, त्यामुळे अशोक सहजासहजी ‘प्रभात चित्र मंडळा’च्या कार्यात ओढला गेला आणि अत्यंत समरसून त्याने ते काम केले. अत्यंत वेगळ्या प्रवाहातील जागतिक आणि राष्ट्रीय स्तरांवरचे चित्रपट अशोकला पाहायला मिळाले. तसे हे चित्रपट पाहणारे अनेक होते, पण अशोकने या एकूण प्रभात चित्र मंडळाच्या रसिक जागृती मोहिमेत स्वत:ला झोकून दिले. नुसते चित्रपट पाहणे नव्हे तर त्या चित्रपटांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर लिहून स्वत:मधली प्रगल्भता वाढवण्याचा प्रयत्न केला. कालांतराने अशोक त्यात इतका माहीर झाला की पुढे जेव्हा ‘प्रभात’च्या पुढाकाराने मुंबईत ‘मामि’ फिल्म फेस्टिव्हल सुरू झाले त्यात अशोकने कार्यकर्ता म्हणून अमूल्य योगदान दिले. पुढे ‘एशियन फेस्टिव्हल’ सुरू झाले, त्यातही अशोक मागे नव्हता. सुरुवातीची ही ‘फेस्टिव्हल्स’ आम्ही पाहात असू. मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील अनेक रंगकर्मी सिनेमाच्या ओढीने फेस्टिव्हलला हजर असत. त्यावेळी नेमके कोणते चित्रपट पाहावेत याच्या टिप्स अशोककडून आम्ही घेत असू. ते सर्व चित्रपट अशोकने कुठल्या ना कुठल्या तरी फेस्टिव्हलमध्ये आधीच पाहिलेले असत. त्यामुळे आम्हाला आयतेच चांगले चित्रपट पाहाणे शक्य होत असे. तो १९९२ -९३चा काळ असावा. चित्रपट करणे हे तेव्हा आजच्याइतके सहज सुलभ नव्हते, अगदी मोजके रंगकर्मी दोन्हीकडे काम करीत. त्यामुळे या माध्यमाविषयी अनेकांना अप्रूप होते. ‘मामि’सारखा फेस्टिव्हल उभा करून प्रभात चित्रमंडळाने मुंबईच्या चित्रपट रसिकांवर अनंत उपकार करून ठेवले आहेत. दिनकर गांगल आणि सुधीर नांदगांवकरांसारख्या कर्तव्यकठोर गुरूंच्या तालमीत अशोक शिष्यत्व पत्करून तयार होत होता. या सर्व प्रशिक्षणात अशोकला फेस्टिव्हल आयोजनाचीसुद्धा एक वेगळीच दृष्टी प्राप्त झाली आणि त्याचा त्याने पुढे पुरेपूर फायदा उठवला.
या संपूर्ण प्रक्रियेत अशोकला श्याम बेनेगल, बासू भट्टाचार्य, गोविंद निहलानी यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांचा सहवास लाभला, त्यांच्याबरोबर सिनेमाच्या चर्चा करून एक वेगळा दृष्टिकोन विकसित करून घेता आला. बासू भट्टाचार्यजींबरोबर तर अशोकची खासच गट्टी जमली होती. एक ‘सिनेमा करणारा’ कुशल आणि बुद्धिमान दिग्दर्शक आणि दुसरा ‘सिनेमा पाहणारा प्रेक्षक’ यांची एकमेकांना पूरक अशी जोडीच जमली. त्यांच्या या दोस्तीचा परावर्तित प्रकाश आमच्यासारख्या अशोकच्या मित्रांवरही सातत्याने पडत गेला आणि व्यावसायिक नाटक सिनेमा करताना माझ्यासारख्या निर्माता दिग्दर्शकाला, पुढे ‘भस्म’सारखा चित्रपट करण्याचा योग आला, तेव्हा आपोआपच काही वेगळ्या प्रेरणा मिळत गेल्या. इथपर्यंतच्या प्रवासापर्यंत अशोक राणे हा मुंबईतल्या मराठी चित्रपटसृष्टीतल्या नवोदितच नव्हे, तर अगदी तरबेज दिग्दर्शकांचाही ‘फेस्टिव्हल’ आधारस्तंभ झाला.
