ब्रिटिश युवराज ‘हॅरी’ याच्या आठवणींचं ‘स्पेयर’ हे पुस्तक सध्या खूप चर्चेत आहे. मुळातच ‘टांग टिंग टिंगाक’ म्हणत नाचणारी कांदा संस्थानची राणी बघितल्यापासून मला मुळातच राजघराण्याविषयी काही लिहिलं असेल ते विनोदीच असेल असं उगाचच वाटतं. पण या पुस्तकाचा विक्रमी खप बघितला. ज्या दिवशी पुस्तक प्रकाशित झालं त्याच दिवशी ब्रिटनमध्ये या पुस्तकाच्या चार लाख प्रती तर जगभरात सुमारे १४ लाख प्रती विकल्या गेल्या. ही एवढी विक्री म्हणजे पुस्तक नक्कीच विनोदी नसावं. हल्ली विनोदी पुस्तकांच्या मागणीवरून हा अंदाज सहजच येतो. मग विचार केला की का बरे हॅरी काय म्हणतो ते वाचण्याची उत्सुकता लोकांना वाटली असेल? तर उत्तर मिळालं की अरे हे म्हणजे ‘दुसर्याचं पाहावं वाकून’ अशी अवस्था आहे. कदाचित राजघराणे आहे, त्यातील लोक कसे वागतात, काय खातात, काय बोलतात याबद्दल लोकांना उत्सुकता वाटली असावी.
या घराण्यातील राणीबद्दल उत्सुकता तशी सगळ्यांनाच आहे. म्हणजे आमच्या घरी तर पैजच लागली होती. आधी काय संपतं? ‘तारक मेहता’ मालिका की ब्रिटनची राणी. अजूनही बरेच प्रश्न जनतेला पडलेले असू शकतात. म्हणजे आज भाजीमध्ये शेपूची भाजी बनवावी की कारल्याची, असा प्रश्न राणीला पडतो का? नवरा म्हणजे राजा आज ३१ डिसेंबरच्या पार्टीत पुन्हा दारू पिऊन धिंगाणा घालतो की काय? त्यामुळे त्याला आज आपली शपथ घालून थांबवावे की मुलाची? हल्ली दुधात भेसळ खूप येऊ लागली आहे, त्यामुळे गवळ्याकडचे दूध बंद करून पिशवीचे लावावे की काय? बाहेर जाताना किल्ल्या कुठल्या शेजार्यांकडे ठेवाव्यात? राजाबद्दलही काही उत्सुकता वाटलीच असावी. आज मित्र बोलवायला आले आहेत, बायको जाऊ देईल की नाही? फुटबॉलमध्ये कुठली टीम जिंकेल? पावसाळा आल्यावर छत्र्या काढून ठेवाव्यात का, राखीव म्हणून ठेवलेल्या चड्ड्याही बाहेर काढून ठेवाव्यात का? अमुक एका परदेशी स्त्रीला बघून आपण ‘टवका’ म्हणालो ते राणीने ऐकले तर नसेल?
असे वा या प्रकारचे काही प्रश्न या राजघराण्यातील लोकांना पडले असतील काय, याची उत्सुकता लोकांना वाटली असावी. त्याचे उत्तर तपासून बघण्याकरिता हॅरीचे पुस्तक इतके खपले असावे असा माझा कयास आहे.
मुळातच माणसाला दुसर्याच्या आयुष्यात डोकावायला अतिशय आवडतं. हा माणसाचा मूलभूत स्वभाव म्हटलं तरी चालेल. आमच्या ऑफिसमध्ये एक शिपाई होता. पलीकडच्या टेबलावर काय चाललंय याची खबर अलीकडच्या टेबलावर देण्यामधून तो त्याच्या पगारापेक्षा जास्त पैसे कमवायचा. बरेच लोक याला भोचकपणा म्हणतात. पण मी याला चौकस वृत्ती म्हणेन. वाटली एखाद्याबद्दल उत्सुकता. कुठे बिघडलं? केली थोडीशी चौकशी, कुठे बिघडलं? ते ऐकून एखाद्याशी बोलता बोलता सांगितल्या याच्यात्याच्याबद्दल दोन चार गोष्टी. कुठे बिघडलं?
माणसाची चौकस वृत्ती नेहमी जागृत राहायला हवी असा मेसेज नुकताच मला एका मित्राने व्हॉट्सअपवर पाठवला होता. त्यातून त्याच्या मेंदूच्या नसांना व्यायाम मिळत राहतो आणि त्यामुळे त्याचा रक्तप्रवाह खेळता राहतो. परिणामी त्याला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते. म्हणजे बघा. एकमेकांच्या आयुष्यात डोकावल्याने, थोडीबहुत चौकशी केल्याने, इकडची खबर तिकडे केल्याने जर जगातील हृदयविकाराचे प्रमाण कमी होणार असेल तर मग याबद्दल एक अभ्यासक्रम तयार व्हायला हवा असे माझे मत आहे.
सतत एखाद्यावर चौकस नजर ठेवणे, त्यातून दुसर्या कोणाला तरी सांगण्यासारखी गोष्ट काढून घेणे हे अजिबातच सोपे नाही हो महाराजा. त्यासाठी कितीतरी श्रम पडतात, केवढा तरी वेळ खर्च करावा लागतो. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त संवाद साधता येण्याचे कौशल्य अंगी आणावे लागते. हे सगळं एखाद्या अभ्यासक्रमापेक्षा कमी थोडेच आहे? म्हणूनच चौकस बुद्धी यावर एखादा अभ्यासक्रम तयार करून विद्यापीठात संशोधनासाठी ठेवायची विनंती करणारे पत्र मी लवकरच पाठवावे म्हणते.
पण, एका गोष्टीची उकल काही मला अजून झालेली नाही. स्वतःच्या आयुष्यातील गॉसिप हॅरीने कसे काय लिहिले? म्हणजे आपल्याकडे कसे ‘फक्त तुला म्हणून सांगते’ असे म्हणत बायका दुसर्याच्या आयुष्यातील सगळं सांगत राहतात. स्वतःच्या घरात कसं सगळं आलबेल चालू आहे, आम्ही कसे जगातील सर्वात आनंदी कुटुंब आहोत हे दाखवण्यासाठी सहलीचे फोटो, लव्ह यू बायको, वर्ल्डस बेस्टेस्ट हबी असे म्हणत फोटो डकवणे जिथे चालू आहे, तिथे स्वतःच्या आयुष्यातील अनागोंदी हा ‘हर्या’ का दाखवून देतोय?
फक्त सर्वसामान्य माणूसच नव्हे तर अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरही तेच दाखवणे चाललेले असते. आपल्या देशात लोकांना द्यायला वीज नसेल, खायला रोटी नसेल, पण भारताच्या जीडीपीमधील अर्धा टक्का कमी झाला म्हटलं की पाकिस्तानला कोण आनंद होतो. माझ्या घरातील हत्ती आजारी असला तरी तुझ्या घरातील उंदराला शिंक आली म्हणून आनंदी होण्यासारखं आहे हे.
सोशल मीडियावर सतत कोणाच्या तरी आयुष्यात डोकावायची सवय लागलेल्या लोकांना बघून मला प्रश्न पडला की जेव्हा सोशल मीडिया नव्हता तेव्हा माणसात ही प्रवृत्ती नव्हती काय? यावर चर्चा करण्यासाठी मी आमच्या हिम्मतवाडी महिला मंडळाची सभा बोलावली. पहिले पावणेदाेन तास उपस्थित नसलेल्या बायकांवर चर्चा केल्यावर मग आम्ही या प्रश्नाकडे वळलो. खूप चर्चेअंती असे लक्षात आले की आधीच्या काळी बायकांसाठी पाणवठा, गिरणी, हळदीकुंकू तर पुरुषांसाठी चावडी, पानाचा ठेला असे एकमेकांच्या आयुष्यात डोकावण्याचे अड्डे होते.
चौकस वृत्ती ही माणसाची मूलभूत गरज असावी असे मला वाटते. म्हणूनच रशिया- युक्रेन, भारत-पाकिस्तान, इस्त्रायल-
पॅलेस्टाईन अशा ज्वलंत विषयांत अमेरिका नेहमी पडत राहते. त्यांच्याकडे वर्णभेद, वंशभेद आहे हे त्यांना विसरायलाच होतं. म्हणजे अगदी शाळेतील मुलांमध्ये चाललेला हिंसाचारही या सगळ्यापेक्षा दुर्लक्षित करण्यासारखा विषय असावा. इतक्या अपार उत्सुकतेने आणि उदार भावनेने अमेरिका सगळ्या भांडणांचा बिमोड करते म्हणून आपण खरं तर त्यांचे आभार मानायला हवेत. त्यासाठी प्रेरणा म्हणून अजून शे-पाचशे हुशार भारतीय तिकडे सल्ला देण्यासाठी पाठवून द्यायला हवेत.
