• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

शिवसेनेचा मुंबई महानगरपालिकेत दणदणीत प्रवेश!

- योगेंद्र ठाकूर (गाथा शिवसेनेची)

Nitin Phanse by Nitin Phanse
December 15, 2022
in गर्जा महाराष्ट्र
0

‘ठाणे जिंकले आता मुंबई जिंकणार’ – शिवसेनेने केला निर्धार!’
शिवसेनेने ठाणे नगरपालिकेवर भगवा फडकवून निवडणुकीतील राजकारणात प्रवेश केला होता. बाळासाहेबांनी मार्च १९६८मध्ये होणार्‍या मुंबई महानगरपालिका लढवण्यासाठी सहकार्‍यांशी चर्चा सुरू केली. मुंबईत शिवसेनेतर्फे रक्तदान शिबिरे, नेत्रदान शिबिरे असे समाजोपयोगी उपक्रम राबवले जात होते. रोज नवीन शाखा स्थापना होऊन त्या त्या विभागातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शाखेतील शिवसैनिक पुढाकार घेत होते. शिवसेना शाखेत न्याय मिळतो असा विश्वास जनतेच्या मनात निर्माण झाला होता. त्यामुळे शिवसैनिकांचा प्रतिदिन जनतेशी संपर्क वाढतच होता. राजकारणाचा उपयोग व्यापक समाजकारणासाठी होऊ शकतो, तेव्हा निवडणुकीत भाग घेणे क्रमप्राप्तच होते. दरम्यान निवडणूक आयोगाने २६ मार्च १९६८ ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली.
याआधीच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. मात्र शिवसेनेने काँग्रेसचे दास्य पत्करले नाही. या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने प्रजासमाजवादी पक्षाशी युती केली. प्रजासमाजवादी पक्षातील एका गटाला शिवसेनेसारख्या जातीय पक्षाबरोबर युती केलेले पटले नाही. त्यांची नाराजी दूर करण्यात प्रा. मधु दंडवते यांना काही प्रमाणात यश आले. शिवसेनेने ८३ तर प्रजासमाजवादी पक्षाने ३२ उमेदवार जाहीर केले. शिवसेनेतर्फे दत्ताजी साळवी, डॉ. हेमचंद्र गुप्ते, प्रमोद नवलकर, मनोहर जोशी, सुधीर जोशी, वामनराव महाडिक, दत्ताजी नलावडे, अमरनाथ पाटील, शरद आचार्य हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तर प्रजासमाजावादीतर्फे प्रा. सदानंद वर्दे, प्रमिला दंडवते. डॉ. बाबा कलगुटकर, सुधाकर तोरणे, डॉ. बी. एम. ढब्बुवाला आदी उमेदवार होते. ही सगळी रथी-महारथी मंडळी होती. शिवसेना आणि प्रजासमाजावादी पक्षाने शहराला स्वच्छ कारभार देण्याचे वचन दिले. बिगरनागरी प्रश्नांची महापालिकेत चर्चा करायची नाही असे आश्वासन दिले. बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतील काँग्रेसच्या स. का. पाटीलांचे साम्राज्य संपवण्याचे आवाहन केले. आमचा ठाण्याचा कारभार पाहा आणि आम्हाला मते द्या असेही सांगितले.
मुंबईतील शिवाजी पार्क, कामगार मैदान आणि चौपाटी येथे बाळासाहेब ठाकरे आणि प्रा. मधु दंडवते यांच्या संयुक्त सभा झाल्या. दत्ताजी साळवी यांची मुलुखमैदानी तोफ साथीला होतीच. मनोहर जोशी, प्रमोद नवलकर यांची दादर, माहीम, गिरगाव, गोरेगाव आदी ठिकाणच्या सुशिक्षित, मध्यमवर्गीय व नोकरदार, मराठी माणसाच्या वस्तीत प्रचारसभा झाल्या. चौपाटी येथे झालेल्या जाहीर सभेत समाजवादी पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष नानासाहेब गोरे यांनी शिवसेनेची भूमिका अराष्ट्रीय नसून महाराष्ट्रीय माणसाची न्याय्य गार्‍हाणी मांडणारी आहे, अशी स्पष्ट कबुली दिली.
