श्रेष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर! त्यांच्या जीवनशैलीवर आणि प्रामुख्याने वैचारिक चौकटीवर ‘एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ हे नाट्यपूर्ण अभिवाचन नाट्य रंगभूमीवर आले आहे. जे चरित्रप्रधान असून त्यांचे मनोविश्लेषण तसेच सूक्ष्म वैचारिक चित्रण करते. एकेक प्रसंगातून कुरुंदकर गुरुजी अलगद उलगडत जातात.
– – –
निजामाच्या जुलमी राजवटीतून १९४८ साली मराठवाडा मुक्त झाला. सत्तरएक वर्षे उलटली, पण कायम उपेक्षाच पदरी पडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी रामानंद तीर्थ यांनी शिक्षण आणि मराठवाडा मुक्तीचा महामार्ग खुला केला. त्यात अनेक संत, महात्मे, विचारवंत, राजकारणी, साहित्यिक असे एकापेक्षा एक दिग्गज जुळले गेले. याच वाटेवरले श्रेष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर! त्यांच्या जीवनशैलीवर आणि प्रामुख्याने वैचारिक चौकटीवर ‘एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ हे नाट्यपूर्ण अभिवाचन नाट्य रंगभूमीवर आले आहे. जे चरित्रप्रधान असून त्यांचे मनोविश्लेषण तसेच सूक्ष्म वैचारिक चित्रण करते.
बायोपिक हा प्रकार व्यक्तित्वाचा जीवनप्रवास मांडणारा. एक चरित्रपटच. तसेच हे नाट्य. मराठी रंगभूमी आणि चित्रपटात अनेक क्षेत्रातील दिग्गज त्यासाठी निवडले गेलेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते अगदी डॉ. काशिनाथ घाणेकर, लोकमान्य टिळक, आनंद दिघे, वसंतराव देशपांडे, मा. भगवान यांच्यापर्यंत. निळू फुले, जॉर्ज फर्नांडिस, शाहीर साबळे, विठ्ठल उमप यांच्यावरल्याही बायोपिकची चर्चा सुरूच आहे. अशा व्यक्तिमत्वांचा भूतकाळ समाजाला काही शिकवत असतो. सजगही करतो. पण आपल्या रोखठोक व टोकाच्या वैचारिक भूमिकेमुळे प्रसंगी वादग्रस्त ठरलेल्या कुरुंदकरांसारख्या विचारवंतांचा आलेख हा दोनएक तासाच्या आवाक्यात बंदिस्त करणे म्हणजे तारेवरची कसरतच. पण नेमक्या प्रसंगांची आटोपशीर मांडणी व संकलन करून या प्रयोगात गुरुजींना समर्थपणे साकार करण्याचे प्रयत्न अजय अंबेकर यांनी केलेत. जी संहिता म्हणूनही वैशिष्ट्यपूर्ण आहे. नाट्य अभ्यासकांसाठी एक आदर्श नाट्यसंहिता म्हणून सिद्ध होताना दिसतेय.
एका चिंतनशील विचारवंताचा नाट्यआलेख मांडताना त्याच्या अंधारातल्या काही खटकणार्या अपरिचित बाबींवरही यात प्रकाशझोत टाकला आहे. त्यामुळे गुरुजी हे आपल्या जवळचे वाटू लागतात. एक अंतर पटकन दूर होते. तंबाखू-सिग्रेटची सवय; उन्हाळ्यात कारण नसताना पूर्ण डोक्याचा चमनगोटा करणे; परीक्षेत नापास होणं, बिनधास्त बोलणं, धार्मिकतेची चेष्टा, भर रहदारीत रस्त्यावरून पुस्तक वाचणे, सायकल नागमोडी चालविणे; अनवाणी भटकंती; पांघरून म्हणून चक्क साडीचा वापर करणे असा हा विक्षिप्तपणा, तिरकसपणाचा काहीदा कहरच. एक ना दोन. या आणि अशा अनेक अपरिचित गोष्टी या एकेका प्रसंगातून उघड होतात. त्या लपविण्याचा जराही खटाटोप संहितेत नाटककार अंबेकर यांनी केला नाही, त्यामुळे यातील नाट्य हे सत्य व पारदर्शक ठरते.
