कमिशनर ऑफिसमधली प्रचंड धावपळ, गर्दी सगळे काही टाळत इन्स्पेक्टर खान कमिशनर साहेबांच्या ऑफिस समोर उभा ठाकला होता. त्याला का बोलावले असेल याची त्याला पूर्ण कल्पना होती आणि त्यासाठी तो सज्ज देखील होता.
‘मे आय…’
‘ये खान आत ये…’ कमिशनर साहेबांचा करारी आवाज कानी पडला आणि खान आत शिरला. मुस्तफा खान म्हणजे कमिशनर साहेबांचा लाडका माणूस अशी सगळ्या पोलीस दलात चर्चा होती. कोल्हापूरमध्ये प्रमोशनवर बदली होण्यापूर्वी त्याने साहेबांच्या हाताखाली बरेच काम केले होते. दोघांची प्रमोशनवर बदली एकाचवेळी झाली होती हे देखील विशेष.
‘खान कोल्हापुरात तिसरा खून झालाय. करताय काय तुम्ही?’
‘सर हे प्रकरण थोडे वेगळे आहे. खून झालेले तिन्ही इसम हे स्कूल बस चालक होते. त्यांची पार्श्वभूमी आम्ही तपासतो आहोत. पण सध्या तुम्हाला काही ठोस सांगता येईल असे माझ्या हातात काही नाही.’
‘खान हे तू बोलतो आहेस?’ कमिशनर साहेबांचा आवाज आता जरा चढला होता.
‘माफ करा सर, पण हे खरे आहे. तिन्ही बसचालक वेगवेगळ्या शाळांचे आहेत आणि ते एकमेकांना ओळखत देखील नव्हते. आम्ही त्यांच्या युनियनशी देखील बोललो आहोत.’
‘खान यात काही सीरियल किलिंग किंवा सायकोचा संबंध?’
‘आम्ही तपास करतो आहोत सर. खरे सांगायचे तर मी देखील थोडा गोंधळलो आहे सर. या तिन्ही लोकांचे कोणाशी कधी वाद अथवा भांडण झाले आहे किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे असे देखील नाही. तिघांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट बघूनच त्यांना नोकरी देण्यात आलेली होती. ’
‘खान इतक्यात कुठल्या स्कूल बसचा अपघात झालाय? किंवा त्यात कोणाचा लहानगा दगावला वगैरे?’
‘मी तो पण अँगल तपासला सर. गेल्या वर्षभरात कोल्हापुरात तीन स्कूलबसचा अपघात झालाय. पण किरकोळ जखमा आणि वाहनाचे नुकसान यापलीकडे फारसे काही गंभीर झालेले नाही.’
‘खान, मी तुला दोन दिवस देतोय. माझ्या हातात काहीतरी ठोस हवे आहे. मीडियावाले प्रचंड गदारोळ करत आहेत. मला खुद्द खासदार, गृहमंत्री यांचे देखील फोन येऊन गेले आहेत. आय वॉन्ट रिझल्ट! यू मे गो नाऊ!’
चडफडत मुस्तफा बाहेर पडला. आजवर कमिशनर साहेबांनी या शब्दांत कधी त्याचा ’सत्कार’ केला नव्हता. पिसाळलेला मुस्तफा खान सरळ बुलेटला वेग देत चौकीत पोहोचला आणि त्याने तिन्ही खुनांची फाइल समोर काढली.
पहिला खून गुलाब चव्हाणचा. स्कूल बस ड्रायव्हर, मेगा स्कूल. दुसरा खून प्रदीप म्हात्रे, युरो स्कूल. तिसरा खून मेघनाद गुळवे, आकांक्षा स्कूल. तिघांचा एकमेकांशी काही संबंध नाही. तिघेही संसारी आणि कोणाच्या अध्यात ना मध्यात. तिघांचे खून एकाच प्रकारे झालेले, गळ्यावर सुरा फिरवून. झटापटीच्या काही निशाण्या नाहीत किंवा इतर कुठले पुरावे नाहीत. सराईत खुनी म्हणावा तर तो असे स्कूल बसचालकांचे खून का आणि कशासाठी करत असेल? कोणी सायको असेल तर तो बसचालकांना लक्ष्य का करत असेल? गेल्या वर्षभरात कुठल्याही बसचालकाने कुठलाही गंभीर अपघात केलेला नाही किंवा कुणाला दुखापत देखील झालेली नाही. मग हे नक्की चालले काय आहे?
