• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

हिंदुत्त्व : बाटग्यांचे नकली आणि शिवसेनेचे बावनकशी!

- योगेंद्र ठाकूर

चित्रसेन चित्रे by चित्रसेन चित्रे
May 12, 2022
in कारण राजकारण
0

निवडणुकीच्या दरम्यान `गर्व से कहो हम हिंदू है’ ललकार्‍याने हिंदूंनी एकगठ्ठा मते कधी जनसंघ-भाजपला मिळाली नाहीत. परंतु १९८७च्या विलेपार्ले पोटनिवडणुकीत शिवसेनाप्रमुखांनी `गर्व से कहो हम हिंदू है’चा नारा दिला आणि सगळे वातावरण हिंदूमय, भगवे झाले. शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली हिंदू एकवटला. १९८७ साली हिंदुत्त्वाच्या मुद्यावर लढवलेली विलेपार्ले पोटनिवडणूक शिवसेनेने जिंकली आणि या मुद्द्यावर निवडणूक जिंकता येते हे सार्‍या देशाला दाखवून दिले.
– – –

गेल्या पंधरा दिवसात अजान, भोंगा, महाआरती आणि हनुमान चालिसाच्या नावाखाली महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक वातावरण प्रदूषित करण्याचे काम स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणणारे मतलबी पक्ष आणि बाटगा फोर्स करीत आहे. निवडणुका जवळ आल्या की मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी ही सगळी नाटकं करतात. भगवी शाल पांघरून आणि हनुमान चालिसा पठण करून आपलं हिंदुत्व हेच खरं हिंदुत्व असे दावे करायचे आणि महाविकास आघाडी बनवून सत्तेत आल्यापासून शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली असल्याची टीका करायची, हे असंच एक नाटक आहे. त्याला शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार उत्तर देताना म्हटले की, मला भगवी शाल पांघरण्याची गरज नाही. हिंदुत्त्वावर बेगडी प्रेम करणार्‍या या सर्वांना मी आठवण करून देतो की हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर पहिली निवडणूक १९८७ साली शिवसेनेने लढवली आणि जिंकलीही! हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकता येते हे हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रथम दाखवून दिले. नविंहदुत्त्ववाद्यांना विलेपार्ले पोटनिवडणुकीत शिवसेनेने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाची आठवण करून देण्यासाठी हा लेखप्रपंच.
`गर्व से कहो हम हिंदू है’ हा नारा जनसंघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि भाजप वर्षानुवर्षे देत होते. पण या नार्‍याने कधीही हिंदू पेटून उठला नाही. निवडणुकीच्या दरम्यान `गर्व से कहो हम हिंदू है’ ललकार्‍याने हिंदूंनी एकगठ्ठा मते कधी जनसंघ-भाजपला मिळाली नाहीत. परंतु १९८७च्या विलेपार्ले पोटनिवडणुकीत शिवसेनाप्रमुखांनी `गर्व से कहो हम हिंदू है’चा नारा दिला आणि सगळे वातावरण हिंदूमय, भगवे झाले. शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली हिंदू एकवटला. १९८७ साली हिंदुत्त्वाच्या मुद्यावर लढवलेली विलेपार्ले पोटनिवडणूक शिवसेनेने जिंकली आणि या मुद्द्यावर निवडणूक जिंकता येते हे सार्‍या देशाला दाखवून दिले.
