प्रिय तातूस,
कसे दिवस आलेत काही कळतच नाही, जरा कुठे कपडे अंगात घातले की ओलेचिंब होऊन जातात. या कुशीवरून त्या कुशीवर वळत झोपेची वाट बघत मी तर जागाच असतो. सगळेजण ग्लोबल ग्लोबल म्हणतात ते मला तर काही कळत नाही. सूर्य तर नुसता आग ओकत असतो. अरे आपल्याकडे अंघोळ झाल्यावर सूर्याला ओंजळीने पाणी देण्यामागे सूर्याला `शांत हो!’ असंच काहीतरी मागणं असणार. तात्यांचं म्हणणं सगळे पक्ष एकमेकांवर आग ओतत भडकवतायत. त्यामुळे वातावरण तापलंय. कुणीतरी परवा म्हणालं की थर्मामीटरची पण आता लांबी वाढवलीय म्हणे. कारण पारा म्हणे इतका वर जातो की काच तडकते. यात अतिशयोक्तीचाही भाग असेल पण तातू तुला सांगतो, हे ग्लोबल वगैरे मला सगळं अतीच वाटतं.
असो. आपल्या घरात काय की चाळीत कुणाकडेही फ्रीज नव्हता. आता घरोघर फ्रीज झालेत. फ्रीजच्या बाजूला उभं राहून बघ, चटका बसावा इतकं गरम असतं. रस्त्यातून चालताना आपण एकेक गाड्या पार करत जातो; अरे, या सर्व एसी गाड्यांच्या बाजूने चालताना सुद्धा काय गरम हवा अंगावर येते म्हणून सांगू? अशा लाखो गाड्या वाढल्यात. नशीब रिक्षा आणि टूव्हीलरला एसी बसवला नाही अजून. मला काही विज्ञानातलं कळत नाही. अरे मी सोशॉलॉजी घेऊन बीए झालो, पण परवा मी हे माझं मत ऐकवलं, तर सगळे म्हणाले, अनंतराव तुम्ही या विषयावर लिहाच! अरे आपली बैठी मातीची, कडीपाटाची घरं होती. ती काय तापत नव्हती!
आता सगळीकडे तीस-चाळीस मजली इमारती झाल्यात. ते सगळं सिमेंट काँक्रीट तापतं आणि रस्तेही तापतात. तज्ज्ञ म्हणवणारे सगळे लोक तिकडे विदेशात ब्राझिलमध्ये रिओपासून सेमिनारला हजेरी लावतात. उगाचच विमानाचा आणि राहायचा खर्च. मी हे सगळे ज्ञान सकाळी मॉर्निंग वॉकला जातो तेव्हा मिळवलेय. पण मला कोण बोलवणार?
अरे, अण्णा आयुष्यभर पंचा नेसून फिरायचे. महात्मा गांधी पंचा आणि एक उपरणं असे सगळीकडे फिरले. तेव्हा ३५ कोटी लोक होते. आता जर दीडशे कोटी झाले तर गरम होणारच. मुख्य म्हणजे सगळ्यांची डोकी तापलेली असतात.
असो. विषय खूपच लांबत गेला. मी हे घरात कुणाला सांगायला गेलो तर कोणी ऐकून घेत नाही. हल्ली कुणाला ज्ञान नकोय, सगळ्यांना कुठं काय चांगलं खायला मिळतं, ते ऐकायला कान टवकारतात. पूर्वी घरात फायर ब्रिगेड आणि पोलीस व अॅम्ब्युलन्स यांचे नंबर ठळकपणे लिहिलेले असायचे.अरे तातू, तुला खरं वाटणार नाही. पण सगळीकडे नुसते हॉटेलचे नंबर लिहिलेले असतात. आता तर काय मोबाईलमुळे सगळंच सोपं झालंय म्हणा!
आता वैशाख म्हणजे लग्नसराई सुरू झालीय. काय समजत नाही पण अलीकडे मुलांची जेवढी लग्न ठरल्याचं कानावर येतं, तेवढी मुलींची लग्ने मात्र जमत नाहीत. बर्याचशा मुलींना एकटं रहावं असंच वाटतं! अरे पूर्वी लग्नात कसा भरपूर आमरस असायचा. हल्ली तर वाट्यांचा आकार पण लहान झालाय. म्हणजे आपण जेवणाच्या रांगेत उभे राहिलो की सगळे इतर पदार्थ स्वत: घेतो, पण आमरसापाशी मात्र तो माणूस वाटी घेऊन भरू की नको असा डाव बुडवून वाढतो. आणि तो आपल्याकडे डायबेटिस झालाय की काय अशाच नजरेने पहात असतो. अर्थात यंदा हापूस खूप महागही आहे म्हणा. अरे परवा हापूसच्या रिकाम्या पेटीचा भाव विचारला, तर ऐंशी रुपये सांगितले.
