माझ्या व्यंगचित्रातील तरुणी खूप सुंदर असते असे अनेक पिढ्यांमधल्या चाहत्यांना सतत वाटत आले आहे. त्यात जत्रा साप्ताहिकाच्या पुरुषोत्तम बेहेरे यांचा फार मोठा वाटा आहे. साप्ताहिक असल्याने दर आठवड्याला माझ्याकडून भरपूर चित्रे, विशेषत: मुखपृष्ठे, चित्रमाला काढल्या गेल्या. बेहेरे वर वर अतिशय गंभीर दिसायचे मात्र ते अतिशय रसिक होते. त्यांचे ‘माहेर’ मासिक महिलांचे, तर ‘मेनका’ भरपूर रोमँटिक- मात्र अश्लील नव्हे. दीपावलीप्रमाणे तेसुद्धा ‘मेनका’मध्ये कलर प्लेटस टाकायचे. संपूर्णपणे अवखळ विनोदांना वाहिलेला ‘जत्रा’ सर्वदूर जात असल्याने भरपूर नाव झाले. वाचक म्हणायचे, आम्ही दर गुरुवारी तुमच्या मुखपृष्ठाची वाट पाहत असतो. त्यात अनेक मंत्रीगणही होते, हे विशेष.
नंतर नंतर जगात उघडे नागडेपणा बोकाळला. तरीही मी रेखाटलेली तरुणी पिढीला मोहात पाडत राहिली. थोडक्यात, प्रेयसीवरची बरीच चित्रे काढली गेली. त्यात आम्ही राज कपूर, दिलीप कुमारच्या पिढीतले. हळवे, बावळट, भित्रे, कफल्लक. मुली बर्याचशा आईबापाच्या धाकातल्या. तिन्हीसांजेच्या आत घरी येणे मस्ट असे. गाव, गल्ल्या, रस्ते, छोटे असत. पोरांकडे मोटरसायकली नसायच्या. किडमिड्या स्कुटी असत. पोरींकडे लेडीज सायकल असायच्या. चिठ्ठ्या चपाट्या द्यायचा, छाती जाम धडधडायचा तो काळ.
आजची तरुण पोरं किती बेफाम झालीत ते मोटरसायकलच्या अपघातांच्या बातम्यांवरून लक्षात येते. त्या काळात मद्यपानाला बंदी होती, फार तर फार सिगरेटी गुपचूप लपून पोरं ओढायचे. आता हे उद्योग पोरंपोरी उघड्यावर करतात. पोरी जेव्हा सिगरेटचे भपकारे सोडतात, त्या वेळेस कसनुसं वाटतं.
प्रेमाला बरकत आणली ती मोगल बादशहा आणि त्यांच्या राण्यांनी. अनारकली हा माईलस्टोन. ताजमहाल हा भक्कम पुरावा. नाकापुढे सतत गुलाबाचे फूल आणि नेहमी एक प्रेम प्रकरण चालूच, मग यांनी लढाया तरी कधी केल्या?
गुलाब मोगलांनीच भारतात आणला असं म्हणतात. मद्यापेक्षा जास्त प्रेम त्यांनी गुलाबाच्या फुलांवर केले, असेही म्हणावे लागेल. एक बादशहा तर फेरफटक्यास निघे, तेव्हा सैनिकांची एक तुकडी पुढे व एक मागे ठेवून ठेवून प्रत्येकाच्या टोपीवर एक फूल खोचायचा आग्रही असे. सैनिक चालायला लागले की पुढे मागे गुलाबांचे ताटवे झुलताना दिसायचे.त्यातली एक जोडी मी माझ्या ‘मस्त हसा’ ह्या मुखपृष्ठावर टाकलीय, ती पहा. हे चित्र मी नेहमी माझ्या कार्यक्रमात काढायचो आणि आठवणीने सूचना द्यायचो की हा बादशहा त्याच्या प्रेयसीला भेटला, हे खरे; पण अनेक बादशहांची झेप चुकली आणि ते प्रेयसीच्या आईबापांच्या अंगावर जाऊन पडलेले आहेत. पोरांनो, ‘बी केअरफुल’. या पंचवर प्रचंड मोठा हशा होई.
जगात भुतं आहेत की नाहीत, हे मला ठाऊक नाही; पण मी काढलेलं तरुण भूत त्याच्या भूतप्रेयसीला विनवणी करत आहे. ‘प्रिये पहा, रात्रीचा समय सरून येत उष:काल हा… आपला समज आहे की भुतं फक्त रात्रीचीच निघतात, दिवसा येत नाहीत. म्हणून तर तो कळवळून सांगतोय, वेळ संपत आली आहे, तिच्या विनवण्या करतोय आणि ती आपली फुरगंटून बसली ते वेगळेच. भूत जन्मात असली तरी रागावणं लोभस आहेच की…
ही आणखी एक प्रेमाची वेगळी तर्हा. मरण तर अटळ आहे, पण मरताना एखाद्या सुंदरीच्या हातून मरण काय वाईट, त्यासाठीसुद्धा झुंबड.
प्रेयसी म्हटली की प्रेमभंग आलाच. त्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या प्रेमवीर करतच असतात ‘शोले’मधला धर्मेंद्रचा प्रेमभंग, टाकीवर चढणं त्यातलाच एक भाग. पोरगी किंवा तिचे कुटुंबीय मुलाच्या प्रेमाला दाद देत नाहीत, त्या वेळेला प्रियकर अल्टिमेटम देतोय. गळ्यात फाशीचा दोर अडकवून व बर्फाच्या लादीवर उभे राहून तो प्रेयसीला व तिच्या आईबापांना सांगतोय, ‘माझ्याकडे फक्त दहा मिनिटे आहेत. लग्नाला होकार देणार की नाही, तुम्हीच काय ते ठरवा.
काही वेळा प्रेयसीशी लग्न होतं, पण तिची गद्दारी फार उशिरा लक्षात येते. अलीकडे घटस्फोटाच्या अनेक केसेस होताहेत. प्रेम एकाशी, मात्र लग्न एखाद्या गब्बर श्रीमंताच्या मुलाशी यथासांग पार पडते. ठरल्याप्रमाणे महिन्या-दोन महिन्यात पोरगी घटस्फोटाची मागणी करते, तेही मुलावर वा सासरच्या मंडळींवर वेडेवाकडे आरोप करून… हल्ली अनेक कायदे मुलीच्या फेवरमध्ये आहेत. त्यात मुलाचे आई-वडील, मोबाईलचा भरमसाठ वापर ही एक महत्त्वाची कारणे आहेत. आगीत तेल अोतायला, भडक आरोप करायला वकील मंडळी आहेतच. मुलाची श्रीमंती पाहून प्रचंड पोटगीची मागणी केली जाते. लाज अब्रू चव्हाट्यावर यायला नको म्हणून मुलाकडचे पोटगीची मागणी मान्य करतात. तडजोड होते. पोरगी प्रियकराबरोबर उंडारायला मोकळी, असा धंदा मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. नाशिकसारख्या छोट्या शहरात गेल्या सहा महिन्यात पाच ते दहा हजाराच्या वर घटस्फोट झाल्याची काल-परवाच बातमी होती. आणि काही प्रेयसींचे अनेक प्रियकर असतात. लग्न झाल्यावर सुद्धा त्यांच्या एकनिष्ठतेचे ग्वाही देता येणार नाही, हे कधी कळतं तर ती मेल्यावर. हा एक प्रियकर पहा, प्रेयसीच्या गद्दारीने कंटाळलेला अगदी आत्महत्येपर्यंत आला आहे; परंतु जिवाचा मोह सुटत नाही. चित्रकार परदेशी असला म्हणून काय झाले. इति…