१९८७ साली लढल्या गेलेल्या या निवडणुकीची पार्श्वभूमीही तशीच होती. देशात शहाबानो प्रकरण नुकतेच गाजले होते. शहाबानो या तलाकपीडित मुस्लीम महिलेने १९८१ साली मध्य प्रदेश हायकोर्टात पोटगीसाठी दावा केला होता. निकाल तिच्या बाजूने लागला. नंतर तिचा पती अहमद खान सर्वोच्च न्यायालयात गेला. १९८५ साली सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश हायकोर्टाचा निकाल कायम केला. नंतर न्याय मागणार्‍या शहाबानोने घुमजाव केले. तेव्हा तिच्यावर वर्तमानपत्रातून आणि समाजाच्या विविध थरातून टीका झाली. या संबंधात `मार्मिक’मध्ये `चिरफाड’ सदराखाली एक उपहासात्मक अनावृत पत्र छापले होते. शिवसेनाप्रमुख चिडून म्हणाले होते की, `सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिमेची आणि नागरी कायद्याची होळी करणार्‍या जात्यंध मुसलमानांना या देशात थारा नाही.’ मुंबईतील लाखो मुस्लिमांनी मंत्रालयात प्रचंड मोर्चा नेऊन मुस्लीम महिलांना पोटगीचा हक्क देणार्‍या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध नोंदविला. देशात अनेक ठिकाणी यासंबंधात मोर्चे निघाले. मुंबईत याविरोधात शिवसेनेने `इस्लाम खतरे में’ या ‘देश खतरे में’ असा आवाज देणारा प्रचंड मोर्चा २७ डिसेंबरला काढला आणि कडकडीत बंदही पाळला. या प्रकरणाने संपूर्ण देशाला एक समान नागरी कायदा असावा का? याची चर्चा सुरू झाली.
१९८६ साली नाशिक येथे गुढीपाडव्याच्या मिरवणुकीवर पोलिसांनी बंदी घातल्यामुळे हिंदूंमध्ये पसरलेल्या संतापाचे पर्यवसान आंदोलनात झाले. त्यानंतर नाशिक, मालेगाव, नांदेड, पनवेल आदी ठिकाणी शिवजयंती मिरवणुकीवर दगडफेक झाली आणि त्याचे पर्यवसान दंगलीत झाले. मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड जिल्ह्यातही याचे पडसाद उमटले आणि जाळपोळ, दंगली झाल्या. त्याआधी १९८०च्या दशकात पंजाबमधील खलिस्तानवाद्यांनी हिंदूंवर केलेले अत्याचार, कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याचा प्रश्न, जळगाव-भिवंडी आदी शहरात हिंदू-मुस्लिमांच्या दंगली, जात्यंध मुसलमानांचा हैदोस महाराष्ट्रातील हिंदू जनतेने पाहिला होता, अनुभवला होता, त्याच्या झळा सोसल्या होत्या. हिंदूंवर अन्याय होत गेला, तेव्हा वेळोवेळी शिवसेनेने हिंदुंच्या रक्षणासाठी पुढाकार घेतला. शिवसैनिक वेळप्रसंगी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी हिंदू समाजाचे संरक्षण केले हा इतिहास आहे.
‘मार्मिक’मध्ये २९ नोव्हेंबर, १९८७ रोजी `पहिले पाऊल पार्ल्यात’ हा अग्रलेख छापून आला. १९८५च्या विधानसभा निवडणुकीत विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले काँग्रेसचे हंस भूग्रा यांच्या आकस्मिक निधनामुळे १३ डिसेंबर १९८७ रोजी ही पोटनिवडणूक झाली. ही पोटनिवडणूक का लढवीत आहोत ते शिवसेनाप्रमुखांनी अग्रलेखाच्या सुरूवातीलाच स्पष्ट केले. `विलेपार्ल्याची ाfनवडणूक जाहीर झाली आणि आम्ही अवधान राखून योग्य वेळी डॉ. रमेश प्रभू यांची उमेदवारी जाहीर केली. त्यापूर्वी शिवसेना ही निवडणूक लढविणार नाही अशा वावड्या उठविण्यात येत होत्या. आमची त्यामुळे करमणूक होत होती. ज्या मतदारसंघात आमचे पाच नगरसेवक आहेत, त्या मतदारसंघात आम्ही निवडणूक लढविणार नाही असे म्हणणे म्हणजे आंध्रच्या निवडणुकीत तेलगू देसम उमेदवार उभे करणार नाही असे म्हणण्यासारखे आहे. काही लोक शिवसेना उमेदवार उभा करणार नाही अशा स्वप्नात मश्गुल होते. आम्ही त्यांना त्या स्वप्नावस्थेतून बाहेर काढल्याबद्दल खेद व्यक्त करतो. डॉ. प्रभू यांना आम्ही केवळ उभे केलेले नाही तर त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणून शिवसेनेच्या महाराष्ट्र राज्यातील सत्ताग्रहणाचे पहिले पाऊल पार्ल्यात टाकणार आहोत. हे केवळ कुडबुड्या ज्योतिषाचे भाकीत नसून सह्याद्रीच्या काळ्या दगडावर स्पष्टपणे दिसणारी रेघ आहे.’ विलेपार्ल्यातील शिवसेनेच्या यशाची नांदी निवडणूक जाहीर झाली त्याच दिवशी झाली. कारण सर्वच पक्षांसमोर सध्याच्या शिवसेनामय हिंदुत्ववादी वातावरणात उमेदवार कोणास करावा हा यक्षप्रश्न उभा राहिला. निवडणुकीत सुरुवातीला इतर पक्षांचे तीन उमेदवार होते. भाजपातर्फे अरूण साठे (भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांचे बंधू), जनता पार्टीतर्फे प्राणलाल व्होरा, काँग्रेसतर्पेâ प्रभाकर कुंटे रिंगणात होते. स्वत:ला हिंदूंचा कैवारी समजणार्‍या भाजपाने आपला उमेदवार मागे घेऊन शिवसेनेला पाठिंबा दिला नाही; पण, विलेपार्ल्यातील सुजाण मतदारांना, संघाच्या स्वयंसेवकांना, हिंदूमहासभेच्या कार्यकर्त्यांना हा भाजपचा निर्णय पटला नव्हता. निवडणुकीला १४ उमेदवार उभे राहिले असले तरी खरी लढत काँग्रेसचे प्रभाकर कुंटे, जनता पार्टीचे प्राणलाल व्होरा आणि शिवसेनेचे डॉ. रमेश प्रभू यांच्यातच होती. या विधानसभा क्षेत्रात येणार्‍या सहापैकी शिवसेनेचे पाच नगरसेवक होते. बाळासाहेबांनी या निवडणूक प्रचाराची जबाबदारी शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यावर सोपवली होती तर विभागप्रमुख दादा वेदपाठक हे निवडणूक कार्यालयीन प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळत होते. सुभाष देसाई प्रचारयंत्रणा राबवत होते, तेव्हा या यंत्रणेत काही वेळा माझाही सहभाग असायचा. त्यामुळे बाळासाहेबांच्या सहाही प्रचारसभांना उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळाले. सहाही वॉर्डात शिवसेनाप्रमुखांच्या दणदणीत प्रचारसभा झाल्या. प्रत्येक सभेला हिंदूभिमानी जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभत होता. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या ज्वलंत विचाराने मतदार पेटून उठला होता. शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी गुजरातहून शंभू महाराज देखील आले होते. तेही प्रचारात सामील झाल्यामुळे विलेपार्लेतील गुजराती समाज शिवसेनेकडे आपसूकच वळला. जितेंद्र आणि ऋषी कपूर या अभिनेत्यांनी देखील प्रचारसभांना हजेरी लावली. मूळचा मार्क्सवादी विचाराचा पगडा असलेला आणि नक्षली चळवळीविषयी सहानभूती दाखवणारा मिथुन चक्रवर्तीही साहेबांबरोबर प्रचारात हिंदुत्वाच्या बाजूने भाषणे देत होता.
त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शंकरराव चव्हाण होते. त्यांना ही पोटनिवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकायची होती. विलेपार्ले मतदारसंघातील सुशिक्षित मतदार, ब्राह्मण मतदारांवर प्रभाव पाडू शकेल, अशा प्रभाकर कुंटे यांना शंकररावांनी उमेदवारी दिली होती. शिवसेनाप्रमुखांनी उमेदवाराची जात बघून कधीही उमेदवारी दिली नाही, शिवसेनेत जातीपातीच्या राजकारणाला थारा नाही. १९७० साली परळ विधानसभा पोटनिवडणूक शिवसेनेने जिंकली. तेव्हा शंकरराव चव्हाण हंगामी मुख्यमंत्री होते तर, १९८७च्या विलेपार्ले पोटनिवडणुकीच्या वेळी शंकरराव चव्हाणच मुख्यमंत्रीपदी होते. दोन्ही खेपेस शिवसेनेचा विजय झाला आणि शंकररावांच्या पदरी पराभवच पडला.
