बच्चूमास्तरचं खरं नावही कुणाला माहीत नव्हतं. त्यांच्या जवळचे असलेल्या प्रबोधनकारांनाही ते कधी कळलं नाही. त्यांची आठवण काढणारंही कुणी नाही. पण या साध्या माणसाने अनेकांना आधार दिला. अनेक नाटक कंपन्या बुडताना वाचवल्या. नव्या नाटक कंपन्या उभ्या केल्या. पण त्याच्या निरपेक्ष कामाची नोंद प्रबोधनकार वगळता कुणीच घेतलेली दिसत नाही.
….
नाटक कंपनीत गेल्यानंतर प्रबोधनकारांना नाना तर्हेची माणसं भेटत राहिली. त्यातल्या अनेकांचं चित्रण त्यांनी आत्मचरित्राबरोबरच ‘जुन्या आठवणी’ या पुस्तकातही केलंय. त्यात सगळ्यात लक्षात राहतात ते बच्चूमास्तर. शंभर वर्षांपूर्वी मराठी मुलखातली अनेक नाटकवेडी रसिक माणसं नाटक कंपन्यांना आपल्याला जसा जमेल तसा आधार देत होती, म्हणून हा आतबट्ट्याचा व्यवसाय टिकून राहू शकला. मराठी नाटक कंपन्या एक मोठा इतिहास घडवू शकल्या. मोठमोठे लेखक कलावंत अजरामर झाले. पण पडद्याआड राहून नाटक कंपन्यांना जिवंत ठेवणार्या रसिकांची इतिहासात कुठेच नोंद नाही. प्रबोधनकारांमुळे बच्चूमास्तर हा एक थोडासा अपवाद ठरले.
बच्चूमास्तरांचा नाटकाशी थेट संबंध नव्हता. ते रेल्वेवाले. जीआयपी रेल्वे म्हणजे ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे म्हणजेच आताच्या मध्य रेल्वेत ते ट्राफिक कन्व्हेयर या हुद्द्यावर काम करत होते. ते पद महत्त्वाचं असावं. मुंबई ते नागपूर–जबलपूर आणि दक्षिणेकडे गुलबर्ग्याजवळच्या वाडी जंक्शनपर्यंत ते फिरतीवर असायचे. प्रबोधनकार तीन छोट्या वाक्यांत त्यांचं व्यक्तिमत्व डोळ्यांसमोर उभं करतात, `बच्चूमास्तर देहाने जसा अवाढव्य, तसा मनाने विशाल. त्याच्या हृदयाची श्रीमंती अफाट.’
मुंबईतल्या एम्पायर हिंदू हॉटेलात बच्चूमास्तरांसाठी एक खोली कायम राखीव ठेवलेली असायची. ही बहुतेक रेल्वे कंपनीने केलेली व्यवस्था असावी. आजही हे हॉटेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या अगदी समोर एम्पायर बिल्डिंगमधे आहे. बच्चूमास्तर देतील ती जेवणाची ऑर्डर हॉटेलला पूर्ण करावीच लागे. त्यामुळे कुणीही ओळखीचा भेटला की बच्चूमास्तर त्याची राहण्याखाण्याची व्यवस्था आपल्यासोबत करत. कुणी गरजवंत रस्त्यावर जरी भेटला तरी त्याला स्वत: बोलावून मदत करत. त्यांच्या उदारपणाचा अनेकजण गैरफायदा घेत. त्यावर प्रबोधनकार काही बोलले तर त्यांचं उत्तर असायचं, `फसवी ना तो मला! वाटले म्हणून खिशात होते तेवढे पैसे त्याला दिले. मनाचं समाधान ही काय लहानसहान चीज आहे?’
सतत सर्वत्र संचार असल्यामुळे बच्चूमास्तरांच्या ओळखी जबरदस्त. रेल्वेच्या हमालांपासून गावोगावच्या व्यापार्यांपर्यंत बच्चूमास्तरांच्या शब्दाला किंमत होते. प्रबोधनकार म्हणतात तसा त्यांचा शब्द हा बेअरर चेकसारखा दर्शनी वटवला जायचा. त्या काळात नाटक कंपन्या आपला सगळा कबिला घेऊन प्रामुख्याने रेल्वेनेच दौरे करायच्या. मुक्काम हलवताना देखावे घेऊन जाण्यासाठी त्यांना मालडब्बे मिळत नसत. डब्बे असले तर त्याच्या भाड्याचे पैसे नसत. शिवाय गावकर्यांची देणीही रखडलेली असत. सगळे उपाय संपले की बच्चूमास्तरांना तार करून बोलावलं जायचं. तार मिळताच स्वारी हजर. मग रेल्वेच्या अडचणी तर चुटकीसरशी दूर व्हायच्या. देण्याघेण्याच्या बाबतीत समझोता व्हायचा.
कंपनी नव्या मुक्कामासाठी निघाली की बच्चूमास्तरही आपल्या फिरस्तीवर निघून जायचे. नव्या नाटक कंपनीसाठी तर ते एखाद्या ओळखीच्या रेल्वे कॉण्ट्रॅक्टरला पटवून पडदे आणि कपडेपट मिळवून द्यायचे. हे सगळं कोणतीही अपेक्षा न ठेवता आणि शांतपणे व्हायचं. मुक्कामाच्या गावाला कंपनीच्या अडचणी जादू झाल्यासारख्या दूर होताना दिसायच्या. पण ते कुणी केलंय, हे कळायचंच नाही.
