कोण कोण कणीक तिंबली असं बोलतात. कणिक तिंबणे यात आपलेपणा नसतो. शिवाय मला यात पिठाला क्रूरपणे बडवलं जातंय असा भास होतो. पीठ भिजवणे या शब्दात भावनांचा जो परिपोष झालेला आहे तो कणिक तिंबणे यात नाही. त्यामुळे हाच आणि हाच शब्द आपण चारही बाजूंनी विचार केला तर बरोबर वाटतो.
—-
मला निर्धास्त करणार्या ज्या गोष्टी आहेत त्यामधे पीठ भिजवलेले असणे, याचा वरचा क्रमांक आहे.
म्हणजे बँकेत चार पैशे असणे (म्हणजे चांगलं मानधन मिळालं तर पाच पैशेही असू शकतात), घरात आपली माणसं असणे, चुलीवर बोका बसलेला असणे, डब्यात डाळ-तांदूळ असणे, पाण्याने भरलेला हंडा असणे अशा ज्या काही मोलाच्या गोष्टी आहेत, त्यात पोळ्यांसाठी पीठ भिजवलेलं असलं की म्हणजे मी एकदम बिनधास्त असते.
सकाळी उठल्याबरोब्बर माझ्या लक्षात येतं की आज (म्हणजे रोजच) आपणाला दहाबारा चपात्या आणि भाजी करायची आहे, तेव्हा पीठ भिजवणं गरजेचं आहे. खरं म्हणजे हे काम करायला मला अत्यंत जिवावर येतं (पोळ्यांसाठी नव्हे, तर पीठ भिजवण्यासाठी मला बाई ठेवावीशी वाटते). पण एकदा ते हातावेगळं केलं की मिळणारं समाधान फार फार मोठं असतं (त्याला त्रिभुवनात तोड नाही… असं नाही). जीवनातला- यू नो- खूपसा ताण निघून जातो.
कोण कोण पीठ मळलं असं म्हणतात… मी तसं म्हणत नाही. मळलं म्हटलं की मला ते मळकट वाटतं. हात न धुता मळक्या हातानी ते भिजवलंय असा मला फील येतो. त्यामुळे मी, कधीही बघा तुम्ही मला नोटीस करा- भाषणात, कवितेत, विनोदात, लेखात, संदर्भग्रंथात, थिसीसमध्ये, बडबडगीतात, ओवीमध्ये, भारुडात, आध्यात्मिक प्रवचनात- नेहमी पीठ भिजवलंय, हाच शब्द मी कटाक्षाने वापरत असते.
उदा. ही ओवीच बघा ना..
पीठ मी भिजवते सकाळच्या पारी गं…
पोळ्या मी लाटीते दुपारच्या पारी गं…
पोळी ग फुगुन टम्म किती होते गं…
सई म्हणे समाधान चित्तीच्या ठाई गं।।
माझं ते एक व्रतच आहे म्हणाणात आणि आणखी एक गंमतीची गोष्ट म्हणजे मला या गोष्टीचा कधीही पश्चात्ताप होत नाही.
कोण कोण कणीक तिंबली असं बोलतात. कणिक तिंबणे यात आपलेपणा नसतो. शिवाय मला यात पिठाला क्रूरपणे बडवलं जातंय असा भास होतो. पीठ भिजवणे या शब्दात भावनांचा जो परिपोष झालेला आहे तो कणिक तिंबणे यात नाही. त्यामुळे हाच आणि हाच शब्द आपण चारही बाजूंनी विचार केला तर बरोबर वाटतो.
आपल्या डोक्यात एकदा कल्पनेचं बीजारोपण झालं की त्याचा आपोआप वेलविस्तार होत राहतो. तसं एकदा चपात्यांसाठी पीठ भिजलं की ते आतल्या आत फुलत राहतं. शिवाय मी गहू दळून आणताना त्यात थोडी मेथी घालते म्हणजे आरोग्यासाठीही मेथी चांगली. फर्मेंटेंशनही चांगलं होतं. कधी ओवा घालते. उन्हाळ्यात उगीचच सब्जा बी पीठ भिजवताना घालते. बी फुगून सुंदर डिझाईन पोळीला येतं. डिझायनर पोळी होवून जाते आणि पोळ्या करताना खमंग वासही येतो. बीवरून लाटणं फिरताना टुबुक टुबुक असा गमतीदार आवाज येतो. कधीकधी तर बिस्किटांसारखा खुसखुशीत वास येतो.
खमंग खुसखुशीत बिस्किटं भराभर तयार होताहेत… पटापट ऑटोमॅटिक पुढे सरकताहेत, मग पटापट पुडे भरले जात आहेत, सील होताहेत… अॅप्रन आणि डोक्याला कॅप (टोपी शब्द नाकारून मी पुढे जात आहे… लक्षात घ्या) घातलेल्या कामगारांची लगबग सुरू आहे आणि मी अर्थातच या सगळ्याची, बिस्कीटांच्या साम्राज्याची मालकीण सगळ्यांवर तीक्ष्ण नजर ठेवून आहे.
आणि धनंजय माने इथेच राहतात का, या चालीवर बिस्कीटांची फॅक्टरी इथेच चालवतात का? असं कोणतरी दार ठोठावून विचारत आहे, असा भास मला होतो… आणि एखादी पोळी व्यवस्थित करपली की हे सगळे भास नीटपणे बंद होतात.
मला आठवतंय लग्नानंतर मला सासुबाईंनी पीठ भिजवायला सांगितलं होतं. लग्नाला आठ एक दिवस झाले होते. मी टीव्हीवर काहीतरी बघत घरातल्या माणसांशी गप्पा मारत पीठ भिजवत होते. हा प्रकार अर्धा तास सुरु होता. पीठ भिजून चिंब होण्याची प्रोसेस सुरू होती. मी सून म्हणून तेव्हा एकदम खपरीत होते. माझ्या आधी तीन सुना त्यांना आलेल्या होत्या. त्यामुळे त्या सिनिअर होत्या. शेवटी त्या किचनमधून बाहेर आल्या… आणि त्यांनी जस्ट माझ्याकडे बघितलं (यू नो), मी पटकन पीठ भिजवलं आणि लगेचच पहिलीत गेले. तेव्हापासून मी झटपट पीठ भिजवायला शिकले… ते आजतागायत!
किती झालं तरी माहेर ते माहेरच! हवा तितका वेळ पीठ भिजवता येतं… हवं तितकं पातळ पीठ भिजवता येतं… कारण पुढे पोळ्या करण्याची जी जबाबदारी असते ती आपल्यावर नसते! उगीच नाही माहेरच्या आठवणीने कंठ भरून येत!
आता आपण थोडं मागे जावूया… मागे म्हणजे खूप खूप मागे. अगदी मागे… विचार करा, पिठाचा शोध कसा लागला असेल? म्हणजे अत्तराचा शोध कसा लागलाय माहितेय ना? एक महाराणी गुलाबाची फुलं पाण्यात टाकून स्नान करायची (आपण आंघोळ करतो) पाणी गरम होतं… ती स्नान करायला सुरवात करणार एवढ्यात तिला पाण्यात कसला तरी म्हणे तेलकट तवंग दिसला… ती संतापली आणि दासीला सगळं पाणी ओतून टाकायला सांगितलं. दासी (वैतागत, कपाळावर हात मारत) सगळं पाणी ओतून टाकणार एवढ्यात राणीने त्या तवंगाला सहज स्पर्श केला (तरी नशीब) आणि तो गंध तिला आवडला आणि अत्तराचा शोध लागला.
तसं मला वाटतं, दुपारची वेळ असेल. शिकार करून आणून भाजून उकडून खावून मोठी माणसं झोपली असतील. एका कोपर्यात थोडसं धान्य शिजवण्यासाठी ठेवलेलं असेल. लहान मुलं दगडावर धान्य वाटत बसली असतील. उगीचच टाईमपास करत बसली असतील… बघता बघता मोठ्यांची झोप होईपर्यंत खूपशा धान्याचे पीठ झालं असेल… आता पीठ टाकून कसं देणार, म्हणून त्या मुलांच्या आईने पाणी टाकून खडकावरच ते भिजवलं असेल आणि चपटा गोळा करून आगीत खरपूस भाजला असेल… हा झाला भाकरीचा प्रथम अवतार! पुढे इंम्प्रोवायजेशन होवून चपाती-पुरी-नान वगैरेचा शोध लागला असेल. हे एकदा आपण नीटपणे लक्षात घेतलं की माणसाच्या प्रगतीचा झपाट्याचा आवाका आपल्या लक्षामध्ये येतो.