’जाधव..’ खानने वैतागून आवाज दिला आणि हवालदार जाधव धावत आत शिरले.
‘जाधव, या तिन्ही लोकांची पूर्ण माहिती मी काढायला सांगितली होती. काय झाले?’
‘पूर्ण माहिती काढली आहे सर. यातले दोघे जण कोल्हापुरात जन्माला आले आणि इथेच आहेत. फक्त गुळवे आधी सातार्यात होता आणि वर्षभरापूर्वी कोल्हापुरात स्थायिक झाला. त्याचे सातार्यातील रेकॉर्ड तसे साफ आहे. पण तो ज्या मित्रांबरोबर असायचा त्यातल्या दोघांना खुनाच्या केसमध्ये चौकशीसाठी आत घेतले होते. पण ते पुढे निर्दोष निघाले.’
‘बाकी दोघे?’
‘चव्हाण आणि म्हात्रे मूळचे कोल्हापुरातील. चव्हाणला दोन मुले आहेत अन दोघेही महानगरपालिकेच्या शाळेत शिकतात. बायको फॉल पिकोचा व्यवसाय घरातून करते. म्हात्रेची बायको एका पापड बनवणार्या कंपनीत कामाला आहे, त्याला मूलबाळ काही नाही.’
‘शेजारी पाजारी काही वाद किंवा शाळेतल्या इतर चालकांशी काही वाद?’ हा प्रश्न खरेतर आपण का विचारतोय हेच खानला कळत नव्हते. एकाचे वाद असतील देखील पण म्हणून इतर दोघांचे खून त्याच कारणाने का होतील? स्वतःवरच संतापत खान सरळ उठला आणि बुलेटला किक मारून बाहेर पडला. एखादी गोष्ट उलगडत नसेल, मन द्विधा असेल तेव्हा तो हेच करायचा. बुलेटला किक मारायची अन सरळ हायवे पकडायचा. डोके तर थंड व्हायचेच, पण त्याबरोबर नवे काही विचार देखील वार्या.सोबत डोक्यात शिरायचे. आपण कुठेतरी काहीतरी मिस करतोय असे त्याला सारखे जाणवत होते, पण काय ते लक्षात येत नव्हते. शेवटी शहराची हद्द संपत आली तसा तो भानावर आला आणि परत फिरला.
‘जाधव, एक काम करा, या तिघांच्या कुटुंबातले लोक, जवळचे मित्र सगळ्यांची हिस्ट्री काढा. यांच्या बायकांचे, जवळच्या मित्रांचे, नातेवाइकांचे फोन रेकॉर्ड ट्रेस करण्याची परवानगी वरिष्ठांकडे मागा. हे तिघेही जिथे राहतात त्या एरियात आपले कोण खबरी आहेत? त्यांना कामाला लावा. छोट्यातील छोटी गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचली पाहिजे.’
‘मी लगेच कामाला लागतो सर. खबरींना मी कल्पना दिली आहेच.’
कमिशनर साहेबांनी दिलेल्या मुदतीचे आता फक्त बारा तास उरले होते आणि अजूनही खानच्या हाताला काहीही लागलेले नव्हते. अक्षरशः पिसाळलेल्या वाघासारखा तो गाव पालथे घालत होता. अचानक त्याचा फोन वाजला आणि त्याने गाडी कडेला घेतली.
‘सर, जाधव बोलतोय. दोन खबरी आल्या आहेत. म्हात्रेच्या बायकोचे आणि त्याचे खुनाच्या तीन दिवस आधी जोरदार वाद झाले होते आणि दुसरी खबर म्हणजे गुळवे, जो आधी सातार्यात होता, त्याचा खून प्रकरणातला मित्र खुनाच्याच दिवशी त्याला भेटायला आलेला होता. त्याचे नाव आणि पत्ता मी तुम्हाला मेसेज करतोय.’
‘पत्ता?’
‘सर, तो अजून कोल्हापुरातच आहे. रंकाळ्याजवळच्या हॉटेलात उतरलाय. मी एक पोलीस टीम तिकडे रवाना केली आहे.’
‘वाह! गुड जॉब जाधव,’ जाधवचे कौतुक करता करता खान बुलेटला किक मारत रंकाळ्याच्या दिशेने सुसाट सुटला देखील होता.
समोर हॉटेलच्या रूममध्ये जेरबंद केलेल्या इसमाकडे खान एकटक पाहत होता. चेहर्यावरून माणूस अत्यंत कपटी आणि नीच जाणवत होता. त्यात कपाळावर असलेल्या जखमेच्या खुणा बरेच काही सांगून जात होत्या.
‘नाव?’
‘प्रताप घुले.’
‘कोल्हापुरात कशासाठी आला होतास?’
‘अंबाबाईच्या दर्शनाला आलो होतो साहेब. पण हे सगळे काय आहे? माझी अशी चौकशी का चालू आहे?’
‘अंबाबाईच्या दर्शनाला आला होता का गुळवेला संपवायला?’
‘गुळवे कोण साहेब?’
‘गुळवे कोण… जाधव, काठी घ्या जरा..’
‘हां हां… मेघनाद होय. साहेब, त्याची माझी खूप वर्षं भेट नाही, म्हणून मग भेटायला गेलो होतो साहेब.’
‘भेटायला का खून करायला?’
‘खून?’ घुलेचा चेहरा आता खरंच पांढरा पडला होता. त्याने सरळ शेजारच्या टेबलवरचा पाण्याचा जार तोंडाला लावला.
‘तुला माहिती नाही?’
‘शपथ सांगतो साहेब, मला यातली काही कल्पना नाही. त्याचा खून झालाय हे मला तुमच्याकडून कळतंय.’
‘जाधव, अंबाबाई मंदिराचे सीसीटीव्ही फुटेज मागवा. हा कोणत्या वेळी दर्शनाला गेला होता ती वेळ तपासा. हा दिसतोय का बघा आणि नसेल दिसत तर सरळ उचला याला.’
‘साहेब ऐका ना.. साहेब माझे बोलणे तर ऐका..’
‘आता कॅमेरा बघितला की मग तुझे बोलणे ऐकतो मी.’
‘साहेब, मी दर्शनाला नव्हतो आलो.’
‘शाबास! बोल आता घडाघडा…’
‘साहेब, मी खरं सांगतो, पण मला अडकवू नका प्लीज.’
‘तू बोलायला तर लाग…’
‘साहेब, गोव्यातून दारूचा
स्टॉक मुंबईत न्यायचा होता. सगळं काम बेकायदा. ऐनवेळी माझ्या ड्रायव्हरने हात वर केले, शेवटी मी मेघनादकडे धावलो, पण त्याने स्पष्ट नकार दिला. शेवटी मी मुंबईचाच नवा ड्रायव्हर पकडला. तो कोल्हापुरात यायची वाट बघत मी इथे लपून राहिलोय. मी मेघनादशी परत संपर्क देखील केला नाहीये.’
‘जाधव, हा देतोय ती माहिती खरी आहे का तपासा आणि जरा देखील शंका आली तरी याला सरळ आत घ्या.’
जाधवांना सूचना देऊन खान बाहेर पडला, पण घुलेचा या सगळ्याशी काही संबंध नसावा हे त्याला जाणवत होते. गाडी वळवत तो चव्हाण हॉटेलकडे वळला आणि पानाच्या टपरीमागे उभा राहिला. त्याला तिथे पाहून काही वेळातच तिथला खबरी बच्चु टपरीपाशी हजर झाला. सिगारेट शिलगावत बच्चू त्याच्या शेजारी उभा राहिला आणि कोणाला कळणार नाही अशा प्रकारे दोघांचा संवाद चालू झाला.
