निताशा कौल या विद्वान महिलेला लेखिकेला जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीवर कब्जा करून बसलेल्या नेभळटांनी भारतात प्रवेश करू दिला नाही, बेंगळुरू विमानतळावरून तिची परतपाठवणी केली?
कोण आहेत निताशा कौल?
कोणी अंमली पदार्थांच्या स्मगलर वगैरे आहेत का?
सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी ज्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडत आहेत ते पाहता या गुन्ह्यासाठी आपल्या देशात कोणावर कारवाई होईल असे वाटत नाही. मुंद्रा पोर्टवर आलेल्या अंमली पदार्थांच्या तपासाचं पुढे काय झालं हे पुलवामा हल्ला कसा घडला, याइतकंच मोठं गूढ आहेच की अजून.
मग निताशा या इंडिया आघाडीच्या नेत्या असतील?
नाही. महत्त्वाच्या नेत्या असत्या तर त्यांना पक्षात घेऊन खासदारकी, आमदारकी, मंत्रीपद दिलं गेलं असतं. धाकदपटशाला बधल्या नसत्या तर ईडी, सीबीआय आहेतच.
मग, त्या नामचीन गुंड असतील?
नाही. तसं असतं तर त्यांचे महत्त्वाच्या नेत्यांबरोबर फोटो आले असते छापून आणि त्यांनी एखादी ‘कामगिरी’ही पार पाडली असती एव्हाना.
मग गुन्हा काय आहे निताशा यांचा?
त्या जागतिक पातळीवर नाणावलेल्या लोकशाहीच्या अभ्यासक आहेत, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टमिन्स्टरमध्ये लोकशाही अभ्यास केंद्राच्या प्रमुख आहेत आणि मोदी सरकारच्या धोरणांच्या टीकाकार आहेत. त्यांनी काश्मीरमधील महिलांची स्थिती इथपासून ते कलम ३७० हटवण्याची कृती किती फसवी आहे, इथपर्यंत अनेक गोष्टींवर टीकात्मक भाष्य केलं आहे.
हे भाष्य करण्याचा त्यांना काय अधिकार आहे, असा प्रश्न ४० पैसे शब्द या दराने कुठल्या तरी कोनाड्यात लपून, आपलं नावही उघड न करता छू म्हटलं की कुणावरही भुंकत सुटणारे पाळीव ट्रोल आणि बुद्धी गहाण ठेवलेले भक्त विचारू शकतात… तर त्या काश्मिरी पंडित आहेत आणि ज्या विषयावर बोलतात, त्याचा अभ्यास करतात; त्यासाठी आयटी सेलने बनवलेली फेक न्यूजची टूलकिट वापरत नाहीत, राजकीय अजेंडा रेटण्यासाठी बनवलेले बोगस सिनेमे बघून मतं बनवत नाहीत. त्या भारतीय पारपत्रधारक आहेत आणि त्या पारपत्रावर ब्रिटनचं नागरिकत्वही धारण करणार्या अनिवासी भारतीय आहेत.
सगळ्यात भयंकर भाग असा आहे की त्यांना याच देशाचा भाग असलेल्या कर्नाटक सरकारने भारतीय लोकशाही आणि भारतीय संविधान या विषयावर होणार्या परिसंवादात भाग घेण्यासाठी त्यांना बोलावलं होतं. भारत आणि कर्नाटक एकच आहेत ना? कर्नाटक हा भारताचा तैवान आहे का? कर्नाटकात निमंत्रित म्हणजे भारतातच निमंत्रित होत्या ना? कर्नाटकात काँग्रेसचं सरकार नसतं, तर हा प्रकार झाला असता का? त्यांच्या येण्याबद्दल काही आक्षेप होते तर त्यासंदर्भात आगाऊ सूचना देणं, हे कायदेशीर मार्गांनी करता आलं असतंच. ते टाळून विमानतळांवर संघसत्तेच्या बेटकुळ्या काढून दाखवण्याची गरज काय असावी? भारत हे एक संघराज्य आहे, त्यात राज्य सरकारांनाही तेवढंच महत्त्व आहे याचं भान कधीच सुटलेल्या संघराज्य सरकारने निताशा यांना विमानतळावर अडवून १२ तास एखाद्या कैद्याप्रमाणे कोठडीत डांबून ठेवलं. अन्न, प्रसाधन सुविधा मिळवण्यासाठी त्यांना झगडावं लागलं. आपल्याला का अडवलं आहे, हे कायदेशीर आहे का, या प्रश्नांचं एकच उत्तर होतं, दिल्लीवरून आदेश आहेत. १२ तासांनी त्यांची परत पाठवणी केली गेली.
या सगळ्या घडामोडी घडत होत्या, तेव्हा ध्रुव राठी या तरूण आणि लोकप्रिय यूट्यूबरचा ‘भारताची हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल’ या विषयावरचा व्हिडिओ ८० लाख लोकांपर्यंत पोहोचला होता आणि हा मजकूर तुम्ही वाचत असला तेव्हा तो एक कोटीपेक्षा अधिक लोकांनी पाहिलेला असेल. भारतात लोकशाही नाही, लोकशाही मार्गाने निवडून आलेली हुकूमशाही आहे, हे ध्रुवने त्या व्हिडिओमध्ये सप्रमाण सादर केलं आहे. परिसंवादात कदाचित निताशाही तेच म्हणाल्या असत्या. त्याची पुष्टी करणारीच ही घटना आहे. तिचे आंतरराष्ट्रीय पातळीवर काहीही पडसाद उमटले तरी काही हरकत नाही, अशा गुर्मीत मोदी सरकारने नेभळटांचं शौर्य गाजवून दाखवलं आहे.
आधीच देशाच्या सीमावर्ती भागांमध्ये अशांतता आहे. कलम ३७० हटवल्यानंतर अपेक्षित आकांक्षापूर्ती न झाल्याने लडाखचे नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. मणिपूरमध्ये २०० नागरिकांचे बळी गेल्यानंतर त्याला कारणीभूत ठरलेलं विधेयक मागे घेण्यात आलं. पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षाचं अस्तित्त्व नगण्य आहे, तर तिथल्या शेतकर्यांना खलिस्तानी देशद्रोही वगैरे ठरवून बिथरवण्याचे उद्योग सुरू आहेत. भाजपच्या फूटपाडू अजेंड्याला दक्षिण भारतात प्रतिसाद मिळत नाही, म्हटल्यावर तिथल्या सरकारांना त्यांचं कामच नीट करू द्यायचं नाही, अशा काड्या घालण्याचे उद्योग सतत सुरू आहेत. देशात आपलीच सत्ता राहावी यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सर्व मर्यादा उल्लंघून सुरू आहेत. त्यात देश अस्थिर झाला तरी चालेल, इथपर्यंत भाजपची वैचारिक घसरण झाली आहे.
या देशातली विविधता नाकारून एकात्मता कधीही साधणार नाही, हे ज्यांच्या लक्षात येत नाही, त्यांच्या भारताविषयीच्या आकलनाचं कुत्र्याचं शेपूट वाकडंच आहे, यात आश्चर्य काय? ते कोणत्याही नळीत घालून सरळ होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही.