पूर्वीच्या उपनयन व विवाह सोहळ्यांची माहिती असलेले काही सुंदर लेख मध्यंतरी वाचण्यात आले. कापडाचोपडापासून किराणा मालापर्यंतची खरेदी व रक्ता-बिनरक्ताच्या नातेवाईकांची तगडी मदत वगैरे अनेक गोष्टी वाचतांना तो काळ डोळ्यापुढे नकळत तरळत गेला. रितीभातींचा मान राखत, मानापानाचा आब ठेवत मोजक्याच गंगाजळीच्या भरवश्यावर होणारी ती कार्यं आजकालच्या पोकळ दिखाव्यापेक्षा वैâकपटीने समृद्ध होती असे वाटून गेले. दागदागिने व कपड्यांचे मोजके व ठरावीकच प्रकार जसे प्रचलित होते नं, तसेच पक्वान्नांचेही. जेवणाच्या मुख्य पंगतीला जिलेबीला पर्याय नसे, खाऊ म्हणून बुंदीचा लाडूच बने तसेच सिमांतीपूजनाच्या जेवणाची सांगता शिरा किंवा सुधारसाने व्हायची. शिरा लग्नाच्या जेवणातील पक्वान्न म्हणून नाही, पण मधल्या वेळचे खाणे व मुख्य म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून नक्कीच लोकप्रिय आहे, सुधारस मात्र कालौघात बराच मागे पडलाय नाही का?
‘अतिपरिचयात अवज्ञा’ म्हणावं अशी काहीशी स्थिती झाली असावी साखरेच्या ह्या एकेकाळच्या हुकूमी पदार्थाची. पूर्वी साखरही जपून वापरली जाई म्हणून सुधारसाचे जास्त कौतुक असेल; आता काय, सुबत्तेच्या वाहत्या पाटांमध्ये खिजगणतीमध्येही नाही राहिला तो.
खूप सोपे आहे सुधारस बनविणे, एक वाटी साखर असेल तर अर्धी वाटी पाणी व पाव वाटी लिंबाचा रस हेच काय ते मुख्य घटक. अर्थात स्वाद वाढवायला ह्यात वेलदोड्याची पूड, केशर व सुकामेवा नक्कीच घालता येतो. साखरेचा, पाणी मिसळून एकतारी पाक करायचा, मग दुधाचा शिपका मारून पाकातली मळी काढून घ्यायची, अर्थात हे ऐच्छिक. मग त्या शुभ्र पाकात लिंबाचा रस व केशर वेलदोड्याची पूड, घालायचे असतील ते सुक्या मेव्यातले पदार्थ मिसळून पाक मंद आचेवर आटवायचा. गार झाल्यावर साधारण मधासारखा दाटपणा यायला हवा, त्या अंदाजानी पाक आटवायचा. मग केशरी रंगाचा घट्टसर व आंबटगोड चवीचा सुधारस तयार होतो खायला. पोळीशी किंवा पुरीशी लावून खातांना ब्रम्हानंदी टाळी लागलीच पाहिजे बघा पक्क्या खवय्याची!!
ह्या मूळ सुधारसात उपलब्धतेनुरूप केळी, आंबा किंवा अननसाच्या फोडी घातल्या की आणखीन साज चढतो ह्या शालीन पक्वान्नाला!
मागच्याच आठवड्यात मी बनवून बघितला सुधारस, पहिल्यांदाच. फारशी काहीच खटपट नसलेला व मोजून दहा मिनिटांत बनणारा हा पदार्थ चवीला तर आवडलाच पण जास्त भावला तो त्याचा साधेपणा. सहज हाताशी असलेल्या साहित्यात तयार होणारा, फारशा पाककौशल्याचीही गरज नसलेला हा पदार्थ निरपेक्ष वृत्तीचे प्रतीक वाटला. अतिशय कमी गरजा असलेला व खाणार्याला पुरेपूर गोडवा देणारा सुधारसही किती सहज शिकवून जातो नं एक श्रेष्ठ तत्वज्ञान?
आयुष्यात साधनांचाच फाफटपसारा वाढला की नकळत त्यांचा उपभोग घ्यायलाही फुरसत मिळत नाही, आनंद मिळणं तर दुरापास्तच. सडकून भूक लागली असेल, तर पंचपक्वान्नांनी भरलेल्या ताटापेक्षा बर्याचदा हातावर घेऊन खाल्लेली चटणी पोळी जास्त समाधान देते, कारण पर्यायांमधून निवड करण्यात बुद्धी खर्च न होता समोर आलेल्या एकाच पर्यायातून भूक भागवण्याचा मूळ आनंद व समाधान मिळते. सीमित गरजांची पूर्ती होणे सहजसाध्य तर असतेच, पण त्यामुळे आपोआपच मनाचे समाधान चिरकाळ टिकते.
‘फारश्या अपेक्षा न ठेवणं’ ह्या गोष्टीला नकारात्मकतेचा गंध येतो कधीतरी; मात्र त्याच्या बरोबरीने आहे ती परिस्थिती आनंदाने स्वीकारणं जमलं की सकारात्मकतेचा झरा प्रवाही होतो. नौबतखान्यातील श्री माताजी सारदादेवींचे दिवस आठवले की ह्या स्वीकाराचे व त्यापलीकडच्या प्रेयसापेक्षा श्रेयसाच्या ध्यासाचे महत्व पटते. ह्या लहानसहान गरजा पूर्ण करण्याच्या नादात आपण मुळ उद्दिष्टापासून विचलीत होत असू तर सगळेच व्यर्थ ठरते, नाही का? ठाकुरांच्या सहवासात राहणे व त्यांची सेवा करणे हे त्यावेळी फक्त त्या लहानश्या नौबतखान्यात राहूनच शक्य होते. दरवेळीच सगळे मनाजोगते होईलच असे नाही, पण परमेश्वरी योजनेचा भाग म्हणून प्राप्तकाळ निभावता आला की एक पुढचा टप्पा गाठलाच समजायचा माणूसपणाच्या वाटचालीचा.
आलेला प्रसंग साजरा करण्याचा विवेकही माताजी निरनिराळ्या गोष्टींमधून कित्येकदा देतात, एकदा त्या भक्तांबरोबर प्रवासात असतांना शिजलेल्या भाताचे भांडे कलंडले व भात सांडला. ठाकुरांच्या नैवेद्यासाठी बाकी काही नव्हतेच. गोंधळून न जाता वरवरचा भात पत्रावळीवर वाढून नैवेद्य अर्पण करणार्या व आहेत ते दोन घास समाधानानी खाणार्या माताजी मला मनोमन भावतात, अगदी त्या सुधारसासारख्याच!!