देशात मॉन्सूनचे आगमन झाले आहे, त्याचवेळी पश्चिम किनारपट्टीवर बिपरजॉय नावाचे एक चक्रीवादळ घोंघावत आले आहे. हा अंक तुम्ही वाचत असाल त्या दिवशीच्या वर्तमानपत्रात कदाचित या वादळाने घडवून आणलेल्या उत्पाताच्या बातम्या असतील… मात्र, आज बाहेरून येणारे कोणतेही वादळ चिल्लर वाटावे, अशा भयकारी आवर्तात देश सापडलेला आहे. केंद्रातल्या ज्या मोदी सरकारची नऊ वर्षे नुकतीच पूर्ण झाली, त्या सरकारच्या काळात हळुहळू या वादळाने जोर पकडला आणि आता ते प्रचंड वेगाने घोंघावू लागले आहे… २०२४ सालापर्यंत हे वादळ कोणकोणत्या भागांमध्ये झंझावात बनून भिरभिरेल आणि काय काय उद्ध्वस्त करून सोडेल ते सांगता येणार नाही… हे वादळ आहे परधर्मद्वेषाचे आणि देशात फूट पाडणार्या आसुरी सत्ताकांक्षेचे. रामाचे नाव घेऊन सत्तेवर रावणांचे राज्य प्रस्थापित झाले आहे की काय, अशी भीती वाटण्यासारखी देशाची वाटचाल भयंकर गर्तेच्या दिशेने सुरू झालेली आहे.
या वादळाच्या मोजमापाची सुरुवात मोदी सरकार याच शब्दप्रयोगापासून करता येईल. आजवर दिल्लीत जेवढी सरकारे आली गेली, ती सगळी त्या त्या पक्षाच्या किंवा आघाडीच्या नावाने ओळखली गेली. पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान. या देशाची पायाभरणी त्यांनी केली. देवदुर्लभ अशी अफाट लोकप्रियता त्यांना लाभली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर, बळजबरीने कोणाच्या गळ्यात न पडताही, त्यांना मोठी मान्यता होती. तरीही त्यांचे सरकार कधीही नेहरू सरकार या नावाने ओळखले गेले नाही. देशात पाकिस्तानद्वेषाची भाषणे देऊन सत्तेत येऊन नंतर वाट वाकडी करून तिकडे केक खायला जाण्याची भंपक राजनीती न करता वेळ आल्यावर पाकिस्तानचे दोन तुकडे करून दाखवणार्या इंदिरा गांधी या रणरागिणीचे सरकार कधी इंदिरा सरकार या नावाने ओळखले गेले नाही. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीत केंद्र सरकार, भारतीय जनता पक्षाचे सरकार किंवा एनडीए सरकार या ओळखी पुसून मोदी सरकार अशी नवी शब्दरचना अस्तित्त्वात आली. देशात संघराज्यात्मक संसदीय लोकशाही आहे की अध्यक्षीय लोकशाही आहे, हेच कळू नये, अशी ही रचना आहे. मोदींच्या या आत्मलुब्धतेचा आणि गर्वोन्नततेचा सर्वोच्च आविष्कार म्हणजे नव्या संसदेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांनी करून घेतलेला राज्याभिषेक! या सोहळ्यात देशाच्या राष्ट्रपतींना योग्य मान दिला गेला नाही, हे देशातील जनतेला पसंत पडलेले नाही.
स्वघोषित विश्वगुरूंचे दुर्भाग्य असे की या सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून दिल्लीच्या अतिउत्साही पोलिसांनी वास्तवातले राष्ट्रगौरव असलेल्या कुस्तीगीरांवर बलप्रयोग केला, त्याच्या बातम्या दुसर्या दिवशी मोदीस्तुतीमग्न माध्यमांनाही छापाव्या लागल्या. त्यात तो सोहळा काळवंडला आणि ज्या प्रकारे अयोध्येतल्या बाहुबली रावणाला संरक्षण देण्यासाठी मोदींनी छातीचे कवच केले आहे, ते पाहून या रावणाकडे नेमके कोणाचे काय गुह्य दडले आहे, असा प्रश्न जनतेला पडला. चीनला डोळे लाल करून दाखवणारे (पण जाहीर मंचावर कुठेही चीनचे नाव घेण्याची हिंमतही न दाखवणारे) थोर नेते त्याला इतके का घाबरतात, हेही लोकांना जाणून घ्यायचे आहे.