दुसरा ब्रेक
१९९४ साली मी एन. चंद्रा यांच्याकरिता त्यांच्या निर्मितीसंस्थेसाठी एक मराठी चित्रपट करीत होतो. ‘अंकुश’, ‘प्रतिघात’ व ‘तेजाब’सारखे लागोपाठ सुपरहिट हिन्दी चित्रपट करणारे एन. चंद्रा यांना मराठी चित्रपटनिर्मितीत पदार्पण करायचे होते, त्यासाठी दिग्दर्शक म्हणून त्यांनी माझी निवड केली ही गोष्ट माझ्यासाठी केव्हाही खूप मोठी होती. पटकथा आणि संवादलेखनासाठी अभिराम भडकमकरला बोलावण्यात आले, अभिरामचा हा पहिलाच चित्रपट. त्यावेळी अचानक अशोक राणे एन. चंद्रा यांच्या कार्यालयात मला भेटला आणि आश्चर्य म्हणजे एन. चंद्रा यांची खास परवानगी काढून आमच्या युनिटमध्ये दाखल झाला. अशोकचा पत्रकारितेतला अनुभव आणि जागतिक दर्जाचे सिनेमे पाहिल्याचा अनुभव असूनसुद्धा चित्रपटनिर्मितीची प्रत्यक्ष प्रक्रिया कशी होते हे जाणून घेण्यासाठी अशोक आमच्यात दाखल झाला. अगदी लेखनप्रक्रियेपासूनच. खरे तर त्याचे इथे येण्याचे कारणच मुळी पुढेमागे चित्रपट-दिग्दर्शनात प्रत्यक्ष उतरणे, हेच होते आणि ते त्याने मुळीच लपवून ठेवले नव्हते. प्रत्यक्ष निर्मितीप्रक्रियेत अशोक राणे, अभिराम भडकमकर आणि एन. चंद्रा यांचा सहभाग असणे ही एक पर्वणीच होती. अशोकने जाणीवपूर्वक केलेला हा सहभाग एके दिवशी त्याला लेखक दिग्दर्शक करणार याची मला खात्री होती आणि पुढे तसेच घडले. कविता महाजन यांच्या ‘ब्र’ या कादंबरीवर आधारित पटकथा-संवाद लिहिण्याची संधी अशोकला मिळाली. अरुण नलावडे यांनी त्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.
क्रिकेटच्या विद्यार्थ्याला जशी खूप उशिरा बॅट हातात मिळते, तसेच अशोकला स्वतंत्रपणे काही करायच्या गोष्टी उशिरा करायला मिळाल्या. पण तयारी पूर्ण झाल्यावरच. प्रत्यक्ष मॅच खेळायला उशीर व्हावा तसा अशोकला चित्रपट दिग्दर्शित करण्याची संधी उशिरा मिळाली आणि त्याने ‘कथा तिच्या लग्नाची’ हा चित्रपट लिहून दिग्दर्शित केला. हा चित्रपट करायला घेतला आणि सर्वत्र हवाहवासा वाटणारा अशोक तो चित्रपट पूर्ण करेपर्यंत अक्षरश: संत्रस्त झाला. अनेक कटू अनुभव त्याला या प्रोसेसमध्ये आले. कारण अशोक सोडून त्या प्रक्रियेतला प्रत्येक माणूस या ना त्या कारणाने त्याला सीनियर होता. त्यामुळे समर्थपणे वर्कशॉप हाताळणार्या अशोकलाच कित्येक लोकांनी शिकवायला सुरुवात केली. मात्र त्यातून शांतपणे वाट काढून अखेर अनेक बरेवाईट अनुभव घेऊन अशोकने चित्रपट पूर्ण केला. चित्रपट पाहून तो समजून घेऊन त्याच्यावर आपली मते मांडून चित्रपटजगतात स्वत:ची जागा निर्माण करणार्या अशोकवर प्रत्यक्ष चित्रपट दिग्दर्शित करून पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत अतिशय कठीण दिव्याला सामोरं जावं लागलं. निर्माता पैसेवसुलीसाठी अडून बसला, अखेर गुजराती नाटककार आणि लेखक मित्र संजय छेल आणि पानिपतकार विश्वास पाटील हे मदतीला धावून आले आणि स्वत:चे वजन वापरून निर्मात्याला चॅनलमधून आणि सरकारी अनुदानातून पैसे वसूल करून दिले आणि या चित्रपटनिर्मितीच्या पनिपतातून अशोक राणे यांची सुखरूप सुटका झाली.
अशोकच्या एकूण चित्रपटविषयक संघर्षाचं हे एकच नव्हे तर अशी अनेक प्रकरणं आहेत. त्याला संघर्षाशिवाय कधीच काही मिळाले नाही. बालपण गुजरातमध्ये नवसारीत गेलं, तिथे गावाच्या बाहेर एक थेटर होते, तिथे जाऊन सिनेमा बघायचा म्हणजे संघर्ष आलाच; कारण तो घरच्यांना न सांगता बघावा लागायचा. नंतर मुंबईत आल्यावर सांताक्रूझला अशा ठिकाणी राहावं लागलं जिथून तंगडतोड करीत शाळा गाठावी लागायची. पुढे वरळीला राहायला आल्यावर जरा बरं वातावरण झालं आणि सिनेमा बघण्याचा सपाटा सुरू झाला. ग्रॅज्युएशन पूर्ण करून वर्तमानपत्रात छोटे छोटे लेख लिहून पुढे समीक्षक झाला, तेव्हाही संघर्ष चुकला नाही. त्यानंतर प्रभात चित्रमंडळातून तावून सुलाखून बाहेर पडला आणि पुनः नव्या संघर्षाला सामोरं गेला. या सर्वातून एक महत्वाची गोष्ट झाली… हे सर्व करीत असताना त्याचा जागतिक चित्रपटांचा अभ्यास अगदी कसून सुरू होता आणि परिणामी जगातल्या विविध देशातून विविध स्पर्धांसाठी ‘ज्युरी’ म्हणून अशोक वारंवार परदेशात जाऊ लागला.
ब्रेक के बाद
आज अशोक पुन्हा सर्वत्र हवहवासा असतो, कारण त्याने जगभर स्वत:चे असे संबंध अनेक संस्थांशी तयार केले आहेत. ‘श्वास’नंतर, म्हणजे २००० सालानंतर मराठी चित्रपटसृष्टीने चांगलीच कात टाकली. नवे विषय, नवा विचार घेऊन नवे निर्माता-दिग्दर्शक प्रवेश करते झाले. त्यांना जागतिक बाजारपेठ खुणावू लागली आणि त्या बाजारपेठेचा रस्ता अशोक राणेच्या पायाखालचा आहे ही अशा लोकांसाठी पर्वणी ठरली. हे सर्व नवे दिग्दर्शक हमखास अशोकशी संपर्क साधतात आणि आपल्या चित्रपटाला परदेशातल्या फेस्टिव्हलमध्ये कसे उजवता येईल याची पूर्वतयारी करतात. अशोकमध्येही त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मार्गदर्शन करायची ऊर्जा कायम आहे. आज या ना त्या फेस्टिव्हलच्या निमित्ताने अशोकचा एक पाय परदेशात असतो. विजय कदम तर त्याला गमतीत एकदा म्हणालासुद्धा, अशोक राणेकडे भारताचा ‘व्हिसा’ आहे.