अगदी भारतातील उदाहरणे बघा. राजकीय पक्ष बघा. आपल्या पक्षातील अमुक आमदारावर फक्त १०० कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे, तमुकने तर ५०० कोटी केलाय. त्यामानाने आमचे काहीच नाही असे म्हणून ते आपलं समाधान करतात.
अमुक धर्माच्या माणसाने एवढे अत्याचार केले आहेत, त्या मानाने आम्ही जे करतोय ते धर्मरक्षणासाठी असे म्हणून आपलं झाकायचं ही प्रवृत्तीच दिसून येते.
सहज म्हणून विचारल्यासारखं करायचं आणि चौकशा करत बसायच्या हा तर मला वाटतं, भारतीय लोकांचा सगळ्यात आवडता छंद असावा. मागे एकदा मला माझ्या मैत्रिणीने बायकांच्या क्लबमध्ये नेले होते. तिथे माझ्या प्रवेशासाठी फॉर्म भरून घेतला. त्यात छंद विचारलेले होते. मी त्यात सामान्य माणसासारखं ‘गाणी ऐकणं, वाचन’ असे लिहिले. तर निघताना तिथल्या अध्यक्षीण बाईने माझ्या मैत्रिणीला सुनावले, ‘हिला पुन्हा घेऊन येऊ नको गं. काय तिचे छंद आहेत.’
मला गॉसिप करण्याचा, चौकशी करण्याचा छंद नाही. यामुळे मी त्या क्लबसाठी अपात्र ठरले होते.
‘फक्त तुला म्हणून सांगते’ हे वाक्य तर आपल्या राष्ट्रगीतात किंवा प्रतिज्ञेत वापरायला हवे असे माझे ठाम मत आहे. मी माझ्या एका आत्येबहिणीला सल्लादेखील दिला होता, ‘फक्त तुला म्हणून सांगते’ अशी रिंगटोन बनवून घे. ती हे वाक्य इतक्या वेळा वापरते की ते रेकॉर्ड केलं आहे की काय असे वाटावे. दुसर्याच्या आयुष्यात डोकावून त्याचं भलं करावं हा त्यामागचा एकमेव उद्देश आहे याबाबत मला अजिबात शंका नाही. दुसर्यांच्या आयुष्यात डोकावणे आणि स्वतःचे झाकून ठेवणे या छंदावर तर कित्येक कहाण्या घडल्या आहेत. मला सांगा, आपले शेजारी जर असे आपल्या आयुष्यात डोकावणारे नसतील तर त्यांच्या शेजारी राहण्याला काय अर्थ? २४ तास चाललेले बातम्यांचे चॅनल्स हे तर याच एकमेव तत्वावर चालू आहेत.
माझ्या एका शेजारणीला सारखी चौकशा करण्याची सवय आहे. तिला कंटाळून मी एकदा विचारले, ‘अगं का तू अशा चौकशा करत फिरतेस?’
तर म्हणाली, ‘आतापर्यंत लागलेले सगळे शोध हे माणसाच्या चौकस बुद्धीमुळे लागलेले आहेत. कल्पना कर जर ही बुद्धी नसती तर ना आज वीज असती, ना मोबाईल. ना आपण दळणवळणाचा शोध लावला असता ना गुरुत्वाकर्षणाचा. आपण फोन केला की एकमेकांना आधी काय विचारतो, कसं चालू आहे, काय चालू आहे? ही चौकशी नाही तर काय आहे? माणूस चौकस असणं हे त्याच्या जिवंत असण्याचं लक्षण आहे अगं. दुसर्यांच्या घरात डोकावणे हा माझा धर्म आहे आणि तो मी निभावणारच.’
तिच्या या वाक्याने मला एकदम साक्षात्कार झाल्यासारखं वाटलं. त्यामुळे यापुढे ती चौकशीला येईल तेव्हा हारतुर्यांनी तिचं स्वागत करावं असं मी ठरवलेले आहे.