काही नाटके ही ठळक व्यक्तिरेखांमुळे कायम स्मरणात राहतात आणि मग त्यांच्याशी जुळत्या असणार्या इतर दिग्गज व्यक्तिरेखांशी तुलनाही करण्यात येते. उदाहरणच द्यायचं झालं तर ‘नटसम्राट’मधले आप्पासाहेब बेलवलकर, ‘तो मी नव्हेच’मधला लखोबा लोखंडे, ‘हिमालयाची सावली’तले प्रा. भानू, ‘विषवृक्षाची छाया’तला चिंतू बापूजी; ‘वादळ माणसाळतंय’मधला भाई… अशा अनेक गाजलेल्या व्यक्तिरेखा रसिकांना विचार करायला भाग पाडतात. त्यांचा भूतकाळ आणि भविष्यकाळही मनात व्यापून राहतो. कथानकातील हे दिग्गज आज जरी काळाआड गेले असले तरीही त्यांच्याभोवतीची उपकथानके दंतकथा म्हणून संचार करतात. असेच एक काल्पनिक गाजलेले साहित्यिक मानव किर्लोस्कर आणि त्यांच्यानंतर दोन मुली आणि शिष्य यांच्यात घडलेले हे पकड घेणारे ‘गालिब’ हे आशयपूर्ण दर्जेदार नाटक आहे!
नाटकाचे नाव ‘गालिब’. त्यामुळे, उर्दू व फारसीचे महान शायर मिर्झा गालिब यांच्या जीवनावर बेतलेले हे नाट्य असावे असा समज होणं स्वाभाविकच आहे. पण तो गैरसमज होतो. एक प्रतीक किंवा रूपक म्हणून हे नाव वापरण्यात आलंय, ज्याचा अर्थ कथानकाच्या ओघात प्रकाशात येतो. हे कुतूहल वाढविणारे आगळेवेगळे शीर्षक झाले आहे. त्यालाही कथेशी संबंध आहे, किंबहुना त्याचाच शोध हा नाटकातल्या गोष्टीतला मध्यवर्ती दुवा ठरतो.
पडदा उघडतो आणि पुण्यातील टिपिकल संस्कृतीतला भव्य वाडा नजरेत भरतो. तिथे एक तरूणी हातात पुस्तक घेऊन बसली आहे. एका युगाच्या पाऊलखुणा सांगणारी प्रकाशयोजना-संगीत आणि नेपथ्य. हा वाडा एका ज्येष्ठ साहित्यिकाचा, मानव किर्लोस्कर यांचा. आज त्यांचे निधन जरी झाले असले तरीही त्यांच्या अस्तित्वाने वातावरण भारावलेले. किर्लोस्करांचे एक स्वप्न होते, प्रतिभासंपन्न शायर मिर्झा गालिब यांच्या जीवनावर कांदबरी लिहिण्याचे. जिवंतपणी त्यावर ते भरभरून बोलायचे. त्यांना गालिबच्या जीवनशैलीने, शायरीने अक्षरश: झपाटलेले. पण आज त्यांच्या निधनानंतर त्यांनी कादंबरी लिहिली का? ती पूर्ण झाली का? कुणा प्रकाशकाला प्रसिद्धीसाठी दिली आहे काय? असे अनेक प्रश्न साहित्य वर्तुळात उमटत आहेत.
त्यांना दोन मुली. एक रेवा आणि दुसरी ईला. आई नसल्याने दोघीजणी या वडिलांच्या मानसिक आधारावर. दोन्ही मुलींचे स्वभाव तसे दोन टोकांचे. वाड्यात वडिलांसोबत असणारी ईला. ही वडिलांवर प्रेम करणारी. त्यांचा शब्द पाळणारी. वडील तिचे सर्वस्वच. तर मोठी मुलगी रेवा ही तशी वाड्यापासून, वडिलांपासून दूर असलेली. मुंबईत नोकरी करणारी. ती दिवंगत आईच्या वळणावर असलेली. वडिलांपेक्षा आईच्या प्रभावाखाली वावरणारी. दोघी बहिणींच्या स्वभावातील फरक हा संवादातून व वागण्यातून दिसतोय.