त्या काळी भिंती रंगवून राजकीय पक्ष उमेदवाराचा प्रचार करीत असत. त्यात आकर्षक आणि मनोरंजनात्मक पण लक्ष वेधून घेणार्‍या घोषणा होत्या. ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते, शिवसेनेला मत देऊन येते’, ‘असशील खरा मराठी तर, राहशील उभा शिवसेनेच्या पाठी’, ‘बुंद जो बन गयी मोती, शिवसेना हमारा साथी’, ‘वाहतो ही दुर्वांची जुडी, शिवसेनेची पालिकेवर उडी’ अशा घोषणांनी भिंती रंगल्या होत्या. शिवसेनेच्या ‘बजाव पुंगी हंटाव लुंगी’ या घोषणेला ‘धोती-लुंगी एक है, टाटा बिर्ला दुश्मन है’ अशा घोषणांनी कम्युनिस्टांनी उत्तर दिले होते. परळ-लालबाग-गिरगाव या कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यावर शिवसेनेने मुसंडी मारली होती. किल्ला खिळखिळा करायला सुरूवात केली होती. लालबाग-परळच्या चाळींमध्ये तर ‘शिवसेना उमेदवार सोडून इतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांना या इमारतीत प्रवेश नाही’ अशा चक्क पाट्या होत्या. शिवसेनाप्रमुख साधी, सोपी पण अर्थवाही भाषा वापरून मराठी मतदारांना भावनिक आवाहन जाहीर सभांमधून करीत होते. मुंंबईत शिवसेना का हवी हे मद्रास, कलकत्त्याचे उदाहरण देऊन पटवून देत होते. बाळासाहेबांनी निवडणुकीपूर्वी २४ मार्च १९६७च्या ‘मार्मिक’च्या अंकात ‘अवघा हल्लकल्लोळ करावा’ असा अग्रलेख लिहून शिवसेनेला एकदा संधी देण्याची विनंती मुंबईकरांना केली. त्यात म्हटले होते, ‘मुंबईच्या मतदारांनो ज्या संधीची तुम्ही काही वर्षे वाट पाहत होतात, ती संधी आली आहे. २६ मार्चला शिवसेनेच्या बाजूने कौल दिलात की चार दिवसांनी वर्ष प्रतिपदेच्या मुहूर्तावर महाराष्ट्राच्या या राजधानीत शिवरायांचा पवित्र भगवा डौलाने फडकताना आपणाला दिसेल. यापूर्वी काँग्रेस आणि संपूर्ण महाराष्ट्र समिती या दोघांना आपण संधी दिली, पण या दोघांनी आपण कारभार करण्यास नालायक आहोत हेच सिद्ध केले. म्हणून जनतेने नव्या दमाच्या शिवसेनेला संधी दिली पाहिजे. ही संघटना ताज्या दमाची आहे. तिच्यापाशी भरपूर कल्पनाशक्ती आहे आणि नागरिकांची सेवा करणे ही इच्छा आहे. या मुंबापुरीचा कारभार स्वच्छ करण्याची आणि त्याच्याबरोबरही नगरीही स्वच्छ करण्याची प्रतिज्ञा शिवसेनेने केली आहे. महाराष्ट्रावर मोगलांचे परचक्र आले. तेव्हा ‘देव मस्तकी धरावा, अवघा हल्लकल्लोळ करावा,’ असा संदेश समर्थांनी दिला होता. २६ मार्चला मुंबईकरांनी असाच हल्लकल्लोळ करावा ही आजची गरज आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्रित घ्या आणि शिवसेना व प्रजासमाजवादी पक्षांच्या उमेदवारांवर मतांचा पाऊस पाडा. मुंबई महापालिकेवर भगवा ध्वज फडकलाच पाहिजे. कारण हा भगवा ध्वज त्यागाचा, चरित्र्याचा आणि शुद्धतेचा आहे. जयहिंद, जय महाराष्ट्र!’