हे दोन अंकी अभिवाचन नाट्य. एकेक प्रसंगातून कुरुंदकर गुरुजी अलगद उलगडत जातात. लेखकाच्या हाती सारी सूत्रे आहेत. तो प्रत्येक प्रसंगावर आणि घडामोडींवर भाष्य करतो. पहिल्या प्रसंगापासूनच स्पष्टवक्तेपणा हा गुरुजींचा नजरेत भरतो. पुण्यातील सरस्वती साहित्य सेवा मंडळात द. वा. जोग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘सांख्य तत्वज्ञान’ या व्याख्यानमालेत जोग यांची सगळी पुस्तके रद्दी असल्याचे सांगून त्यांनी प्रहार केला. अखेर तरुणाईवर टीका करणार्या जोगांना व्यासपीठ सोडून पळ काढावा लागला. नांदेड येथील असेच एक गुरुजींचे व्याख्यान. ‘आस्तिक का नाही?’ हा विषय. ‘धर्म जर माणसाला नैतिक रहायला उपयोगी पडला असता तर एकाही देवळाच्याजवळ एवढी संपत्ती जवळ झाली नसती!’ असे गुरुजींनी राम मंदिर संस्थानच्या आवारात मांडून एकच खळबळ माजविली. अगदी बालपणापासूनच गुरुजींच्या युक्तिवादावर ‘तू नरकात जाशील!’ असा शेरा मिळाला. त्यावेळी धर्मपंडितांनाही हादरून सोडले. त्यांचे मामाचे गाव हे हैदराबाद. तिथे नांदापूरकर हे त्याचे वडीलमामा. चपलेच्या लाल रंगावरून सडेतोड बोल सुनविणार्या बाल नरहरीला चक्क घराबाहेर काढले गेले. हाही प्रसंग नाट्यपूर्ण जमलाय.
आणीबाणीचा काळ. त्यातही गुरुजींनी नवं तंत्र हाती घेतले. इसापनीती आणि पंचतंत्राच्या गोष्टी भाषणातून सांगितल्या. त्यातून लोकशाहीचा गळा कसा काय आवळला जातोय, हे प्रतीकात्मक मांडले. ही भाषणे आणि त्यातील गोष्टी गाजल्या. इंटरच्या परीक्षेच्यावेळी त्यांना आणि त्यांचा मित्र मधू याला नाहक तुरुंगवास झाला होता. ‘माफीनामा’ देण्यास नकार दिल्याने तुरुंगवास वाढला. या तुरुंगातून बाहेर पडताना ‘इथे आपला इतका अभ्यास झालाय की त्या जोरावर जगातली आता कुठलीही परीक्षा देऊ शकतो,’ असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला, जो खूप काही सांगणारा. काही कौटुंबिक प्रसंगांतून गुरुजींनी सदस्यांच्या श्रद्धास्थानांना दुखावलेलं नाही. किंवा त्यांच्याशी वादविवादही घातलेले नाहीत. कुठल्याही राजकीय पक्षाचा पुरस्कारही त्यांनी कधी केला नाही. वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला.
नाटकाचा शेवटचा प्रसंग हृदय हेलावून टाकणारा. संभाजीनगरातल्या सरस्वती भुवनात एका संगीतविषयक व्याख्यानाला प्रारंभ करताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते कोसळले. त्यावेळी त्यांचे वय पन्नास वर्षे होते. हा शेवट आणि प्रकाश मंदावत असतांना ‘उड जायेगा हंस अकेला’चे सूर वातावरणनिर्मितीत भर पाडतात. राजकीय, सामाजिक, साहित्य, धर्म, समीक्षा अशा विषयांवरला एक अधिकारी तपस्वीचे दर्शन या सादरीकरणातून होते.
नेत्याची जात कोणती, यावर आदर बाळगणार्यांची जात जर ठरत असेल आणि लिहिणार्याची जात कोणती यावर टाळ्यांचा किंवा जोड्यांचा कार्यक्रम ठरत असेल तर चिकित्सेला फारसं भवितव्य नाही, असेही विश्लेषण गुरुजींनी केले होते. विचारवंत हा कायम समाजापासून एकाकी असतो. त्याला तसे ठेवण्यात येते, याबद्दलही खंत त्यांनी मांडली होती.