आता आतापर्यंत पत्रिकेवर कृपया आहेर वा पुष्पगुच्छ स्वीकारले जाणार नाहीत, असे असायचे. त्यामुळे कसं जाताना आपल्याला संकोच वाटत नव्हता. अलीकडे तर पुष्पगुच्छ देण्याऐवजी सगळीकडे पुस्तक देण्याची प्रथा बोकाळलीय. आता ते कागदात गुंडाळलेलं पुस्तक कुठलं असेल कुणाला ठाऊक?
परवा मी पुस्तकाच्या दुकानात गेलो होतो, तिथे लग्नकार्यात भेट देण्यासाठी म्हणून पुस्तकाचा वेगळा काउंटर होता. एकदम घेतली तर तीस टक्के कमिशन देतात. असो. आता हे काही वाईट नाही, कारण वाचन संस्कृती वाढायलाच हवीच म्हणा. पण नवरानवरी काय हनीमूनला जाऊन पेंग येईपर्यंत पुस्तकेच वाचत बसणार काय, असं आपलं उगाच वाटत रहातं. माझं म्हणणं पुस्तकही द्या आणि छानसा गुच्छपण द्या. किती छान वाटतं खरे तर ताजेताजे फुलांचे गुच्छ बघताना.
या वर्षीपासून मी नवीनच प्रथा बघतोय. बर्याच पत्रिकांवर आहेर ‘ऐच्छिक’ असे छापलेले. तुम्ही खूप बाणेदारपणाने आव आणला तरी घरच्या लोकांच्या मते आपण सगळ्यांच्या लग्नात एवढा आहेर केला, तेव्हा तर सव्वाशे रुपये ताट होतं; आता अगदी साधा केटरर असला तरी पाचशेच्या खाली ताट नसतं. मग आपण `आहेर ऐच्छिक’ असं लिहिलं तर त्यात वावगं काय? मला काहीवेळा घरच्यांचं म्हणणं पटतंही! आता काहीवेळा एकदम चारपाच लग्नं एकाच दिवशी येतात. मग कुठे जायचं हा मोठा प्रश्न पडतो. मग आम्ही फोन करून तुमचं आमंत्रण मिळालं वगैरे हवापाण्याच्या गप्पा करत नेमका मेन्यू आणि केटररचं नाव काढून घेतो. त्यातला आपल्या आवडीचा असेल त्याला आम्ही पहिली पसंती देतो. आपण सगळी चौकशी करतोय म्हणताना ज्यांच्याकडे लग्न आहे त्यांना अगदी भरून येतं. अरे वा… होक्का… छानच… म्हटलं की माणसाला आनंदच होतो म्हणा. परवा मी एक लेख वाचला त्यात पत्रिकेमध्ये केटररचे नाव, पाणी कुठले देणार व काय पदार्थ याची कायद्याने माहिती देणे आवश्यव्ाâ करायला हवेय असं लिहिले होते.
आम्ही शक्यतो दुपारचे लग्न असेल तर हॉलमध्ये जाता जाता टिफिनचा डबा केटररकडे देऊन ठेवतो. त्यामुळे संध्याकाळचा प्रश्न सुटतो. हल्ली कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असला की लोक जमणे फार कठीण असते. पण लग्नाला मात्र चांगली उपस्थिती असते.
अरे तातू काळ इतका बदलत चाललाय की काही दिवसांनी लोक आज पुष्कळ दिवसांनी घरी जेवलो असं म्हणायला लागतील की काय?
आता सगळीकडे कोरोनाचे वातावरण निवळल्याने लोकांना पर्यटनाचे वेध लागलेत. खरे तर विमानाचे तिकिट, व्हिसा, इन्शुरन्स आणि हॉटेलचा रहाण्याचा खर्च हे सर्व लोकांना कसे काय परवडते, मला तर काही कळत नाही. अरे आमचं किती दिवस चारधाम यात्रा करायचं चाललंय, पण काय करणार? अरे तातू बीबीसीवर तो टुरिझमचा कार्यक्रम असतो, त्यात सगळ्या जगाची पर्यटनस्थळे दाखवतात. ती बघून डोळ्यांचे पारणे फिटते. आणि जाहिरात करणार्यांना पण काय काय सुचते बघ.
`घरातून कुठेतरी निघून जावेसे वाटतंय ना! उगाच डोक्यात राख घालू नका आमची युरोपची टूर बुक करा! आनंद घ्या.
मला खरंच कौतुक वाटत रहाते. तुझ्याकडे प्रवासवर्णनाचे नवे पुस्तक असेल तर पाठव, कळावे.
तुझाच
अनंत अपराधी