कुस्तीगीरांच्या आंदोलनाने घसरलेली मोदींच्या मीडिया मॅनेजमेंटची गाडी बालासोरच्या विचित्र अपघातानंतर आणखी घसरली आहे. या दुर्घटनेला मोदी सरकारचे रेल्वेकडे दुर्लक्ष कारणीभूत ठरले आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. मूळ कोकण रेल्वेची अँटि कोलिजन डिव्हाइसची रचना होती. ती कवच हे फॅन्सी नाव देऊन आपणच शोध लावल्यासारखी नाचवली, गाजवली गेली. प्रत्यक्षात या इव्हेंटबाजीत गाड्यांना कवचाचे संरक्षण देणे राहूनच गेले. प्रवाशांच्या जिवाची सुरक्षा हे रेल्वेच प्राधान्य असायला हवे. त्या सुरक्षेसाठी दिलेला निधी वापरलाच गेला नाही आणि जिथे वापरला तिथे तो अधिकारी वर्गाच्या सुखसोयी, फुट मसाज यंत्रे वगैरे अनुत्पादक गोष्टींवर खर्च झाला हे कॅगच्या अहवालात उघड झाले आहे. रेल्वे ही देशातल्या लाखो लोकांची प्रमुख वाहतूकदार आहे. या प्रवाशांच्या जिवाशी खेळणे हा देशद्रोह नाही का?
नऊ वर्षांच्या कालावधीत जनतेसाठी नेमके काय केले, देशाचा काय फायदा केला, हे मोदी सरकार सांगू शकत नाही. देशावरचे, पर्यायाने देशातल्या नागरिकांवरचे कर्ज अमाप प्रमाणात वाढवणे, मित्रांची भर करणे आणि मानवी प्रगतीच्या सर्व निर्देशांकांवर देशाला तळाला ढकलणे, हे काही चारचौघांत सांगण्यासारखे नाही. त्यामुळेच मग हिंदू-मुस्लिम हा हुकमी खेळ खेळणे सुरू आहे. केरळ स्टोरीसारख्या काल्पनिक कथानकावर आधारलेल्या सिनेमाची भलामण करून आपल्याच देशातले सर्वात प्रगत राज्य बदनाम करण्यापर्यंत खुद्द पंतप्रधानांची मजल जाते, हे भयंकर आहे. ज्यांनी देश एक ठेवायचा, तेच देशात फूट पाडत सुटले आहेत, आपली सत्ता नाही, ती राज्ये बदनाम करत सुटले आहेत. इकडे काल्पनिक लव्हजिहादची हाकाटी देऊन आक्रोश मोर्चे काढायचे आणि दुसरीकडे औरंगजेबाला थडग्यातून बाहेर काढून दंगली घडवायच्या हे उद्योग सुरू झाले आहेत.
महाराष्ट्रात मिंधे सरकारच्या विरोधात प्रचंड रोष आहे. शिवसेना पक्ष फोडणे या एकाच उद्देशाने मिंध्यांचे बंड घडवले गेले होते, आता त्यांचा वापर संपत आल्याने त्यांनाही बाजूला केले जाणार आहे, याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेनेत फूट पाडली की आपण सत्तेत येऊ हा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. राज्यात जेव्हा कुठे, जी कोणती निवडणूक होईल, तिच्यात भाजप आणि मिंधे गटाचा पालापाचोळा होणार आहे, हे त्यांचेच अहवाल सांगत आहेत. तेव्हा आता उत्तर प्रदेश आणि गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात विद्वेषाची आग पेटवण्याचे उद्योग सुरू झालेले आहेत. आजवर या भोंदुत्ववाद्यांना थारा न देणार्या कोल्हापुरात पहिला ‘प्रयोग’ झाला आहे. अर्थात, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राने अशी अनेक वादळे थोपवली आहेत. कोल्हापूरच्या दंगलीतून धडा घेऊन उर्वरित राज्यात असले अनुचित प्रकार घडू न देणं, ही सुजाण मराठीजनांची जबाबदारी आहे. अन्यथा शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा सांगण्याचा अधिकार आपल्याला उरणार नाही.