नाटक कंपन्यांत असताना प्रबोधनकारांनी बच्चूमास्तरांचा परोपकार पाहिला, पण नाटक कंपन्या सोडल्यावर तर स्वत: त्याचा अनुभवही घेतला. १९०९च्या जानेवारीत ते नाटक सोडून लहान भाऊ यशवंतराव यांच्या बिर्हाडावर ठाण्याला आले. अचानक ठाणे स्टेशनवरचा टीसी त्यांच्या घरी बच्चूमास्तरांचा निरोप घेऊन आला. माथेरानची हिल रेल्वे तेव्हा जीआयपी रेल्वे कंपनीने नुकतीच आदमजी पीरभॉय कंपनीकडून विकत घेतली होती आणि बच्चूमास्तर नेरळ स्टेशनवर ट्राफिक सुप्रीटेंडण्ट म्हणून काम करत होते. ते प्रबोधनकारांना सोबत घेऊन नेरळला गेले. बेकारीच्या दिवसांत त्यांना मानसिक आधार दिला. कोणतं नवीन काम करता येईल, यावर दोन तीन दिवस चर्चा केली. त्यात प्रबोधनकारांनी टायपिंग शिकायची इच्छा व्यक्त केली. ते ऐकून बच्चूमास्तरांनी न्यू ब्रँड अॅडलर टाईपरायटर घेऊन दिला. वर पुढची व्यवस्था करण्याचं आश्वासनही दिलं.
एकदा प्रबोधनकार बोरीबंदरला गेलेले असताना बच्चूमास्तर त्यांना भेटले. विक्टोरिया करून ते आजच्या खाडिलकर रोडवरच्या इस्माईल बिल्डिंगमधे घेऊन गेले. तिथे गणेश नारायण उर्फ तात्यासाहेब परांजपे राहत असत. त्यांची टाइपरायटर, डुप्लिकेटर यांच्या नावाजलेल्या कंपनीची एजन्सी होती. त्यात प्रबोधनकारांना बच्चूमास्तरांच्या ओळखीने सेल्समन म्हणून नोकरी लागली. या नोकरीने प्रबोधनकारांच्या आयुष्यात मोठा बदल झाला. कोट-धोतराच्या जागी सूटबूट आला. परदेशी कंपन्यांशी व्यवहार करताना अनुभवाचं क्षेत्रं विस्तारत गेलं. आणि सेल्समनगिरीचा नवा हुन्नर शिकता आला तो वेगळाच.
बहुतेक पुढच्या वर्षभराच्या आतच बच्चूमास्तरांचा एक विचित्र अपघात झाला. नेरळला नोकरीत असतानाच जिन्याच्या पायर्या उतरताना ते पाय घसरून वरून जोरात खाली कोसळले. त्यांचा स्थूल शरीराला खूप मार बसला. त्यातून ते बरेच झाले नाहीत. आजार बळावतच गेले. तात्यासाहेब परांजपेंनी त्यांना उपचारासाठी मुंबईला आणलं. बच्चूमास्तरांच्या लहानपणापासून त्यांचा परांजपे कुटुंबाशी स्नेह होता. मुंबईत त्यांच्यावर खूप उपचार झाले. पण तब्येत बिघडतच गेली. त्यामुळे त्यांनी तात्यासाहेबांच्या घरी चाळीसगावात जाण्याची इच्छा व्यक्त केली. चाळीसगावला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी प्रबोधनकार गेले होते. ती त्यांची शेवटची भेट ठरली. चार पाच दिवसांनी पत्र आलं की बच्चूमास्तरांचं निधन झालं. ते लिंगायत असल्यामुळे परांपजे कुटुंबाने त्यांचं रीतीनुसार दफन केलं.
बच्चूमास्तरांविषयी दुःख व्यक्त करताना प्रबोधनकार लिहितात, `बच्चूमास्तरचा नि माझा दोन तीन वर्षांचा निकट संबंध. त्याच्या स्नेहाचे आणि उपकारांचे किती वर्णन करावे? पण त्याचे खरे पूर्ण नाव अखेरपर्यंत मला कळले नाही.’ बच्चूमास्तरांचा विश्वास कमावलेल्या प्रबोधनकारांनाही बच्चूमास्तरांनी आपलं खरं नाव कधी सांगितलं नाही. नावाचा सोस न बाळगता ते कायम इतरांच्या मदतीला धावत राहिले. प्रबोधनकार लिहितात, `आजकाल हव्या त्या सटरफटराचे नाव समाजसेवक म्हणून वृत्तपत्री मृत्युलेखात येते. बच्चूमास्तराने शेकडो लोकांना रेल्वेत अन्नाला लावले. कितीतरी नाटक मंडळ्यांच्या संकटात तो त्यांच्या मदतीला धावला. अनेक व्यापार्यांना रेल्वेची कंत्राटे दिली. त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी वजन खर्च केलं. पण एकाही वर्तमानपत्रात त्याच्या मृत्यूचा उल्लेख आला नाही… आजकाल मयत नटनटींचे पोवाडे सगळेच गातात. पण जुन्या जमान्यात अनेक नाटक कंपन्यांना संकटकाळी मदतीला हात देऊन त्यांचा तारणकर्ता असणार्या बच्चूमास्तरासारख्या उदारधी स्नेह्यांचे स्मरण कोण करणार?’
प्रबोधनकारांनी व्यक्त केलेलं हे शल्य तसंच बच्चूमास्तरांचं जगणं आणि मरणं दोन्ही चटका लावून जातं. प्रबोधनकार आत्मचरित्रात अनेक मोठमोठ्या माणसांशी आपली ओळख करून देतात. पण रूढ अर्थाने मोठ्या नसलेल्या बच्चूमास्तरची ओळख मात्र कायम लक्षात राहते.
– सचिन परब
(लेखक प्रबोधनकार डॉट कॉम या वेबसाईटचे संपादक आहेत.)