तर मी एकदा पीठ भिजवून झालं की इतर कामधाम सुरू करते. केरवारे, प्यायचे पाणी भरणे, योगा (यू नो…) भाजी चिरणे किंवा अगदी बाहेर जाणे, कणकवली कुडाळ किंवा कसाल ट्रिप, लायब्ररी कसलंही काम असू दे, मी निर्धास्तपणे ते करते. कुणाच्या जिवावर तर पिठाच्या जिवावर. पीठ मस्तपैकी भिजतंय. अंतर्यामी फुलत चाललंय. आता कसलीही भाजी केली की झालं, बस, एवढंच तर काम आहे. समजा भाजीला वेळ नाही मिळाला तर सुक्या खोबर्याच्या लसूण चटणीबरोबर किंवा अननसाच्या मुरंब्याबरोबरही खाता येईल. पण बाहेरील कामं आटपून घरी येवून आरामात जेवण्यात मग लोळण्यात आणि मग कडक मगभरून चहा पिण्यात जी मजा आहे ती कपभर अमृत पिण्यातही नाही आणि ही गोष्ट मी मोठ्या आढ्यतेने सांगत नाहीये. माझ्या मुखीचा सहज उद्गार आहे हा (अमृत म्हणजे साधं देव पितात ते… जे पिवून मरायला वगैरे होत नाही ते).
तर सकाळीच पीठ भिजवलं की आत्मविश्वास जो आहे तो भरभरून वर येत राहतो… आणि दिवस उंच उंच जात राहतो आणि जेव्हा मी पोळ्या करायला घेते तेव्हा तर तुम्हाला माझ्या क्रिएटिव्हिटीला भरभरून दाद द्यावीशीच वाटेल.
इकडे दुसर्या गॅसवर मटकीची उसळ किंवा भाजी रटमटत असते. तवा छान तापलेला असतो (तवा किंवा कढई छान तापते आणि मग छान जिरेमोहरी घालून छानशी फोडणी घालायची असते हा शोध मला टीव्हीवरील रेसिपी शोमध्ये लागला) आणि मी दे दणादण वेगवेगळ्या आकाराच्या पोळ्या लिलया करत असते. एकाच आकाराच्या काय कोणीही करु शकेल. पोळ्यांचा घरभर सुंदर सुवास सुटलेला असतो. खुसखुशीत गरम गरम पोळीबरोबर काहीही खा… अगदी सुवास खाल्ला तरी छानच चव येते.
बरं पीठ भिजवून ठेवलं आणि थोडं फार उरलं की बंदिस्त डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवता येतं! मग काय मजाच मजा… फक्त पोळी लाटून तव्यावर टाकली की झालं… गरगरुन फुगून टम्म होते.
मध्यंतरी एक फॅड आलं होतं की असं भिजवलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवू नका. ते पिंडासाठी गोळे ठेवतात तसं दिसतं, अशुभ असतं! अरे पण पिंडी ते ब्रम्हांडी अशी म्हणच आहे. त्यात खराब असं काय आहे? त्या पिठाला बुडबुडे आले किंवा पीठ काळंनिळं होवून बेशुद्ध पडलं तर ठीक आहे. आज ठेवलेलं पीठ उद्या वापरण्यात काहीही गैर नाही… लोक हल्ली कायच्या काय एखाद्या गोष्टीचं पीठ पाडायला लागलीत! हे असं पाडलेलं पीठ भिजवणार कोण… हा एक प्रश्न आहेच!
– सई लळीत
(लेखिका खुसखुशीत ललित लेखन आणि सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहेत)