माझ्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन २००६ साली झाले, तेव्हा माझे शिक्षक डॉ. रवी बापट यांनी मला ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना कार्यक्रमाला बोलवण्यास सांगितले. सावंतांशी माझी ती पहिली भेट. त्यानंतरच्या अनेक भेटींमधून ते माझ्यासाठी पंढरीकाका कधी झाले, हे कळलंच नाही. अफाट वाचन आणि व्यासंग, शिवसेना संघटना ते राजकीय पक्षाची वाटचाल, प्रबोधनकार ठाकरेंचं सगळं लिखाण, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, दुसरे महायुद्ध, हिटलरचं राजकारण अशा गोष्टींचा चालताबोलता एन्सायक्लोपिडीया म्हणजे पंढरीकाका. केईएमला शिकत असताना साप्ताहिक मार्मिकच्या ऑफिसला जाऊन पंढरीकाकांसोबत गप्पा मारण्याचा छंदच मला जडला होता.
पत्रकार होण्याआधी बस कंडक्टर, मुंबई महापालिकेच्या उर्दू शाळेत चित्रकला शिक्षक असा हा प्रवास प्रबोधनकार ठाकरेंचे स्वीय सहाय्यक व लेखनिक इथपर्यंत येऊन पोहोचला. ‘श्री’ साप्ताहिक, दैनिक ‘लोकमत’ अशा विविध ठिकाणी पत्रकारिता करत बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत विश्वासू म्हणून साप्ताहिक मार्मिकमध्ये त्यांची कार्यकारी संपादक म्हणून नेमणूक होणे, ही त्यांची प्रतिभा, गोष्टींकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन आणि अनुभव यांचा सन्मान होता. ‘शिवसेना’ या संघटनेच्या नावावर शिक्कामोर्तब झाले त्या बैठकीत प्रबोधनकार आणि बाळासाहेब यांच्याव्यतिरिक्तचे तिसरे साक्षीदार म्हणजे पंढरीनाथ सावंत. अनेकदा गप्पा सुरू असताना, ही बैठक कशी झाली, कोण कुठे बसले होते आणि प्रबोधनकारांचे डोळे कसे चमकले आणि त्यांच्या मुखातून ‘शिवसेना’ या नावाचा कसा उल्लेख झाला, याचा कौतुकाने एकपात्री प्रयोगच ते मला करून दाखवत. १९६६ साली शिवसेनेची घोषणा झाली, त्या स्टेजला बाळासाहेबांच्या सोबतीने बांबू-काठ्या आवळणारे आणि स्टेजवर सतरंजी टाकणारी व्यक्ती म्हणजे पंढरीकाका. शिवाजी पार्क येथील पहिल्या सभेत गर्दीतून ‘शिवसेनाप्रमुख’ अशी पहिली घोषणा देणारी व्यक्ती कोण होती आणि ती दादरला कुठे राहायची ते घर पंढरीकाकांनी त्या रस्त्यावरून जाताना मला अनेकदा दाखवले आहे.
शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात मातोश्रीच्या बैठकीत आमदार, खासदार, मंत्री ठरायचे. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी बसलेल्या पंढरीनाथांना बाळासाहेब विचारायचे, ‘पंढरी तुला काय हवंय?’ यावर बाळासाहेबांचा हात हातात घेऊन ते म्हणायचे, ‘ तुम्ही आहात ना.’ ठरवले असते तर पत्रकारांना मिळणारे कोट्यातील घर काय, शिवसेना सत्तेत असताना केंद्रीय मंत्रीपदापर्यंतही त्यांना पोहचता आले असते. परंतु ते ठरवून या सगळ्यापासून लांब राहिले.
बदललेल्या पत्रकारितेमध्ये नैतिकतेने पत्रकारिता करणारे महत्त्वाचे मालुसरे पंढरीनाथ सावंत यांच्या रूपाने धारातीर्थी पडले, याचे आज मनस्वी दु:ख होत आहे. वैजापूरला गेल्यावर माझी एकही मुंबईवारी पंढरीकाकांना भेटल्याशिवाय पूर्ण झाली नाही. काळाचौकीच्या रस्त्यावरील बैठ्या चाळीतील त्यांचे पत्र्याचे एका खोलीचे घर हा माझ्यासाठी एक वैचारिक राजमहल होता. त्यांच्या घरासमोरील ‘माय लॉन्ड्री’ चा मालक संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत फ्लोरा फाऊंटनला १०७ हुताम्यांपैकी एक कसा होता, असे अनेक किस्से त्यांच्या घरात त्यांच्याशेजारी बसून मी ऐकले आहेत.
सामनामधील माझ्या ‘हे बोलायलाच हवं’ या स्तंभाचे पुस्तक निघाले. त्यावेळी पंढरीकाकांनी फोन केला. या पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरेंच्या हस्ते करू, असं त्यांनी सांगितलं आणि मी तारीख घेतोय, तू षण्मुखानंद हॉल बुक कर असा आदेश सोडला. त्या पुस्तक प्रकाशनाला स्टेजवर उद्धव साहेब, रामदास कदम, मनोहर जोशी, दिवाकर रावते, संजय राऊत, सुभाष देसाई, सुनील प्रभू असे शिवसेनेच्या पहिल्या फळीतील सर्व नेते माझे पुस्तक हातात घेऊन मंचावर उपस्थित होते. अशी होती पंढरीकाकांची किमया आणि प्रेम.
इतक्या थोर व्यक्तिमत्त्वाला शेवटच्या क्षणी हलाखीत जीवन व्यतीत करावे लागले. माझ्या परिने शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांना जी काही मदत करू शकलो, त्याबद्दल माणूस म्हणून मला समाधान वाटते. शेवटच्या काही भेटींमध्ये पंढरीकाकांनी मला सांगितले होते की, ‘मी गेल्यावर आला नाहीस तरी चालेल, पण बाळासाहेबांनी मला त्यांच्या संग्रही असलेले दिलेले रुद्राक्ष आणि माझी सर्व पुस्तके मी तुझ्या नावावर करतो आहे. ती मात्र नंतर येऊन नक्की घेऊन जा.’ परवा मध्यरात्री पंढरीकाका झोपेतच चिरनिद्रेत गेले. जड हृदयाने मी ती पुस्तके घ्यायला जाईन, पण तिथे पंढरीकाका नसतील हे सत्य पचवता येत नाही. माझ्यावर त्यांनी मुलासारखे प्रेम केले. त्यांची गेल्या १८ वर्षांची सोबत ही अनंत जन्मांच्या साथीसारखी होती. आज ती साथ सुटली, पण हे नातं कायम स्मरणात राहील.
– डॉ. अमोल अन्नदाते