अशोकचे संघर्षमय जीवन वाचल्यास एक गोष्ट लक्षात येते की त्याने जेवढे मानसन्मान मिळवले त्यापेक्षा जास्त ‘अपमान’ सहन केले. मात्र त्यातून तो घडत गेला. पत्रकारिता हळूच बाजूला ठेवून चित्रपटविषयक लिखाण केले. पुस्तके लिहिली. तीन तीन ‘राष्ट्रीय पुरस्कार’ पुस्तकांबरोबर घरात आले. सहा ते सात माहितीपट तयार केले. मा. दत्ताराम आणि अँथनी गोन्साल्वीस या हिन्दी चित्रपटसृष्टीतील दिग्गज संगीतकार आणि म्युजिक अरेंजर्सवर केलेले अभ्यासपूर्ण माहितीपट खूपच लोकप्रिय आहेत. कोकणच्या ‘दशावतार’ आणि ‘खेळे नमन’वरही माहितीपट करून स्वत:च्या मातीचे सांस्कृतिक ऋण फेडले. ऐन तरुण्यात मुंबईतल्या गिरणगावाने आयुष्याच्या खाच-खळग्यांची जाणीव करून दिली आणि पुढे येणार्या संघर्षाला तोंड देण्याची जिद्द आणि खुमारी दिली, त्या गिरणगावावर सध्या अशोक राणे एक प्रदीर्घ माहितीपट करण्यात गुंतले आहे. उशिरा का होईना, चित्रपट माध्यमाच्या दिग्दर्शनाचा ‘सूर’ अशोकला गवसला आहे. मातीतली मढी उकरून न काढता मातीतलं सांस्कृतिक वैभव उभं करून सजवण्यात आणि जिवंत करण्यात अशोक आज व्यस्त आहे आणि अर्थात याबरोबर हा ‘सिनेमा पाहाणारा माणूस’ सिनेमे बघतोच आहे. ती संख्याही मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढतेच आहे. आजच्या नवीन पिढीसाठी तीन तीन चार चार दिवसांचे वर्कशॉप्स घेऊन त्यांच्या चित्रपटविषयक जाणिवा तीव्र करण्याचे कार्यही सुरू आहे. ‘मी शिकलो, माझं काम झालं’, असं न म्हणता जगात कुठे काय स्पर्धा होत आहेत, त्यात आपल्या भारतीय मुलांनी आवर्जून भाग घ्यावा, या भावनेने त्या स्पर्धांची माहिती तो नियमितपणे पोचवत असतो. मुलांनी स्पर्धेत भाग घेतला की त्याला प्रचंड आनंद होतो. अशीच एक जाहिरात त्याने माझ्या मुलीला गौतमीला पाठवली, तिने त्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपल्या शॉर्ट फिल्म्स पाठवल्या आणि गेल्या वर्षी तिला दोन्ही ठिकाणी पुरस्कार मिळाले. या आशा गोष्टी त्याला भरपूर आनंद देऊन जातात. आज अशोकची एक मुलगी पॅरिसमध्ये आहे आणि दुसरी न्यूयॉर्कमध्ये. त्यामुळे चिपळूणला जाता जाता रत्नागिरीला पण जाऊन यावं तसं अशोक मुलींकडे जाऊन येतो. त्याची ‘टाइम्स ग्रुप’मध्ये इंग्रजी विभागात कार्यरत असलेली पत्नी ही त्याची उत्तम क्रिटिक आहे. त्यामुळे आपोआपच त्याच्या इंग्रजीचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. प्रभात चित्र मंडळातून फेस्टिव्हल्सचे धडे घेतलेला अशोक आता गेली काही वर्षे औरंगाबाद येथे होणार्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचा संचालक म्हणून कार्यरत आहे.
अशोक राणे आता केवळ एक पत्रकार, किंवा समीक्षक मित्र न राहाता चित्रपटजगतातील एक दीपस्तंभ म्हणून उभा आहे. कोणत्याही देशातल्या कोणत्याही सिनेमाबद्दल, तिथल्या जागतिक दर्जाच्या दिग्दर्शक, अभिनेत्याबद्दल कोणतीही माहिती हवी असल्यास लांबून हाक मारली तरी हा दीपस्तंभ जवळ येऊन तुम्हाला आनंदाने ती माहिती देईल.
पत्रकारितेच्या कोशातून बाहेर पडून उमललेल्या या ‘सिनेमा पाहाणार्या माणसा’च्या संघर्षमय रंगीबेरंगी फुलपाखराचे विहरणे जगभर असले, तरी याचा पाया प्रचंड अनुभवाच्या अथांग समुद्रात रुतलेला आहे, हे विसरता येत नाही.