नोव्हेंबर १९९४मध्ये नाशिक येथे शिवसेनेचे शिबिर झाले होते, तेव्हा आई जगदंबेला ‘दार उघड बये दार उघड…’ असे साकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घातले होते. मग १९९५ साली महाराष्ट्र विधानभवनावर शिवसेनेचा भगवा फडकला होता, याची आठवण जागवणारे शिवसेनेच्या पदाधिकार्यांचे अधिवेशन नाशिक येथे नुकतेच पार पडले. याही अधिवेशनात आणि जाहीर सभेत ‘दार उघड बये दार उघड’ असे साकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदिशक्ती जगदंबेला घातले. यावर्षी होणार्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळण्याचे हे शुभसंकेत आहेत.
नाशिकच्या हॉटेल डेमोक्रेसीमध्ये पार पडलेल्या पदाधिकार्यांच्या अधिवेशनात आणि अनंत कान्हेरे पटांगणात पार पडलेल्या जाहीर सभेतल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि मिंधे सरकारवर तोफ डागून समाचार घेतला. प्रभू रामचंद्र ही एका व्यक्तीची किंवा एका पक्षाची मालमत्ता नाही. तसे कुणी करत असेल तर भाजपमुक्त प्रभू श्रीराम करावाच लागेल, असे त्यांनी ठणकावून सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने महाराष्ट्राच्या मातीत तेज जन्माला आले आहे. या मातीत शिवरायांच्या तेजाचे अंश आहेत, कण आहेत ते महाराष्ट्रभर घेऊन जा. पुन्हा महाराष्ट्राला पेटवा, महाराष्ट्र जगवा, असे आवाहन जमलेल्या शिवसेना पदाधिकार्यांना त्यांनी केले.
१९८४ सालापासून शिबीर/अधिवेशन भरवण्याची प्रथा शिवसेनेने सुरू केली. शिबिरे काय किंवा अधिवेशन काय, प्रतिनिधींना वैचारिक खाद्य असतं. तसेच विविध सामाजिक-राजकीय विषयांवर राजकीय नेत्यांनी केलेले विचारमंथन असते. ही शिबिरे-अधिवेशने म्हणजे शिवसेनेचे विचारमंथन होय. अधिवेशनात मागील काही वर्षांच्या पक्षीय कार्याचा धांडोळा घेऊन नेते मंडळी भविष्यातील रूपरेषा ठरवतात. पक्षातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांना शिबिरात जोमाने कार्य करण्यासाठी, पक्षीय बांधणी मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण केले जाते.
१९६६मध्ये शिवसेनेची स्थापना झाली. परंतु शिवसेनेचे पहिले अधिवेशन भरवायला १९८४ साल उजाडलं. शिवसेनेचे पहिले अधिवेशन २२ व २३ जानेवारी १९८४ रोजी दादरच्या स्वा. सावरकर स्मारकात संपन्न झाले. या अधिवेशनात महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून पदाधिकारी, लोकप्रतिनिधी अशा सुमारे ५००० शिवसैनिकांनी उपस्थिती लावली. शिवसेनेला अधिवेशन घेणे ही संकल्पना नवीन होती. त्याआधी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी मुंबईत विभागीय शिबिरे आयोजित केली होती. पहिल्या अधिवेशनात लोकसत्ताचे संपादक माधव गडकरी आणि विद्याधर गोखले यांनी ‘मुंबई वाचवा’ या परिसंवादात सहभाग नोंदवला. तर ‘शिवसेनेकडून अपेक्षा’ या विषयावर कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, गोदी कामगार नेते एस. आर. कुळकर्णी, थोर विचारवंत प्रा. धों. वि. देशपांडे यांनी परखड मतं मांडली. कम्युनिस्टांशी हाडवैर असतानाही शिवसेनाप्रमुखांनी कम्युनिस्ट नेते कॉ. डांगे यांना शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले होते. बाळासाहेबांनी नेहमीच पत्रकारांचा, विचारवंतांचा सन्मान राखला, हे त्यांच्या या कृतीने अधोरेखित होते.
१९८४ नंतर दोन आणि तीन नोव्हेंबर १९८५ रोजी ‘मुंबई जिंकली, घोडदौड महाराष्ट्रात!’ ही घोषणा देत शिवसेनेचे दुसरे अधिवेशन महाड येथे संपन्न झाले. या अधिवेशनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईबाहेर महाराष्ट्रात शिवसेना वाढवण्याचा निर्धार केला. या अधिवेशनात शाहीर कृष्णराव साबळे यांच्या महाराष्ट्र गीताने शिवसैनिकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले, तर प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या अस्खलित मराठी भाषेमुळे सारा सभामंडप मंत्रमुग्ध झाला.
३० आणि ३१ डिसेंबर १९८८ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या एस. पी. महाविद्यालय प्रांगणात शिवसेनेचे तिसरे महाराष्ट्रव्यापी संपन्न झाले. ‘हिंदुत्वाची बुलंद गरज, शिवसेना शिवसेना’ या घोषणेने परिसर दुमदुमून गेला. पुण्यनगरीत हिंदुत्वाचा जागर केला गेला. ४ आणि ५ जून १९९४ रोजी दोन दिवसाचे तुळजापूर येथे महिला आघाडीचे अधिवेशन संपन्न झाले.