१४ डिसेंबर, १९८७ रोजी पार्ले पोटनिवडणुकीचा निकाल लागला. शिवसेनेचे डॉ. रमेश प्रभू ११ हजार मतांनी विजयी झाले. ११ उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या. शिवसेनाप्रमुख उद्गारले, `आता राज्य आमचे!’ नंतरच्या ‘मार्मिक’मध्ये `हा विजय हिंदुत्वाचा!’ असा अग्रलेख छापून आला. त्यात ते म्हणतात… `हा विजय भवानी मातेचा आहे. आई जगदंबेचा आहे. कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचा आहे. प्रभू रामचंद्राचा आहे. डॉ. प्रभू निमित्तमात्र आहे. आम्हीही निमित्तमात्र आहोत, म्हणून आम्हाला या धवल यशाचा अभिमान वाटत असला, तरी गर्व वाटत नाही. घमेंड तर नाहीच नाही. या पराक्रमाचे श्रेय द्यायचेच झाले तर विलेपार्लेच्या जनतेच्या खालोखाल महिनाभर तहान भूक विसरून जिवापाड मेहनत घेणार्‍या सार्‍या शिवसैनिकांना द्यावे लागेल. रात्र जागविणार्‍या आमच्या सहकार्‍यांना द्यावे लागेल. नगरसेवकांना द्यावे लागेल. विभागप्रमुखांना द्यावे लागेल. शाखाप्रमुखांना द्यावे लागेल. त्यांनी दिलेल्या एकाकी झुंजीचे विलक्षण दर्शन विलेपार्ल्यात घडले. एकेकाळी हिंदुत्वाची मशाल हाती घेणारा जनसंघ कोठे आणि आज हिंदुधर्माच्या विरोधात उभा राहणारा भारतीय जनता पक्ष कोठे? देशाच्या प्रजासत्ताक दिनावर बहिष्कार घालणार्‍या शहाबुद्दिनच्या आणि गणपतीसमोरची आरास लाथेने तुडवणार्‍या निहाल अहमदच्या जनता पक्षाशी निका लावून भाजपने विलेपार्ल्यात हे अकाली वैधव्य कशासाठी पत्करले? स्वत:चा उमेदवार उभा करायचा नव्हता तर स्वस्थ बसायचे. ते सोडून स्वत:च्याच हाताने तोंडाला काळे कशासाठी फासून घेतले? आपले हे दळभद्री धोरण आपल्याच हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना कदापि मान्य होणार नाही. एवढेही समजण्याइतके तारतम्य भाजपच्या नेत्यांना नव्हते काय?’
अग्रलेखात पुढे असेही म्हटले आहे की नजीकच्या भविष्यकाळात संपूर्ण देश हिंदूमय होऊन सार्‍या जगात तो हिंदूंचा हिंदुस्थान म्हणून ओळखला जाणार आहे. त्या हिंदुस्थानात फक्त राष्ट्रवादी लोकांना थारा राहणार आहे आणि सर्व धर्माचे राष्ट्रवादी सुखासमाधानाने राहून या देशाची, हिंदूधर्माची कीर्ती वाढविणार आहेत. ते युगप्रवर्तक कार्य शिवसेनेच्या हातून घडावे अशीही त्या श्रींचीच इच्छा आहे. म्हणून विलेपार्ल्यात आम्हाला विजयाचा प्रसाद मिळाला. विजय हिंदुत्वाचा झाला आणि यापुढेही या देशात हिंदुत्वाचा आणि हिंदुत्वाचाच विजय होत राहील अशी आम्ही समस्त हिंदूंना कृतज्ञतापूर्वक ग्वाही देऊ इच्छितो.’
या निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेते व चाणक्य प्रमोद महाजन यांनी मान्य केले की हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर मत मिळू शकतात व निवडणूक जिंकता येते हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विलेपार्ले पोटनिवडणूक जिंकून दाखवून दिले आहे. त्यानंतर निवडणुकीसाठी हिंदुत्त्वाच्या मुद्यावर भारतीय जनता पक्षाने शिवसेनेशी युती केली आणि एकत्रितपणे निवडणूक लढले आणि जिंकले. आज भारतीय जनता पक्ष हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवून विजयाचे इमले बांधत आहेत. त्या इमल्याची पहिली वीट शिवसेनेने १९८७ साली रचली होती. हे भाजपने विसरता कामा नये.
भाजपवाल्यांनी कितीही थयथयाट केला आणि बाजारबुणगे नाचवले तरी भाजपाचे हिंदुत्त्व हे कथलाचे आहे तर शिवसेनेचे हिंदुत्व हे बावन्नकशी सोने आहे हे सुजाण हिंदुंना नक्कीच कळते.

Previous Post

जनमन की बात

Next Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

टपल्या आणि टिचक्या

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.