या वाड्यात अंगद नावाचा तरूण पोहचतो. तो साहित्याचा अभ्यासक आणि किर्लोस्करांचा शिष्य. त्याच्या आगमनामुळे एक वेगळाच अध्याय सुरू होतो. आधी अंगदचा तिरस्कार आणि नंतर जवळीक होते. वडिलांना साथसोबत करणारी ईला आणि अंगद याचं ट्युनिंग जमतं आणि ‘गालिब’वरल्या कथित कादंबरीचा शोध सुरू होतो. किर्लोस्करांच्या खोलीत शोधाशोध होते. कांदबरीबद्दल कायम आस्थेने बोलणार्या किर्लोस्करांनी कादंबरी लिहिली की नाही यावर चर्चा रंगते, वादही होतात. पण अंगद काही केल्या पाठपुरावा सोडत नाही. यातून कादंबरीकाराचं जीवन अधोरेखित होते. त्याभोवती असलेल्या घटना खूप काही सांगतात. आता शेवटी कादंबरी मिळते का? ही शोध मोहीम यशस्वी होते काय? की त्यातून नवीनच कादंबरी जन्म घेते? या प्रश्नांपर्यंत नाट्य पोहोचविण्यात आलं आहे. जे प्रत्यक्ष बघणं उत्तम. अन्यथा उत्कंठाच संपेल!
या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर. लेखनापासून ते अभिनयापर्यंत आणि मराठीपासून ते हिंदीपर्यंत सगळीकडे चौफेर संचार करणारा नव्या पिढीचा लक्षवेधी रंगधर्मी. ‘गालिब’च्या लेखनातून तसेच दिग्दर्शनातून परिपक्वता दिसते. विषय-आशय गंभीर असला तरीही त्याची एकूणच मांडणी अप्रतिमच. नाट्य कुठेही रेंगाळणार नाही किंवा भरकटणार नाही याची पुरेपूर दक्षता त्याने घेतली आहे. विशेषतः मानव किर्लोस्करांचे निवडक ‘फ्लॅश बॅक’चे प्रसंग हे कल्पकतेने आकाराला येतात. प्रमुख पात्रांची वैशिष्ट्यपूर्ण देहबोली शोभून दिसते. एखाद्या सत्यकथेचा आधार याला असावा असेही वारंवार वाटते. चित्रपट, मालिका, जाहिराती, नाटक, निवेदन, निर्मिती या सर्व दालनांचा पुरेपूर अनुभव असल्याने चिन्मयने यात खुबीने रंग भरले आहेत. उत्कर्षबिंदू परिणामकारक आहे.
नाटकात चार पात्रे आणि चौघांचीही निवड अचूक आहे, जी शोभून दिसते. या चौकोनात प्रत्येकजण आपलं वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. ही पात्रे कुठेतरी भेटलेली, जवळपास असलेली वाटतात, यातच सारं काही आलंय. ईलाच्या भूमिकेत गौतमी देशपांडे प्रथमच पूर्ण नाटकभर वावरत आहे. तरीही त्यातील सहजता नजरेत भरते. तिची घुसमट अस्वस्थ करणारी. व्यावसायिक रंगभूमीची दारे गौतमीने या नाटकातून उघडली आहेत. संशोधक साहित्यिक शिष्य बनलेला अंगदच्या भूमिकेत विराजस कुलकर्णी याच्या स्वभावाच्या दोन छटा सुरेखच. संयम उत्तम. अश्विनी जोशी हिने रेवाच्या भूमिकेत आपल्या आईचा प्रभाव दाखविला आहे. वादविवाद आणि युक्तिवाद चांगला जमलाय. ज्येष्ठ अभिनेते गुरूराज अवधानी यांनी मानव किर्लोस्कर ताकदीने उभा केलाय. मोजके प्रसंग असले तरी आवाजातील जरब विलक्षणच. बाप आणि साहित्यिक ही दोन्ही रूपे त्यात डोकावतात. गालिबच्या जीवनावर कादंबरी लिहिण्याचे स्वप्न आणि निधनानंतरची गोष्ट या वनलाइनवर नाटकाचा डोलारा उभा असल्याने त्यांचा रूबाब विलक्षण प्रभावी! कलाकारांना मालिकेचा अनुभव व ग्लॅमर असले तरीही कुठेही त्याचा नकारात्मक परिणाम होत नाही, हे महत्वाचे.
