महिलांना स्वतःचे अस्तित्व, कर्तृत्व दाखविण्याची महत्त्वाकांक्षा मनात असते पण तिच्या त्या कल्पनाच ठरतात. रूढी, परंपरा यातून ती आजही मुक्त नाही. त्यात तिचा कोंडमारा होतो. एका गंभीर विषयाकडे तिरकस फॅन्टसीच्या नजरेतून मनोरंजनासोबत प्रबोधन करण्याचा हा प्रयत्न यशस्वी झालाय. आजच्या विनोदी नाटकांच्या गर्दीमध्ये हे नाटक लक्षवेधी ठरलंय.
– – –
कुटुंबाच्या केंद्रस्थानी स्त्री असते. ती कुटुंबाचा एक मजबूत पायाच. पण आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत नवर्याची बंधने, वर्चस्व बायकोने स्वीकारलेच पाहिजे, असा मतप्रवाह आजही दिसतो. पुरुषाच्या दोन बायका किंवा मैत्रिणी प्रसंगी स्वीकारल्या जातात, पण बायकोने तो प्रकार केला तर समाज या नातेसंबंधाला स्वप्नात तरी मान्यता देईल काय? अर्थातच नाही. आजवर ‘दोन बायका फजिती ऐका’ अशा कथानकावर बरीच नाटके आली आहेत. पण ‘हसता हा सवता’ या नाटकात नेमका उलटा प्रकार आलाय. तो म्हणजे ‘एक बायको, दोन नवरे!’ आणि त्यांची फजिती ऐका!
नाटकाची शीर्षकापासूनच हसवणूक सुरू होते. शीर्षकात तीन शब्द आहेत. दोन शब्द एक केले तर ‘हासवता’ बनते. तसाच नाटकाचा गाभाही हासवता-हसवता पुरेवाट करतोय. अर्थपूर्ण शीर्षक फिट्ट जुळून आलंय. या कल्पकतेला दादही अगदी ‘टायटल’पासूनच मिळते!
या नाटकामुळे काही विक्रम, योगायोग जुळून आलेत. त्याची नोंद घेणे क्रमप्राप्त ठरेल. नाट्यतंत्रावर हुकमत असलेले अभ्यासू दिग्दर्शक कुमार सोहोनी यांच्या नाट्य कारकीर्दीतले हे पन्नासावे नाटक. दुसरं म्हणजे, विनोदवीर आणि स्वतःची वेगळी ओळख असलेला अभिनेता प्रियदर्शन जाधव याचे हे पंचविसावे नाटक. गायक अभिनेता म्हणून स्वतःचा ठसा उमटवणार्या अमोल बावडेकरने या नाटकात विनोदी ढंगाची भूमिका न गाता पूर्ण तयारीने सादर केलीय. ‘गायक नट’ ही ओळख पुसण्याचा त्याचा प्रयत्न यशस्वी झालाय.
पडदा उघडतो तेव्हा स्वर्गलोकातून ढगाआडून विष्णू-पार्वती भटकंती करताना दिसतात. चौदा अवतार असलेला पुराणातील विष्णू भगवान आणि उभ्या जगाची माता ‘जगम्माता’ जी शिवाची पत्नी पार्वती. दोघेजण पृथ्वीतलावरल्या कौटुंबिक नातेसंबंधावर चर्चा करतात. त्यातून एक गोष्ट अलगद उलगडत जाते आणि हे दोघे या नाट्यातले सूत्रधारच ठरतात. संपूर्ण नाटकभर त्यांचे प्रगटीकरण आणि त्यावरली शेरेबाजी चालू असते. एका मध्यमवर्गीय टिपिकल दांपत्याच्या घरापर्यंत आपण पोहोचतो.
मानव आणि गार्गी हे दांपत्य वैवाहिक जीवन सुखाने जगत आहे. एकमेकांवर त्यांचे जिवापाड प्रेम. पण नवरा संशयी. पत्नीच्या पाकिटात मिळालेल्या हॉटेलच्या बिलातून संशयकल्लोळ सुरू. करिअर करण्याची इच्छा असलेल्या बायकोला अनेक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष समस्यांना तोंड द्यावे लागते. घराबाहेर आणि घरात मानसिक ताप सहन करावा लागतो. चाकोरीबाहेरचं तिचं जिणं. संशय, वाद वाढतात. या दांपत्यात एक धक्कादायक घटना घडते आणि आकाश हा तरुण प्रगटतो. आकाश-गार्गी यांचा विवाह आणि हनिमून हा पहिला नवरा मानव याच्या समक्ष होतो. दोन नवरे आणि एक बायको यांचा संसार सुरू. त्यातून एकेक घटना आकाराला येतात. तिघाजणांचे खरे चेहरे त्यातून प्रकाशात येतात. धक्कातंत्राने ही फॅन्टसी कळसाला पोहचते. कथानक पूर्णपणे ‘कथन’ करून लज्जत घालवणे अन् गुपित उघड करणे म्हणजे रसभंग होईल… शेवटचा ‘बोध’ महत्त्वाचा ठरतो!
पाच पात्रांभोवती नाटक मजबुतीने गुंफले आहे. जबाबदार विष्णूच्या भूमिकेत प्रसाद दाणी आणि धूर्त पार्वती- श्रद्धा पोखरणकर या दोघांची पुराणातील गेटअपमधली आजची भाषा बोलणारी जोडी शोभून दिसते. मानवच्या भूमिकेत प्रियदर्शन जाधव. उत्स्फूर्तपणा त्याच्यात खच्चून भरलेला आहे. देहबोली लवचिक आणि संवादावर प्रभुत्व यामुळे मानव बाजी मारतो. त्याची पत्नी गार्गी हिच्या भूमिकेत अश्विनी जोशी हिने चांगली साथसोबत केलीय. तिचा बिनधास्तपणा शोभून दिसतो. अमोल बावडेकरने भोळेपणा भरलेला ‘चमू’ आकाश बारकाव्यासह पेश केलाय.
‘फॅन्टसी’तून पुन्हा भानावर येण्याचा प्रसंग, बेडरूममधला हनिमून, थिएटरमधला एकाकीपणा, विष्णू-पार्वतीमधला मॉडर्न संवाद, मुलाखतीचा सिलसिला यातलं ‘नाट्य’ चांगले रंगले आहे, जे पकड घेते. बेरका संशयी पहिला नवरा; भोळा सिधासाधा दुसरा नवरा आणि बोल्ड बायको यांच्याभोवतीचे नाट्य विनोदी ढंगात हशे-टाळ्या वसूल करते. ‘पात्र’निवड शंभर टक्के यशस्वी झालीय. सारे शोभून दिसतात.
लग्न किंवा ‘लिव्ह इन’ यात आपण ‘प्रेम’ करतो का जबरदस्तीने मालकी हक्क गाजवतो, असा प्रश्न उभा करून एकूणच या नाजूक संबंधांवर विचार करायला लावणारं हे नाटक आहे. त्यादृष्टीने काढलेले ‘चिमटे’ अलगदपणे सजग तर करतातच, पण त्यातून निखळ विनोदनिर्मितीही होते.
दिग्दर्शन आणि प्रकाशयोजना या दोन्ही जबाबदार्या कुमार सोहोनी यांनी एकहाती पेलेल्या आहेत. प्रकाशयोजनेत वेगळेपणा करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. प्रत्येक प्रसंग बंदिस्त आणि उत्कर्षबिंदू वाढविणारा करण्यामागे त्यांचा प्रयत्न आहे. शाब्दिक कोट्यांना अनुरूप हालचाली चांगल्या बांधल्या आहेत. नाट्य कुठेही रेंगाळणार नाही याचीही खबरदारी दिग्दर्शनकौशल्यातून घेतली आहे. बर्याच वर्षांच्या मध्यंतरानंतर ‘विनोदी फॅन्टसी’ नाटकाला त्यांनी साज चढवला असून त्यातली हुकमत सिद्ध केलीय. कथानकात ‘फॅन्टसी’ आहे हे पहिल्याच काही प्रसंगात उघड जरी झाले असले तरी एकूणच सादरीकरणातून त्याचा विसर पडतो. त्याला दिलेली ट्रीटमेंट भुरळ पाडते. थक्क करते. हळुवार आणि वास्तव गोष्ट ठरते.
जन्मरहस्य (डॉ. आनंद नाडकर्णी), कुणीतरी आहे तिथं (सुरेश खरे), वासूची सासू (प्रदीप दळवी), लग्नाची बेडी (आचार्य अत्रे), रातराणी (प्र. ल. मयेकर) अशा काही नाटकांना दिग्दर्शक सोहोनी यांनी यापूर्वी दिग्दर्शनासोबतच प्रकाशयोजनाही सांभाळली होती. प्रकाशयोजना या तांत्रिक दालनाला त्यांनी महत्त्व दिले आहे. प्रकाशात वेगळेपणा आणणारा ‘प्रयोग’ दिसून येतो. वेशभूषा आणि रंगभूषा यावरही खास लक्ष दिलंय. विष्णू-पार्वतीचा गेटअप तसेच आकाशची वेशभूषा नजरेत भरते.