बाळासाहेबांनी केलेल्या या आवाहनाला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यावेळी मुंबईत मराठी माणूस ३६ टक्के होता. महाराष्ट्रासाठी लढणारी समिती ही कम्युनिस्टांच्या वळचणीला जाऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. त्यामुळे समिती आणि शिवसेना यांच्यात मराठी मतांची फूट होईल असा अंदाज राजकीय पंडितांनी वर्तवला होता. पण प्रत्यक्षात निवडणुकीचा निकाल लागला, तेव्हा समितीचा दारुण पराभव झाला होता. शिवसेनेला पदापर्णातच चांगले यश लाभले. शिवसेनेचे ४२ वाघ निवडून आले, तर प्रजासमाजावादी ११ उमेदवार विजयी झाले. काँग्रेस, कम्युुनिस्टांच्या मातब्बर नेत्यांना शिवसेनेने धूळ चारली. शिवसेनेच्या प्रमोद नवलकर यांनी काँग्रेसच्या बेलोसे यांचा पराभव केला तर दत्ताजी साळवी यांनी दिग्गज प्रकाश मोहाडीकर यांचा पराभव केला. शिवसेनेचे ८ ते १० उमेदवार फक्त १५ ते १५० मतांच्या फरकांनी पराभूत झाले होते. ते विजयी झाले असते तर या मुंबईतील पहिल्या निवडणुकीत शिवसेनेने अर्धशतक पार केले असते.
निवडून आलेले शिवसेनेचे नगरसेवक हे अत्यंत सामान्य, गरीब व मध्यमवर्गातील होते. जनतेला ‘आपला माणूस’ निवडून आल्याचे समाधान होते. त्यामुळे शिवसेनेची जबाबदारी वाढली होती. अपेक्षितप्रमाणे प्रिं. मनोहर जोशी यांची शिवसेना गटनेतेपदी नेमणूक झाली.
२८ मार्च १९६८ रोजी महाराष्ट्र टाइम्सच्या ‘समाजकार्याची अमूल्य संधी’ या अग्रलेखात या विजयासंबंधी लिहिले की, ‘‘समितीच्या मुंबईच्या नागरी कारभारातून अस्त आणि शिवसेनेचा प्रमुख पक्ष म्हणून उदय ही घटना अत्यंत सूचक आहे. चोख व स्वच्छ कारभाराने सार्‍या भारतापुढे आदर्श ठेवण्याची संधी त्यांना लाभली आहे. शिवसेनेच्या कामगिरीवरच तिचे भवितव्य अवलंबून आहे.’’
त्याआधीच्या निवडणुकीत १८ जागा जिंकणार्‍या कम्युनिस्टांना फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसची सदस्यसंख्याही कमी झाली. शिवसेनेच्या हाती नगरपालिकेच्या सत्तेची चावी आली नसली तरी प्रबळ विरोधी पक्ष म्हणून प्रवेश मिळाला. या संधीचे सोने करण्यासाठी शिवसेनेचे सर्व नगरसेवक कार्यरत झाले. या मुंबापुरीचे नगरपिते म्हणून नव्हे तर खर्‍या अर्थाने नगरसेवक बनले. नागरी समस्या सोडविण्यासाठी नगरसेवक काय करू शकतो याचे उदाहरणच शिवसेनेचे नगरसेवक आपल्या कार्याने देत होते. एक आदर्श ठेवला. त्यामुळे अल्पकाळात शिवसेनेचे नगरसेवक लोकप्रिय झाले, लोकमान्य झाले.
शिवसेनेच्या पहिल्या बॅचच्या नगरसेवकांची कार्यपद्धती, प्रशासनावरील पकड, नागरी समस्यांचे निराकरण करण्यासाठीचा पाठपुरावा, यामुळे लोकसंग्रह वाढला. लोकांचा सतत पडणारा गराडा वाढल्यामुळे दिवसेंदिवस शिवसेना भक्कम होत गेली. याचा उपयोग मुंबई शिवसेना संघटना वाढीसाठी आणि मजबूत करण्यासाठी झाला.

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

तारें जमीन पर!

Next Post
तारें जमीन पर!

तारें जमीन पर!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.