या अधिवेशनाचे उद्घाटन माँसाहेब मीनाताई ठाकरे यांनी केले. ‘तुळजाभवानी माते आम्हाला शक्ती दे, यश दे. महाराष्ट्रात विधानभवनावर भगवा फडकेल तेव्हा माते, तुझी खणानारळाने ओटी भरायला मी येईन,’ असे साकडे माँसाहेबांनी घातले.
१९९५ साली महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक होणार होती. त्याआधी १७ नोव्हेंबर १९९४ रोजी नाशिक येथे शिवसेनेचे चौथे राज्यव्यापी अधिवेशन उत्साहात, जल्लोषात, दमदारपणे पार पडले. विधानसभा निवडणुकीपूर्वीचे हे अधिवेशन असल्याने शिवसेनेच्या वचननाम्याचे प्रकाशन शिवसेनाप्रमुखांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते म्हणाले, ‘शिवसेनेच्या राजवटीत शेतकरी राजा होईल आणि मायभगिनी निर्भय होतील हेच शिवसेनेच्या विचारनाम्याचे सार आहे.’ सुखी, समृद्ध, भ्रष्टाचारमुक्त आणि स्वाभिमानी महाराष्ट्र हाच शिवसेनेचा वचननामा! या नाशिकच्या यशस्वी अधिवेशनानंतर शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला. ‘हर हर महादेव’ म्हणत शिवसैनिक विधानसभेच्या निवडणुकीत उतरला. त्यामुळे अवघ्ाा हल्लाकलोळ माजला. नंतर भगवामय वातावरणात निवडणुका झाल्या आणि ११९५ साली महाराष्ट्राच्या विधान भवनावर प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकला. शिवसेनेचे प्रिं. मनोहर जोशी हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.
११ नोव्हेंबर २००० रोजी विदर्भातील अमरावती येथे शिवसेनेचे महाशिबिर संपन्न झाले. उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार व पुढाकाराने हे शिबीर पार पडले. यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून एकूण ५० हिंदुत्ववादी ज्योती अमरावतीमध्ये आल्या. ९ आणि १० एप्रिल २००२ रोजी शिर्डी येथे शिवसेनेचे शिबीर पार पडले. या शिबिरात शिवसेनेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या शिबिराचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. बाळासाहेबांनी समारोपाच्या भाषणात हिंदुत्वाच्या ज्वलंत विचारांचा वन्ही पेटवून नवीन चैतन्य दिले.
२००३ रोजी महाबळेश्वर येथे शिवसेनेचे महाशिबीर संपन्न झाले. शिवसेनेत वर्षानुवर्षे एकच पद होते ते म्हणजे शिवसेनाप्रमुख. या शिबिरात शिवसेना नेते आणि शिवसेनाप्रमुख यांच्यामध्ये ‘कार्यकारी प्रमुख’ हे पद घटनेत बदल करून निर्माण करण्यात आले. या महाबळेश्वरच्या शिबिरात उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या कार्यकारी प्रमुखपदी एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार हे पद निर्माण करण्यात आले होते. कार्यकारी प्रमुखपदी निवड झाल्यानंतर भावनाविवश उद्धव ठाकरे म्हणाले, ‘काही बोलावं तर आज शब्दच सुचत नाही. माझी माँ आज हवी होती. तुम्ही सर्वांनी जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे. त्याला मी तडा जावू देणार नाही.’
मा. शिवसेनाप्रमुखांच्या अनुपस्थितीत नाशिकमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखील राज्यव्यापी पदाधिकारी अधिवेशन संपन्न झाले आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिल्लीश्वराच्या सहाय्याने शिंदेंनी चोरले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या गद्दार सोळा आमदारांना पात्र ठरवत उफरटा न्याय दिला. लोकसभा निवडणूक उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस-पवार महायुती सरकारचा मनमानी कारभार चालू आहे. मुंबई-महाराष्ट्रातील उद्योग-धंदे गुजरातला पळवले जात आहे. तरी महाराष्ट्राच्या विकासाचा ढोल पिटवला जात आहे. पण प्रत्यक्षात महाराष्ट्र उद्ध्वस्त व भकास झाला आहे. शेतकर्यांच्या आत्महत्या थांबत नाही. त्यांना पीकविम्याचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. महाराष्ट्रात काही भाग दुष्काळाने होरपळला आहे. तर काही भागांवर अवकाळी पावसामुळे संकट कोसळले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचे आंदोलन सर्वत्र पेटले आहे. अशा महाराष्ट्रातील गोंधळ व अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुखांनी अधिवेशनात केलेले मार्गदर्शन व दाखवलेली दिशा शिवसैनिकांना, पदाधिकार्यांना जिंकेपर्यंत लढण्यासाठी बळ व ऊर्जा देणार आहे.
प्रभू श्रीरामांनी पंचवटीतूनच संघर्ष केला. अयोध्याइतकेच पंचवटीला महत्त्व आहे म्हणून पंचवटीची अधिवेशनासाठी निवड केली. भगूर (नाशिक) येथील स्वा. सावरकर स्मारकास भेट देऊन उद्धव ठाकरे यांनी स्वा. सावरकरांना अभिवादन केले तर नाशिकच्या काळाराम मंदिरात महापूजा आणि गोदावरी तीरी महाआरती केली. हे सर्व भविष्यातील शिवसेनेच्या विजयाचे शुभसंकेत आहेत. २०२४ साली होणार्या महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी विजयाचा शंखनाद करणारे हे अधिवेशन ठरणार आहे.