नाट्यसृष्टीत एका प्रदीर्घ कालखंडाचे साक्षीदार असलेले जेष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांचे नेपथ्य नाटकाला लाभले आहे. दामू केंकरे, विजया मेहता यांच्या नाटकांसह आजवर पाचेकशे नाटकांचे नेपथ्य त्यांनी साकार केलेय. यातही त्यांनी नेपथ्यरचनेत सरकत्या दाराचा प्रभावी वापर करून थिएटर, हॉटेल, स्वर्गलोक यांचा आभास प्रभावी साकार केला आहे. नाटक जरी दोन खोल्यांत घडत असले, तरी त्यात सुटसुटीतपणा दिसतो. कोच, बेड यांची हालचालींना पूरक अशी मांडणी आहे. नेमकी सामुग्री प्रसंगाना पूरक ठरतेय.
रंगभूमीवरल्या सर्व दालनातील अनुभवी रंगकर्मी पुरुषोत्तम बेर्डे यांचे संगीत ही एक आणखी जमेची बाजूच म्हणावी लागेल. ‘मेंदीच्या पानावर’ पासून ‘खिलौना जानकर मुझको’पर्यंत अनेक गाण्यांच्या तुकड्यांचा वापर करून त्यांनी विनोदाला चांगली झालर दिली आहे. संगीत भडक नाही ते अर्थपूर्ण झालंय. टायटल साँग ताल धरायला भाग पाडणारे. विनोदाची लज्जत वाढविणारे.
नाटककार अभिराम भडकमकर याची सशक्त विनोदी संहिता हे या नाटकाचे प्रमुख वैशिष्ट्य. ‘देहभान’, ‘ज्याचा त्याचा प्रश्न’, ‘पाहुणा’, ‘हसत खेळत’, ‘प्रेमपत्र’, ‘याच दिवशी याचवेळी’, ‘सुखांशी भांडतो आम्ही’, ‘आलटून-पालटून’ ही त्यांची आजवरची गाजलेली नाटके. ‘असा बालगंधर्व’मुळे तर आदर्श चरित्र कादंबरीचे दर्शनच मराठी वाचकांना झाले. एक सुवर्णकाळ जागा झाला. ‘अभिराम आणि कुमार’ ही नाटककार-दिग्दर्शक युती यापूर्वीही ‘देहभान’ आणि ‘सुखांशी…’ यात चांगली पकड घेणारी सिद्ध झाली होती. आता हे पुढलं ‘फॅन्टसी’चे पाऊल मजबुतीने आकाराला आलंय. संहिता आणि दिग्दर्शक यातलं ट्युनिंग मस्त जमलंय. सार्या तांत्रिक बाजू नाट्याला गती देणार्या ठरतात.
स्वतःचे अस्तित्व, कर्तृत्व दाखविण्याची महत्त्वाकांक्षा बाईच्या मनात असते पण तिच्या त्या कल्पनाच ठरतात. रूढी, परंपरा यातून ती आजही मुक्त नाही, त्यात तिचा कोंडमारा होतो. जयवंत दळवी यांचे ‘बॅरिस्टर’, ‘महासागर’, ‘संध्याछाया’, ‘कालचक्र’, ‘पर्याय’, श्री. ना. पेंडसे यांचे ‘रथचक्र’, विजय तेंडुलकर यांचे ‘कमला’, ‘कन्यादान’, रत्नाकर मतकरींचे ‘अग्निदिव्य’, प्रशांत दळवींचे ‘ध्यानीमनी’, ‘चारचौघी’, वसंत कानेटकर यांचे ‘पंखांना ओढ पावलांची’, शेखर ताम्हाणे यांचे ‘सविता दामोदर परांजपे’ अशी अनेक गाजलेली नाटके याला साक्ष आहेत. अशा या गंभीर विषयाकडे तिरकस फॅन्टसीच्या नजरेतून पाहून मनोरंजनासोबत प्रबोधन करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. आजच्या विनोदी नाटकांच्या गर्दीमध्ये हे नाटक लक्षवेधी ठरलंय.
हसता हा सवता
लेखक – अभिराम भडकमकर
दिग्दर्शक – कुमार सोहोनी
नेपथ्य – बाबा पार्सेकर
संगीत – पुरुषोत्तम बेर्डे
प्रकाश – कुमार सोहोनी
निर्माता – भाऊसाहेब भोईर
सूत्रधार – भैरवनाथ शेरखाने
निर्मिती – मोरया थिएटर्स, स्मितहरी आणि वेदांत