नेपथ्य आणि प्रकाशयोजना या दोन्ही जबाबदार्या कल्पक ज्येष्ठ नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी सांभाळल्या आहेत. पुणेरी जुना वाडा त्यातील दरवाजे, खांब, कारंजी, बैठक हे सारं वातावरणनिर्मिती करणारे. त्यामागली रंगसंगतीही उत्तम. वाड्यातील परंपरा जपणार्या छोट्या-मोठ्या वस्तूंवरही नेमकी नजर दिसते. नाट्य अभ्यासकांना हे नेपथ्य निश्चितच खुणावेल यात शंका नाही, सोबतच प्रकाशयोजनाही दृश्यबदलासाठी चांगली वापरली आहे. भूतकाळ आणि वर्तमानकाळ त्यातून उभा राहातो. संगीतकार राहुल रानडे यांचे संगीतही जमेची बाजू ठरते. प्रदीप मुळ्ये आणि राहुल रानडे या दोघा ज्येष्ठ रंगधर्मींनी तांत्रिक बाजू उचलून धरल्या आहेत. मंगल केंकरे यांची वेशभूषा पात्रांना शोभून दिसणारी. पडद्यामागलं ‘टीमवर्क’ शिस्तबद्ध. हुकमी एक्के या नाटकासाठी एकत्र आलेत, हे विशेष!
साहित्यक्षेत्रातील वादविवाद, हेवेदावे, स्पर्धा, लाचारी, शरणागती यावरही या नाट्यात बोलके भाष्य करण्यात आलय. मानव किर्लोस्कर यांच्यासह मुलगी ईला, आणि शिष्य अंगद यांचे खडेबोल त्याबद्दल आहेत. साहित्यिक, विचारवंत यांच्या लेखणी व विचारातील ताकद आणि दुसरीकडे त्या वाटेवरले अडथळे याचीही दखल काही संवादात दिसते. त्यातून ‘गालिब’ काही सांगण्याचा प्रयत्न करतोय. यातली महाकादंबरी ही प्रतीकात्मक आहे. ज्याचा प्रवास संघर्षमय वाटेवरला ठरतो.
काही नाटके कालबाह्य होत नाहीत. काळ बदलला तरी त्यातला आशय हा कायम नवा राहतो. यातली एका साहित्यिकाची इच्छा आणि त्यावर बेतलेले कथानक हे शिळे होणार नाही. याबद्दल खुद्द नाटककार चिन्मय म्हणतो की, ‘हे नाट्य सर्वकालीन आहे. यातील भावभावना आजच्याप्रमाणे त्या भविष्यकाळातही कायम राहतील. कथा कायम सुसंगत राहील!’ याची प्रचिती प्रयोगातून येते. ‘वाडा चिरेबंदी’, ‘चारचौघी’ ही नाटके आजही रसिकांना खुणावतात. त्याच प्रकारे ‘गालिब’ खुणावेल. ‘गालिब’या टायटलमुळे नाट्यगृहाकडे येणार्या प्रेक्षकांचा गैरसमज होणार नाही, याची दक्षता निर्मात्यांनी घ्यावी ही अपेक्षा.
मराठी नाटक म्हणजे फक्त विनोदासाठी केलेला धांगडधिंगा किंवा निव्वळ हसवणुकीचे उत्स्फूर्त नाट्य अशी दुर्दैवाने विचित्र ओळख गेल्या काही वर्षांत होत चालली आहे. पण अशा आशयप्रधान संहितांमुळे त्याला कुठेतरी चोख प्रत्त्युतर मिळत आहे हे सुदैवच म्हणावं लागेल. उत्कट अनुभव देणार्या ‘गालिब’चा आशय, अभिनय, तांत्रिक गुणांनी खिळवून ठेवणारा प्रयोग झालाय. लेखक-दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांच्याकडून रसिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सुजाण प्रेक्षकांसाठी गुणवत्तेशी नातं जोडणारा हा हृदयस्पर्शी आविष्कार आहे.
बेवजह नहीं रोता इश्क में कोई गालिब; जिसे खुद से बढकर चाहो, वो रूलाता जरूर है… एकूणच, रंगमंचावर ‘गालिब’ छा गया…
गालिब
लेखन-दिग्दर्शन : चिन्मय मांडलेकर
नेपथ्य-प्रकाश : प्रदीप मुळ्ये
संगीत : राहुल रानडे
वेशभूषा : मंगल केंकरे
सूत्रधार : प्रणीत बोडके
निर्मिती : अष्टविनायक/ मल्हार/ वर्जेश्वरी