नरहर कुरुंदकरांच्या भूमिकेत दिलीप पाध्ये यांनी चांगले बेअरिंग सांभाळले आहे. तो काळ भाषणांचा होता. त्यात चांगले रंग भरले आहेत. जरी हा अभिवाचनाचा प्रयोग असला तरीही अभिनय, वेशभूषा, रंगभूषा, प्रकाशयोजना, संगीत याने परिपूर्ण असा आविष्कार झालाय. गुरुजींची आई- ज्योती पाध्ये आणि पत्नी- स्वाती देशपांडे या दोघींनी चांगली साथ दिलीय. कल्पक प्रायोगिक रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर यांनी नंदापूरकर, कहाळेकर, पोलीस, बाबा या चारही भूमिकांमध्ये आवाज आणि गेटअपमधून बाजी मारली आहे. संपूर्ण नाट्य एका सूत्रात सांभाळणारा लेखक गणेश पांडे यांनीही नाट्य कुठेही रेंगाळू दिलेले नाही. त्याची गती कायम ठेवली आहे. गुरुजींच्या बाल भूमिकेत जिगीषा देशपांडे हिने ठसक्यात संवाद पेश केलेत. संहिताकार व दिग्दर्शक अजय अंबेकर यांनी मधुकर जोग, जोशी, पत्रकार, रामराव अशा पंचरंगी भूमिकेतून रसिकांचा चांगला प्रतिसाद वसूल केलाय. प्रत्येक भूमिका ही सादरीकरणात ‘हटके’ करण्यामागे त्यांचा प्रयत्न दिसला. एकूणच ‘टीमवर्क’ उत्तम आहे. तांत्रिक बाजूही नाट्याला पूरक ठरल्यात. त्यामुळे नाट्य रेंगाळत नाही. विशेष म्हणजे पार्श्वभूमीवरले चित्ररेखाटन उल्लेखनीय. शुभम हुरसूर याने त्यात वेगळेपणा दाखवला आहे.
एकांकिका, एकपात्री, पथनाट्य, नाट्यछटा, श्रुतिक, अभिवाचन अशा अनेक प्रकारांनी प्रायोगिक रंगभूमी संपन्न होत आहे. त्यात नवनवीन संकल्पना येतात आणि प्रयोग अधिक फुलविण्याचा त्यातून प्रयत्नही करण्यात येतो, यातील ‘अभिवाचन’ या शैलीत बदल होतांना दिसताहेत. जे पूर्ण नाटकाचा आभास निर्माण करणारे. अभिवाचन संहिता आणि त्याभोवतीच्या रंगमंच सूचना याने परिपूर्ण नाट्यसंहिता म्हणजे एक आव्हानच. दिग्गज रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांनीही अखेरच्या काळात ‘अभिवाचना’चा आधार घेऊन गांधींना रंगमंचावर आणले. स्वातंत्र्यानंतरचे नेत्यांमध्ये राजकीय ताणतणाव हे अभिवाचनात शब्दबद्ध केले होते. स्वतः त्यांनी गांधींची भूमिकाही साकार केली होती. त्याच वाटेवरलं हे पुढले पाऊल. जे संहितालेखक, दिग्दर्शक अजय अंबेकर यांनी रंगमंचावर भक्कमपणे टाकले आहे. यातील भाषणांमुळे हे तसे विचार-प्रधान नाट्य जरूर झालेय, पण विषयांचे प्रसंगानुरूप अस्तर हे सुरेख विणलं आहे. वक्ता आणि श्रोता यातील संवाद मस्त जुळविणारा हा रंगमंचीय आविष्कार बनलाय.
पारंपारिक आकृतिबंधातून या प्रयोगाचे सादरीकरण होत नाही. नव्या लवचिक दृष्टीतून हा प्रयोग सादर होतो तो एका सत्यकाळाचा साक्षीदार आहे. त्याची प्रचिती येते आणि दोन अंकी पूर्ण विचारांची अपरिचित गोष्ट बघितल्याचे समाधानही देते. अशा प्रायोगिकतेची पाठराखण करावयास हवी.
एका विचारवंताची अपरिचित गोष्ट
(साभिनय नाट्यअभिवाचन)
लेखन/दिग्दर्शक – अजय अंबेकर
प्रकाश – कैलास पुपुलवार
संगीत – प्रशांत ठाकरे
चित्ररेखाटन – शुभम हुलसूर
निर्मिती – नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान