जळगावचे केळीचे बागायतदार आणि निर्यातदार नेहते पाटील साहेब जेमतेम बारावी पास झालेले. कमी शिकून पण छान शेती करणार्या शेतकर्यांच्या एका मोठ्या गटात मोडणारे. पण अत्यंत यशस्वी उद्योजक व शेतकरी. जितका उन्हाळा जास्त, तितका पाऊस व केळीचे उत्पादन भरघोस हे गणित पक्के वर्षानुवर्ष डोक्यात बसलेले. भारतातील सगळ्या केळीच्या बाजारपेठा माहिती आणि रेल्वेच्या वॅगन भरून पाठवलेल्या मालाची आकडेवारी त्यांच्या जिभेच्या टोकावर. गेल्या चार-पाच वर्षात निर्यातीची संपूर्ण माहिती घेऊन त्यालाही त्यांनी सुरुवात केली. आपले शिक्षण कमी पडते, तेच आडवे येते ही कायमची बोच त्यांच्या मनात. उशिरा झालेले लग्न आणि त्यानंतरही बर्याच वर्षांनी झालेला मुलगा हर्ष याला त्यासाठी काय शिकवायचे हा त्यांच्या पुढचा यक्षप्रश्न. जळगावच्या प्रसिद्ध अशा रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये हर्षचे सगळे शिक्षण झालेले. अर्थातच इंग्रजी माध्यमातून. वेल बिहेव्हड, वेल डिसिप्लिनड, स्टूडियस बॉय अशी त्याची शाळेत ख्याती. सुट्टीत फक्त घरी यायचे मम्मी-पप्पांच्या बरोबर एखादी टूर करून यायची, तीही वर्षाआड फॉरेनची. असा आखीव रेखीव शिरस्ता संपवत हर्षची दहावी संपली. कॉलेजशिक्षणाला पुण्याला जायचे का मुंबईला एवढाच प्रश्न होता. त्याच्या शाळेच्या प्रिन्सिपलने पुण्यातील एका इंटरनॅशनल बेकॅलोरेट (आयबी) कोर्स चालवणार्या संस्थेची माहिती पुरवली. अकरावी व बारावीसाठीचा खर्च होता, फक्त ५० लाख रुपये.
निर्यातीच्या दोन कंटेनरमध्ये हर्षचे शिक्षण होणार हा साधा सोपा हिशोब नेहते पाटील साहेबांनी मांडला व प्रवेश घेऊन टाकला. मुलगा पुण्याला संस्थेत दाखल व्हायला आई-वडिलांबरोबर आला. ऑडी, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू अशा शोफर ड्रिव्हन गाड्यातून आलेले सुटा बुटातील आईबाप व त्यांची कॉन्व्हेंट एज्युकेटेड मुलेमुली उतरत होती. शाळेची इमारत मोहब्बते सिनेमातील इमारतीला लाजवेल अशी. ज्यांनी शाहरुख ऐश्वर्याचा ‘मोहब्बते’ सिनेमा वीस वर्षांपूर्वी पाहिला असेल, त्यांना ही सारी भानगड नीट लक्षात येईल. पैशाने गडगंज असले तरी नेहते पाटील थोडेसे बिचकलेच होते. इस्रायलला भेट देण्यासाठीचा आयुष्यात शिवलेला एकुलता एक सूट आज आपण का घातला नाही हा प्रश्न त्यांच्या मनात घोंगावत होता. उत्तम इंग्रजी बोलणारा हर्ष तिथे आलेल्या मुलामुलींचे अमेरिकन इंग्रजी ऐकून थोडासा बावरला होता. मात्र तिथल्या लेडी कौन्सिलरशी बोलून त्याला खूप शांतता मिळाली.
हर्षचे शिक्षण सुरू झाले, यथावकाश अकरावीपण संपली. बारावीच्या सुरुवातीपासूनच हर्षाच्या असे लक्षात आले की वर्गातील ९० टक्के मुलेमुली अमेरिकेला शिकायला जाण्याचा विचार करत आहेत. असा काही विचार हर्षने किंवा त्याच्या आईवडिलांनी अजिबातच केलेला नव्हता. हा विचार ऐकून आता खरी गोंधळून जाण्याची वेळ होती नेहते पाटील साहेबांची. अमेरिकेशी त्यांचा दूरान्वयानेही कधीही व्यापारी म्हणून संबंध आलेला नव्हता. किंबहुना मुलाने अमेरिकेत जावे, शिकावे, तिथेच स्थायिक व्हावे हा विचार त्यांनी कधीही केला नव्हता. याउलट गेल्या वर्षभरामध्ये हर्षच्या मनात प्रचंड खळबळ माजली होती. जळगावचा उकाडा, केळीच्या बागा व त्याच्यामधून चालतानाचा कठीण अनुभव आता त्याला खरोखरच नकोसा वाटू लागला होता. अमेरिकन सिनेमे, अमेरिकन वातावरण, अमेरिकेतील सुबत्ता, तिथल्या लोकांच्या विविध गप्पा, किस्से हे आता त्याला सारे पाठ झाले होते. त्याचे आकर्षण मनात पक्के रुजले होते. गोड पेरूऐवजी पाणेरी पांचट पेअर त्याला गोड लागू लागले होते. ड्रॅगन फ्रूट किती छान याची वर्णने तो आता आईला ऐकवत असे. केळी खाणे हे ‘डाऊन मार्केट’ असते हे बरोबरच्या मुलांचे वाक्यही मेंदूत घुसले होते. गुडगाव, लखनऊ, जयपूर, मुंबई, बंगलोर येथील सहाध्यायी मुले-मुली यांच्याबरोबरच्या स्वप्नात तो आता रमला होता.
या सार्या बदलाची नेहते पाटील साहेबांना अजिबात जाणीव नव्हती असे नाही. पण मुलाच्या मेंदूमध्ये अमेरिका इतकी घुसली असेल असे त्यांना चुकूनही कधी वाटले नव्हते. मुलाने उत्तम शिकायचे, व्यापार दसपट वाढवायचा, निर्यात सुरू करायची, असा साधा, सरळसोट विचार त्यांच्या मनात होता. हर्षचा पासपोर्ट लहानपणीच काढलेला असल्याने अमेरिकेतील विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठीची एसएटीची परीक्षा देणे त्याला अजिबात अडचणीचे नव्हते. पैसा हा पण प्रश्न नव्हता. अभ्यासू असल्यामुळे मार्कही चांगले होते. केळी हा विषय डोक्यातून जाऊन आयटी हा विषय पक्का रुजलेला होता. आई-वडिलांना न कळवताच त्याने बारावीच्या मध्यावर एसएटीची परीक्षा दिली आणि तो त्यात चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाला. सोळाशे मार्काची ही परीक्षा असते. चौदाशेपेक्षा जास्त मार्क हे चांगले समजले जातात. त्याला चौदाशे पन्नास मार्क मिळाले होते. इंग्रजीवर प्रभुत्व लहानपणापासून असल्यामुळे आयईएलटीएसमध्येही त्याने प्राविण्य मिळवले. जळगावला आई-वडील आता तेरावीला मुलाला कुठे शिकायला ठेवायचे याची चर्चा करत होते. अॅग्रीकल्चर का मॅनेजमेंट असे त्यांच्या चर्चेचे कायम सूत्र असायचे. त्याच वेळेला हर्षाने एकदम पन्नास हजार रुपयाची मागणी केली. एवढे पैसे कशाला असे विचारले असता त्याचे उत्तरच बाबांना भोवळ आणणारे ठरले. हर्षने सांगितले, अमेरिकेतल्या किमान दहा कॉलेजात अर्ज करावा लागतो. प्रत्येक अर्जाची किंमत ५० डॉलर असते. त्यातून विद्यार्थ्यांची निवड करून एक-दोन कॉलेजे मुलाखत घेतात. अशी प्रवेश देण्याची पद्धत आहे. अर्जाची फी व तो पाठवण्यासाठीचा खर्च ५० हजार रुपये येईल. तो लवकरात लवकर पाठवा, नाही तर मला पुढच्या वर्षी भारतातच राहून शिकावे लागेल. तशी मला अजिबात इच्छा नाही. माझे इथले सर्व मित्र अमेरिकेत शिकायला जाणार आहेत. मुख्य म्हणजे मला केळीच्या तुमच्या व्यवसायात अजिबात रस वाटत नाही. बारावी संपल्यानंतर तीन महिने मी जळगावला तुमच्याबरोबर राहीन. तसाही गेली दहा वर्षे वर्षातून जेमतेम दीड दोन महिनेच मी तुमच्याबरोबर राहत आलो आहे. होस्टेलमध्ये राहणे, मग भारतात असो किंवा परदेशात, माझ्या दृष्टीने फार फरक नाही. मात्र उरलेले आयुष्य केळीच्या निर्मितीमध्ये व व्यवसायात घालवणे मला जमेलसे वाटत नाही.
वडिलांना बसलेला धक्का इतका मोठा होता की यावर त्यांनी कोणतेही उत्तर न देता फक्त पन्नास हजार रुपये पाठवून दिले. आईने मात्र मुलाला विचारले, अमेरिकेत शिकायला जाणार आहेस, त्याचा खर्च बाबाच करणार आहेत ना? मग त्यांना इतके दुखावण्याचे कारण काय?
हर्षचे उत्तर आईलाही दुखावणारेच निघाले. फीचे आणि इतर खर्चाचे पैसे मला कर्ज म्हणून द्या मी फेडून टाकेन. तेही व्याजासकट. त्याची तू काळजी करू नकोस. यावर संवादच जवळपास तुटल्यात जमा होता. मात्र नेहते पाटील साहेबांनी मन घट्ट करून मुलाला निरोप दिला आणि त्याच्या शैक्षणिक खर्चाची व्यवस्था करण्यासाठी जमवाजमव सुरू केली.
‘मार्मिक’च्या वाचकांसाठी अमेरिकेतील किंवा इंग्लंडमधील पदवीसाठीच्या म्हणजेच अंडरग्रॅज्युएट शिक्षणाचे खर्चाचे काही आकडे येथे फक्त नमूद करत आहे. पुणे मुंबईच्या कोणत्याही कॉलेजमध्ये पदवी शिक्षणासाठी वर्षाला ३० ते ३५ हजार रुपये खर्च येतो. अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये पदवी ही चार वर्षांनी मिळते. राहण्यासाठीचा खर्च किमान ८०० ते १००० डॉलर इतका येतो. थोडक्यात चार वर्षांची एक लाख वीस हजार डॉलर फी अधिक ५० महिने राहण्याचा पन्नास हजार डॉलरचा खर्च करून तिथली पदवी हाती येते. सुमारे दीड कोटी रुपये यासाठी सध्याच्या आकड्यानुसार लागतात असे समजा ना. हा खर्च नेहते पाटील साहेबांना पण जडच होता. तरी त्यांनी तो करण्याचे ठरवले, कारण मुलाशी वाकडे घेण्याची त्यांची इच्छा नव्हती.
अखेर हर्ष अमेरिकेतील एका कॉलेजमध्ये दाखल झाला व त्याची आयटी क्षेत्रातील पदवी हाती आली. पदवीनंतरची पहिली नोकरी त्याला मिळेपर्यंत आठ महिने तसेच गेले. त्या दरम्यान भारतातून येणार्या मनीऑर्डरवरच त्याचा निभाव लागत होता. अमेरिकेतील वास्तव्यासंदर्भात आता हर्षलाही काळजी वाटू लागली होती. आयटीचे आकर्षण व केळी व्यवसायाबद्दलची तीव्र नाराजी या द्वंद्वांमध्ये हर्ष सापडला होता. आईने त्याला अनेक वेळेला, भारतात परत ये आणि इथे लक्ष घाल, आम्ही तुझी वाट पाहत आहोत व स्वागतच करणार आहोत, असे विनवून फोनवर सांगितले. पण अमेरिकन वातावरणाची सवय झालेला हर्ष आता परतण्याची शक्यता राहिलेली नव्हती. आईबाबा आपल्या पदवीदान समारंभासाठी आले नाहीत हा रागही मनात खदखदत होता. अखेर हर्षला कशीबशी नोकरी मिळाली. भारतामधील आयटीचा पगार हा खूप मोठा वाटतो. तितका पगार इतर कोणत्याही क्षेत्रात मिळत नाही. मात्र ती स्थिती अमेरिकेत अजिबात नाही. सुरुवातीचा पगार जेमतेम ५५ हजार डॉलर वर्षाला असतो. विद्यार्थी फारच हुशार असेल व नामांकित कॉलेजमधून त्याने पदवी घेतली असेल तर तो पगार ७० हजार डॉलरपर्यंत वाढतो. भारतीय आई-वडील व इथले सामान्य नागरिक याला ८०ने गुणून आकडे मनात आणत राहतात. पण या पगारात वर्षाकाठी जेमतेम दोन हजार डॉलर बाजूला टाकून आई-वडिलांना भेटायला येणारा मुलगा व मुलगी तुम्हाला सापडतो का? नाही ना? त्याचे कारण साधेसे आहे. ते म्हणजे वर्षाला दोन हजार डॉलरसुद्धा बाजूला टाकणे तिथे शक्य होत नाही. सगळेच आकडे बुजगावण्यासारखे असतात. असो.
सध्या हर्ष अमेरिकेत एका आयटी कंपनीत काम करतो. त्याचे वय ३२ आहे. नेहते पाटील हे आडनाव ऐकल्यावर अजूनही त्याला स्वीकारणारी अन्य जातीतील मुलगी मिळालेली नाही. जातवाली तिथे मिळत नाही. म्हणून लग्न तसेच राहिले आहे. तसे त्याचे एक दोन तिथल्याच मुलींबरोबर लिव्ह इन राहून झाले. पण लग्न मात्र होऊ शकलेले नाही. मोठे घर, छानशी गाडी, भरपूर काम आणि खायला उठणारे एकटेपण अशी हर्षची अवस्था असते. त्याची वर्षाची मिळकत, तीही नेहते पाटील साहेबांच्या महिनाभराच्या मिळकतीएवढीच आहे. फीचे वडिलांनी दिलेले पैसे व्याजासह परत फेडेन असे आईला ऐकवणारा हर्ष ती रक्कम विसरून गेला आहे. वडील मात्र हर्षला विसरू शकत नाहीत. आई वडील व मुलगा तिघेही मनाने थकलेले आहेत. मोडेन पण वाकणार नाही हा महाराष्ट्रीयन बाणा सांभाळत आहेत. नेहते पाटलांनी आता निर्यात बंद केली आहे. व्यवसाय आवरता घेण्याच्या इच्छेला मात्र त्यांना आवर घालावा लागलाय. कारण एकच, सुकलेली केळीची बाग कोणालाच पहावत नाही.
तात्पर्य : नामवंत शाळा, इंग्रजी माध्यमाचे आकर्षण, उच्चभ्रू समाजातील वागणुकीच्या चालीरीती, परदेशी शिक्षणाचे अवाजवी आकर्षण याचा सारासार विचार करावाच लागतो. नाहीतर घरातील उत्तम व्यवसायाला ठोकरून नोकरीसाठी परदेशी जाऊन हर्षसारखी संधी शोधत बसायची वेळ येते.