‘बोल बच्चू…’
‘साहेब, म्हात्रेच्या खुनाच्या तीन दिवस आधी म्हात्रे आणि त्याच्या बायकोत जबरदस्त भांडण झाले होते. पार शेजारी पाजारी मध्ये पडले तेव्हा सगळे थांबले.’
‘भांडणाचे कारण?’
‘बाबल्या शिंदे.’
‘हा कोण आता? सविस्तर सांगत जा रे बाबा..’
‘हा बाबल्या शिंदे म्हात्रेचा मित्र पण आहे आणि त्याच्या बायकोचा सुमनचा मालक पण आहे. पापडाचा कारखाना चालवतो हा शिंदे. सुमन तिथेच कामाला आहे.’
‘मग असे असताना वाद कशाला?’
‘हा बाबल्या आपल्या नवर्याला व्यसनी बनवतोय, भिकेला लावतोय अशी तक्रार होती सुमनची.’
‘चल पळ तू. संध्याकाळी जाधवांकडून तुझे पैसे घेऊन जा., बच्चुला कटवून खानने सरळ म्हात्रेच्या शाळेची वाट धरली. इथे देखील फारसे काही हाताला लागेल असे त्याला वाटत नव्हते. राहून राहून त्याला गुलाबची शंका येत होती. या माणसाचे
रेकॉर्ड इतके साफ कसे? खबर्यांना देखील काही माहिती मिळू नये? हा माणूस खरा पुण्यवान आहे का महाचालू?
‘नमस्कार, नाडकर्णी साहेब. शाळेच्या बसेसचे सगळे व्यवस्थापन आपणच बघता ना?’
‘हो साहेब.’
‘या म्हात्रेबद्दल काय सांगाल? दारू किंवा इतर काही व्यसन?’ तो रोज रात्री बेसुमार प्यायचा हे खरे होते?’
‘साहेब, सकाळी सहाला स्कूलबस घेऊन बाहेर पडायला लागायचे त्याला. तो जरा जरी नशेत दिसला असता, तर माझ्या लक्षात आले नसते का? साहेब, २५ वर्षे या कामात आहे मी. कोणताही ड्रायव्हर कितीही चलाख असू दे, माझ्या नजरेतून त्याचे व्यसन सुटणार नाही.’
‘म्हणजे म्हात्रे सज्जन माणूस होता तर.’
‘असेही नाही सर, तो बरेचदा प्यायचा, पण दुसर्या दिवशीच्या ड्यूटीची जाणीव ठेवून हे नक्की. त्याच्या व्यसनाचा आणि कामाचा कधीच एकमेकांच्यात गोंधळ झाला नाही.’
खानची शंका खरी ठरली आणि पुन्हा एकदा निराशा मनात घेऊन तो बाहेर पडला. कुठेतरी काहीतरी हाताला लागेल ही आशा पुन्हा एकदा मावळली होती. रंकाळ्याचा गार वारा कानात शिरला आणि तो पुन्हा एकदा भानावर आला. तीन खून तिघांचे एकमेकांशी काही संबंध देखील नाहीत आणि काही धागेदोरे देखील नाहीत. कुठेतरी काहीतरी चुकतंय हे नक्की. या जाधवला पण नाही अक्कल… बिनकामाचा माणूस कुठला… मनातल्या मनात खान चडफडला आणि एकदम त्याची ट्यूब लकाकली. विनाकारण आपण त्या जाधवला कोसतो आहोत, कारण तो आपल्या हाताखाली कामाला आहे. पण मग असे विनाकारण ही म्हात्रेची बायको स्वत:च्या मालकाला का बोल लावत असेल? खानने तातडीने बुलेट कडेला घेतली आणि जाधवला फोन लावला.
‘जाधव, मला या बाबल्याचे फोन रेकॉर्ड आणि लोकेशन हिस्ट्री हवी आहे.’
‘लगेच कामाला लागतो सर.’
‘या या बाबल्या शेठ..’
‘साहेब एकदम चौकीत बोलावून घेतलेत?’
‘तुमचा सत्कार करायला हो.’
‘म्हणजे?’
‘कळेल… कळेल.’
‘आता मला सांगा बाबल्या शेठ १४ जून, १९ जून आणि २१ जूनला तुम्ही कुठे होतात?’
‘आता साहेब येवढे कोण लक्षात ठेवतो? होतो मी कोल्हापुरातच पण कुठल्या वेळी कुठे असणार ते कसे सांगायचे?’
‘मी दिवस विचारले, वेळा नाही बाबल्या. तुझ्या लक्षात नसेल पण तुझ्या मोबाइलच्या लक्षात सगळे असते बाबल्या.’
‘मी समजलो नाही साहेब…’
‘समजेल ते पण. जरा फोन दे तुझा..’
‘माझा फोन? का साहेब?’
‘अरे दे रे… लॉक उघडून दे.’
बाबल्याने फोन दिला आणि खानने समोरच्या कागदावरचा एक नंबर डायल करत फिरवला. काही वेळ रिंग वाजली आणि फोन उचलला गेला.
‘बाबू, आता काही दिवस फोन करायचे नाहीत असे ठरले होते ना? येवढी कळ सोसेना होय? एकदा महिना संपला की आहेच की मग…’
‘बाबू नाही बाबूचा बाबा बोलतोय मी, इन्स्पेक्टर खान!’ खानचे शब्द संपायच्या आतच पलीकडून ‘देवा रे..’ असे शब्द बाहेर पडले आणि फोन कट झाला.
– – –
‘पाहुणे आलेत साहेब,’ जाधव हसत म्हणाले. ‘आता आत आणा त्यांना..’
समोरासमोर बसलेले दोन्ही पाहुणे एकमेकांकडे बघण्याचे टाळत होते आणि त्यांची चलबिचल पूर्ण चौकी निवांत बघत बसली होती. शेवटी खानने एक जांभई दिली आणि बाबल्याच्या खुर्चीवर काठी आपटली.
‘बाबल्या… तू बोलायला लागतो आता की माझी काठी बोलायला लागू दे?’
‘कशाबद्दल साहेब?’
‘मी याचे उत्तर देऊ का तू देतेस सुमन?’ खाडकन खानने विचारले आणि समोरच्या खुर्चीत बसलेली सुमन प्रचंड दचकली.
‘मी सांगतो साहेब..’ कापर्या आवाजात बाबल्या बोलला आणि खानची खुर्ची तिकडे वळली.
‘साहेब, म्हात्रे खरंच देवमाणूस होता. पूजाअर्चा, उपवास अन् साधना हेच त्याचे आयुष्य होते. आपल्याला मूल होत नाही याचे त्याला वैषम्य होते, पण देवाची मर्जी मानून त्याने ते देखील स्वीकारले. पण सुमन मात्र नातेवाईकांच्या टोमण्याने हताश झाली होती, तिला कूस भरून हवी होती. अशातच ती माझ्याकडे कामाला लागली आणि तिची बेचैनी मी अचूक ओळखली. काही दिवसातच आमचे सूत जुळले आणि मी म्हात्रेला देखील मैत्रीच्या जाळ्यात ओढले. मी सडाफटिंगच होतो आणि त्यात सुमन आयुष्यात आली. एकवेळ अशी आली की, आम्ही एकमेकांशिवाय जगण्याची कल्पना देखील करू शकत नव्हतो. मात्र आमच्या मार्गातला मुख्य अडथळा होता तो म्हात्रे. तो सहजासहजी सुमनला सोडायला तयार झाला नसता. शेवटी आम्ही त्याला मार्गातून बाजूला काढायचे ठरवले. कोणाला शंका येणार नाही अशा प्रकारे हे सगळे करायचे होते. मग खूप विचार करून आम्ही एक प्लॅन आखला, नीट पाळत ठेवून आम्ही दोन बसचालकांना हेरले आणि संधी साधून त्यांना संपवले. मग योग्य वेळी म्हात्रेचा देखील काटा काढला. हे सगळे खून माथेफिरूने केले असावेत याच चक्रात पोलीस फिरत राहतील असा आमचा अंदाज होता. पण…’